आत्मनिर्भर भारत ते विकसित भारत! संकल्पाकडून सिद्धीकडे जाणारी मोदी सरकारची ११ वर्षे : मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस
10-Jun-2025
Total Views | 9
मुंबई : आत्मनिर्भर भारत ते विकसित भारत अशा संकल्पाकडून सिद्धीकडे जाण्याची मोदी सरकारची ही ११ वर्षे आहेत, असे वक्तव्य मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी केले आहे. मोदी सरकारची ११ वर्षे पूर्ण झाल्याच्या निमित्ताने मंगळवार, १० जून रोजी आयोजित पत्रकार परिषदेत ते बोलत होते.
मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस म्हणाले की, "सेवा, सुशासन आणि गरीब कल्याणाची मोदी सरकारची ११ वर्षे पूर्ण झाली आहेत. आत्मनिर्भर भारत ते विकसित भारत अशा संकल्पाकडून सिद्धीकडे जाण्याची ही ११ वर्षे आहेत. एक परिवर्तनशील दशक पूर्ण करून भारताच्या विकासाकडे वाटचाल रेखाटते आहे अशा एका नव्या दशकाची सुरुवात झाली आहे. पारदर्शकता, प्रामाणिकता, गतीशीलता आणि निर्णयक्षम सरकार असे गेल्या ११ वर्षांच्या मोदी सरकारचे वर्णन करता येईल. भ्रष्टाचार, घोटाळे, तुष्टीकरण या गोष्टी संपवत विकास, अनुसंधान आणि सर्वसमावेशकतेच्या आधारावर या सरकारने गेली ११ वर्षे काम केले आहे."
"महाराष्ट्राचा विचार केल्यास मोदी सरकारच्या काळात महाराष्ट्रात रेल्वेचे पावणे दोन लाख कोटी रुपयांचे प्रकल्प सुरु आहेत. यूपीए सरकारने दहा वर्षात महाराष्ट्राला रेल्वेसाठी जेवढे पैसे दिले तेवढे पैसे एका वर्षात मोदी सरकारने दिले. मोदी सरकारच्या सहकार्यातून महाराष्ट्रात पायाभूत सुविधा क्षेत्रात ६ लाख कोटी रुपयांचे काम सुरु आहेत. एकाच वर्षात राज्याला ३० लाख घरे देण्याचा विक्रम मोदी सरकारने केला आहे. प्रत्येकाला घर देण्याचा संकल्प सिद्धीकडे नेण्याचे काम सुरु आहे. मोदीजींनी देशात गरीब कल्याणाचा अजेंडा राबवला. ८१ कोटी लोकांना मोफत अन्नधान्य दिले," असेही त्यांनी सांगितले.
मोदी सरकारचा सर्वसमावेशक चेहरा!
"मोदीजींनी या सरकारला एक सर्वसमावेशक चेहरा दिला आहे. या सरकारमधील ६० टक्के मंत्री हे एससी, एसटी आणि ओबीसी आहेत. समाजातील वंचित घटकांना थेट लाभ देऊन २५ कोटींपेक्षा जास्त लोकांना गरीबी रेषेच्या वर आणण्याचे काम मोदी सरकारने केले. सहकार क्षेत्रात मोदीजींनी पहिल्यांदा नवीन सहकारिता मंत्रालय सुरु केले. सहकाराच्या माध्यमातून साखर कारखानदारीला ५० वर्षात झाली नाही एवढी प्रचंड मदत केली. महिलांकरीता मोदीजींनी विविध योजना राबवून त्यांच्यासाठी मोठ्या प्रमाणात काम केले. यासोबतच विद्यार्थी, युवा, मध्यमवर्गीय विविध योजना राबवल्या आहेत," असेही मुख्यमंत्री फडणवीस म्हणाले.
ते पुढे म्हणाले की, "राष्ट्र प्रथम या भूमिकेतून मोदी सरकारने काम केले. त्यामुळे ऑपरेशन सिंदूर हा आत्मनिर्भर आणि स्वाभिमानी भारताचे ऑपरेशन म्हणून भारताच्या इतिहासात लिहिले जाईल. संरक्षणाच्या स्वदेशीकरणात आयात करत असलेले ५ हजार उपकरणे आता १०० टक्के भारतात बनतात आणि आपण ते निर्यात करतो. भारतीयांचे आणि भारतीय पासपोर्टचे महत्व तसेच भारतीयांच्या जीवनाचे महत्व ओळखून त्याप्रकारे काम आपण केले आहे. चांद्रयान ३ हा भारतासाठी एक ऐतिहासिक क्षण आहे. जे जपानलासुद्धा जमले नाही ते भारताने करून दाखवले आहे. कलम ३७० रद्द करून काश्मीमध्ये परिवर्तन आणण्याचे काम मोदी सरकारने केले आहे. मोदी सरकारने शक्तीशाली भारत तयार केला असून आता आपण जगातील चौथ्या क्रमांकाची अर्थव्यवस्था झालो आहोत. पुढच्या तीन वर्षात जगातील तिसऱ्या क्रमांकांची सगळ्यात मोठी अर्थव्यवस्था भारत होणार आहे."
४० वर्षे अडकलेले प्रकल्प मोदीजींनी खुले केले!
"भारतात येणाऱ्या परकीय गुंतवणूकीत २६ टक्क्यांनी वाढ झाली आहे. मोठ्या अर्थव्यवस्थांमध्ये सर्वाधिक वेगाने विकसित होणारी अर्थव्यवस्था भारताची आहे. मोदीजींच्या काळात एक बदललेली कार्यसंस्कृती पाहायला मिळते. आज मुंबईसह महाराष्ट्राचे झालेले परिवर्तन हेदेखील मोदी सरकार आल्यानंतरच होऊ शकले आहे. आपले सगळे महत्वाचे प्रकल्प ४०-४० वर्षे अडकले होते. मोदी सरकार आल्यानंतर ते खुले झाले आणि आता ते पूर्ण होत आहेत," असे म्हणत प्रगतीशील आणि सर्वसमावेशक सरकार दिल्याबद्दल मी पंतप्रधान नरेंदी मोदीजींचे आणि त्यांच्या मंत्रिमंडळाचे मुख्यमंत्र्यांनी आभार मानले.
आता बोटावर मोजण्याइतकेच सक्रीय माओवादी!
"नक्षलविरोधी मोहीमेतील या सरकारचे काम हे इतिहास लिहिणारे आहे. गृहमंत्री अमित शाह यांनी मार्च २०२६ पर्यंत नक्षलवाद समाप्त करण्याची घोषणा केली असून त्यादिशेने आज प्रवास सुरु आहे. मधल्या पाच वर्षात छत्तीसगडमध्ये काँग्रेसचे सरकार असताना मोठ्या प्रमाणात माओवाद्यांची भरती झाली. अन्यथा आतापर्यंत आपण ते संपवू शकलो असतो. आता आपल्याकडे बोटावर मोजण्याइतकेच सक्रीय माओवादी राहिले असून त्यांच्यावरसुद्धा कारवाई होईल," असेही मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस म्हणाले.