कोणतेही कार्य निर्विघ्नपणे पार पाडण्यासाठी श्रीगणेशाची आराधना आपण सारेच करतो. शक्तीउपासनेमध्येही हा नियम आहेच. श्री जगदंबेच्या कृपाप्राप्तीसाठी साधक शक्तीउपासनेला सुरुवात करतो, त्याआधी त्याने श्री गणेशाची आराधना करणेही आवश्यक आहे. त्याची कारणे आणि पद्धती यांचा घेतलेला आढावा...
शक्तीउपासना सुरू करण्यापूर्वी आपल्याला अनुष्ठान करणे आवश्यक आहे. मुख्य उपासना प्रारंभ करण्यापूर्वी आपली शारीरिक आणि मानसिक बैठक तयार करण्यामुळे, साधकामध्ये नियमितता आणि श्रद्धाभाव यांचा विकास होतो.
आपल्याकडे कोणतीही उपासना किंवा शुभकार्य करायचे असेल, तर सर्वप्रथम श्री महागणेशाचे पूजन केले जाते. तो विघ्नहर्ता आणि आपला लाडका गणपती बाप्पा आहे, अग्रपूजेचा मानही त्याचाच. हाती घेतलेले कार्य निर्विघ्न पार पडण्यासाठी गणेशाचा आशीर्वाद आवश्यकच. म्हणूनच शक्तीउपासनेच्या मार्गावर प्रवास सुरु करतान सर्वप्रथम, श्री महागणेशाचेच अनुष्ठान करतात. गणेशाच्या या स्वरूपाला ‘पुर्यष्टक गणेश’ असे संबोधले जाते. महागणेश हा श्री ललिता त्रिपुरसुंदरीचा पुत्र आहे. आपणसुद्धा देवीची उपासना पुत्रभाव बाळगूनच करणार आहोत, त्यामुळे आपल्याला श्री महागणेशाचा आशीर्वाद निश्चित प्राप्त होईल.
महागणेशाला विघ्नहर्ता का म्हणतात? तो प्रथमउपास्य का आहे? हे समजून घेण्यासाठी आपल्याला श्री ललिता सहस्त्रनामातील भंडासुर वधाच्या आख्यानातील श्लोक आणि त्याचे विवेचन उमजणे आवश्यक आहे.
ललिता सहस्त्रनाम भाष्य श्लोक 30ब, 31अ
कामेश्वर मुखालोक कल्पित श्रीगणेश्वरा।
महागणेश निर्भिन्न विघ्नयंत्रा प्रहर्षिता॥
शब्दार्थ : श्री ललिता देवीने कामेश्वर शिवाकडे एक प्रेमकटाक्ष टाकल्यावर , त्यातून महागणेशाचा जन्म झाला.
भावार्थ : भंडासुर आणि श्री ललिता देवीचे युद्ध चालू असताना, भंडासुराला त्याच्या सैन्याची अपरिमित हानी होताना दिसू लागली. म्हणून त्याने जयविघ्न नावाचे यंत्र श्री ललिता देवीच्या सैन्याच्या मधोमध फेकले. या यंत्राच्या प्रभावाने, श्री ललिता देवीच्या सैन्याचा आत्मविश्वास लयाला जाऊ लागला. मन्त्रिणी देवी मंत्रशक्तीस्वरूपा असल्याने ,तिने हे ललिता देवीला कथन केले. परंतु, या यंत्राचा प्रभाव निवारण तोच करु शकत होता, ज्याने पुर्यष्टकावर मात केलेली असेल.
पुर्यष्टक म्हणजे काय?
पाच कर्मेंद्रिये, पाच ज्ञानेंद्रिये, अंतःकरण (मन, बुद्धी, अहंकार, चित्त), पंचप्राण, पंचमहाभुते, इच्छा (कामना), अज्ञान, कर्म. या गुणांना पुर्यष्टक म्हणतात. याच गुणांपासून संपूर्ण मानवी शरीर आणि व्यक्तिमत्त्व घडते.
शिवस्वरूप असणारा जीवात्मा ज्यावेळी शिवापासून भिन्न होऊन अंशात्मक ब्रह्मरूपाने शरीर धारण करतो, त्यावेळी तो पुर्यष्टकात बद्ध झाल्याचे मानले जाते. या अवस्थेत त्याचे ब्रह्मतत्त्वाशी असणारे अभिन्नत्व विस्मृतीत गेलेले असते. ही पुर्यष्टक अवस्था हेच मूळ स्वरूप आहे, या भ्रमात तो वावरतो. अर्थात, शरीराला धारण करूनही आपल्या मूळ आत्मस्वरुपाची जाणीव असणारा पुण्यात्माच, या यंत्राच्या प्रभावापासून मुक्त करु शकत होता.
