दुःखी आत्मा बिचारे!

    11-Jun-2025   
Total Views | 13

परवा फुलेवाड्यात महिला वटपौर्णिमा साजरी करत होत्या. मात्र, त्यांनी ती वटपौर्णिमा साजरी करू नये म्हणत, बाबा आढाव (तेच ते तीन दिवसांतच उपोषण गुंडाळणारे) आणि ‘संभाजी ब्रिगेड’, ‘सत्यशोधक प्रबोधन’, ‘राष्ट्र सेवा दल, नारी समता मंच इत्यादींनी त्यांच्या पूजेत व्यत्यय आणण्याचा प्रयत्न केला. संविधानात तर सगळ्यांना त्यांच्या त्यांच्या श्रद्धा जपण्याचा हक्क आहे. पूजा करणार्या महिलांना मुर्ख, तुच्छ समजणारे आणि त्यांच्या श्रद्धांना विरोध करणारे हे लोकच संविधानविरोधी आहेत? स्वतःला सर्वज्ञानी समजण्याच्या अहंकाराच्या नादात हे लोक मानवी नात्यातील प्रेम, आदर, श्रद्धा यांपासून दूर असावेत. दुःखी आत्मा बिचारे! असो. महिलांनी फुले वाडा सोडून इतर कुठेही वटपौर्णिमा साजरी करावी, असाही त्यांचा फतवा. कर्तृत्ववान सावित्रीमातेच्या पवित्र वास्तूत पतीसाठी महिलांनी पूजा करणे म्हणजे सावित्रीबाईंचा अपमान आहे, असेही ते म्हणत होते. पण, माता सावित्रींनी देवधर्म श्रद्धा, पूजा यांना कधी विरोध केला? पती-पत्नीच्या नातेसंबंधातील आदर प्रेमाला त्यांनी कधी विरोध केला? कधीच नाही. ‘पहिली माझी ओवी गं, सावित्रीच्या लेकीला,’ असे हे तथाकथित पुरोगामी लोक त्यादिवशी फुले वाड्यात सामुदायिकरित्या म्हणत होते. का? तर म्हणे, तिथे वड पूजायला आलेल्या महिलांचे प्रबोधन व्हावे आणि त्यांनी वटपौर्णिमा सण तिथे साजरा करू नये म्हणून! त्यांच्या मते, महिलांनी पतीसाठी श्रद्धायुक्त पूजा करणे, हा सावित्रीमातेचा अपमान. काय म्हणावे? माता सावित्रीबाई आणि क्रांतिज्योती जोतिबा यांच्यातला प्रेम, स्नेह, आदर या तथाकथित ढोंगी, भंपक लोकांना माहिती तरी आहे का? सावित्रीबाईंच्या मनात त्यांच्या पतीविषयी अपार प्रेम, श्रद्धा, स्नेह होता. कृतज्ञतेने त्या म्हणाल्या होत्या, ‘स्वामी जोतिबांच्या| लागे मी चरणी.’ अर्थात, जोतिबाही आदर्श पती आणि माणूस होते, म्हणूनच सावित्रीबाई हे म्हणाल्या. मग आजच्या आधुनिक सावित्रींच्या लेकीच्या मनातही पतीसाठी श्रद्धाभाव असणे काय पाप आहे? बरं सगळेच पती दुष्ट, पत्नीला छळणारे राक्षस आहेत, असे आढाव आणि त्यांच्या समविचारी पिलावळींना का वाटते? हं, पण हे कसे विसरले की, आढाव आणि त्यांच्या समविचार्यांना असे वाटणारच. कारण, हे लोक समाजरूपी वटवृक्षापासून तुटलेले आहेत. अरेरे, दुःखी आत्मा बिचारे!

