आपत्कालीन निधीचा अमेरिकी धडा

    02-Jun-2025
Total Views | 11
आपत्कालीन निधीचा अमेरिकी धडा
‘आर्थिक महासत्ता’ असे बिरूद मिरवणार्या अमेरिकी नागरिकांपाशी आपत्कालीन खर्चासाठी दोन हजार डॉलर्सही नाहीत, हे वास्तव एका अहवालातून समोर आले. अमेरिकी वर्तमानातून भारतीयांनी भविष्यासाठीचा धडा घेण्याची गरज, यातूनच अधोरेखित झाली आहे.


जगभरात ‘आर्थिक महासत्ता’ असा लौकिक असलेल्या अमेरिकेतील निम्म्याहून अधिक नागरिकांकडे, दोन हजार डॉलर्स इतकाही निधी आपत्कालीन खर्चासाठी नसल्याची धक्कादायक आकडेवारी एका अहवालातून समोर आली. (भारतीय रुपयात एक लाख, ६० हजार रुपये) कर्जाच्या सापळ्यात रुतलेली अमेरिकी अर्थव्यवस्था कशी बेगडी आहे, हे यापूर्वी वारंवार समोर आले आहेच. म्हणजेच, ही वस्तुस्थिती तेथील व्यक्ती, कुटुंबे आणि देशाच्या आर्थिक आरोग्यावरच प्रश्नचिन्ह उभी करणारी आहे. आपत्कालीन निधी उपलब्ध नसण्याची कारणेही पाहायला हवीत. गेल्या काही वर्षांत तेथे महागाईचा भडका उडाला असून, त्या तुलनेत वेतनवाढ झालेली नाही. तसेच, बहुतांश अमेरिकी नागरिकांचे उत्पन्न हे रोजच्या मूलभूत गरजांसाठीच खर्ची पडते. म्हणूनच, तेथे ग्राहक कर्जात प्रचंड वाढ झाली आहे. त्याशिवाय दैनंदिन खर्चासाठी क्रेडिट कार्ड हे तेथे सर्वमान्य असेच. ही कर्ज फेडण्यातच अनेकांचे आयुष्य जाते. एखाद्या अमेरिकी व्यक्तीवर १ लाख ६ हजार रुपये अनपेक्षितपणे खर्च करण्याची वेळ आली, तर त्या कुटुंबाचे अर्थसंतुलन कोलमडेल, हाच या अहवालाचा भावार्थ. या कर्जामुळेच सर्वसामान्य अमेरिकी नागरिकांमध्ये चिंता, नैराश्य, कौटुंबिक मतभेद वाढीस लागत असल्याचे हा अहवाल सांगतो. याचा परिणाम अमेरिकेच्या अर्थव्यवस्थेवरही होत आहे. ग्राहक खर्च हा अमेरिकेच्या अर्थव्यवस्थेचा प्रमुख घटक असून, नागरिकांकडे आपत्कालीन परिस्थितीत खर्च करण्यासाठी पैसे नसल्याने अनेकदा ते खर्च टाळतात. शिक्षण, आरोग्य यांचा खर्च टाळण्याकडे तेथील नागरिकांचा कल असून, यामुळेच आर्थिक गतीला खिळ बसतेे. अमेरिकी अर्थव्यवस्था म्हणूनच मंदीच्या छायेतून बाहेर येत नाही. ही बाब तिथल्या अर्थतज्ज्ञांना राष्ट्रीय आर्थिक आपत्ती वाटणे, हे अत्यंत स्वाभाविक असेच.


ज्या अमेरिकी नागरिकांकडे जगातील सर्वांत मजबूत चलन आहे, जगातील सर्वांत मोठी अर्थव्यवस्था आहे, अशा देशातील घराघरांत इतका गडगडाट असेल, तर भारतात या विषयाकडे अधिक गांभीर्याने पाहणेच गरजेचे ठरेल. भारतात अशी स्थिती उद्भवली, तर त्याचे होणारे परिणाम अधिक व्यापक असतील. भारतातील सरासरी घरगुती बचत दर २०२४-२५ या आर्थिक वर्षात, ५.१ टक्क्यांपर्यंत पोहोचला आहे. ही वाढ चांगली असली, तरी तो अजूनही धोयाच्या सीमारेषेवरच आहे. २०२५ साली करण्यात आलेल्या एका सर्वेक्षणानुसार, भारतात केवळ २५ टक्के लोकांकडेच आपत्कालीन खर्चासाठी ५० हजारांपेक्षा अधिक रक्कम उपलब्ध आहे. भारतातील आरोग्यसेवा, महागाई आणि शिक्षणखर्चाच्या तुलनेत ती खूपच अपुरी आहे, हे मान्य करावे लागेल.

