चीनभक्तीचे भोई...

    14-Jun-2025
Total Views |

Communist Party of India General Secretary D. Raja ridiculous statement rss does not need to teach us patriotism
 
कम्युनिस्ट पक्षाकडून भारतातील पक्षांना सेक्युलर आणि लोकशाहीवादी असल्याचे प्रमाणपत्र मिळण्याचा हास्यास्पद काळ खरं तर केव्हाच इतिहासजमा झाला. आता नव्या भारताचे हे युग असून, त्यात देशभक्ती नावाचे एकच नाणे चलनात आहे. मात्र, मार्क्सवादीच नव्हे, तर सर्व डाव्या पक्षांकडे प्रारंभीपासून या नाण्याची कमतरता. कारण, हे देशभक्तीचे नव्हे तर चीनभक्तीचे भोई आहेत. म्हणूनच देशभक्तीचे धडे गिरविण्यासाठी त्यांनी संघाकडून शिकवणी घेण्याचीच आज गरज आहे.
 
कम्युनिस्ट पार्टी ऑफ इंडिया’ या पक्षाचे सरचिटणीस डी. राजा यांनी पुन्हा एकदा एक हास्यास्पद विधान केले. “रा. स्व. संघाने आम्हाला देशभक्ती शिकवण्याची गरज नाही. आम्ही स्वातंत्र्य चळवळीत लढलेलो आहोत. संघ या चळवळीपासून नेहमीच दूर होता,” असा आरोपही त्यांनी केला. राजा यांचे वय बघता त्यांना खरं तर केव्हाच निवृत्त करायला हवे होते. पण, कम्युनिस्ट पक्षाच्या कोणत्याही नेत्याला दन्ताजीचे ‘ठाणे उठले, फुटले दोन्ही कान, डोळे रुसले, नन्ना म्हणती मान’ अशी जराजर अवस्था झाल्यावरही सत्तेचा आणि खुर्चीचा मोह सोडवत नाही. म्हणूनच आजच्या काळात पूर्णपणे संदर्भहीन बनलेल्या कम्युनिस्ट पक्षाचे हे कालबाह्य नेते अजूनही पक्षाच्या सत्तास्थानी असून ते अधूनमधून साठीनंतर बुद्धी नाठी होते, याची उदाहरणे देत असतात. त्यापैकीच एक असलेल्या राजा यांच्या हाती खर्‍या इतिहासाचे पुस्तक ठेवण्याची गरज आहे.
 
अलीकडेच केरळमध्ये राज्यपाल आर्लेकर यांनी आयोजित केलेल्या एका कार्यक्रमात सीपीआयच्या एका मंत्र्याने भारतमाता वंदनाच्या कार्यक्रमाला आक्षेप घेतला होता. “भारतमातेचे हे चित्र ही रा. स्व. संघाची कल्पना असून, आम्ही अशी काही देवता मानीत नाही, त्यामुळे तिला वंदन करणार नाही,” असा युक्तिवाद या मंत्र्यांनी केला. हे चित्र तत्काळ हटविले नाही, तर आपण हा कार्यक्रम सोडून निघून जाऊ, असा इशाराही त्यांनी दिला. त्यावर आपण गेलात तरी चालेल. पण, भारतामातेच्या वंदनाचा कार्यक्रम होणारच, अशी ठाम भूमिका राज्यपालांनी घेतली आणि ती अमलातही आणली.
 
भारतमातेचे चित्र असो की, ती संकल्पना असो. शेवटी त्यांना भारत हा देशच अभिप्रेत आहे ना? त्याच्याबद्दल कम्युनिस्टांना आक्षेप का आहे? कारण, कम्युनिस्ट हे कोणत्याच देशाचे नसतात. कम्युनिस्ट पक्ष हा कोणत्याच देशात ‘देशभक्त’ पक्ष म्हणून ओळखला जात नाही. जर्मनी असो, फ्रान्स असो, ब्रिटन असो की भारत, तो ज्या ज्या देशात सक्रिय आहे, तेथे त्याने त्या देशाच्या विरोधातच काम केले आहे. दुसरे महायुद्ध असो की, त्यानंतरचा शीतयुद्धाचा काळ असो, कम्युनिस्ट पक्षाच्या कार्यकर्त्यांची आणि नेत्यांची निष्ठा पूर्णपणे ‘सोव्हिएत युनियन’ला वाहिलेली होती. ‘सोव्हिएत युनियन’ अस्ताला गेल्यावर ही निष्ठा आता चीनच्या चरणी वाहिली जाते. म्हणूनच भारतात जेव्हा जेव्हा उत्स्फूर्तपणे चिनी उत्पादनांवर बहिष्कार टाकण्यासाठी नागरिक, संघटना रस्त्यावर उतरतात, तेव्हा कधी तरी कम्युनिस्टांनी चिनी मालाची होळी पेटवली का? त्यामुळे कम्युनिस्टांच्या उक्तीत केवळ तोंडदेखली देशभक्ती असली तरी याबाबतीत त्यांची कृतिशून्यता लपून राहिलेली नाही. त्यामुळे रा. स्व. संघावर कोणत्याही प्रकारे टीका करण्यापूर्वी या पक्षाने आपल्या देशनिष्ठतेचे प्रमाण देण्याची गरज आहे. राजा यांना ही गोष्ट पटणार नाही. कारण, ते मानसिकदृष्ट्या 1960 व 70 सालच्या काळात बंदिस्त झाले आहेत. तेव्हाच्या समाजवादी दशकांमध्ये देशातील राजकीय पक्षांना एखादा कम्युनिस्ट नेता किंवा पक्षाकडून लोकशाहीवादी आणि सेक्युलरपणाचे प्रमाणपत्र मिळविणे गरजेचे वाटत असे. ती राजकीय गरज होती. डी. राजा हे आजही त्याच काळात अडकले आहेत.
 
