अर्ध्यावरती युद्ध थांबले.. अधुरी एक कहाणी

    20-May-2025
Total Views | 28
The war is at pause
भारत-पाकिस्तान यांच्यात होऊ घातलेले युद्ध अर्ध्यावरती थांबले असले, तरी त्याची पूर्ण कहाणी समोर यायला काही दिवस लागले. वरकरणी हे युद्ध अनिर्णित अवस्थेत संपले असे वाटले, तरी या युद्धातील अनेक आघाड्यांवर भारताला निर्विवाद विजय मिळाला आहे. ‘ऑपरेशन सिंदूर’ मधील घडामोडींचा घेतलेला आढावा...

पाकिस्तानसोबत शस्त्रविराम होत असताना अनेक भारतीयांच्या मनात भावना होती की, पाकिस्तान काही सुधारणार नसल्यामुळे त्याचा एकदाच काय तो सोक्षमोक्ष लावून टाका. भारताने पाकिस्तानमधून झालेले जवळपास सर्वच्या सर्व ड्रोन आणि क्षेपणास्त्र हल्ले परतवून लावले. एकाही पाकिस्तानी विमानाची भारताच्या हद्दीमध्ये घुसण्याची हिंमत झाली नाही. याउलट भारताने केलेल्या हल्ल्यांमध्ये, पाकिस्तानमधील दहशतवाद्यांच्या ३० हून अधिक प्रशिक्षण केंद्रांपैकी नऊ केंद्रे उद्ध्वस्त झाली. पाकिस्तानमधील हवाई हल्ले प्रतिरोधक यंत्रणाही उद्ध्वस्त करण्यात आल्या. पाकिस्तानची राजधानी इस्लामाबाद, आर्थिक राजधानी कराची आणि लष्कराचे मुख्यालय असलेल्या रावळपिंडी जवळच्या हवाईदलाच्या धावपट्या उद्ध्वस्त करण्यात आल्या. एवढ्यावरच न थांबता पाकव्याप्त काश्मीरही जिंकून घ्यायला हवा होता किंवा मग पाकिस्तानचे चार तुकडे करूनच हे युद्ध थांबवायला हवे होते, असे वाटणार्‍यांची संख्या मोठी आहे. दुसरीकडे पाश्चिमात्य माध्यमांनी या युद्धाचे पूर्णतः वेगळेच वार्तांकन केले. पाकिस्तानला आपल्या पंखांखाली घेताना अनेकांनी, त्यांचा दृष्टिकोन आपली भूमिका म्हणून मांडला. त्यात भारताची किमान पाच विमाने पडली आणि भारताच्या आदमपूर आणि उधमपूर येथील हवाईतळांचे नुकसान झाल्याच्या बातम्या होत्या. शस्त्रविरामाला दोन आठवडे पूर्ण होत असताना नेमके काय घडले, याचे अनेक तपशील बाहेर येऊ लागले. भारताच्या परराष्ट्र व्यवहार मंत्रालय तसेच सैन्य दलांच्या प्रतिनिधींनी माध्यमांशी बोलताना अत्यंत सावधगिरीची भूमिका घेतली होती. त्यातूनही अनेकांचा भारताने बोटचेपी भूमिका घेतल्याचा समज झाला. उपग्रहांच्या मदतीने जमिनीवरची चित्रे समोर येऊ लागल्यानंतर पाकिस्तानचे किती मोठे नुकसान झाले आहे, हे समोर आले. ऑस्ट्रियातील हवाई युद्धतज्ज्ञ टॉम कूपर यांनी या युद्धाबाबत सविस्तर विश्लेषण केले आहे. त्यांच्या मते, भारताने बुद्धिबळाच्या सामन्यात अवघ्या १० ते १२ चालींमध्ये पाकिस्तानच्या वझीराला अडकवून ठेवले आणि त्यांच्यावर शस्त्रसंधीची वेळ आणली. या युद्धात भारतीय सैन्यदलांच्या कामगिरीची युद्धाच्या इतिहासात नोंद होऊ शकेल. एखादी धावपट्टी उद्ध्वस्त करायची, तर