तालिबानशासित अफगाणिस्तानशी भारतासह पाकिस्तान आणि चीननेही आपले द्विपक्षीय संबंध सुधारण्याच्या दृष्टीने अलीकडे पद्धतशीर पाऊले उचललेली दिसतात. त्याचे एकमेव कारण म्हणजे, अफगाणिस्तानचे भारतीय उपखंडातील भूराजकीय स्थान. याअनुषंगाने भारत-अफगाणिस्तान संबंधांचे आकलन करणारा हा लेख...
भारताचे परराष्ट्रमंत्री डॉ. एस. जयशंकर यांनी दि. १५ मे रोजी अफगाणिस्तानचे अंतरिम परराष्ट्रमंत्री अमीर खान मुत्ताकी यांच्याशी फोनवर चर्चा केली. पहलगाम हल्ल्यानंतर पाकिस्तानमधील दहशतवादी अड्ड्यांवर प्रत्युत्तरादाखल भारताने केलेल्या हल्ल्यानंतर लगेचच झालेल्या या संभाषणात, भारतीय परराष्ट्रमंत्र्यांनी अफगाणिस्तानच्या जनतेप्रति भारताच्या वचनबद्धतेचा पुनरुच्चार केला आणि पहलगाममधील दहशतवादी हल्ल्याचा निषेध केल्याबद्दल अफगाणिस्तानच्या परराष्ट्रमंत्र्यांचे आभारही मानले. भारत आणि अफगाणिस्तानमध्ये अविश्वास निर्माण करण्याच्या अलीकडच्या प्रयत्नांना अफगाणिस्ताननेही नाकारल्याचेही त्यांनी मान्य केले. ही बाब विशेषत्वाने भारत आणि पाकिस्तानमधील संघर्षात अफगाणिस्तानला ओढण्याच्या पाकिस्तानच्या प्रयत्नांच्या संदर्भात होते.
दि. १० मे रोजी पाकिस्तानच्या ‘इंटर-सर्व्हिसेस पब्लिक रिलेशन्स’च्या (आयएसपीआर) महासंचालकांनी भारतावर संपूर्ण युद्ध करून उपखंडाला धोयात आणल्याचा आरोप केला. ‘आयएसपीआर’च्या महासंचालकांनी दावा केला की, भारताने डागलेल्या क्षेपणास्त्राने अफगाणिस्तामध्ये हल्ला केला. हे विधान अफगाणिस्तानच्या संरक्षण मंत्रालयाच्या प्रवक्त्याने स्पष्टपणे फेटाळून लावले. भारताचे परराष्ट्र सचिव विक्रम मिस्री यांनीही हा दावा फेटाळून लावला आणि टिप्पणी केली की, अफगाणिस्तानच्या लोकांना हे आठवण करून देण्याची गरज नाही की, कोणत्या देशाने त्यांच्या नागरी पायाभूत सुविधांना वारंवार लक्ष्य केले आहे आणि नागरिकांचे रक्त सांडले आहे. गेल्या तीन वर्षांत, पाकिस्तान आणि अफगाणिस्तानमधील संबंध दिवसेंदिवस बिघडत असताना, तालिबानने त्यांचे राजनैतिक संबंध वाढवण्याचा प्रयत्न केला. या प्रयत्नात भारत एक महत्त्वाचा भागीदार म्हणून उदयास आला आहे.
पहलगाममधील दहशतवादी हल्ल्यानंतर, अफगाणिस्तानने या घटनेचा निषेध करणारे आणि प्रादेशिक सुरक्षा आणि स्थिरतेवर त्याचा नकारात्मक परिणाम अधोरेखित करणारे निवेदन जारी केले. दोन आठवड्यांनंतर, जेव्हा भारताने ‘ऑपरेशन सिंदूर’ सुरू केले, तेव्हा अफगाणिस्तानने पुन्हा एकदा तणाव वाढल्याचा निषेध केला आणि दोन्ही बाजूंना संयम बाळगा आणि संवाद आणि राजनयिकतेद्वारे समस्या सोडवा, असे आवाहन केले. अलीकडील संघर्षावरील तालिबानच्या संदेशात अफगाणिस्तानच्या संतुलित आणि अर्थव्यवस्थेवर केंद्रित परराष्ट्र धोरणावर भर देण्यात आला. अफगाणिस्तानने सर्व शेजारी देशांशी संबंध राखण्यासाठी आणि प्रदेशातील संघर्षांना विरोध करण्यासाठी वचनबद्ध असलेली एक जबाबदार प्रादेशिक शक्ती म्हणून स्वतःला सादर करण्याचा प्रयत्न केला आहे. भारत आणि पाकिस्तानच्या बाबतीत तालिबानचा दावा आहे की, त्यांचे दोन्ही देशांशी समान आणि सकारात्मक संबंध आहेत. तालिबानची अशी विधाने आंतरराष्ट्रीय समुदायासमोर आपली प्रतिमा सुधारण्यासाठी, आंतरराष्ट्रीय मान्यता मिळविण्याच्या प्रयत्नांना बळकटी देण्यासाठी आणि सर्व देशांसोबत भागीदारीद्वारे फायदे मिळविण्याच्या त्यांच्या प्रयत्नांचा एक भाग आहेत, हे लक्षात घ्यायला हवे.
