काँग्रेस नेत्यांचं खर्गेंना पत्र! वर्षा गायकवाडांची केली तक्रार
24-Jun-2024
Total Views | 68
मुंबई : विधानसभा निवडणूकीला थोडेच दिवस शिल्लक असताना मुंबई काँग्रेसमध्ये अंतर्गत धुसफूस पाहायला मिळत आहे. मुंबईतील काँग्रेस नेत्यांनी नवनिर्वाचित खासदार आणि अध्यक्षा वर्षा गायकवाड यांच्यविरोधात मल्लिकार्जून खर्गेंना पत्र लिहिलं आहे. वर्षा गायकवाड यांना मुंबई काँग्रेसच्या अध्यक्ष पदावरून हटवण्याची मागणी या पत्रात करण्यात आली आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, काँग्रेसच्या १६ नेत्यांनी मल्लिकार्जून खर्गेंना हे पत्र लिहिले आहे. वर्षा गायकवाड यांच्या विरोधात पत्र पाठवणाऱ्यांमध्ये राज्यसभा खासदार आणि काँग्रेस कार्यकारिणी सदस्य चंद्रकांत हंडोरे, मुंबई काँग्रेसचे माजी अध्यक्ष जनार्दन चांदूरकर, भाई जगताप, नसीम खान, सुरेश शेट्टी, मधु चव्हाण, चरणसिंग सप्रा, झाकीर अहमद इत्यादींचा समावेश आहे.
याशिवाय काही नेते मुंबईत पक्ष कसा मजबूत करता येईल यावर चर्चा करण्यासाठी काँग्रेसचे अध्यक्ष मल्लिकार्जुन खर्गे, केसी वेणुगोपाल आणि राहुल गांधी यांची भेट घेणार असल्याचेही सांगण्यात येत आहे. वर्षा गायकवाड यांच्या कार्यपद्धतीवर नाराज होऊन त्यांना अध्यक्षपदावरून हटवण्याची मागणी या पत्राद्वारे करण्यात आली आहे. दरम्यान, यावर काँग्रेसचे वरिष्ठ नेते काय निर्णय घेतात, याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.