उदासीनता हे सर्व आध्यात्मिक तत्त्वांचे सार आहे, असे स्वामी म्हणतात. आध्यात्मिक साधना करणार्याला उदासीनता नीट समजून घ्यावी लागते. त्यांचा अभ्यास करावा लागतो. समर्थ सांगतात, ती उदासीनता म्हणजे नैराश्य, उदासवाणेवाटणे नव्हे. उदासीनता याचा अर्थ विरक्ती म्हणजेच अनासक्ती, असा परमार्थमार्गात घ्यायचा असतो. अनेक भौतिक सुखसोयींच्या साधनांमुळे जगातील विविध गोष्टींची आसक्ती निर्माण होते. जीव त्यात गुंतून पडतो. ही बहिर्मुखता टाळून अभ्यासाने जीवाला अंतर्मुख विचारांकडे वळवले की, अनासक्तीचा पल्ला गाठता येतो. त्यामुळे स्वार्थ आणि अहंभाव कमी होऊ लागतात. अहंभावाबरोबर देहबुद्धी कमी होत जाऊन आत्मबुद्धीची पहाट उजाडते.
या सर्व प्रक्रियेत आपली वृत्ती मोकळी ठेवावी लागते, असे स्वामींनी मागील श्लोकात स्पष्ट केले आहे. तथापि सर्वसाधारण माणसाला मोकळीवृत्ती ठेवून राहता येत नाही. त्याची वृत्ती अहंभाव, स्वार्थ, वासना, कामना, इच्छा, दुराशा इत्यादीकांनी बांधलेली असते. स्वार्थाबरोबर द्वेष, मत्सर, क्रोध, संताप हे विकारही तेथे विराजमान होतात. या सर्व प्रकारात माणूस परमार्थातील आनंद व प्रसन्नता अनुभवू शकत नाही. यावर काय उपाययोजना करावी, हे आता समर्थ पुढील श्लोकातून सांगत आहेत.
नको वासना वीषईं वृत्तिरुपें।
पदार्थी जडे कामना पूर्वपापें॥
सदा राम नि:काम चिंतीत जावा।
मना कल्पनालेश तो ही नसावा॥५८॥
माणसाचे मन वायुस्वरुप असल्याने ते क्षणभरही स्वस्थ असत नाही. सारखे भटकत असते. मन हे बहिर्मुख असल्याने भौतिक विषयांची त्याला आवड उत्पन्न होते. माणसाला आनंद हवा असतो, पण तो कशाला शोधावा, हे त्याला समजत नाही. सर्वप्रथम माणसाचे मन वासनातृप्तीत आनंद शोधण्याचा प्रयत्न करते. सर्वसाधारण माणसाची देहबुद्धी पक्की असल्याने त्यांच्या ठिकाणी वासना प्रबळ असतात.वासना ही आनंद मिळवण्याचे साधन आहे, असे माणसाने मनातून ठामपणे ठरवले असल्याने विषय हे वृत्तिरुप ठरतात. वासना मनाला विषयोपभोगाकडे खेचून नेत असते. वासनेला तृप्तीसाठी इंद्रियांचा आधार घ्यावा लागतो. वासना इंद्रियांद्वारे उपभोग भोगत असते.
त्यामुळे आपला आनंद इंद्रियसुखात, भौतिक सुखात आहे, अशी बहुतेकांची कल्पना असते. हा विषयोपभोगाचा आनंद कसा असतो, हे सांगण्यासाठी ज्ञानेश्वरांनी आकाशात क्षणभर चमकणार्या विजेचा प्रकाश आपल्याला किती उपयोगी पडतो, तसा विषयाचा क्षणिक आनंद असतो, असे म्हटले आहे. हे विकारविषय, रोहिणी नक्षत्रात पडणार्या पावसाप्रमाणे किंवा स्वप्नातील दृश्याप्रकारे केवळ भासमान असतात, असेही ज्ञानेश्वरांनी म्हटले आहे. या माणसांना विषयोपभोगाच्या आनंदाव्यतिरिक्त इतर आनंदाची जाणीव नसते. ती माणसे इंद्रियांचा स्वभाव कसा असतो, ते ज्ञानेश्वर सुरेख शब्दांत सांगतात
या विषयांवाचून काही।
आणीक सर्वथा रम्य नाही।
ऐसा स्वभावचि पाही। इंद्रियांचा॥ (ज्ञानेश्वरी)
परंतु, इंद्रियांची विषयोपभोगाची क्षमता मर्यादित असते. क्षणैक आनंदाची अनुभूती मिळते न मिळते तोच दु:खेही पुढे उभी ठाकलेली असतात. वासना इंद्रियांना सोडत नाही. काही काळ इंद्रिये विषयांना कंटाळली तरी वासना त्यांना स्वस्थ बसू देत नाही. इंद्रिये थकली, तरी वासना थकत नाही. एकदा का वासना वृत्तीत मिसळली की, माणसाचा वासनेवर ताबा राहत नाही, अशी चिवट वासनावृत्ती सामान्य माणसाला भगवंतापासून अध्यात्मसुखापासून दूर घेऊन जाते.