त्यावर किमान ५० ते १०० हवाई हल्ले करावे लागतात. भारताने अवघ्या एका हल्ल्यातच पाकिस्तानमधील अनेक धावपट्ट्या तात्पुरत्या निकामी केल्या. असे करणे सोपे नाही; कारण कोणत्याही देशातील विमानतळ आणि धावपट्ट्या सर्वांत सुरक्षित संरक्षण केंद्रामध्ये मोडतात. त्यावर हल्ला करणार्‍या देशाला मोठे नुकसानही सहन करावे लागू शकते. पाकिस्तानकडे चीन आणि तुर्कीकडून मिळालेली अत्याधुनिक हवाई हल्ला प्रतिरोधक यंत्रणा होती. पण, भारताची ‘ब्रह्मोस’ आणि ‘स्काल्प’ क्षेपणास्त्र अचूकपणे आपल्या लक्ष्यांवर आदळली. भारताकडे पाकिस्तानच्या हवाई केंद्रांवरील कच्च्या दुव्यांची खडानखडा माहिती होती.
या कारवाईमध्ये भारताची तीन प्रमुख उद्दिष्टे दिसून आली. दि. ७ मे २०२५ रोजी भारताने पाकव्याप्त काश्मीर तसेच पाकिस्तानातील दहशतवाद्यांची नऊ प्रशिक्षण केंद्रे उद्ध्वस्त करून पहलगाम तसेच, यापूर्वी झालेल्या दहशतवादी हल्ल्यांचा बदला घेतला. या कारवाईत भारतीय विमानांनी प्रत्यक्ष नियंत्रण रेषा ओलांडली नाही. भारतीय आणि पाकिस्तानी विमानांच्या संघर्षात दोन्ही देशांची काही विमाने पडली, असे म्हटले जात आहे. भारताने आपली किती विमाने पडली याचे उत्तर देणे टाळले असले, तरी आपले सर्व वैमानिक सुरक्षित असून त्यांना दिलेल्या लक्ष्यांना उद्ध्वस्त करण्यात यशस्वी झाल्याचे म्हटले आहे. या हल्ल्यानंतर संतापलेल्या पाकिस्तानने आंतरराष्ट्रीय सीमा तसेच प्रत्यक्ष नियंत्रण रेषेवर तोफखान्याचा मारा करण्यास सुरुवात केली. भारताविरुद्ध मोठ्या संख्येने ड्रोन आणि क्षेपणास्त्रांचा वापर करण्यात आला. यात टेहळणी करणार्‍या ड्रोनच्या जोडीला आक्रमण करणारे ड्रोनही वापरण्यात आले. भारताविरुद्ध ‘फतेह’ आणि ‘शाहीन’ या क्षेपणास्त्रांचाही वापर करण्यात आला. पण, भारताच्या एकात्मिक हवाई हल्ले प्रतिरोधक यंत्रणेने उत्कृष्ट काम करून, पाकिस्तानचे सर्व हल्ले निष्फळ ठरवले. पाकिस्तानने त्यांच्या हल्ल्यांमध्ये अमृतसरच्या सुवर्ण मंदिरासह, भारतातील धार्मिक स्थळांनाही लक्ष्य करण्याचा प्रयत्न केला. त्यानंतरच भारताने आपले दुसरे उद्दिष्ट पूर्ण करायला सुरुवात केली. याअंतर्गत पाकिस्तानला आपली विमाने आणि क्षेपणास्त्रे सीमेपासून दूर नेण्यासाठी, त्यांच्या दोन एकात्मिक हवाई हल्ले प्रतिरोधक प्रणाली उद्ध्वस्त करण्यात आल्या. त्यामुळे भारताने सीमेजवळ हवाई हल्ला केल्यास पाकिस्तानला त्याची पूर्वसूचना मिळणे अवघड झाले. भारताने हवाई हल्ला केल्यास आपली विमाने आणि क्षेपणास्त्रे नष्ट होतील, या भीतीने पाकिस्तानने त्यांना इस्लामाबाद, कराची आणि रावळपिंडीजवळच्या तळांवर हलवले. भारत याच संधीची वाट पाहात होता. पाकिस्तानकडून भारताच्या विविध