पुर्यष्टकामध्ये एकूण 27 विविध गुण आहेत आणि 28वा गुण म्हणजे शिवतत्त्व. महागणेशाचा मूलमंत्रसुद्धा 28 शब्दांचा आहे. ज्यावेळी हे 27 गुण लयाला गेल्यावर जे शिल्लक उरते, ते सगुण शिवतत्त्व. या सगुण शिवतत्त्वाकडून साधकाचा प्रवास निर्गुण शिवतत्त्वाकडे होतो. 27 गुण लयाला जाऊन येणारे आत्मज्ञान हा पहिला टप्पा आणि दुसरा टप्पा म्हणजे मुक्ती आहे. वास्तवात, हे नाम मुक्तीच्या वाटेवरील टप्प्यांची माहिती देत आहे.ॐकार महागणेश हे 27 गुण लयाला नेण्यास साहाय्य करणारे तत्त्व आहे.
॥ॐ श्रीं ह्रीं क्लीं ग्लौं गं गणपतये वर वरद सर्वजनं मे वशमानय स्वाहा॥
हा महागणेशाचा मूल/बीज मंत्र आहे. कामेश्वर शिव हे निर्गुण ब्रह्म. त्यात आधी इच्छा निर्माण झाली, ‘एकोहं बहुस्यामि।’ या इच्छेतूनच निर्गुण ब्रह्मात चेतना अर्थात सगुण ब्रह्म निर्माण झाले. या निर्गुण आणि सगुण ब्रह्माच्या एकत्वाचे फळ म्हणजे, एक अनाहत नाद निर्माण झाला. तो विश्वातील पहिला ध्वनी, ॐकार. त्या अर्थाने हा ॐकार शिव-पार्वतीचा पुत्र आहे. म्हणूनच याला ‘शब्दब्रह्म’, ’अक्षरब्रह्म’ किंवा ’नादब्रह्म’ म्हणूनसुद्धा ओळखले जाते. ॐकार हे अक्षर जर आकार स्वरूप पहिले, तर गजमुख स्थूल रूप दिसते. त्यातून गणेशाच्या गजमुखाचे रूपक तयार झाले.
‘ॐ’ या अक्षराचे पृथःकरण:
यातील ‘उ’कार जो आहे, तो मानवाच्या डीएनए साखळीस्वरूप आहे. आपल्याला ज्ञात विश्वात मानव हा जीवसाखळीतील सर्वोच्च जीव आहे. त्यामुळे डीएनए साखळीस्वरूप असा हा ‘उ’कार, त्यात सर्व जीव समाविष्ट असल्याचे द्योतक आहे. यातील जे लहरी स्वरूप रूप आहे, ते सर्व विश्वाला व्यापून असणार्या चेतनेचे प्रतीक आहे. ऊर्जा ही भौतिकशास्त्रात लहरींच्या स्वरूपातच व्यक्त होते. ’सायनोसायडल वेव्ह’ हेच ऊर्जा दर्शवणारे आधुनिक विज्ञानातील प्रतीक आहे. यातील वरची चंद्रकोर आणि बिंदू हे परमाणु आणि त्यापेक्षाही सूक्ष्म अशा चर आणि अचराचे प्रतीक म्हणून आधुनिक विज्ञान वापरते. अर्थात, ॐ सर्व विश्वातील जीव, चेतनातत्त्व आणि सूक्ष्मासूक्ष्म तत्त्वे व्यापून आहे. अगदी असाच आणि हाच उल्लेख ‘मांडुक्य उपनिषदा’तही केलेला आहे. यातूनच ॐकारस्वरूप गणेशाचे सर्वव्यापकत्व साधकाने ध्यानात घेतले पाहिजे. आपल्या अस्तित्वाचे मूळ हा ॐकार आहे. म्हणून याला मूलाधार चक्राचा स्वामी मानले जाते. त्यालाच पृथ्वीतत्त्वाचेही प्रतिक मानतात. आत्मविश्वास नष्ट करणार्या सर्व शक्ती, या ललिता देवीच्याच मायापटलाची निर्मिती आहे. पण ती स्वतः या शक्तींना नष्ट करत नाही. साधक ज्यावेळी मूलाधार चक्रात महागणेशाची उपासना करतो आणि 27 गुणांचा स्वशरीरात लय घडवतो, अर्थात या 27 गुणांचे मूळ स्वरूप समजून घेऊन त्यांच्या अधीन न होता त्यांच्यावर नियंत्रण मिळवतो, त्यावेळी श्री ललिता देवी गणेशाच्या हस्ते या आत्मविश्वासाला साधकात परत स्थित करते. जो साधक महागणेशाची उपासना करेल, त्याच्या विघ्नांचे हरण होईल, त्याचा आत्मविश्वास बळावेल आणि त्याची आध्यात्मिक आणि भौतिकही प्रगती होईल.
