जगदंबेच्या लीला अपरंपार आहेत. तिच्या पराक्रमाच्या अनेक कथा सर्वांनाच ज्ञात आहेत. जशा तिच्या पराक्रमाच्या कथा आहेत, तशाच भगवान महादेवांना प्राप्त करण्यासाठी केलेल्या व्रतवैकल्यांच्या कथाही सुमधुर आहेत. शक्तीउपासनेमध्ये श्री ललिता सहस्त्रनाम, श्री दुर्गा सप्तशती आणि सौन्दर्यलहरी या ग्रंथांना विशेष महत्त्व. त्यापैकी श्री ललिता सहस्त्रनामाच्या उत्पत्तीचा हा कथाभाग.
शक्तीउपासनेची प्रस्थानत्रयी असणारे ग्रंथ म्हणजे श्री ललिता सहस्त्रनाम, श्री दुर्गा सप्तशती आणि सौन्दर्यलहरी. श्री ललिता सहस्त्रनामाची रचना अष्ट वाग्देवींनी केली असून, त्याचे निरूपण ब्रह्मांडपुराणाच्या उत्तर खंडात विष्णु अवतार हयग्रीव आणि अगस्त्य ऋषी यांच्या संवादाच्या रूपाने मांडले आहे. श्री दुर्गा सप्तशतीचे लेखक व्यास ऋषी असून ते मार्कंडेय पुराणात वर्णिले आहेत. सौन्दर्यलहरी हे वास्तवात शिवाने रचलेले शक्तीचे स्वरूप उलगडून सांगणारे काव्य आहे. परंतु, त्याचे जनकत्व आदि शंकराचार्यांकडे दिले जाते. त्याची एक वेगळी आणि विस्तृत कथा आहे.
श्री ललिता सहस्त्रनामाच्या उत्पत्तीची कथा :
दक्ष प्रजापतीला संतती होत नसते. म्हणून दक्ष आणि त्याची पत्नी प्रसुती हे कठोर तपस्या करतात. पराशक्ती श्री ललिताम्बिकेला प्रसन्न करतात आणि "आमच्या पोटी जन्म घे” म्हणून विनवतात. श्रीललिताम्बिका त्यांना तसा वर देते, परंतु त्यांना हेदेखील सांगते की, "तुम्ही जर माझा अपमान केलात, तर मी तत्क्षणी स्वतःला नष्ट करून घेईन.”
जन्मापासून दक्षकन्या सती ऊर्फ दाक्षायणी हिला शिवाबद्दल आसक्ती असते. शिवाला पती म्हणून प्राप्त करून घेण्यासाठी ती कठोर तपस्या करते आणि शिवाला प्रसन्न करून घेते. शिव आणि सती यांचा विवाह होतो. दक्षाला शिव हे जावई म्हणून पसंत नसतात. दक्षाच्या मते, शिव हे श्रेष्ठ नाहीत. दक्ष हा प्रापंचिक भावाने लिप्त आणि भौतिकतेत रममाण होत असतो. त्यामुळे त्याला शिवाचे तपस्वी असणे, निरिच्छ असणे मान्य नसते. शिव ही संहार घडवणारी ईश्वरी शक्ती आहे. सतीच्या मते, जसे सृष्टीमध्ये उत्पत्ती आणि स्थिती अवस्था आवश्यक आहे, त्याचप्रमाणे संहार हासुद्धा पुनरुज्जीवनाचा मार्ग मुक्त करतो. म्हणूनच संहारसुद्धा तितकाच आवश्यक आहे. पूर्वीच्या काळी यज्ञ केला की त्यातील हवी भाग देवतांना अर्पण केला जात असे किंवा त्यांच्या नावे ठेवला जात असे. दक्ष शिवाला यज्ञाचा हवी भाग देण्यास अपात्र समजतात. दक्ष स्वतः यज्ञ हवी भाग शिवाला देणे नाकारतात आणि तसा प्रचारसुद्धा सुरू करतात. शिवाला दक्षाच्या या कृत्याबद्दल काहीही वाटत नाही, कारण स्वतःचे श्रेष्ठत्व कुणाला सिद्ध करून दाखवण्याची त्यांना इच्छाच नसते. सती आणि शिव यांच्यात याबद्दल चर्चा होते. परंतु, सतीचा दृष्टिकोन शिवाला मान्य नसतो.
एकदा दक्ष एक महायज्ञ आयोजित करतो. दक्ष शिवाला श्रेष्ठ मानत नसतो. त्यामुळे तो त्या यज्ञाचे शिवाला आमंत्रण देत नाही. सतीला आपला पिता एक यज्ञ आयोजित करत आहे, याची वार्ता कळते. दक्षकन्या म्हणून सतीला या यज्ञाला जायची इच्छा असते; परंतु शिव तिला तिथे माझा अपमान केला जाईल आणि तो तुला सहन होणार नाही, म्हणून जाण्यापासून परावृत्त करण्याचा प्रयत्न करतात. परंतु, सती मात्र हट्ट करून त्या यज्ञाला जाते. यज्ञातील जो हवी भाग एकेका देवाच्या नावाने प्रदान केला जात असतो, त्यात शिवाला हवी भाग देण्यास दक्ष नकार देतात. त्या मुद्द्यावरून दक्ष आणि त्याची कन्या सती यांच्यात वाद होतो.