त्यामुळे जीवबद्ध अवस्थेतून बाहेर पडू शकत नाही. या वासनेपासून सुटका हवी असेल, तर ही वासना नकोच, असा मनाचा निश्चय झाला पाहिजे. म्हणून स्वामी या श्लोकात सांगतात की, ‘नको वासना विषयी वृत्तिरुपे।’ मनाचा एक चांगला गुण असा की, मनाने जर एखादा दृढनिश्चय केला, तर तो मन पार पाडतेच. ही वासना जीवाच्या ठिकाणी कशी उत्पन्न होते, हे समर्थ श्लोकाच्या पुढील ओळीत सांगतात. उपभोग कालाच्या पूर्वानुभवात इंद्रियांनी ज्या अल्पसुखाची अनुभूती घेतलेली असते, त्याची आठवण जीव सतत जतन करुन ठेवतो. त्याला काळाचे बंधन नसते. त्यामुळे त्या स्मृती पूर्वजन्मीच्याही असू शकतात. ही वासना विविध दृश्य पदार्थांत अडकून पडलेली असते.
समर्थ म्हणतात की, पूर्वपापांमुळे वासना कामना ही दृश्यपदार्थाला चिकटून राहिलेली असते. ती तेथून सोडवता येत नाही. हे पूर्वपापामुळे घडते. समर्थांनी याठिकाणी ‘पाप’ या शब्दाचा प्रयोग का केला आहे, तेही पाहावे लागेल. अध्यात्म ज्ञानात विरक्तीतून वैराग्यातून आनंदाची प्राप्ती करून घ्यायची असते. त्या आनंदप्राप्तीत वासना अडथळा निर्माणकरते. म्हणून वासनेला अध्यात्मशास्त्रात ‘पाप’ म्हटले आहे. वासनेमुळे माणसाची कृती बर्हिमुख झाल्याने त्याच्या ठिकाणी दृश्यातील विषयांचा ओढा निर्माण होतो. त्याचा परिणाम म्हणून मन अंतमुर्ख होत नाही. तसे झाले की, अंतरंगातील स्वभावतः असलेले भगवंताचे वास्तव झाकोळून जाते.
भगवंताच्या अस्तित्वाची प्रचिती येत नाही. हृदयातील भगवंताची आठवण निघून गेल्याने मोठी दुरवस्था निर्माण होते. म्हणून स्वामी सांगतात की, पूर्वपापाने वृत्ती दृश्यपदार्थांना चिकटल्याने जीवाचे अधःपतन होते. हे सर्व कसे टाळता येईल, यासाठी त्यावर उपाय स्वामी पुढील ओळींतून सांगत आहेत. यावर रामबाण उपाय म्हणजे नेहमी निष्काम भावनेने रामाचे त्याच्या गुणांचे चिंतन करणे. रामाच्या चिंतनाने, रामनामाच्या जपाने पूर्व पापापासूनसुटका होते. वासना वृत्तीला चिकटलेली असते. ती हळूहळू मुक्त होऊन वृत्ती भगवंताच्या विचारांकडे वळू लागते. भगवंत कृपेने वृत्ती मोकळी झाल्याची त्याला अनुभूती येऊ लागते. उदासीनतेचा विरक्तीचा आनंद त्याच्या दृष्टिपथात येऊ लागतो.
त्याला मोकळेपणाने आयुष्य जगता येते. हा आनंद मिळविण्यासाठी त्याला दुसर्या कशावर अवलंबून राहावे लागत नाही. कारण, मुक्तावस्था ही जीवाची स्वाभाविक स्थिती असल्याने त्यापासून मिळणारा आनंदाचा झरा उपजत असतो. साधक विषयत्याग करूनही प्रसन्नता अनुभवतो आणि भगवंतसुखात रममाण होतो. परंतु, यासाठी स्वामी एक अट सांगतात. ती अट म्हणजे, कल्पनेवर नियंत्रण मिळविणे होय. ‘मना कल्पनालेश तोही नसावा।’ वासनेची, विषयसुखाची अल्पशी जरी कल्पना मनात असेल, तर मन कल्पनाविलासात कसे भरकटत जाईल, याची कल्पनाही करता येेत नाही म्हणूून या विषयाच्या कल्पनेचे मूळ छाटून टाकावे व जीवाला आपले मूळ आनंदीस्वरूप अनुभवू द्यावे, हे आपल्या हिताचे आहे, असे स्वामी सांगतात.