विधान परिषदेचे अपक्ष आमदार सत्यजित तांबे यांनी काँग्रेस नेते राहुल गांधी यांच्या कार्यपद्धतीवर मागे थेट हल्लाबोल केला. एवढेच नव्हे, तर तांबे यांनी थेट काँग्रेस नेत्यांनाही आव्हान दिले. "मी छातीठोकपणे सांगतो, राहुल गांधी काँग्रेस नेत्यांना भेटत नाही. महाराष्ट्रातील काँग्रेसच्या कोणत्याही नेत्याने अगदी प्रदेशाध्यक्षांसह एक तासाच्या आत वेळ घेऊन राहुल गांधींची भेट घेऊन दाखवावी. ते नाही तर फोनवर बोलून दाखवावे. राहुल गांधी कधीच भेटीसाठी उपलब्ध नसतात. पंजाबमध्ये ‘भारत जोडो’ यात्रा सुरू असताना मी संपर्क केला असता तो झाला नाही. असे नेतृत्व असेल, तर कार्यकर्त्यांनी कोणाच्या भरवशावर लढाई लढायची,” असा सवाल सत्यजित यांनी उपस्थित केला होता. तसेच, राज्यातील काँग्रेस नेत्यांचीही त्यांनी पोलखोल केली. हेच तांबे एकेकाळी राहुल गांधी यांचे निकटवर्तीय मानले जात होते. परंतु, आता त्यांना राहुल गांधींची खरी कार्यपद्धती समजली. पदवीधर निवडणुकीत ते अपक्ष उभे राहिले आणि विजयीदेखील झाले. त्यानंतर अनेकदा सत्यजित यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचे कौतुकही केले. या सगळ्या गदारोळानंतर सत्यजित यांचे मामा असलेले संगमनेरमधील काँग्रेसचे पराभूत उमेदवार व माजी प्रदेशाध्यक्ष बाळासाहेब थोरात यांनी भाच्याचे कान टोचले. सत्यजित यांचे वक्तव्य बालिशपणाचे असल्याचे थोरात मामा म्हणाले. मामांनी कान टोचले खरे. मात्र, संगमनेरमध्ये आपण फक्त स्वतःच्या कुटुंबाचे प्रस्थ तयार केले, हे ते विसरले. ‘सबकुछ थोरात’ अशा पद्धतीने त्यांनी कारभार केला. सलग आठ वेळा आमदारकी भूषविली. पण, शहरापलीकडे विकासाचा गाडा गेलाच नाही. शहराचाही बकालपणा ‘जैसे थे’च होता. म्हणूनच मागील वर्षी संगमनेरकरांनी ‘एक हैं तो सेफ हैं’चा नारा देत बाळासाहेब थोरात यांना आस्मान दाखविले. नवख्या अमोल खताळ यांनी बाळासाहेबांना धूळ चारली आणि काँग्रेसच्या भावी मुख्यमंत्र्यांसाठी विधानसभेची दारे बंद झाली. सध्याचे आसामचे मुख्यमंत्री हिमंता बिस्व सरमा यांनीही याच कारणामुळे काँग्रेसला सोडचिठ्ठी दिली. सरमा भेटीला गेले, तेव्हा राहुल गांधी कुत्र्यासोबत खेळण्यात व्यस्त होते. राहुल यांना कुत्र्यासाठी वेळ होता, मात्र नेत्यासाठी नाही. पक्ष तोडणाराच इथे जोडण्याच्या यात्रा काढतो, तर मग बाकी बोलून तरी काय फायदा?
राऊतांचे दौरे, उबाठाचे वाटोळे
धानसभा निवडणुकीनंतर उबाठा गटाला लागलेली गळती थांबण्याची चिन्हे दिसत नाही. राज्यभरात पक्ष पदाधिकारी उद्धव ठाकरेंच्या कार्यशैलीला आणि नेतृत्वाला कंटाळून अन्य पक्षात प्रवेश करत आहेत. सध्या उबाठा गटाकडून लोकसभा निवडणूक लढविलेले चंद्रहार पाटील हेदेखील उबाठा गटाला धक्का देण्याच्या तयारीत आहेत. मला शिवसेनेकडून ऑफर असल्याचेही त्यांनी म्हटले असून डबल ‘महाराष्ट्र केसरी’ असलेल्या चंद्रहार यांनी उबाठा गटाला दुहेरी धक्का दिला आहे. त्यातच नाशिक येथील शिवसेनेचे उपनेते सुधाकर बडगुजर यांची तर भर पत्रकार परिषद सुरू असताना पक्षातून हकालपट्टी करण्यात आली. नुकतीच त्यांनी काही विकासकामांनिमित्त मुख्यमंत्री फडणवीस यांची धावती भेट घेतली होती. उबाठा गटात नाराज असल्याची कबुलीही त्यांनी माध्यमांना दिली होती. यासोबत आणखी १०-१२ जण नाराज असल्याचे त्यांनी म्हटले होते. पत्रकार परिषदेलाही ते गैरहजर होते. बडगुजर यांची हकालपट्टी यासाठी महत्त्वाची ठरते. कारण, त्यांना उबाठा गटाचे विश्वप्रवक्ते संजय राऊत यांचा ‘उजवा हात’ म्हटले जायचे. दोनवेळा त्यांना उबाठा गटाने नाशिक पश्चिम मतदारसंघातून उमेदवारीही दिली होती. मात्र, दोन्ही वेळेस पराभव स्वीकारावा लागला. मुंबई बॉम्बस्फोटातील आरोपी सलीम कुत्ता याच्यासोबत पार्टी केल्याचा व्हिडिओ समोर आल्यानंतर त्यांच्या चौकशीची मागणी करण्यात आली. त्यांच्यावर ‘एसीबी’कडून गुन्हादेखील दाखल करण्यात आला. एवढे आरोप होऊनही त्यावेळी सुधाकर बडगुजर यांच्या पाठीशी उभे राहण्याचा निर्णय उबाठाने घेतला. राऊतांनीही त्यांचीच बाजू घेतली. मात्र, आता सुधाकर यांनी नाराज असल्याचे सांगितल्यानंतर आणि मुख्यमंत्री फडणवीस यांचे स्वागत केल्यानंतर त्यांना पक्षातून बाहेरचा रस्ता दाखविण्यात आला. काही दिवसांपूर्वीच माजी आमदार निर्मला गावित यांनीदेखील उबाठा गट सोडून शिवसेनेत प्रवेश केला होता. नाशिक जिल्ह्यात उबाठा गटाला गळती लागलेली असताना राऊतांचे नाशिक दौरे काही थांबत नाही. ज्यावेळी राऊत नाशिक दौर्यावर येतात, तेव्हा उबाठा गटात गदारोळ झालाच समजा. संपूर्ण पक्षाचे वाटोळे केल्यानंतरही आजही राऊतांचे ऐकावे लागते, अशी उद्धव यांची नेमकी काय मजबुरी असेल, असा प्रश्न यामुळे उपस्थित होतो.