राहुल गांधींसोबत वाद करण्यासाठी आमचा कार्यकर्ता पुरेसा! मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांचा टोला
10-Jun-2025
Total Views | 13
मुंबई : राहुल गांधींसोबत वाद करण्यासाठी माझी गरजच नाही. ते आमचा कार्यकर्तासुद्धा करू शकतो, असा टोला मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी लगावला आहे. मोदी सरकारची ११ वर्षे पूर्ण झाल्याच्या निमित्ताने मंगळवार, १० जून रोजी पत्रकार परिषद आयोजित करण्यात आली होती. यावेळी ते बोलत होते.
मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस म्हणाले की, "राहुल गांधींना निवडणूक आयोगाने उत्तर दिले आहे. परंतू, त्यांना जर निवडणूक आयोगाकडून उत्तर हवे आहे तर ते भाजपवर आरोप का करतात? ते वृत्तपत्रात का मांडतात? त्यांनी आयोगाला पत्र द्यावे. आयोग त्यांना उत्तर देईल. ते आयोगाला पत्र देत नाही कारण यापूर्वीच आयोगाने या सगळ्या गोष्टी माहितीच्या अधिकारात विचारल्या आहेत. आयोगाने त्यांना ६० पानांचे उत्तर दिले आणि त्यामुळे त्यांचे तोंड बंद झाले."
ते पुढे म्हणाले की, "मतदानाच्या दिवशी प्रत्येक पक्षाचा बुथ एजेंट बुथमध्ये असतो. काँग्रेस पक्षाचासुद्धा असतो. एकातरी काँग्रेस पक्षाच्या बुथ एजेंटने आक्षेप घेतल्याचे दाखवा. याचा अर्थ निवडणूकीची सगळी प्रक्रिया नीट झाली आहे. मी राहुल गांधींच्या प्रत्येक प्रश्नाचे पुराव्यासहित उत्तर दिले आहे. राहुल गांधींसोबत वाद करण्यासाठी माझी गरजच नाही. ते आमचा कार्यकर्तासुद्धा करू शकतो. पण जर त्यांची इच्छा असेल तर मी तयार आहे," असेही मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस म्हणाले.