"जयंत पाटील हा राजकारणातला..."; गोपीचंद पडळकर यांचा घणाघात
11-Jun-2025
Total Views | 15
कोल्हापूर : जयंत पाटील हा राजकारणातील संपलेला विषय आहे, असा घणाघात भाजप नेते गोपीचंद पडळकर यांनी केला आहे. बुधवार, ११ जून रोजी त्यांनी माध्यमांशी संवाद साधला. राष्ट्रवादी काँग्रेसच्या वर्धापन दिनाच्या कार्यक्रमात जयंत पाटलांनी प्रदेशाध्यक्ष पद सोडण्याबाबत विधान केले. यावर पडळकर यांनी प्रतिक्रिया दिली.
गोपीचंद पडळकर म्हणाले की, "जयंत पाटील हा राजकारणातील संपलेला विषय आहे. हा पळ काढणारा माणूस आहे, रणांगणात टिकणारा माणूस नाही. हा अनुकंपावर भरती झालेला कार्यकर्ता असल्यामुळे लढाऊ नाही. जयंतरावांनी कुणासाठी संघर्ष केला नाही, एखादा दिवस जेलमध्ये गेले नाहीत, सांगली जिल्ह्यासाठी एखादा मोठा प्रकल्प आणला नाही. एवढी वर्षे महाराष्ट्राच्या राजकारणात व्हीआयपी कॅबिनेट मंत्री म्हणून राहिलेत पण एक प्रकल्प ते सांगू शकत नाहीत," अशी टीका त्यांनी केली.
ते पुढे म्हणाले की, "आज देवाभाऊ राज्याचे मुख्यमंत्री असताना कितीतरी असे प्रकल्प सांगता येतील. परंतू, जयंत पाटलांना काही कामच करता आले नाही. त्यामुळे आता त्यांनी प्रदेशाध्यक्ष असणे, नसणे हा त्यांच्या पक्षाचा विषय आहे," असेही गोपीचंद पडळकर म्हणाले.