तुम आ गये हो नूर आ गया हैं।’ असे म्हणता म्हणताच ‘तुने दिल मेरा तोडा, कहीं का न छोडा।’ असे म्हणण्याची नामुश्की आली आहे आपल्यावर. कळतंय का? आपण असे म्हणत असताना ते कमळवाले फडणवीस गालत हसत मनातल्या मनात ‘इंजिन’ला म्हणत होते की, “आखिर तुम्हे आना हैं। जरा देर लगेगी!’ काय करावे? ‘इंजिन’ सोबत येईल, मग ‘इंजिन’वार बसून आम्ही महानगरपालिका सत्तेची मशाल पेटवू. काय न काय स्वप्न बघितली. काय म्हणता, आता स्वप्न बघत निवांत पडणार आहोत. म्हणजे निवडणुकीत पण निवांत पडणार आहोत की काय?
इथे आम्ही “आई ये आप का इंतजार हैं,’ म्हणत असताना ते तिकडे गेले. महाराष्ट्राच्या मनात काय आहे, हे त्यांना माहिती नाही की काय? दोन भाऊ एकत्र यावे, असे महाराष्ट्राला वाटते. काय म्हणता, महाराष्ट्राला अशी वायफळ स्वप्न बघायला आणि मनाचे मांडे खायला वेळ नाही. काय म्हणता, कोण कोणसोबत जाणार यापेक्षा कोण कोणासोबत कशासाठी जातो, हे महाराष्ट्राला चांगलेच माहिती आहे? त्यामुळे आम्ही ‘इंजिन’ला का सिग्नल दिला हे लोकांना माहिती आहे? काय म्हणता, आताच का राज ठाकरे हे भाऊ आहेत असे सूचले? त्यांच्या मुलाला निवडणुकीत हरवताना तो भावाचा मुलगा आहे, हे तेव्हा का सूचले नाही? हं. आताच आम्हाला उपरती झाली की, राज ठाकरे भाऊ आहेत. कारण, मुंबई महानगरपालिकेची निवडणूक होणार आहे. त्यामुळे ‘इंजिन’सोबत घेणार होतो. काय म्हणता, आमच्यासोबत इंजिन असू दे की, हात असू दे की तुतारी, आमची मशाल पेटणार नाही म्हणजे नाही? नाही आम्ही कोटीवेळा बोललो, आम्ही म्हणजे महाराष्ट्र, आम्ही म्हणजे मुंबई आणि आम्ही म्हणजे मराठी माणूस. काय म्हणता? आम्ही कोटीवेळा असे म्हणालो, तरी देवेंद्र एकदाच आमच्याबद्दल म्हणाले होते की, ‘तुम्ही म्हणजे महाराष्ट्र नाही आणि तुम्ही म्हणजे मराठी माणूसही नाही.’ हो आठवले. त्यानंतरच तर जगातला ‘बेस्ट सीएम’ असूनही सत्ता सोडावी लागली होती. काय करावे? इकडे देवेंद्र ‘पुन्हा येईन’ म्हणत, पुन्हा नक्कीच येतात आणि दुसरीकडे ‘मी येईन’ म्हणत, अनपेक्षित ठिकाणी जाणारे आमचे चुलतभाऊसाहेब. आता काय करावे? काय म्हणता, आमच्या दूरदृष्टी संजयचे आवडते वाक्य म्हणू ‘पेढे वाटा पेढे!’
बॉयकॉट ‘टाटा’ नव्हे तुम्ही!
इंडियन पीपल इन सॉलिडेरिटी विथ पॅलेस्टाईन’ या संघटनेच्यावतीने ‘टाटा’ समूहाच्या विरोधात देशभर प्रदर्शन केले जात आहेत. ‘टाटा’ समूहाचा इस्रायलशी संबंध आहे. त्यामुळे ‘टाटा’ समूहाने उत्पादित केलेल्या उत्पादनावर बहिष्कार टाका, असे आवाहन ही संघटना करीत आहे. या संघटनेला गाझातल्या लोकांचा भारी कळवळा. यावर लोकांचे म्हणणे आहे की, इतका कळवळा आहे, तर प्रत्यक्षात गाझामध्ये जाऊन तिथल्या भावा-बहिणींना मदत ते का करत नाहीत?
दुसरे असे की, भारताने आणि भारताच्या उद्योगसमूहाने कोणत्या देशाशी संबंध संपर्क ठेवावा, हे ठरविण्याचा हक्क या असल्या संघटनांना कोणी दिला? तसेच, गाझापट्टीतल्या लोकांची दया येतही असेल. पण, मग गाझापट्टीतील ‘हमास’च्या दहशतवाद्यांबाबत ही संघटना मौन का बाळगून आहे? भारतात राहायचे, भारतात खायचे आणि सगळे नको ते उपद्व्याप पण भारतातच करायचे. मात्र, जीव गाळायचा तो बाहेरच्या देशासाठी, हीच खासियत असते अशा संघटनांची. तर ‘इंडियन पीपल इन सॉलिडेरिटी विथ पॅलेस्टाईन’ या संघटनेने सध्या भारतात ‘बॉयकॉट टाटा ट्रेंड’ चालवला आहे. त्यांच्या ट्रेंडला ना टाटा भीक घालणार, ना भारतीय जनता. नुकतेच अहमदाबाद येथे विमान कोसळले आणि शेकडो लोकांना जीव गमावावा लागला. प्रवाशांची स्वप्न त्यांच्यासारखीच बेचिराख झाली. या घटनेने मन आणि बुद्धीही सुन्न झाली. दुर्दैवी अपघातात मृत पावलेल्या कुटुंबाचे दुःख कधीही न भरून येण्यासारखे. भारतीय सरकार प्रशासन कुटुंबीयांना सर्वतोपरी सहकार्य करेलच. सगळा भारत देश त्यांच्या सोबतही आहेच. याच पार्श्वभूमीवर ‘टाटा’ समूह अपघातातील मृतांच्या वारसांना प्रत्येकी एक कोटी रुपये देणार आहे. तसेच, या विमान अपघातात क्षतिग्रस्त झालेल्या बी. जे. मेडिकल हॉस्टेलच्या पुनर्बांधणीसाठी ‘टाटा समूह’ सहकार्य करणार आहे. दुर्घटनेतील मृतांच्या कुटुंबांना तातडीने माहिती मिळावी, यासाठी कंपनीने आपत्कालीन केंद्र सुरू केले आहे. अर्थात ‘टाटा’ समूह काय किंवा आणखी कोणी देशहितासाठी काय करतात, याचे या संघटनांना काही देणेघेणे नाही. देशात काय सुरू आहे, याचेही सोयरसूतक नाही. यांना देणेघेणे आहे गाझापट्टीचे. या असल्या संघटनांनाच भारतीय जनता बॉयकॉट करेल आणि करते!