"जातीपातींचं विष कालवणाऱ्या लोकांना...;" राज ठाकरेंचं विधान
24-Jun-2024
Total Views | 63
मुंबई : जातीपातींचं विष कालवणाऱ्या लोकांना महाराष्ट्राने दूर ठेवायला हवं, असं वक्तव्य मनसे अध्यक्ष राज ठाकरेंनी केलं आहे. विधानसभा निवडणूकांच्या दृष्टीकोनातून सोमवारी मनसेची पक्षांतर्गत बैठक पार पडली. या बैठकीनंतर राज ठाकरेंनी माध्यमांशी संवाद साधला.
राज्यातील सध्याच्या परिस्थितीवर बोलताना राज ठाकरे म्हणाले की, "सर्व समाजांनी ही गोष्टी समजणं गरजेचं आहे. मी अनेकदा माझ्या भाषणातून आणि मुलाखतीतून सांगत आलोय की, या जातीपातीतून काहीही होणार नाही. सगळे पुढारी जातीपातीत द्वेष पसरवून फक्त मतं हातात घेतील आणि हे भोळसटपणे मतं देतीलसुद्धा."
"मी काल एका क्लिपमध्ये बघितलं की, लहान लहान मुलं जातीपातीवरुन एकमेकांशी बोलत होती. मी हे आधीच बोललो होतो की, हे प्रकरण शाळा, कॉलेजपर्यंत जाणार. हे विष महाराष्ट्रात कधी नव्हतंच. जातीपातींचं विष कालवणाऱ्या लोकांना महाराष्ट्राने दूर ठेवलं पाहिजे. कितीही आवडता पक्ष किंवा व्यक्ती असेल, पण तो असं विष कालवत असेल तर पुढच्या पिढ्यांनी कसं जगायचं? त्यामुळे जसं उत्तर प्रदेश, बिहारमध्ये सुरु आहे तसं उद्या महाराष्ट्रातही सुरु होईल," असे ते म्हणाले. तसेच निवडणूकांच्या पार्श्वभूमीवर जुलैमध्ये महाराष्ट्र दौरा सुरु करणार असल्याचेही त्यांनी सांगितले.