"भाजपमध्ये निवडणूकांसंदर्भातील निर्णय करण्याचा अधिकार फक्त..."; काय म्हणाले मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस?

    11-Jun-2025
Total Views | 15



अकोला : भाजपमध्ये निवडणूकांसंदर्भातील निर्णय करण्याचा अधिकार हा आमचे अध्यक्ष, कार्याध्यक्ष आणि आमच्या निवडणूक समितीला आहे असून बाकी कुणालाही तो अधिकार नाही, अशी प्रतिक्रिया मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी दिली आहे. बुधवार, ११ जून रोजी त्यांनी अकोला येथे माध्यमांशी संवाद साधला.

नागपूरमध्ये महापालिका निवडणूका स्वबळावर लढण्याचे भाजपने म्हटले आहे. यावर आपली भूमिका काय? असा प्रश्न मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांना विचारण्यात आला. यावर बोलताना ते म्हणाले की, "भाजपमध्ये निवडणूकांसंदर्भातील निर्णय करण्याचा अधिकार हा आमचे अध्यक्ष, कार्याध्यक्ष आणि आमच्या निवडणूक समितीला आहे. बाकी कुणालाही तो अधिकार नाही. आमची भूमिका पक्की आहे. आम्ही महायूतीमध्ये निवडणूका लढवणार असून जिथे शक्य नाही अशा एखाद्या ठिकाणी मैत्रीपूर्ण लढत होईल," असे ते म्हणाले.

अकोल्यात ३ हजार कोटींच्या विकास कामांचा शुभारंभ!

"अकोला येथे जवळपास ३ हजार कोटी रुपयांच्या विकास कामांचा शुभारंभ आपण करतो आहोत. सिंचनापासून तर वीज निर्मितीपर्यंत, रस्त्यांपासून तर महिला बालविकासापर्यंत आणि क्रीडापासून तर नाट्यगृहापर्यंत अशा सगळ्या प्रकारच्या विकासाच्या कामांची मुहूर्तमेढ आज अकोल्यात केली आहे. अकोल्याचे खासदार अनुप धोत्रे यांच्यासह जिल्ह्यातील सर्व आमदारांचे मनापासून अभिनंदन करतो. या सगळ्यांच्या प्रयत्नातून महाराष्ट्र सरकारने जिल्ह्याच्या विकासासाठई खूप मोठ्या प्रमाणात निधी दिला असून यापुढेही असाच निधी दिला जाणार आहे ," असेही त्यांनी सांगितले.

बच्चू कडू यांच्या आंदोलनासंदर्भात पालकमंत्री चंद्रशेखर बावनकुळे हे प्रशासनाच्या संपर्कात असून त्या माध्यमातून त्यांच्याशी संपर्क सुरु आहे. चंद्रशेखर बावनकुळे यासंदर्भात लक्ष घालतील," असे मुख्यमंत्र्यांनी सांगितले. तसेच मंत्री संजय राठोड यांच्यावर होणाऱ्या आरोपांवर बोलताना ते म्हणाले की, "पुरावा दिला तर त्या आरोपांमध्ये अर्थ आहे. नुसता आरोप करून फायदा काय? उद्या कुणी काहीही आरोप करतील. जर कुणाकडे पुरावा असेल तर तो पुरावा त्यांनी नक्की द्यावा. असा पुरावा मिळाल्यास मी आणि एकनाथ शिंदे आम्ही त्याची पडताळणी करू," असे त्यांनी सांगितले.

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी खासदार सुप्रिया सुळे यांच्याकडे शरद पवारांच्या तब्येतीची विचारपूस केली. याबद्दल शरद पवारांनी त्यांचे आभार मानले. यावर बोलताना मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस म्हणाले की, "राजकारणात माणूसकी, ओलावा, संवेदना आहेत. आम्ही राजकीय आणि वैचारिक विरोधक आहोत. आम्ही एकमेकांचे शत्रू नाहीत. त्यामुळे जिथे वैचारिक विरोध असतो तिथे अशी वैयक्तिक संवेदना व्यक्त होणे चांगले आहे. हे सुदृढ लोकशाहीचे एक प्रमाण आहे."




'मुंबई तरुण भारत'चं व्हॉट्सअप चॅनल फॉलो करा!
अग्रलेख
जरुर वाचा

Email

admin@mahamtb.com

Phone

+91 22 2416 3121