
शरद पवारांच्या राष्ट्रवादी काँग्रेस गटाचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांनी कालच्या वर्धापन दिनानिमित्त आयोजित मेळाव्यात बरीच फटकेबाजी केली. पण, त्यात प्रामुख्याने चर्चा रंगली ती त्यांच्या ‘नवीन चेहर्यांना संधी द्या’ या मागणीची आणि त्यांनी केलेल्या राजीनाम्याच्या सूतोवाचाची. नंतर आपण राजीनामा दिलेला नाही वगैरेही माध्यमांशी बोलताना त्यांनी सारवासारव केली खरी. पण, जयंत पाटील यांचे पडद्यामागे नेमके काय सुरू आहे, ही बाब खुद्द चाणाक्ष पवार साहेबांपासूनही लपलेली नाहीच. आपल्या याच भाषणात जयंतरावांनी आणखीन एक वक्तव्य केले. ते म्हणाले, "एकेकाळी देशात भाजपचे अवघे दोन खासदार होते. आज तोच भाजप देशातील सर्वांत मोठा पक्ष आहे. त्यामुळे घाबरून जाऊ नका. आपण सगळे ताकदीने कामाला लागलो, तर या राज्याची लढाई पुन्हा जिंकू. आपली लढाई ही तुकाराम विरुद्ध नथुरामाची आहे, हे कायम लक्षात ठेवा.” म्हणजेच भाजप हा ‘नथुरामवादी’ आणि पवारांची राष्ट्रवादी काँग्रेस कशी तुकारामांच्या विचारांना समर्पित आहे, यासाठी जयंत पाटील ही शाब्दिक कोटी करून बसले. सध्याचे वारीचे वातावरण लक्षात घेता, जयंतरावांना ‘नथुराम’ आणि ‘तुकाराम’ अशी अनाकलनीय, असबद्ध तुलना करावीशी वाटली, हेच मुळी खेदजनक. त्यामुळे राहुल गांधींच्या पाऊलावरच जयंतरावांनी पाऊल ठेवले. मागे जसे सावरकर बदनामी प्रकरणात, सात्यकी सावरकर यांचा नथुरामशी बादरायण संबंध जोडण्याचा प्रयत्न राहुल गांधींनी केला, तसेच आताही जयंतरावांनीही भाजपला ‘नथुरामवादी’ ठरविण्याचा जुनाच खटाटोप केला. जर तसे असेल तर देशातील आणि बहुतांश राज्यांतील जनतेने भाजपवर विश्वास दाखविला, तेही जयंतरावांच्या मते ‘नथुरामवादी’ ठरतात का? खरं तर तुकोबारायांचे कोणते असे विचार शरद पवारांनी आजवर अमलात आणले, हाच खरा संशोधनाचा विषय. याउलट जगद्गुरू संत तुकाराम महाराजांचे वंशज, प्रसिद्ध व्याख्याते दिवंगत शिरीष मोरे महाराज हे खुद्द रा. स्व. संघाचे प्रचारक होते आणि त्यांनी हिंदूंच्या प्रबोधनासाठी विविध विषयांवर परखड भाष्यही केले. मग तेही जयंतरावांच्या दृष्टीने ‘नथुरामवादी’ होते का? याचे त्यांनी उत्तर द्यावे. त्यामुळे जयंतरावांना तुकोबांच्याच शब्दांत सांगायचे तर- ‘तुका म्हणे ऐशा नरा | मोजुनी माराव्या पैजारा’
‘बेस्ट’बळीची भीतीपरवा मुंब्र्यातील लोकलबळीच्या दुर्घटनेने अख्खी मुंबई सुन्न झाली. त्यानंतर खडबडून जागे झालेल्या रेल्वे प्रशासनाने दोन रुळांमधील अंतर मोजण्यापासून ते लोकलला स्वयंचलित दरवाजे बसवण्यापर्यंतच्या उपाययोजनांचा आढावाही घेतला. त्यावरूनही सध्या वाद-प्रतिवाद रंगलेले दिसतात. पण, केवळ मुंबईची लोकलच नव्हे, तर दुसरी जीवनवाहिनी असलेल्या ‘बेस्ट’ची अवस्थाही फार वेगळी नाही. ‘बेस्ट’कडे दि. १ जून रोजीपर्यंत स्वमालकीच्या अवघ्या ४३७ बसेस असून, उर्वरित २ हजार, १५७ बसेस हा कंत्राटदारांच्या ताफ्यातील आहेत. म्हणजेच आजघडीला ‘बेस्ट’कडे स्वमालकीच्या अवघ्या १७ टक्के, तर उर्वरित ८३ टक्के ताफा हा कंत्राटी. त्यामुळे ‘बेस्ट’ची अवस्था ही अत्यंत बिकट असून, त्यातच तिकीटदर वाढवल्यामुळे प्रवाशांची संख्याही घटलेली दिसते. दि. १ जून रोजीपासून ‘बेस्ट’ने काही मार्गांमध्ये बदल केले. यामध्ये बसेसचे मार्ग कमी करण्यापासून ते काही साध्या बसेसचे एसी बसेसमध्ये रूपांतर करण्यात आले. पण, हे करताना ‘बेस्ट’ने त्या त्या मार्गांवरील प्रवासीसंख्या, बसथांबे यांचा सखोल विचार केलेला नसल्याचेच दिसून आले. उदाहरणादाखल बस. क्र. २४१ ही मालवणी आगार ते वडाळा आगारपर्यंत धावणारी बस पश्चिम उपनगरे ते दादर, माहीमसारख्या परिसराला जोडणारा महत्त्वाचा बसमार्ग होता. परंतु, हा मार्ग एसीमध्ये परिवर्तित करून तो सांताक्रुझ आगारापर्यंत आता संपवण्यात आला. शिवाय ‘बेस्ट’च्या ताफ्यातील बसेसचे आयुर्मान संपल्यामुळे मोठ्या बसेसची संख्या झपाट्याने घटली. त्याचाच फटका काही बसमार्गांना बसलेला दिसतो. मालाडचे एक टोक असलेल्या मढ आणि मार्वेपासून मालाड स्थानक (प) पर्यंत धावणार्या २७१ आणि २७२ या बसमार्गांना प्रचंड गर्दी असते. या बसेस मात्र मिनी बसेस स्वरूपात परिवर्तित केल्याने, या बसेसमध्ये सकाळ आणि संध्याकाळच्या वेळेला मुंगी शिरायलाही जागा नसून, प्रवासीही जीव धोक्यात घालून लटकून प्रवास करीत आहेत. त्यामुळे लोकलमधून पडून जसा मुंबईकरांना जीव गमवावा लागला, तशीच परिस्थिती ‘बेस्ट’च्या बाबतीतही उपनगरांमध्ये आज दृष्टिपथास पडते. त्यामुळे ‘बेस्ट’ प्रशासनाने अशा अपघातांची प्रतीक्षा न करता, वेळीच कृती करणे अगत्याचे ठरेल.