सारसबाग : सरस बाग

बासी ईद’च्या दिवशी सारसबाग बंद केली म्हणून पुण्यातल्या मुस्लीम संघटना तसेच, हिंदू धर्मात जन्मलेले पण हिंदूंविषयीच तिटकारा आणि मुस्लिमांविषयी उतू जाणारे प्रेम असलेल्या काही तथाकथित पुरोगाम्यांना तीव्र दुःख, संताप आला. त्यांच्या मते, हा मुस्लिमांवर अत्याचार आहे. ही ‘आधुनिक अस्पृश्यता’ आहे. आता ही ‘आधुनिक अस्पृश्यता’ कशी, हे त्यांचे त्यांनाच ठावूक. कारण, सारसबागेमध्ये काय केवळ मुस्लीमच येत नाहीत, तर हिंदू आणि विविध समाजाचे लोक तिथे येतात. मग बाग बंद करणे म्हणजे मुस्लिमांना अस्पृश्य वागणूक देणे, हे कसे काय बरं? तर या लोकांचे म्हणणे आहे की, राज्यसभा खासदार मेधा कुलकर्णी यांनी पुणे महापालिकेला ईदच्या दुसर्याच दिवशी सारसबाग बंद करण्याचे पत्र दिले होते. यावर मेधा कुलकर्णी यांचे म्हणणे की, "सारसबागेचा परिसर हा देवस्थान ट्रस्टचा परिसर आहे. ती जागा महापालिकेने भाडेतत्त्वावर घेतली आणि तिथे उद्यान उभारले. इथे सिद्धिविनायकाचे मंदिर आहे. तळ्यातील गणपती आहे. मात्र, हे लोक इतर कुठेही न जाता हेतुपुरस्पर इथे याच देवस्थान असलेल्या बागेत येतात आणि मांसाहार करतात. (खाल्ल्यानंतर मटणाची हाडे तिथेच टाकतात) त्यामुळे इथे असे काही घडू देणार नाही.” या घटनेबाबत अनेकांचे म्हणणे आहे की, कुणी काय खावे, प्यावे हा ज्याचा त्याचा वैयक्तिक प्रश्न. त्यामुळे ते मटण खातात, याबाबत काही देणेघेणे नाही. पण, ‘बासी ईद’च्या दिवशी मंदिर परिसरात येऊनच मांसमटण खावेसे त्यांना का वाटत असेल? तसेच, खाल्ल्यानंतर हाडे वगैरे तिथेच का टाकावेसे वाटत असेल? काही लोकांचे म्हणणे, हिंदू कधी तरी दर्गा किंवा मशीद परिसराजवळ हिंदूपद्धतीने पूजाअर्चा सोडा; पण बायका-पोरांना घेऊन तिथे जाऊन निवांत बसण्याचा विचार तरी करतील का? मग हिंदूंच्या देवस्थानाबाबत हे कशासाठी? हे संविधानाचे राज्य आहे. लोकशाही आहे, मान्य आहे. मात्र, आपापल्या धर्माच्या श्रद्धा जपण्याचा अधिकार सगळ्यांनाच आहे. तो अधिकार हिंदूंनाही आहेच की! त्यामुळे मुस्लीम असोत की हिंदू, जर त्यांनी सारसबागेत मंदिराजवळील परिसरात कोटी हिंदूंच्या भावना दुखावणारे कृत्य केले, तर त्यावर निर्बंध हवेतच. पुण्याला शौर्याचा, तेजाचा ऐतिहासिक वारसा आहे. त्याच पुण्यातील सारसबागेने सुरुवात झाली आहे.

योगिता साळवी

एम.ए. समाजशास्त्र. सध्या मुंबई तरुण भारत  येथे वार्ताहर-उपसंपादक पदावर कार्यरत. राजकीय कार्यकर्ता म्हणून प्रदीर्घ अनुभव. विविध सामाजिक प्रश्‍नांच्या अभ्यासाची आवड व लिखाण. वस्त्यांचे वास्तव हे मुंबई तरुण भारतमधील लोकप्रिय सदराच्या लेखिका.
'मुंबई तरुण भारत'चं व्हॉट्सअप चॅनल फॉलो करा!
अग्रलेख
जरुर वाचा

Email

admin@mahamtb.com

Phone

+91 22 2416 3121