वर्षाअखेर बिहार विधानसभा निवडणुकांसाठी मतदान पार पडणार असले, तरी आतापासूनच राज्यात राजकीय घडामोडींनी वेग घेतलेला दिसतो. त्यातच चिराग पासवान आणि नितीश कुमार यांच्या भेटीने राजकीय चर्चांनाही उधाण आले. ‘बिहार पुकार रहा हैं’ अशी प्रतिक्रिया खुद्द चिराग पासवान यांनी दिल्याने, ते विधानसभा निवडणुकीच्या रणांगणात उतरण्याचीही शक्यता वर्तविली जात आहे. त्यानिमित्ताने बिहार निवडणुकीपूर्वीच्या राजकीय स्थित्यंतरांचा आढावा घेणारा हा लेख...
सध्या बिहारच्या राजकीय वर्तुळात केंद्रीय मंत्री चिराग पासवान यांच्या नावाची चांगलीच चर्चा सुरू आहे. कधी चिराग पासवान बिहारमध्ये राजकारण करण्याबद्दल बोलतात, तर कधी पाटण्यात चिराग पासवान यांना मुख्यमंत्री बनवण्याची मागणी करणारे पोस्टर लावल्याने राजकीय वातावरण रंगतदार होते. आता चिराग पासवान सोमवारी मुख्यमंत्री नितीश कुमार यांना भेटण्यासाठी सीएम हाऊसमध्ये पोहोचले. यानंतर बाजारातील अटकळींचा जोर वाढला. नितीश कुमार आणि चिराग पासवान यांच्यातील या विशेष बैठकीत जागावाटपापासून ते ‘एनडीए’ला जास्तीत जास्त जागा कशा मिळू शकतात, यांसारख्या मुद्द्यांवर चर्चा झाली, अशा चर्चा आहेत. 2025 सालच्या बिहार विधानसभा निवडणुकीपूर्वी राजकीय हालचाली तीव्र झाल्या आहेत. चिराग पासवान यांच्या पक्षाच्या कार्यकर्त्यांनी पाटण्याच्या मुख्य रस्त्यांवर आणि चौकात एक पोस्टर लावले आहे, ज्यावर लिहिले आहे की, ‘बिहार चिराग पासवान यांचे स्वागत करण्यास सज्ज आहे.’ राजकीय वर्तुळात या पोस्टरची जोरदार चर्चा सुरू आहे. बिहार विधानसभा निवडणुकीसाठी जागावाटप आणि निवडणूक रणनीती अंतिम करण्यासाठी ही बैठक आयोजित करण्यात आली होती. चिराग पासवान यांच्या पक्षाला त्यांच्या इच्छेपेक्षा जास्त जागा मिळण्याची अपेक्षा आहे.
चिराग पासवान आणि नितीश कुमार यांच्यातील संबंध कधी समर्थनाचे, तर कधी विरोधी राहिले आहेत. 2020 सालच्या विधानसभा निवडणुकीत चिरागने नितीशच्या जेडीयूविरुद्ध वेगळा मार्ग निवडला होता. ज्यामुळे जेडीयूला अनेक जागांवर पराभव पत्करावा लागला. पण, 2024 सालच्या लोकसभा निवडणुकीत दोन्ही नेत्यांनी ‘एनडीए’ युतीमध्ये एकता दाखवली. चिरागच्या पक्षाने हाजीपूरसह पाचही जागा जिंकल्या. ज्यामध्ये नितीशच्या प्रचाराचाही वाटा होता. त्याच वेळी, एका वर्षाच्या आत असे अनेक प्रसंग आले आहेत; जेव्हा चिराग पासवान स्वतः मुख्यमंत्री नितीश कुमार यांना भेटायला आले आहेत. आता अशा परिस्थितीत दोघांमधील मैत्री वेगळीच कहाणी सांगत असल्याचे दिसते. आता ही बैठक दोघांमधील नवीन मैत्री मजबूत करण्याचे आणि युतीची रणनीती अंतिम करण्याचे संकेत आहे. पण, चिराग यांना मुख्यमंत्री बनवण्याची मागणी करणारे शहरात लावलेले पोस्टर्स वेगळेच काहीतरी दर्शवतात. प्रश्न असा पडतो की, चिराग यांनी मुख्यमंत्र्यांचे पोस्टर लावून नितीश कुमार यांच्यासमोर शरणागती पत्करली की, नितीश कुमार यांना भाजपला सत्तेची चावी न देऊन चिराग यांना पुढे करायचे आहे? सध्या हे प्रश्न बिहारच्या राजकारणात केंद्रस्थानी आहेत.
