'माझी वारी माझा संकल्प'! समाजपरिवर्तनासाठी वारीनिमित्त राज्य सरकारचे विषेश अभियान
25-Jun-2025
Total Views | 12
मुंबई : वारीनिमित्त समाजपरिवर्तनासाठी राज्य सरकारतर्फे 'माझी वारी माझा संकल्प' अभियान राबवण्यात येणार आहे. उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदेंनी बुधवार, २५ जून रोजी याबाबतची माहिती दिली. तसेच त्यांनी सर्वांना वारीनिमित्त एक संकल्प करण्याचे आवाहनही केले.
उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे म्हणाले की, "महाराष्ट्राची आध्यात्मिक आणि सांस्कृतिक ओळख म्हणजे वारी. वारी म्हणजे पंढरपूरच्या दिशेने चाललेली यात्रा नव्हे तर संतांची शिकवण आणि विठ्ठल भक्तीत विलीन होण्याची वाटचाल आहे. आपले सरकार वारी आणि वारकऱ्यांसाठी विविध उपक्रम राबवत आहे. त्यातील मोबाईल शौच्छालयाचा प्रकल्प वारकऱ्यांच्या मदतीने यशस्वी झाला."
"यावर्षीपासून माझी वारी माझा संकल्प हे अभियान आपण सुरु करणार आहोत. आपल्या श्रद्धेला कृतीत उतरवणे हा या अभियानामागचा हेतू आहे. विठ्ठल भक्ती ही केवळ नामस्मरणापुरती मर्यादित न ठेवता तिला सेवा, त्याग, संवर्धन आणि सामाजिक जाणीव देण्यासाठी हे अभियान आहे. यामध्ये नित्यसेवा, गोसेवा आणि वृक्षसेवा असे तीन संकल्प आहेत. आपण स्वत:ला एखादा संकल्पाशी जोडायचे आहे. मी, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि उपमुख्यमंत्री अजित पवार स्वत: एक संकल्प घेऊन या अभियानात सहभागी होणार आहोत. मी समान्य पांडूरंगाचा वारकरी म्हणून नामस्मरणाचा संकल्प करत आहे. माझ्यासाठी हा केवळ संकल्प नसून विठू माऊलीच्या चरणी अर्पण केलेला प्रेमाचा, निष्ठेचा आणि भक्तीचा ध्यास आहे. तुमच्या मनाला भावेल तो संकल्प करा. रोज हरिपाठ आणि सामुहिक आरती करा. जे कराल ते संपूर्ण समर्पणाने करा," असे आवाहनही त्यांनी केले.