मृत्यूचे रहस्य

    22-May-2025
Total Views |

The mystery of death
 
प्रकाशाचा वेग दर सेकंदाला 1 लाख, 86 हजार मैल असतो. एवढ्या प्रचंड वेगाने जडशरीर जाऊ शकत नाही. या भयानक वेगाने आपली पृथ्वी गेल्यास, ती एखाद्या मोठ्या फुटबॉलएवढी दिसेल. वेगामुळे वस्तूचा आकार कमी होतो. सर्व वेगात प्रकाशवेग अधिक असल्यामुळे, प्रकाशवेगाने गमन करणार्‍या वस्तूचा आकार जवळजवळ नगण्य असतो. शरीर तर असल्या प्रचंड वेगात जिवंत राहणेच कठीण आहे. म्हणूनच या भयानक मृत्यू अवस्थेचा अनुभव जिवंत शरीर घेत नसून, त्याचा अतींद्रिय भाग जे लिंगशरीर आहे ते घेत असते. जडदेहाला धरूनच आपण जीवनात सारे अनुभव घेत असल्यामुळे, जडदेहाला सोडून आलेला दिव्य अनुभव आपल्याला स्मरत नाहीत. मरणोत्तर येणारे अनुभव दिव्यच असे असतात. शिवाय, प्रकाशवेगापेक्षाही अधिक भयंकर असा मृत्युवेग सराव नसल्यामुळे आपल्या जीवात्म्याला सहन होत नाही. म्हणून मृत्युसमयी बहुतेक सर्व जीव एकप्रकारच्या ग्लानीत वा अज्ञानात प्रवास करीत असतात. ग्लानीतील अनुभव घेण्याकरिता जीवात्मा जागृत नसतो, म्हणून मृत्युसमयीचे दिव्य अनुभव आपल्याला स्मरत नाहीत.
 
ज्या साधकांना असल्या मरणोत्तर भयानक वेगाचा अनुभव असतो, त्यांना मृत्युनंतरचे सर्व अनुभव स्मरत असतात व नंतर प्राप्त होणार्‍या जन्म घटनेचेही त्यांना ज्ञान असते. त्यामुळे असले श्रेष्ठ साधक जन्म-मृत्यूचे सर्व रहस्य करतलामलवत् जाणतात. अशांना मृत्यूचे भय नसते की जन्माचे आकर्षण नसते. म्हणून जन्म-मृत्यूच्या मायेच्या ते वर असतात. जो मायेच्या वर असतो, तो मुक्तच.
मृत्यूनंतरचा प्रवास महाप्रयाण म्हणून मानला आहे. तो भयंकर गतीचा प्रवास ज्या बलवान व्यक्तींना सहन होतो, त्यांना त्या दिव्य जीवनाचे सर्व ज्ञान असते. ज्यांना सहन होत नाही, ते अज्ञानात जन्म घेतात, साधना न केल्यामुळे अज्ञानात जीवन जगतात व साधनेद्वारे दिव्य संस्कार न घेतल्यामुळे अज्ञानातच मृत्युप्रवास करतात. अशांचा जन्मापासून मृत्यूपर्यंत व मृत्यूनंतर जन्मापर्यंतचा दिव्य प्रवास अज्ञानातच होतो. जन्मजन्मांतरीचा साथी अज्ञान असते, गीता अशांचे वर्णन करते.
 
अज्ञानेनावृतं ज्ञानं तेन मुह्यन्ति जन्तवः॥अ.5 श्लो.15॥
 
मायेमुळे अशांचे ज्ञान झाकलेले असते, त्यामुळे ते मोहित व अज्ञानात असतात. जन्म व मृत्यू प्रकृतीची माया आहे असे जे श्रेष्ठ पुरुष जाणतात, तेच खरे जीवन पाहतात व जाणतात. अशांनाच जीवनाचे रहस्य कळते. जन्म-मृत्युभाव वा अवस्था जडाची असून आत्मा त्या सर्वांच्या वर आहे असे जे जाणतात, ते खरोखरच ज्ञानपूर्ण जीवन जगतात.
 
मृत्यू यात्रेचे वेदवर्णन
 
वेदात अशा तर्‍हेचे अनंत दिव्य ज्ञान आहे. परंतु, नंतरच्या काळात साधनानुभव नसल्याने त्या दिव्य ज्ञानाला न जाणून वेद हे अपौरुषेय मंत्र आहेत, असा वृथा आरोप केला गेला. पलीकडे वेदातील मंत्रमयताही नष्ट झाली आणि आज वेद एक पांडित्याचे वा पठनकलेचे प्रदर्शन मात्र राहिले आहे. योगसाधना केल्यावर जे अतींद्रिय अनुभव येतात, त्या दिव्य अनुभवांचे थोडक्यात वर्णन म्हणजे वेद होय. विद् म्हणजे जाणणे व वेद म्हणजे जाणलेले ज्ञान असा त्याचा अर्थ आहे. वेदांत मृत्यूनंतरच्या दिव्य प्रवासाचे वर्णन पुष्कळ ठिकाणी आले आहे. दिव्य साधना करणार्‍यांना वेदांत वर्णन केल्याप्रमाणे, सर्व अनुभव येतात. काही ऋचा पाहू -
 
