आनंद नाहीसा करणारा भेदभाव

    13-Oct-2022
Total Views | 88
 
समर्थ रामदासस्वामी
 
 
 
‘माझे-तुझे’ हा भेदभाव न करता वाद सोडून संवाद करावा, असे समर्थांचे मत आहे. बुद्धी ही मानवाला मिळालेली मोठी देणगी आहे. तिचा विवेकाने वापर करून आपली उन्नती साधावी, नाही तर बुद्धी, भक्ती यासारखी कामधेनू घरी असताना काही करंटे आनंद मिळविण्यासाठी वणवण फिरत राहतात व दुःख पदरात पाडून घेतात.
 
 
 
समर्थ रामदासस्वामी तत्त्वज्ञानी तसेच भक्तिमार्गी संत होते. त्यांचा आणखी एक गुणविशेष म्हणजे, उत्तम लोकशिक्षकांच्या अंगी जे गुण असावे लागतात, ते सारे गुण समर्थांच्या व्यक्तिमत्त्वात दिसून येतात. ‘शहाणे करूनी सोडावे सकल जन’ हा विचार स्वामींच्यामनावर बिंबलेला असल्याने ज्ञानशाखेतील तसेच भौतिक घटनांतील बारकावे समर्थ स्पष्ट करून सांगतात. प्रत्येक विधानातील सार आणि असार समजावून देतात. सार तेवढा भाग घ्यावा आणि असार ते सोडून द्यावे, असे स्वामी सांगतात. यापूर्वीच्या मनाच्याश्लोकांतून खर्‍या भक्ताच्या अंगचे गुणविशेष स्वामींनी सविस्तर वर्णन करून सांगितले आहेत. त्याचा थोडक्यात आढावा घ्यायचा, तर हा भक्त सदाचाराने वागणारा, मनन-चिंतन करणारा, नेहमी नम्र-सुवाचा असलेला, सत्यवादी आणि विवेकी असतो.
 
 
अनन्यभावाने भगवंताला शरण भक्ताचे वर्णन करताना समर्थ म्हणतात की, देवसुद्धा अशा भक्ताचा ऋणी असतो. असा हा परमेश्वराचा दास झालेला भक्त धन्य होय, असा समर्थांनी त्याचा गौरव केला आहे. पण, या जगात असे सदाचारी, सद्गुणी भक्त थोडे असतात. इतर सारे भक्तीच्या क्षेत्रासाठी निरुपयोगी असतात. असे हे बाजारबुणगे कसे असतात, हे सांगण्यासाठी स्वामींनीमनाच्या श्लोकातील पुढील श्लोकाची रचना केली आहे. अर्थात, या रिकामटेकड्यांचे दोषास्पद वर्तन टाकून देण्यासाठी स्वामींना सविस्तर सांगावे लागले. दासबोधात स्वामींनी ‘मूर्खलक्षणे’, ‘पढत मूर्खलक्षणे’, ‘कुविधालक्षणे’ वगैरे सांगताना ते ‘त्यागार्थ बोलिले’ असे सांगितले आहे. तसाच भाव हे श्लोक सांगताना स्वामींच्यामनात असावा. सद्भक्ताची लक्षणे सांगून झाली. आता करंट्या माणसाची लक्षणे ‘त्यागार्थ’ ऐका. स्वामी सांगतात,
 
 
उभा कल्पवृक्षातळीं दुःख वाहे।
तया अंतरी सर्वदा तेंचि आहे।
जनीं सज्जनीं वाद हा वाढवावा।
पुढे मागुता शोक जीवीं धरावा॥61॥
 
 
समर्थांचा सर्व प्रश्नांकडे पाहण्याचा दृष्टिकोन सकारात्मक आहे. स्वामी सांगतात की, राम म्हणजे कामधेनू आहे. तसाच सर्व पारमार्थिक आकांक्षा पूर्ण करणारा तो कल्पतरू आहे. तो अंतरीचे शाश्वत सुख देणारा आहे. रामाच्या चिंतनात दुःख, चिंता, नैराश्य नाहीसे होऊन समाधान मिळवता येते.
 
 
पण, रामाच्या सान्निध्यात जाताना सकारात्मक विचार घेऊन जावे लागते. ‘मी सुखी समाधानी आहे, मला आत्मोद्धाराचा मार्ग सापडला आहे,’ अशा विश्वासाने रामोपासना करायची असते. मग तो कृपाळू राम अर्थात भगवंत भक्तावर कृपा करून त्याला इच्छित असा आनंदाचा मोक्षाचा ठेवा देतो. तथापि, रामासारख्या कल्पवृक्षाच्या तळी उभा असलेला दुर्दैवी माणूस आपल्याच दु:ख-शोकांची उजळणी करीत राहिला, तर त्याला दु:ख-शोकाशिवाय दुसरे काय मिळणार? आपण जसा विचार घेऊन रामाकडे जावे, त्याची तेथे पूर्तता होते. राम आणि संत हे कल्पवृक्षाप्रमाणे असतात. ज्याची मनात कल्पना करावी, तसे घडून येते.
 