जो संघ आजही ‘अखंड भारता’चे स्वप्न पाहतो आहे, तो भारताच्या स्वातंत्र्यलढ्यापासून दूर राहिला, असे समजणार्‍या व्यक्ती आणि राजकीय पक्षाच्या बुद्धिमत्तेची कीव करावी तितकी कमीच. एकीकडे धर्माला अफूची गोळी मानायची आणि त्याचवेळी धर्माधिष्ठित पाकिस्तानच्या निर्मितीला मान्यताही द्यायची, असे हे कम्युनिस्टांचे दुटप्पी धोरण. उलट संघाने स्वातंत्र्यलढ्याच्या अनेक आंदोलनांमध्ये भाग घेतला होता. ते कार्य आजवर विविध माध्यमांमधून प्रसिद्धही झाले आहे. संघाचे संस्थापक प्रथम सरसंघचालक पू. डॉ. हेडगेवार यांनी तर जंगल सत्याग्रहाबद्दल सहा महिन्यांचा तुरुंगवासही भोगला होता. शिवाय तत्कालीन काँग्रेसच्या आंदोलनात सहभागी झाले, तरच स्वातंत्र्यलढ्यात सहभागी झाले, असे मानणे हे बौद्धिक अपरिपक्वतेचे लक्षण आहे. देशात असंख्य क्रांतिकारक हे काँग्रेसबाहेर राहून स्वातंत्र्यासाठी लढत होते. ते देशभक्त नव्हते, असे तर राजा यांना म्हणायचे नाही ना?
 
स्वातंत्र्यप्राप्तीनंतर संघाने सामाजिक समरसता आणि समाजसेवेवर लक्ष केंद्रित केले. देशात कोठेही नैसर्गिक किंवा मानवनिर्मित आपत्ती आली, तर सामान्य माणसाच्या मदतीला धावून जाणारी पहिली शक्ती ही संघाची. केरळमध्येही पूर आल्यास सर्वप्रथम स्वयंसेवक मदतीला पुढे धावतात. कारण, संघ कार्यकर्त्यांसाठी भारत हा त्यांचा देश आहे. उलट कम्युनिस्ट पक्षाचे सर्वोच्च आणि लढवय्ये नेते असलेल्या चारू मुझुमदार यांनी चीनच्या कम्युनिस्ट पक्षाचे सरचिटणीस माओ त्से तुंग हेच आपले नेते असल्याचे जाहीरपणे सांगितले होते. भारत-चीन युद्धात देशातील कम्युनिस्ट पक्षांनी उघडपणे चीनची बाजू घेतली होती. नक्षलवादी चळवळ ही भारतात अराजक माजवून त्याचे तुकडे करण्यासाठी पोसली गेली. हा सर्व इतिहास आता भारतीयांना चांगलाच ठाऊक झाला आहे. पण, या सार्‍या कार्याकडे हेतूत: कानाडोळा करायचा आणि संघाला जातीयवादी ठरवायचे, हे सोपे काम आहे. तसे केल्यास मुस्लिमांची हक्काची मतेही मिळतात, हे कम्युनिस्टांना पुरते ठाऊक आहे. पण, त्रिपुरासारखा कम्युनिस्टांचा बुरूज जसा ढासळला, तसा आता केरळ हा अखेरचा बालेकिल्लाही लवकरच ढासळणार आहे. प. बंगाल, त्रिपुरा आणि केरळ असा डाव्यांच्या पाठिंब्याचा आलेख देशात आक्रसत चालला आहे. उलट महाराष्ट्रापासून सुरुवात करून आज देशाच्या कानाकोपर्‍यात निव्वळ सामाजिक कार्याने आपला पाया व्यापक करणारा संघाचा विचार भारतात लोकप्रिय होत असून, कम्युनिस्ट विचारसरणी मात्र जगभरातच लयाला जाताना दिसते.
 
आजच्या काळातील भारत बदललेला आहे. हा नवा ‘आत्मनिर्भर भारत’ आहे. आजघडीला भारतात केवळ देशभक्तीचे नाणे खणखणीत वाजते. कम्युनिस्टांकडे याच नाण्याची पूर्णपणे वानवा आहे. देशभक्ती कशाला म्हणतात, हे जाणून घेण्यासाठी त्यांनी रा. स्व. संघाची शिकवणी लावण्याची नितांत आवश्यकता आहे. एकेकाळी प. बंगालमध्ये सलग तीन दशके आणि त्रिपुरात दोन दशके सत्तेवर असलेली कम्युनिस्ट आघाडी आज केवळ केरळपुरती मर्यादित का झाली आहे, त्याचे उत्तर या युक्तिवादात सापडेल. या पक्षाच्या मूळ विचारसरणीच्या जितक्या चिंध्या झाल्या आहेत, तितके डावे पक्ष आज भारतात आहेत. त्या सर्वांची मोट ‘डावी आघाडी’ नावाने बांधली जाते. आता केरळमध्येही या आघाडीचे दिवस भरत चालले आहेत, हे निश्चित!