लष्करी तसेच हवाईतळांवर हल्ले करण्यात आल्यानंतर, भारताने थेट पाकिस्तानच्या हवाईतळांना लक्ष्य केले. कोणत्याही देशाचे हवाईतळ हे तेथील सर्वांत सुरक्षित जागांपैकी एक असतात. त्यावर हल्ला करणार्‍या देशाला मोठ्या संख्येने विमाने आणि क्षेपणास्त्रे गमवावी लागतात. त्यामुळे भारताने पाकिस्तानच्या हवाईतळांवरील कच्चे दुवे लक्ष्य करण्याचे ठरवले. कुठे धावपट्टी, कुठे नियंत्रण कक्ष, तर कुठे विमाने उभी करतात त्या हँगरना लक्ष्य करण्यात आले. किराना हिल्सजवळील पर्वतराजींच्या आत पाकिस्तानच्या अण्वस्त्रांचा तळ आहे, असे म्हटले जाते. अण्वस्त्रांना लक्ष्य करण्याचा आपला उद्देशही नव्हता आणि पर्वतराजींच्या खाली दडवलेली अण्वस्त्रे उद्ध्वस्त करणे जवळपास अशयच होते. पण, पाकिस्तानकडून वारंवार अण्वस्त्रयुद्धाच्या धमया दिल्या जातात, त्यामुळे त्याचा एकदाच सोक्षमोक्ष लावणे आवश्यक होते. अण्वस्त्र हल्ला करायचा, तर अण्वस्त्रांना क्षेपणास्त्राशी जोडून त्या क्षेपणास्त्राला विमानावर चढवणे आवश्यक असते. त्यामुळे पाकिस्तानच्या किराना हिल्स परिसरात पाकिस्तानी हवाईदलाची तिन्ही केंद्रे स्थित आहेत. भारताने औपचारिकदृष्ट्या किराना हिल्समधील अण्वस्त्रांवर हल्ला केल्याचा इनकार केला असला तरी टॉम कूपरसारख्या तज्ज्ञांचे मत आहे की, भारताने अण्वस्त्र तळाकडे जाणार्‍या मार्गावर हल्ला करून तेथील दरवाजे उद्ध्वस्त केले असावेत. त्यामुळे पाकिस्तानला अण्वस्त्रांचा वापर करणे अशयच झाले. या हल्ल्यामुळे पाकिस्तानसमोर शस्त्रविरामाशिवाय पर्याय उरला नाही. त्यासाठी पाकिस्तानने अमेरिकेला साकडे घातले. अमेरिकेने संदेश भारतापर्यंत पोहोचवला आणि मध्यस्थीची तयारी दाखवली. भारताने स्पष्ट शब्दांमध्ये अमेरिकेला सांगितले की, पाकिस्तानच्या सैन्यदलांच्या महासंचालकांनी भारताच्या सैन्यदलांच्या महासंचालकांशी संपर्क करून तसा प्रस्ताव द्यावा. त्यानंतर शस्त्रविराम झाला. त्यामुळे नाराज झालेल्या एका वर्गाला, आजच्या काळात युद्ध कशी लढली जातात आणि योग्य वेळेस बाहेर न आल्यास त्या दलदलीत कशा प्रकारे अडकायला होते हे माहिती नाही. पाकिस्तानची लोकसंख्या २५ कोटी असून, अर्थव्यवस्था संकटात आहे. पाकिस्तानची सीरिया किंवा येमेनसारखी अवस्था झाली, तर त्याची सगळ्यात जास्त किंमत भारताला मोजावी लागेल. भारत पाकिस्तान यांच्यात होऊ घातलेले युद्ध अर्ध्यावरती थांबले असले, तरी त्याची पूर्ण कहाणी समोर यायला काही दिवस लागले. वरकरणी हे युद्ध अनिर्णित अवस्थेत संपले असे वाटले, तरी या युद्धातील अनेक आघाड्यांवर भारताला निर्विवाद विजय मिळाला आहे.

अनय जोगळेकर
अग्रलेख
जरुर वाचा

Email

admin@mahamtb.com

Phone

+91 22 2416 3121