भारतीयांचे सरासरी घरगुती उत्पन्न शहरी भागात २५ ते ३० हजार रुपये इतके असून, ग्रामीण भागात ते यापेक्षाही कमी आहे. भारतात जीवनावश्यक खर्च लक्षात घेतल्यास, शहरी कुटुंबाचा मासिक खर्च किमान २० हजार रुपयांच्या पुढे जातो. अर्थात बहुतांश कुटुंबे विमा, भविष्य निर्वाह निधी, सोने खरेदी तसेच भिशीच्या माध्यमातून बचत करण्याचा मार्ग अवलंबतात. एका गृहितकानुसार, आपत्कालीन निधी कमीतकमी तीन ते सहा महिन्यांच्या मासिक खर्चाच्या समतुल्य असावा, असे म्हटले जाते. म्हणजेच, एका कुटुंबाचा मासिक खर्च २५ हजार रुपये असेल, तर त्याकडे किमान ७५ हजार ते १.५ लाख रुपयांची बचत आवश्यक आहे. आज भारतात अशा सुस्थितीत असलेल्या कुटुंबांचे प्रमाण केवळ २७ टक्के इतकेच आहे. उर्वरित ७३ टक्के जनतेकडे ही आर्थिक सुरक्षा नाही. आपत्कालीन निधी नसल्यामुळे सर्वसामान्य कर्ज घेतात आणि त्यातून व्याजाचा बोजा वाढतो आणि कर्जाचे दुष्टचक्र सुरू होते. आकस्मिक खर्चासाठी मनाची तयारी असल्याने मानसिक स्वास्थ्य उत्तम राहते. अन्यथा, तणाव वाढीस लागतो. यातून अस्वस्थताही वाढून कार्यक्षमतेवरही त्याचा नकारात्मक परिणाम होतो. जेव्हा नागरिकांच्या हातात रोख पैसे किंवा आपत्कालीन बचत असते, तेव्हा राष्ट्रीय अर्थव्यवस्था संकटकाळात लवकरात लवकर सावरते. ‘कोविड’ महामारी हे त्याचे उत्तम उदाहरण. ज्यांच्याकडे बचत होती, अशांना त्या काळात कर्ज न घेता, महामारीच्या कालावधीत तग धरता आला.

आर्थिक साक्षरता वाढवणे का गरजेचे आहे, हे अमेरिकेतील या परिस्थितीने पुन्हा एकदा अधोरेखित केले. शालेय अभ्यासक्रमात ‘व्यक्तिगत वित्तीय नियोजन’ हा विषय अनिवार्य असणेही गरजेचे झाले आहे. तसेच, भारतात डिजिटल अर्थव्यवस्था वाढीस लागली असल्याने बँक खाती, ‘यूपीआय अॅप’, ‘एसआयपी’ यांच्या माध्यमांतून दरमहा ठराविक रक्कम आपोआप बाजूला ठेवणे तुलनेने सोपे झाले. त्याचवेळी, मोबाईल अॅपच्या माध्यमातून आपले खर्च तपासणे, शिलकीनुसार खर्चाची विभागणी करणे आणि अल्पबचतींचे गुंतवणुकीत रूपांतर करणे सहज साध्य आहे. सरकारनेही बचतीला प्रोत्साहन देणार्या योजनांना करसवलती, महिला आणि ग्रामीण भागांसाठी विशेष डिजिटल बचत साक्षरता कार्यक्रम आणि प्राथमिक आरोग्य सुविधा सुलभ करून खर्च रोखणे आवश्यक असेच. अमेरिकेतील डरडोई उत्पन्न हे ८० हजार डॉलर्स इतके आहे, तर भारतीयांचे ते २ हजार, ८०० डॉलर्स इतकेच आहे. अमेरिकेतील आजचे वर्तमान हे उद्या आपले भविष्य असणार आहे. आपण सावध राहिलो नाही, तर उद्या अचानक आलेल्या आरोग्य संकटात, बेरोजगारी किंवा मुलांच्या शिक्षणाच्या वेळेस भारतीयही हवालदिल होऊ शकतात. प्रत्येक नागरिकाने वैयक्तिक आर्थिक सुरक्षिततेला सर्वोच्च प्राधान्य दिले पाहिजे, हेच अमेरिकी परिस्थितीने दाखवून दिले आहे. बचत म्हणजे केवळ पैसा बाजूला ठेवणे असे नाही, तर ती भविष्यातील धोयांपासून स्वतःचा आणि कुटुंबाचा प्रमुख आधार असते, हाच याचा अन्वयार्थ.

संजीव ओक
'मुंबई तरुण भारत'चं व्हॉट्सअप चॅनल फॉलो करा!
अग्रलेख
जरुर वाचा

Email

admin@mahamtb.com

Phone

+91 22 2416 3121