आपला पती निरिच्छ आहे; त्यांना आपला मुद्दा मान्य होत नाही. आपल्या वडिलांनासुद्धा प्रजापती असूनही प्रजेसाठी असणारे शिवतत्त्वाचे महत्त्व आणि मूल्य उमगत नाही. ते वैयक्तिक स्वार्थ आणि राग-लोभापेक्षा अधिक विचार करायला तयार नाहीत, हे पाहून सतीचे मन विद्ध होते. ती यज्ञाच्या स्थंडिलाच्या उत्तरेला बसून, स्वतःला यौगिक शक्तीने प्रज्वलित करते.
सतीच्या या देहत्यागाला फार व्यापक दृष्टीने पाहणे आवश्यक आहे. आपल्या पतीचा आपला पिता अपमान करतो, म्हणून अग्निप्रवेश करण्याइतकी अपरिपक्व आणि सामान्य सती नाही. सती हे साक्षात जगन्माता श्रीललिता त्रिपुरसुंदरीचे रूप आहे. ती कोणत्याही स्वरूपात असली, तरी जगन्माता आहे आणि तिला संपूर्ण विश्वाची चिंता आहे. त्यामुळे सतीचा दृष्टिकोन आपण समजून घेणे आवश्यक आहे.
दक्ष किंवा कोणताही सामान्य मानव हा फक्त भौतिक पातळीवर विचार करतो, त्यामुळे भौतिक सुखे प्राप्त होणारी उपासना करण्यास तो उद्युक्त होतो. त्यामुळे प्रपंचपालन करणारा विष्णू आणि त्याचे अवतार हे सामान्यतः अधिक उपास्य आणि पूज्य असतात. परंतु, विश्वाचे संचलन योग्य पद्धतीने होण्यासाठी उत्पत्ती, स्थिती आणि लय अर्थात निर्मिती, पालन आणि संहार या तिन्ही गुणांची आवश्यकता असते. विश्वात या तिन्ही क्रिया सतत समांतर आणि परस्परविच्छेदी या दोन्ही स्वरूपांत चालू असतात. या त्रिगुणांचे व्यक्तीच्या पातळीवरील अस्तित्व हे तम, रज आणि सत्व यांत मांडले जाते. या तिन्ही गुणांच्या समुच्चयातून एका मानवाचे व्यक्तिमत्त्व तयार होते. या तिन्हींचे नियंत्रण आणि त्यांना कार्यप्रवण करण्याचे कार्य श्री ललिता त्रिपुरसुंदरी अर्थात जगन्माता करते. या तिन्ही गुणांचे अस्तित्व वैश्विक आणि वैयक्तिक पातळीवरसुद्धा आवश्यक आहे. तिथे तुम्ही एखादा गुण नाकारू शकत नाही. अन्यथा, तुमचे अस्तित्व शय नाही.
नवनिर्मिती हे तमोगुणाचे कार्य आहे. पालन हे सत्वगुणाचे कार्य आणि संहार हा अत्यंत सात्विक असतो. शिव हा संहाराचा देव मानला जातो. शिव हा नेहमी तपस्यारत असतो. शिव हा अत्यंत संयमी म्हणूनही ओळखला जातो. तसेच शिव हा अत्यंत निरिच्छ म्हणून ओळखला जातो. शिव हे निर्गुण ब्रह्माचे मूर्त प्रतीक आहे. संहाराची क्षमता असलेल्या प्रत्येकाने अत्यंत संयमी असणे आवश्यक असते. शिव त्याचेच मूर्त स्वरूप आहे.
जर तुम्ही शिवतत्व नाकारत असाल, जर तुम्ही शिवाचे उपास्य असाल आणि त्याचा यज्ञाचा हवी भाग भक्षणाचा अधिकार नाकारत असाल, तर तुम्ही सात्विकता नाकारत आहात. संपूर्ण जगातील प्रत्येक घटक या त्रिगुणांनी व्यापला आहे. एका गुणाचे अस्तित्व नाकारले, तर अस्तित्वच नष्ट होण्याचा धोका निर्माण होतो. त्यामुळे सतीने दक्षाला केलेला विरोध आणि आपल्या पतीशीसुद्धा असहमत असूनही केलेला शास्त्रार्थ जगन्मातेने विश्वाचे संचलन उत्तम पद्धतीने व्हावे, म्हणून केलेला प्रामाणिक प्रयत्न आहे. श्री ललिता त्रिपुरसुंदरीचे अपर नाव त्रिगुणात्मिका आणि त्रिधा असेसुद्धा आहे. अर्थात, जिने त्रिगुण धारण केले आहेत, जी त्रिगुणांची स्वामिनी आहे, ती त्रिधा आहे. (क्रमश:)