गंदा हैं पर धंदा हैं !

    27-May-2025
Total Views | 16

Just Corruption or Real Involvment is present?

वावा! मुंबईमध्ये जोरदार पाऊस पडतोय, आता भाजप महायुतीविरोधात भाषणे करून मुंबईकरांना भडकवण्याची नामी संधी आहे. हो तर, मुंबई महानगरपालिकेच्या निवडणुका येत आहेत ना? नेहमीप्रमाणे शहरात कमी अधिक भागांत पाणी भरले. काय करावे? काय म्हणता; जुलै 2005 साली मुंबईत महापूर आला, तेव्हा आजोबांना सोडून माझे बाबा उद्धव ठाकरे, आई आणि आम्ही मुलं हॉटेलला राहायला गेलो होतो. आताही तसेच ‘माझे कुटुंब, माझी जबाबदारी’ म्हणत आम्ही उबाठा कुटुंबाने, हॉटेलमध्ये राहायला जावे? हं त्याची गरजच नाही. मातोश्री एकनंतर दोन काय उगाच बांधले आम्ही. आमची सत्ता नाही, त्यामुळे भाजप, शिंदे गट यांच्यावर टीका करत सरकारविरोधात अपप्रचार करण्याची हीच ती वेळ. आता मी मुंबईतल्या काही भागांना भेट देणार. काय म्हणता? त्यानिमिताने तरी मला मतदारसंघातील लोकांचे प्रश्न समजतील? राजकारणातल्या कुचाळक्या करण्यासाठी का होईना; पण मी लोकांना भेटेन? काय म्हणता, 2005 सालचा पूर आमच्याच काळात आला? त्यानंतर मिठी नदी स्वच्छता आणि नालेसपाई रूंदीकरणासाठीची ब्रिमस्टोवॅड परियोजनाही आमचीच.


पण, आमच्या कारकिर्दीमध्ये मिठी नदी स्वच्छतेचे किंवा ब्रिमस्टोवॅड परियोजनाचे काम व्यवस्थित झाले नाही? त्यात भ्रष्टाचार झाला? हे पाहा मला त्याबद्दल काही विचारू नका. 2005 साली खूप पाऊस पडला, तेव्हा आणि त्यानंतरही आमच्या कारकिर्दीमध्ये प्रत्येक वर्षी मुंबई पावसात बुडतच होती पण, म्हणून काय झाले? आमच्या सत्ताकाळात मुंबईचे कितीही वाटोळे झाले असले, तरी आम्ही त्याबद्दल बोलणार नाही. काय म्हणता? लोकांना तेव्हा आणि आताही आमच्याकडून काही अपेक्षाच नाहीत? काय म्हणता, मेट्रोमध्ये सगळीकडेच पाणी भरले, असे जे घडलेच नाही तो ‘खोटा नॅरेटिव्ह’ रंगवून सांगून लोकांच्या मनात आम्ही भ्रम निर्माण करतो? काय म्हणता, लोकांचे भले करावे, त्यासाठी काम करावे, हे काम त्या भाजपवाल्यांचे आहे आमचे नाही? काय म्हणता, देवेंद्र फडणवीस यांच्यासारखे दूरदर्शी लोकाभिमुख काम आम्ही करू शकत नाही, म्हणून त्यांच्या प्रत्येक कामात आम्ही उगाच चुका शोधत बसतो? असू द्या, आम्हाला फक्त भाजप आणि मोदी-फडणवीसांवर टीका करता येते. समजून घ्या, दुसरे काहीच काम नाही आम्हाला. काय म्हणालात, ‘आमचा गंदा हैं, पर धंदा हैं?’

काय करायचे?


राहुल गांधीनी ‘एक्स’वर पोस्ट केले, ‘नॉट फाऊंड सुटेबल’ म्हणजे ‘नवीन मनुवाद’ आहे. एससी, एसटी, ओबीसीचे योग्य उमेदवार शिक्षण आणि नेतृत्वापासून दूर राहावेत म्हणून, त्यांना मुद्दाम अयोग्य ठरवले जाते. राहुल गांधींच्या या विधानावर काय बोलावे? राहुल गांधींसारखे लोक देशात आणि परदेशात जाऊनही भारताची बदनामी करतात. असे चित्र उभे करतात की, भारत देशात इतर मागासवर्गीय तसेच अनुसूचित जाती-जमातींना गुलाम म्हणून वागवले जाते. त्यांना कोणतीच संधी मिळत नाही, या देशात विषमता आहे. अत्यंत भयानक परिस्थिती आहे, असे धांदात खोटे ते सांगत असतात.

पण, सत्य असे आहे का? तर मुळीच नाही. जातपात काढण्यात अजिबात स्वारस्य नाही. मात्र, राहुल गांधींसारखे हीच भाषा समजत असतात. त्यामुळे सांगावे लागते की, नशीब या देशाचे पंतप्रधान इतर मागासवर्गीय समाजाचे आहेत. या देशाच्या राष्ट्रपती महिला आहेत आणि त्या आदिवासी म्हणजे, अनुसूचित जमातीच्या आहेत. तर देशाचे उपराष्ट्रपती हे इतर मागासवर्गीय समाजाचे आणि देशाच्या सर्वोच्च न्यायालयाचे सर्वोच्च न्यायाधीश हे न्या. भूषण गवई आहेत.

आज विविध क्षेत्रात आज सर्व समाज प्रगती करत आहे. शिक्षा, विज्ञान, साहित्य, संस्कृती, क्रीडा तसेच मुख्य म्हणजे, सत्ता क्षेत्रातही समाजाने चांगलाच ठसा उमटवला आहे. या सगळ्या समाजातील लोकांनी केवळ भारतीय म्हणूनच देशाच्या कल्याणामध्ये योगदान दिले आहे. मी अमूक जातीचा, मी तमूक जातीचा म्हणून यापैकी कुणीही जातीचे तुणतुणे वाजवलेले नाही. तसेच, या सगळ्या व्यक्तींना त्यांच्या समाजाव्यतिरिक्त, इतर समाजानेही डोक्यावर घेतले आहे. त्यांना मानसन्मान दिला आहे. त्यांना आपले मानले आहे. पण, हे जर राहुल गांधी आणि त्यांच्यासारख्या लोकांना कळाले असते, तर मग प्रश्नच नव्हता. समाजाचे हे सुखद वास्तव त्यांना माहिती नाही. त्यांना इतकेच माहिती आहे की, जातिभेद करा आणि सत्ता मिळवण्याचा प्रयत्न करा. जाती अंताची लढाई समाज आणि देश लढत असताना आणि त्यात निर्णायक यश आले असताना राहुल गांधीच्या या जातिभेदाचे काय करायचे? भारत सुरक्षित, सक्षम होत आहे. त्याचवेळी राहुल गांधींच्या या असल्या विघातक बोलण्याचे काय करायचे?

योगिता साळवी
9594969638
अग्रलेख
जरुर वाचा

Email

admin@mahamtb.com

Phone

+91 22 2416 3121