थोर पुरुष स्वतःच्या साधनेचा ढोल वाजवत नसतात. ते आत्मतृप्त असल्यामुळे त्यांच्यात काय आहे, हे इतर जनांना कळत नसते. जे डोळस असतात, त्यांनाच अशांच्या योग्यतेची जाणीव असते. साधारण जन केवळ प्रचारावर जाऊन प्रचारकुशल व चमत्कार दाखविणार्यांच्या मागे लागतात, त्यामुळे कोणाचीच प्रगती होत नसते. दंभाने दंभ वाढतो आणि अज्ञानाचा बडेजावही. ज्ञानेश्वर माऊली म्हणतात, ‘भृंग मधुपान करतेवेळी गुंजारव करीत नाही.’ ज्ञानामृत प्राशन करणारे थोर साधक कीर्तीची अभिलाषा धरीत नसतात.
प्रतिदिन साधना करून आपणही आपल्या जडशरीराबाहेर जाऊन पुनः आपल्या शरीरात प्रवेश करू शकतो. अशा तर्हेने सतत मृत्यू व जन्माचा अभ्यास असल्यावर मग मृत्यू वा जन्म कोणाचा? मरणाचे भय कोणाला व कशाकरिता? मग इतरांनी आपले अतींद्रिय अनुभव सांगावे व आपण ते विश्वास ठेवून मोठ्या आशाळभूतपणे ऐकावे, यात काय पुरुषार्थ आहे? प्रत्येकजण साधनेद्वारे श्रेष्ठ बनू शकतो आणि जिवंतपणी आपले मरण पाहू शकतो. साधारण माणसे इतरांचे अतींद्रिय अनुभव ऐकून तेवढ्यातच तृप्त राहायला पाहतात. ते स्वतःच्या जडशरीराला व जीवात्म्याला थोडासुद्धा त्रास देऊ इच्छित नाहीत. स्वतः साधना केल्याविना दिव्यानुभव येत नाहीत. याज्ञवल्क्य मैत्रेयीला सांगतात, ‘आत्मा अरे वा द्रष्टव्यः श्रोतव्यः मंतव्यः, निदिध्यासतव्यः।’
यमराज व यमलोक
मेल्यानंतरच मृत्यूचा व कथित यमलोकाचा अनुभव येतो, असे नसून सुयोग्य साधना केल्यास जीवंतपणीही मृत्यू आणि यमलोकाचा अनुभव येऊ शकतो. मृत्यू वा यमलोक या जडजगतापेक्षा अन्य वस्तीसारखा स्वतंत्र प्रदेश नसून बर्फात जसे पाणी असते, तद्वत् या जडाच्या आतच सूक्ष्म गतीचा तो लोक वा अवस्था आहे. भगवान व्यासांनी भागवताच्या तिसर्या स्कंदातील अध्याय 30च्या श्लोक 29 मध्ये कपिलदेवांद्वारे वदविले आहे, ‘अत्रैव नरकः स्वर्ग इति मातः प्रचक्षते।’ म्हणजे नरक येथेच आहे आणि स्वर्गही येथेच असून, तो आपण पाहू शकतो. तद्वत्च यमलोक वा यमाबद्दल आहे. मृत्यूवर नियंत्रण ठेवणारी एक शक्ती अवश्य आहे, परंतु ती शक्ती आम्ही भारतीय ज्या एका विशिष्ट आकार वा रचनेत पाहतो, तशी असेलच असे नाही. ज्याच्यावर जसे संस्कार असतील, त्याप्रमाणे मृत्यू अवस्थेचे त्याला दर्शन होईल. मन आहे म्हणून दर्शन होईल. मन आहे म्हणून दर्शने वा प्रचिती आहे. मनाची अवस्था जर नष्ट झाली वा साधक मनाच्या पलीकडील उच्च अशा उन्मनी अवस्थेत गेला, तर त्याला कोणतेच साकार दर्शन होणार नाही, त्या तत्त्वाची अन्य प्रकारे अनुभूती मात्र त्याला येईल.
मृत्यू कशाला म्हणतात व मृत्यूचे रहस्य काय, याबद्दल महाभारतातील द्रोणपर्वात अकंपन राजाच्या मुलाचा मृत्यू झाल्यामुळे नारद अकंपन राजाच्या मनाचे सांत्वन करताना म्हणतात,
एषा मृत्युर्देवदिष्टा प्रदानाम् प्राप्ते काले संहरन्ति यथावत। स्वयंकृत्वा प्राणहरा प्रजानाम् आत्मानं वै प्राणिनो ध्वन्ति सर्वे॥
नैतात् मृत्यूर्दण्ड पाणिहि नास्ति तस्मान्मृतान् नानुशोचन्ति धीरा।
मृत्यू ज्ञात्वा निश्चयं ब्रह्मसृष्टम्॥ महाभारत, द्रोणपर्व 54।49-50॥
यावरून असे दिसते की, महाभारतकाळी मृत्यूची एक साकार स्वतंत्र देवता मानून तिच्या हातात दण्ड असून ती मरणार्याचे प्राण आपल्या हातातील दोराने हरण करते, अशी कल्पना रुढ झाली असावी असे या वचनावरून दिसते. परंतु, मृत्यूची अशी अशास्त्रीय कल्पना महाभारतकारांनीच पूर्णतः अमान्य केली, असे त्यांच्या ‘नैतात् मृत्यूर्दण्डपाणिहिः’ या वचनावरून दिसते. भगवान व्यास वरील वचनाद्वारे स्पष्टच सांगतात की, मृत्यूची देवता म्हणजे हातात दण्ड असलेली अशी कोणी साकार नसून मृत्यू ही घटना ब्रह्मसृष्टीचाच एक भाग आहे. ब्रह्मावस्था जशी सृष्टीचा पसारा स्वतः करते, तद्वत् स्वतःच्या पसार्याचा नाशही करते. म्हणून धीरपुरुषाने शोक करू नये.