त्याचवेळी तालिबानला पाठिंबा देऊन फायदा मिळवण्याच्या पाकिस्तानच्या आशा धुळीस मिळाल्या आहेत. तालिबान सत्तेत परतल्यानंतर पाकिस्तान आणि अफगाणिस्तानमधील संबंध आतापर्यंतच्या सर्वांत नीचांकी पातळीवर आहेत. पाकिस्तानने तालिबानला ‘तहरीक-ए-तालिबान पाकिस्तान’वर नियंत्रण ठेवण्यास आणि या गटाला दिलेला पाठिंबा मागे घेण्यास सांगितले आहे. परंतु, तालिबानने हे आरोप फेटाळून लावले आहेत. प्रत्युत्तरादाखल, तालिबानने पाकिस्तानवर त्यांच्या देशांतर्गत समस्यांची जबाबदारी टाळण्याचा आरोप केला आहे. डिसेंबर २०२४ साली पाकिस्तानने संशयित ‘टीटीपी’तळांवर हवाई हल्ले केल्याने दोन्ही देशांमधील तणाव हिंसक झाला. सशस्त्र संघर्ष आणि सीमेपलीकडून गोळीबाराच्या घटनाही घडल्या. गेल्या वर्षी अफगाण निर्वासितांना परत पाठवण्याच्या पाकिस्तानच्या निर्णयामुळे संबंध आणखी बिघडले. तालिबान आता पाकिस्तानकडे भारताच्या दृष्टिकोनातून पाहतो. म्हणजेच, या वर्षाच्या प्रारंभी प्रसिद्ध झालेल्या केंद्रीय सुरक्षा आणि मंजुरी आयोगाच्या वार्षिक अहवालात, तालिबानने बलुचिस्तान आणि खैबर-पख्तूनख्वा प्रांतांमध्ये दहशतवाद्यांना आश्रय दिल्याबद्दल पाकिस्तानमधील काही घटकांना दोषी ठरवले आहे.
गेल्या तीन वर्षांत भारत आणि अफगाणिस्तानमधील संबंधांच्या पार्श्वभूमीवर तालिबान सरकारने भारताशी संपर्क वाढवला आहे. अफगाणिस्तानमधील पाकिस्तानचा प्रभाव कमी झाल्यामुळे भारतासाठीही संधी निर्माण झाल्या आहेत. पहलगाम हल्ल्याच्या पाच दिवसांनंतर दि. २७ एप्रिल रोजी भारतीय परराष्ट्र मंत्रालयाच्या पाकिस्तान, अफगाणिस्तान आणि इराण (पीएआय) विभागाच्या संयुक्त सचिवांच्या नेतृत्वाखालील एक भारतीय शिष्टमंडळ अफगाणिस्तान दौर्यात मुत्तकी यांची भेट घेतली. अफगाणिस्तानच्या परराष्ट्र मंत्रालयाने (एमओएफए) जारी केलेल्या निवेदनात म्हटले आहे की, दोन्ही बाजूंनी भारत आणि पाकिस्तानमधील वाढत्या तणावावर आणि अफगाणिस्तानात भारताच्या भूमिकेच्या विस्तारावर चर्चा केली. दहशतवादी हल्ल्यानंतर आणि पाकिस्तानविरुद्ध भारताच्या कारवाईनंतर झालेल्या बैठकीच्या वेळेने पाकिस्तानसोबतच्या संघर्षात भारत अफगाणिस्तानला कसे पाहतो, याबद्दल एक मजबूत राजकीय संदेश दिला.
भारताने हळूहळू तालिबानशी आपले संबंध वृद्धिंगत केले आहेत. तेथील मानवतावादी मदतीवर लक्ष केंद्रित केले असून तालिबानला आपल्या सुरक्षेच्या चिंताही कळविल्या आहेत. परराष्ट्र सचिव मिस्री यांनी जानेवारी २०२५ साली अफगाणिस्तानच्या अंतरिम परराष्ट्रमंत्र्यांचीही भेट घेतली होती. दोन्ही बाजूंमधील ही आतापर्यंतची सर्वोच्च स्तरीय बैठक होती. भारत आणि अफगाणिस्तानमधील वाढत्या संबंधांमुळे पाकिस्तानमध्ये अस्वस्थता निर्माण होणे साहजिकच. कारण, त्याला अफगाणिस्तानात धोरणात्मक खोली मिळवण्याच्या आशा धुळीस मिळतात. दुसरीकडे, तालिबान भारताशी असलेले आपले वाढते संबंध पाकिस्तानविरुद्ध एक प्रभावी शस्त्र म्हणून पाहतो, ज्यामुळे त्याला पाकिस्तानला धक्का देण्याची संधी त्यांना प्राप्त होईल.