 
ये अवचरतां उ पराच आहुर्य पराचस्तां उ अर्वाच आहुः इन्द्रश्च या चक्रथुः सोम तानि धुरा नयुक्ता रजतो वहंति॥(ऋग्वेद 1।174।19)
 
जे जवळ आहेत ते दूर जातात, तर जे दूर जातात ते जवळ येतात. इंद्रियांचा स्वामी जीवात्मा म्हणजे इंद्र जी कर्मे करतो, ती कर्मे जीवात्म्याला बंधनात घालून एका योनीतून दुसर्‍या योनीत घेऊन जातात. जसे बैलाच्या खांद्यावरील धुरा नांगराला एका शेतातून दुसर्‍या शेतात घेऊन जाते, तसे. यावरून दोन गोष्टी स्पष्ट होतात एक म्हणजे, इंद्र नावाची कोणी स्वर्गस्थ देवता नसून, प्रत्येकाच्या शरीरातील जीवात्मा म्हणजेच इंद्र होय आणि दुसरे म्हणजे मृत्युनंतर जीवात्मा इंद्र लगेच जन्म घेत नसून, मधील अवस्थांतून प्रवास करतो.
 
प्रत्येक जीव इंद्र आहे. ज्ञान झाल्यावर सर्व जीव प्रत्यक्ष परमात्मा आहेत. मग असला ज्ञानमय जीवात्मा अज्ञानात गुरफटून जाऊन जन्मजन्मांतराच्या दुष्ट चक्रात का सापडतो? याचे कारण त्याचे कर्मच होय. शरीर हे जीवात्म्याचे कर्म करण्याचे उपकरण होय, सर्वस्व नव्हे. शरीराद्वारे होणार्‍या कर्माचा उपभोक्ता जीवात्म्याने असायला हवे, शरीरनिर्मीत कर्मांचा गुलाम नव्हे. वेद सांगतात -
 
द्वा सुपर्णा सयुजा सखायां समानं वृक्षं परिषस्वजाते। तन्योरन्यः पिप्पलं स्वाब्दत्त्यनश्नन् अन्यो अभिचाकशीति॥
 (ऋग्वेद 1।164 120, अथर्व 9।9।20)
 
जीवात्मा व परमात्मा दोन्ही मिळून एखाद्या पक्षाप्रमाणे संसाररुप वृक्षावर बसले आहेत. वृक्षाचे फळ जीवात्मा खातो व परमात्मा केवळ द्रष्टा मात्र आहे. येथे ‘जीवात्मा’ याचा अर्थ शरीरबंधनात असलेली प्रकृती धरल्यास, सांख्य तत्त्वाचे मूल वेदात सापडते. सांख्य दर्शन वा कपिल महामुनि कोणी स्वतंत्र नसून, वेदप्रणित विचारधारेचे स्पष्टीकरण आहे. लेखकाची अशी धारणा आहे की, वेदात लिहिलेल्या ऋषींची नावे ही त्यांची खरी नावे नसून, त्या त्या दिव्य अवस्था जाणणार्‍या थोर दिव्य साधकांच्या त्या अवस्थादर्शन उपाध्या होत. जो जो साधक त्या दिव्य अवस्थेत जाईल, त्याला ते नामाभिधान आपोआप प्राप्त होत असे. ‘ऋषी’ हे नाव नसून अवस्थाबोधाचे नामकरण आहे.
 
अनच्छये तुरगातु जीवमेजद धृवं मध्य आ पस्त्यानाम्।
जीवो मृतस्य चरति स्वधाभिमर्त्यो मर्त्येना सयोनिः॥(ऋग्वेद 1।164।30)
 
जीवात्मा मृत्यूनंतर जडशरीराच्या बाहेर निघून आपल्या स्वधर्मानुसार, म्हणजे सतत संस्काराद्वारे धारण केलेल्या कर्मगतीनुसार व त्याद्वारे प्राप्त झालेल्या वृत्तिस्वभावानुसार स्वतः अमर असूनही मर्त्यशरीररुप उपकरणालाच सर्वस्व मानून आपली योनी बनवितो आणि जन्ममरणाच्या चक्रात अडकतो. मृत्यूनंतर येणार्‍या जन्माला तो आपली वस्ती मानतो. पुनः मरतो पुनः जन्म घेतो.
 
अपश्यं गोपाननिपद्यमानामाच पराच पथिभिश्चरन्तम्। स सघ्रीचीः स विषूचीर्वसान आ वरिवर्ति भुवनेष्वन्तः॥(ऋग्वेद 1।164।31)
 
आशय - मृत्यूनंतर अदृश्य होणारा जीवात्मा, आपल्या इंद्रियस्थित वृत्ती गत आयुष्यातील संस्कारामुळे प्राप्त झालेली अवस्था न सोडता, परावस्थेच्या मार्गाने गमन करतात. ते आपल्या पूर्वसंस्कारांना धरून अनुकूल वा प्रतिकूल अशा लोकात म्हणजे अवस्थेत, मोहित होऊन भुवनात वा कर्म लोकात आपल्या कर्मभाराने पुनः पुनः शेवटपर्यंत जन्म घेत असतात.
 
(शब्दांकन : राजेश कोल्हापुरे)
अग्रलेख
जरुर वाचा

Email

admin@mahamtb.com

Phone

+91 22 2416 3121