"ज्यांच्यासाठी आम्ही प्रतिष्ठा पणाला लावली..."; चंद्रहार पाटलांच्या प्रवेशानंतर संजय राऊतांनी व्यक्त केली खंत
10-Jun-2025
Total Views | 74
मुंबई : ज्या माणसासाठी आम्ही प्रतिष्ठा पणाला लावली त्यानेसुद्धा बेईमानी करावी, अशी खंत संजय राऊतांनी व्यक्त केली आहे. उबाठा गटाचे सांगलीतील नेते डबल महाराष्ट्र केसरी पैलवान चंद्रहार पाटील यांनी नुकताच शिवसेनेत प्रवेश केला. यावर राऊतांनी ही प्रतिक्रिया दिली.
संजय राऊत म्हणाले की, "चंद्रहार पाटील हे पैलवान दिसत असले तरी ते कच्चं मडकं आहे. त्यांच्यासाठी शिवसेनेने प्रतिष्ठेचा विषय केला. सांगलीची जागा चंद्रहार पाटलांनी लढावी अशी त्यांची इच्छा होती. त्यांच्या त्या इच्छेसाठी आम्ही प्रतिष्ठा पणाला लावली. अशा माणसाने स्वार्थासाठी, लाभासाठी बेईमान व्हावे. काय कमी केले? ठीक आहे सत्ता आली नाही. तुमच्या गावात तुम्हाला मते पडली नाही. ज्या माणसासाठी आम्ही प्रतिष्ठा पणाला लावली, त्याने सुद्धा बेईमानी करावी, या गोष्टीचे मला वाईट वाटले. या बेईमानीचे वर्णन करण्यासाठी माझ्याकडे शब्द नाही," अशी खंत त्यांनी व्यक्त केली.
ते पुढे म्हणाले की, "चंद्रहार पाटील यांना त्यांच्या विटासारख्या गावात १० हजार मते पडली नाहीत. पण आम्ही प्रयत्न केला. ते जर अपक्ष लढले असता तर ५ हजार मतेसुद्धा पडली नसती. शिवसेनेची असलेली ६० हजार मते त्यांना पडली. शेवटी सगळे काही आर्थिक लाभापोटी चालले आहे," असेही ते म्हणाले.