बिहारचे मुख्यमंत्री नितीश कुमार आणि केंद्रीय मंत्री चिराग पासवान यांच्यात सोमवारी झालेल्या बैठकीवरूनही विविध विधानांचा फेरा सुरू झाला. या क्रमाने ‘आरएलएम’चे राष्ट्रीय अध्यक्ष उपेंद्र कुशवाह यांनी चिराग पासवान यांना पद्धतीने सल्ला दिला आहे. उपेंद्र कुशवाह म्हणाले की, “यावेळी कोणतीही चूक होऊ नये म्हणून सावधगिरीने पुढे जाण्याची गरज आहे. रालोआचे सरकार मजबूतपणे सरकार स्थापन करण्यासाठी सर्व पक्षांनी प्रयत्न करणे आवश्यक आहे. अशा परिस्थितीत कोणत्याही प्रकारचे विधान विचारपूर्वक दिले पाहिजे.” चिराग पासवान यांनी बिहार निवडणूक लढवण्याच्या मुद्द्यावर उपेंद्र कुशवाह म्हणाले की, “निवडणूक लढवायची की नाही आणि कुठून लढवायची हा त्यांचा पक्ष आणि चिराग यांचा निर्णय आहे. परंतु, रालोआमध्ये काही दुरावा आहे, हा संदेश देण्यासाठी सध्या सर्व घटक पक्षांनी अशा गोष्टी टाळल्या पाहिजेत. आपल्या कृती आणि शब्दांमुळे रालोआ घटक पक्षांमध्ये कटुतेचा संदेश जनतेला जाणार नाही, याची काळजी आपण घेतली पाहिजे.” नितीश कुमार आणि चिराग पासवान यांच्या भेटी आणि पोस्टर वादावर कुशवाह म्हणाले की, “नितीश कुमार हे अशा स्थितीत आहेत, जेथे ते अनेक लोकांना आशीर्वाद देतात. नितीश कुमार आणि चिराग यांच्यात काय चर्चा झाली, हे आपल्याला ठाऊक नाहे,” असे ते म्हणाले. मात्र, यावरून कुशवाह यांनी योग्य तो संदेश नितीश आणि चिराग यांच्यापर्यंत पोहोचविल्याची चर्चा आहे.
बिहारच्या राजकारणात नवे खेळाडू असलेले जनसुराज पक्षाचे अध्यक्ष प्रशांत किशोरही चांगलीच तयारी करत आहेत. ते सध्या विविध पक्षातील नाराज नेत्यांना आपल्याकडे आणून पक्षाची मोट बांधू पाहत आहेत. गेल्या वर्षी दि. 31 ऑक्टोबर 2024 रोजी एकेकाळी नितीश कुमार यांचे खास असलेले रामचंद्रप्रसाद उर्फ आरसीपी सिंह यांनी त्यांचा नवीन पक्ष ‘आसा’ स्थापन करण्याची घोषणा केली होती. पण, त्यानंतर ते एकदमच पडद्याआड गेले. माजी केंद्रीय मंत्री आरसीपी सिंह आता पुन्हा एकदा नवी इनिंग सुरू करणार आहेत. ते आता प्रशांत किशोर यांच्या जनसुराज पक्षाला बळकटी देण्यासाठी सज्ज होत आहेत. बिहार विधानसभा निवडणुकीपूर्वी स्वतःचा पक्ष जनसुराजमध्ये विलीन करणे, ही एक मोठी राजकीय घडामोडी मानली जात आहे. कारण, रामचंद्र प्रसाद सिंह उर्फ आरसीपी सिंह हे एक अनुभवी कुर्मी नेते म्हणूनही ओळखले जातात.
सध्या बिहारच्या राजकारणात आरसीपी सिंह एकाकी पडलेले दिसतात. आरसीपी सिंह यांच्या राजकीय उदय आणि नंतर अधोगतीची कहाणी 2021 साली सुरू होते. 2021 साली जेव्हा पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी त्यांच्या मंत्रिमंडळाचा विस्तार केला, तेव्हा आरसीपी सिंह यांना जेडीयू कोट्यातून मंत्री बनवण्यात आले. मात्र, तेव्हा त्यांच्या मंत्रिमंडळात सहभागी होण्यास पक्षातून विरोध असल्याची चर्चा होती. त्यामुळे नंतरच्या काळात त्यांनी मुख्यमंत्री नितीश कुमार यांच्यापासून अंतर राखण्यास प्रारंभ केला होता. पुढे 2022 साली जेडीयूने त्यांना पुन्हा राज्यसभेत पाठवले नाही. ऑगस्ट 2022 साली बिहारचे राजकीय चित्रही बदलले आणि नितीश कुमार राजद-काँग्रेस युतीत सामील झाले. यानंतर आरसीपी सिंह 2023 साली भाजपमध्ये सामील झाले. त्यावेळी त्यांना वाटले होते की, भाजप त्यांना 2024 सालच्या लोकसभा निवडणुकीत तिकीट देऊ शकेल. पण, त्याआधीच बिहारमध्ये पुन्हा मुख्यमंत्री नितीश कुमार लोकसभा निवडणुकीपूर्वी रालोआमध्ये सामील झाले. राजकीय तज्ज्ञांचे म्हणणे आहे की, हा तो काळ होता, जेव्हा आरसीपी सिंह हे राजकारणात एकाकी पडू लागले. त्यामुळे आता प्रशांत किशोर यांच्यासोबत जाऊन तरी त्यांच्या राजकीय महत्त्वाकांक्षा पूर्ण होतील का, हे पाहणे महत्त्वाचे ठरेल.
एकूणच बिहारच्या राजकारणात सध्या लगबग सुरू आहे. बिहारमध्ये काँग्रेस वगळता सर्वच पक्ष हे आपापल्या रणनीतीस अंतिम रूप देण्यात मग्न आहेत. मुख्यमंत्री नितीश कुमार यांची ही शेवटची निवडणूक ठरू शकते, तर तेजस्वी यादव हे गतवेळपेक्षा यावेळी अधिक चांगली कामगिरी करण्याची तयारी करीत आहेत, त्याचवेळी चिराग पासवान हे यंदा तरी बिहारमध्ये जम बसविण्यासाठी सज्ज होत आहे. या पार्श्वभूमीवर भाजपने अद्याप आपले पत्ते उघड केलेले नाहीत.