॥अनुष्ठान॥
आपल्या नित्य पूजा विधीची साधारण पद्धत सर्वांना ज्ञात असल्याने, तिचा ऊहापोह याठिकाणी करत नाही. आपली नित्य पूजा करून आपण या अनुष्ठानाला प्रारंभ करू शकतो . इथे समोर गणेशप्रतिमा, मूर्ती किंवा सुपारीचा गणपती घेणे अभिप्रेत नाही. नित्य पूजा झाली की, देवघराच्या समोर बसून अनुष्ठान प्रारंभ करावे. अनुष्ठान करताना आवर्जून दीपप्रज्वलन आणि उपलब्ध असेल तर अगरबत्ती किंवा धूप प्रज्वलित करावा. अनुष्ठानास बसताना आपल्या समोर एका फुलपात्रात किंवा भांड्यात पाणी भरून ठेवावे.
अनुष्ठानाचे महत्त्वाचे नियम म्हणजे एका विशिष्ट वेळी, विशिष्ट ठिकाणी आणि विशिष्ट काल तुम्हाला हे अनुष्ठान करायचे आहे. उदाहरणार्थ आपल्या देवघराच्या समोर बसून, रोज सकाळी 9 वाजता सलग नऊ दिवस हे अनुष्ठान करायचे आहे. नऊ दिवस हा विधी अखंडित व्हायला हवा. काहीही समस्येमुळे जर यात खंड पडला, तर परत नऊ दिवस अनुष्ठान करायचे. अनुष्ठान करताना महागणेशाचा मूल/बीज मंत्राचा एक माळ, अर्थात 108 वेळा जप करायचा आहे.
॥ॐ श्रीं ह्रीं क्लीं ग्लौं गं गणपतये वर वरद सर्वजनं मे वशमानय स्वाहा॥
त्यानंतर संकटनाशन महागणेश स्तोत्राची नऊ आवर्तने करायची.
श्री गणपतिस्तोत्रम्
प्रणम्य शिरसा देवं गौरीपुत्रं विनायकम्॥ भक्तावासं स्मरेनित्यमायुःसर्वकामार्थसिद्धये॥1॥
प्रथमं वक्रतुंड च एकदन्तं द्वितीयकम्। तृतीयं कृष्णपिंगाक्षं गजवक्त्रं चतुर्थकम्॥2॥
लंबोदरं पंचमं च षष्ठं विकटमेव च। सप्तमं विघ्नराजेन्द्रं धूम्रवर्णं तथाष्टमम्॥3॥
नवमं भालचंद्रं च दशमं तु विनायकम्। एकादशं गणपतिं द्वादशं तु गजाननम्॥4॥
द्वादशैतानि नामानि त्रिसंध्यं यः पठेन्नरः। न च विघ्नभयं तस्य सर्वसिद्धिकरं प्रभो॥5॥
विद्यार्थी लभते विद्यां धनार्थी लभते धनम्। पुत्रार्थी लभते पुत्रान् मोक्षार्थी लभते गतिम्॥6॥
जपेत् गणपतिस्तोत्रं षड्भिर्मासैः फलं लभेत्। संवत्सरेण सिद्धिं च लभते नात्र संशयः॥7॥
अष्टेभ्योे ब्राह्मणेभ्यश्च लिखित्वा यः समर्पयेत्। तस्य विद्या भवेत्सर्वा गणेशस्य प्रसुदतः॥8॥
इति श्री नारदपुराणे संकटनाशनं नाम महागणपतिस्तोत्रं संपूर्णम्॥
त्यानंतर भांड्यात ठेवलेले पाणी हे तीर्थ म्हणून प्राशन करा. नऊ दिवस हा विधी अखंडित करावा.
- सुजीत भोगले