 
 
त्यासाठी संतांकडे, रामाकडे जाताना संतोषजनक सकारात्मक विचार घेऊन जावे. त्याने सदाचार वाढीस लागून आत्मोद्धाराचा मार्ग सापडतो. हा अत्यंत महत्त्वाचा विचार शहाण्या लोकांनी इतर जनांत घेऊन जावा. त्यांना तो समजावून सांगावा. त्यावर विचारविनियम करावा आणि त्यांनाही हा विचार पुढे नेण्यास सांगावे. या श्लोकातील ‘जनीं सज्जनीं वाद हा वाढवावा’ या ओळीत स्वामींना अभिप्रेत अर्थ हा असावा, असे वाटते. काही अभ्यासकांच्या मते, ‘वाद’ याचा अर्थ ‘विचार’ असा घेता येत नाही. त्यांच्या मते, भगवंताचे अनुसंधान कसे करावे, हे शिकण्यासाठी संतांकडे जायचे असते. काही विद्वान आपली विद्वत्ता दाखवण्यासाठी किंवा तात्त्विक वादविवाद करण्यासाठी संतांकडे जातात. तिथे शब्दच्छल करून निरर्थक वाद वाढवित बसतात. त्या वादातून काहीही मिळत नाही. उरते ते फक्त अहंकार, शोक आणि चिंता, तेच त्या वादविवाद करणार्‍या विद्वानांना प्राप्त होते. म्हणून स्वामी या श्लोकात सांगतात की, उगीच वाद वाढवत बसलात, तर पुढे जीवाला दु:ख, शोक मिळणार आहे.
 
 
 
अभ्यासकांचा हा दृष्टिकोन मान्य केला, तरी वर सांगितल्याप्रमाणे ‘वाद वाढवावा’ म्हणजे वरील विचार पुढे न्यावे, त्यावर चर्चा करावी. असा जरी अर्थ घेतला तरी हे न करण्याने जीवाला दु:ख भोगावे लागणार आहे. अशारीतीने ‘जनी सज्जनी वाद हा वाढवावा’ या ओळीचा अर्थ कसाही घेतला तरी राम हा कल्पतरू असल्याने सकारात्मक संतोष बरोबर घेऊन त्याच्याकडे जावे, त्याची भक्ती-उपासना करावी म्हणजे तो आनंदच देईल. जीवाला दु:खी कष्टी व्हावे लागेल. यासाठी रामोपासना, रामभक्ती करताना नकारात्मक विचारांना कायमचे सोडून द्यावे, हे उत्तर!
 
 
सतत दुःख, कष्ट, नैराश्य या विषयांचे नकारात्मक विचार मनात बाळगून रामाचे चिंतन होणार नाही. ही नकारात्मकता न सोडल्याने माणसाचेकरंटेपण आणि त्याचा परिणाम काय होतो, हे स्वामी पुढील श्लोकात सांगत आहेत-
 
 
निजध्यास तो सर्व तूटोनी गेला।
बळें अंतरी शोक संताप ठेला।
सुखानंद आनंद भेदें बुडाला।
मनीं निश्चयो सर्व खेदें उडाला॥
 
 
 
अहंकारयुक्त अंतःकरणाने गर्व ताठा बरोबर घेऊन केवळ बुद्धिकौशल्य दाखविण्यासाठी वादविवाद करावा, या उद्देशाने कोणी संतांकडे गेला तर परिणाम काय होईल? त्याचे अनुसंधान, परमात्मा विषयाचे त्याचे मनन-चिंतन सुटून जाईल. मनाची एकाग्रता भंग पावेल. मन अशांत होईल. यातून लाभ तर काही होणार नाही, पण संतांशी केलेल्या वादातून ‘मीच खरा’, ‘माझेच मत बरोबर’ असा गर्व, ताठा उत्पन्न होऊन शोक आणि संताप बळजबरीने त्याच्या अंतःकरणात प्रवेश करतील. त्या रागाचा, शोकाचा आवेश एवढा तीव्र असेल की, त्याला थोपवता येणार नाही. वाद घालणार्‍याच्या नुकसानीचे मोजमाप करता येणार नाही. ‘मी हुशार, माझ्या इतका बुद्धिमान कोणी नाही, बाकी सारे यथातथा’ असा भेदभाव उत्पन्न झाल्याने आनंदमय भगवंताचे सतत चिंतन करणारा निजध्यास भंग पावतो.
 
 
 
निजध्यासाने प्रापंचिक दुःख विवेकाने झेलण्याचे सामर्थ्य अंगी येते. भेदभावाने प्रापंचिक दुष्परिणामही जाणवू लागतात. भेदभाव वाढला की, द्वेष, मत्सर, असूया उत्पन्न झाल्याने मन भौतिक सुखालाही पारखे होते. मनातील भगवंताविषयीचा निश्चयही मावळू लागतो. तेव्हा ‘माझे-तुझे’ हा भेदभाव न करता वाद सोडून संवाद करावा, असे समर्थांचे मत आहे. बुद्धी ही मानवाला मिळालेली मोठी देणगी आहे. तिचा विवेकाने वापर करून आपली उन्नती साधावी, नाही तर बुद्धी, भक्ती यासारखी कामधेनू घरी असताना काही करंटे आनंद मिळविण्यासाठी वणवण फिरत राहतात व दुःख पदरात पाडून घेतात. तो पुढील श्लोकाचा विषय असल्याने नंतर सविस्तरपणे पाहता येईल...(क्रमश:)
 
 
- सुरेश जाखडी
 
 
अग्रलेख
जरुर वाचा

Email

admin@mahamtb.com

Phone

+91 22 2416 3121