शिंदे जाणार शिंदेंकडे?

    10-Jun-2025
Total Views |

sudhakar badgujar
 
 
उबाठा गटातून नुकतीच हकालपट्टी झालेल्या सुधाकर बडगुजर यांनी पूर्वी अनेक आरोप-प्रत्यारोपांनंतरही नाशकात उबाठा गटाचा किल्ला लढवला. त्यांच्या जिल्हाप्रमुखपदाच्या काळातच नाशिक लोकसभेत उबाठा गटाचा खासदार निवडून आला. कुख्यात गुंड सलीम कुत्ता नाचगाणे प्रकरण त्यांच्या अंगलट आले. त्यांच्या सुपुत्रावरही ‘मकोका’ कायद्याखाली कारवाई झाली. तरीही बडगुजर यांनी ठाकरेंशी एकनिष्ठ राहण्याचा निर्णय घेतला.
 
पण, पक्षात निर्णय घेत असताना डावलले जात असल्याची खंत उघडपणे बोलून दाखविल्याने त्यांना ‘मातोश्री’ने बाहेरचा रस्ता दाखवला. दरम्यान, विधानसभा निवडणुकीनंतर उद्धव यांनी कार्यकारिणीत बदल करून बडगुजर यांचे जिल्हाप्रमुखपद काढून डी. जी. सूर्यवंशी यांच्याकडे सोपवत बडगुजर यांना उपनेतेपद बहाल केले. यामुळे ते संघटनेच्या निर्णय प्रक्रियेतून एकप्रकारे दूर लोटले गेले. याचवेळी नाशिकचे महानगरप्रमुख विलास शिंदे यांना बढती मिळून जिल्हाप्रमुखपद मिळेल, अशी अपेक्षा होती. पण, पदाधिकार्‍यांना नेहमीच गृहीत धरणार्‍या ठाकरेंनी सूर्यवंशी यांच्याकडे जिल्हाप्रमुखपद दिले आणि पक्षात नाराजीचे वारे घुमू लागले. त्याचेच पर्यावसन बडगुजर यांच्या हकालपट्टीत झाले. हकालपट्टीपूर्वी बडगुजर यांनी आपण स्वतः नाराज आहोतच, शिवाय महानगरप्रमुख विलास शिंदे यांच्यासह पक्षातील दहा ते 12 जण नाराज असल्याचा दावा करत ठाकरेंना आव्हान दिले.
 
त्यात नाशिकमधील पदाधिकारी उद्धव यांच्या भेटीसाठी गेले. त्यावेळी त्यांच्यासोबत विलास शिंदे नव्हते. त्याआधी विलास शिंदे यांच्या लेकीच्या लग्नसोहळ्यासाठी खास उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे आले होते. यावेळी बोलताना त्यांनी शिंदे आहेत, शेवटी शिंदेकडेच जाणार असे विधान केले. त्यात बडगुजर यांनीही पत्रकार परिषदेत विलास शिंदे नाराज असल्याचे सांगितले. विलास शिंदे हे जुने शिवसैनिक आहेत. एकनाथ शिंदे बाजूला गेल्यानंतरही विलास शिंदे हे उद्धव यांच्यासोबतच राहिले. त्यामुळे उद्धव यांनी त्यांच्यावर महानगरप्रमुखपदाची जबाबदारी सोपवली. तिकडे सांगलीत चंद्रहार पाटील शिवसेनेत दाखल होत असताना इकडे नाशकात विलास शिंदेही ठाकरेंची साथ सोडणार असल्याची चर्चा रंगली आहे. शिंदे यांच्यासोबत काही माजी नगरसेवकही पक्षाची साथ सोडू शकतात. शिंदे शिंदेंकडे गेल्याने शिवसेनेला त्याचा चांगला फायदा होईल.
 
दुही माजवणारे शुक्राचार्य
 
भारत हा तसा सहिष्णू देश आणि आपली ही सहिष्णू ओळख जपण्याचा प्रत्येक भारतीय आटोकाट प्रयत्न करताना दिसतो. त्यामुळेच येथे असंख्य जाती-धर्माचे लोक अगदी गुण्यागोविंदाने नांदतात. अशा विविधतेने नटलेल्या देशात रुजलेल्या लोकशाहीकडे संपूर्ण जग आदराने पाहते. आपल्या लोकशाहीचे दाखले अनेक देश वेळोवेळी देत असतात. पण, मागील काही वर्षांपासून लोकशाहीचे लेणं ल्यालेल्या आपल्या देशात धर्मांधता बाळसे धरताना दिसते. फाळणीनंतरही भारतात वास्तव्याला असणार्‍या कट्टरपंथीयांकडून वेळोवेळी भारत अशांत कसा राहील, यासाठी सारखा खोडसाळपणा सुरू असतो. हे अगदी काल-परवाच्या ताज्या उदाहरणावरून दिसून येईल. नुकतीच बकरी ईदची नमाज अदा झाल्यानंतर नाशिक शहरातील ईदगाह मैदानावर पॅलेस्टाईनचा झेंडा फडकविण्याचे पातक घडले. असाच प्रकार मागील वर्षी मालेगाव येथे रमजान ईदची नमाज अदा झाल्यानंतर घडला होता. यावेळी रमजान ईदच्या नमाज दरम्यान, आमदार मौलाना मुफ्ती मोहम्मद हे पॅलेस्टाईनवर होत असलेल्या अन्यायाबाबत संबोधित करताना एक तरुण पाठीमागून पॅलेस्टाईनचा ध्वज घेऊन फडकवत आला आणि पॅलेस्टाईनचे समर्थन केले.
 
त्यामुळे देशात अशांतता माजवण्याचे हे प्रकार जाणूनबूजून तर होत नाही ना, याचा शोध घेण्याची गरज निर्माण झाली आहे. महिन्याभरापूर्वीही अनधिकृत दर्गा हटवताना या धर्मांधांनी पोलिसांवर तुफान दगडफेक केली, तर वर्षभरापूर्वी वैजापूर आणि जुन्या नाशकात तुफान दगडफेक करत भळभळती जखम निर्माण केली, ती अजूनही ताजी आहे. अशा घटना घडविण्याचे पाप या धर्मांधांकडून नित्यनेमाने होत असून, नाशिकच्या नावाला एकप्रकारे कलंक लावला जात आहे. हे कमी की काय, म्हणून देशभरातही दररोज कुठेना कुठे या धर्मांधांकडून देशविरोधी कृत्ये जाणूनबुजून केली जातात. या कृत्यांमुळे समाजात विष पेरले जात असल्याचे मात्र यांच्या लक्षात येत नाही. त्यामुळे ठरवून देश कसा धुमसत राहील आणि समाजा-समाजामध्ये दुही निर्माण करून आपली पोळी कशी भाजून घेता येईल, असे यांचे मनसुबे असल्याचे स्पष्ट दिसते. या कृत्यांना वेळीच पायबंद घातला, तरच सुदृढ लोकशाहीचे गोडवे आपल्याला जगभर गाता येतील.
 
 
 - विराम गांगुर्डे
 
'मुंबई तरुण भारत'चं व्हॉट्सअप चॅनल फॉलो करा!
अग्रलेख
जरुर वाचा

Email

admin@mahamtb.com

Phone

+91 22 2416 3121