कोणी आपला मृत्यूकाळचा अनुभव सांगतात की, यम स्वतः काळाकभिन्न असून तो एका महिषावर बसून येतो. अर्थात महिष काळाच असणार. ज्या व्यक्तीचे यमराजाला प्राणहरण करायचे असते, त्याचे गळ्यात यम आपला दोरपाश टाकून त्याचे प्राणहरण करतो. यम नामक साकार अस्तित्व खरोखरीच असते काय? की आपल्या मनाचा तो एक साकार संस्कार आहे? असे असते, तर प्रत्येक साधकाला शवासन साधनेत तसा यम दिसला असता.
पण गडद काळ्या रंगापलीकडे व श्वास बंद झाल्यामुळे गळा घोटल्यासारख्या विचित्र अनुभवापलीकडे साधकाला मृत्यूचा अन्य अनुभव येत नाही. आपापल्या पूर्व संस्कारांनुसार मरणोन्मुख माणूस मरणसमयी अनुभवास येणारा गडद काळा रंग व श्वासनिरोध याचा भिन्न भिन्न साकार अनुभव घेत असेल. अमेरिकेत राहणार्या ख्रिश्चन संस्कारांच्या व्यक्तीला यमाचे दर्शन काळ्या निग्रोसारख्या काळा सूट परिधान केलेल्या व काळ्या स्कूटरवर धावणार्या व्यक्तीद्वारे साकारणे शक्य आहे. यम नावाचे कोणते साकार अस्तित्व नसून, मृत्यूसमयी अनुभवास येणार्या काळ्या वर्णाचे ते साकार दर्शन होय. मरताना प्रत्येकाचा श्वास बंद होतो, म्हणून काहीजणांना त्यांचा गळा त्या यमाच्या गळफासाने दाबला जाऊन त्याचे प्राणहरण केल्याचा अनुभव येत असेल. मृत्यूकाळची अवस्था अतिशय तीव्र असल्यामुळे, त्या तीव्रतेनुसार साकार अनुभवसुद्धा तितकेच तीव्र म्हणून सत्य वाटत असावेत.
प्रत्येकाचे अनुभव काळ्याकभिन्न वर्णाला व श्वासबंद झालेल्या तीव्र संवेदनेला धरून असतात, एवढे मात्र खरे. काळा वर्ण का दिसतो? तर प्रकाशरहित अवस्था म्हणजे कृष्णवर्ण होय. प्रकाशाद्वारे जीवन नटते, जगते तर प्रकाशाच्या अभावामुळेच जीवन नष्टही होते. जीवन नष्ट वा मृत्यू अवस्था प्रकाशरहित अवस्था असल्यामुळे, साधकाला मृत्यूसमयी घनदाट अंधकार दिसतो. मरणसमयी आपण प्रकाशमय म्हणजे सजीव सृष्टीतून निर्जीव अवस्थेकडे आकर्षिले जातो. यामुळे मृत्युसमयी एका विलक्षण वेगाचा साधकाला अनुभव येतो.
आपण व्यवहारातसुद्धा असेच पाहतो. एखाद्या ठिकाणी सूर्याची प्रखर किरणे पडून तेथील हवा उष्णतेमुळे हलकी होऊन वर जाते. त्यामुळे त्या भागात लघुभारप्रदेश पोकळी उत्पन्न होते. तेथील पोकळी भरून काढण्याकरिता अवतीभोवतीची हवा लघुभारप्रदेशाकडे आकर्षिली जाते. म्हणून भोवतालची हवा त्या लघुभारप्रदेशाकडे विलक्षण वेगाने धाव घेते. तद्वत् मृत्यू अवस्थाशून्य पोकळी असल्यामुळे आणि त्या शून्य अवस्थेकडे जाणारा जीवात्मा प्रकाशमय म्हणजे गुरुभार वातावरणातून आकर्षिला जात असल्यामुळे, अति वेगाने धाव घेतो. हाच मृत्यूच्या भयंकर वेगाचा अनुभव होय. हा वेग मरणोन्मुख व्यक्तींना रेड्यासारख्या धावणार्या जनावराद्वारे व्यक्त होत असावा. वास्तविक, यम नावाची अशी कोणतीच व्यक्ती नाही.
- राजेश कोल्हापुरे