निर्बीजीकरण आणि वंशविच्छेद? तरीही धर्मबांधव गप्प?

    01-Jun-2024
Total Views | 78
genocide religion issue



चिनी सरकार शिनजियांगमधील उघूरांच्या मानवी हक्कांचे उल्लंघन करत आहे, त्यांचा छळ करीत आहे. लोकसंख्या नियंत्रित करण्यासाठी महिलांचे निर्बीजीकरण करीत आहे, त्यांच्यावर बलात्कार केला जात आहे. त्यांचा वंशविच्छेद होत आहे. हा छळ किंवा नरसंहाराचाच प्रकार मानला पाहिजे, असे प्रसार माध्यमांनी म्हटले आहे. उघूरांना वेगळे विचार स्वीकारण्यास भाग पाडले जात आहे, त्यांचे विचारपरिवर्तन घडवून आणले जात आहे (ब्रेनवॉश). आमूलाग्र मतपरिवर्तन किंवा वृत्तीतील बदल करून व्यक्तीला नवीन व्यक्तिमत्त्व देण्याचाच हा आहे. हे सर्व आरोप चीनने सपशेल फेटाळले असले, तरी त्यावर कोणीही विश्वास ठेवण्यास तयार नाही. उघूर नावाच्या मानवसमूहाच्या बाबतीतील चीनचा व्यवहार हा निंद्य, आक्षेपार्ह आणि मानवतेला काळीमा फासणारा आहे, असेच मुस्लीममेतर जग मानते आहे आणि मानत राहणार आहे, हे नक्की. पण, मग मुस्लीम जग अशी मुलुखावेगळी भूमिका का घेत आहे?
 
'सिनीफिकेशन’ हे एका प्रक्रियेचे नाव असून, यानुसार चिनी नसलेले समाज किंवा गट यांना चिनी संस्कृतीत आत्मसात करून घेणे अपेक्षित आहे. यातून असे समाज किंवा गट, भाषा, सामाजिक नियम, संस्कृती आदी बाबतीत मूळ चिनी समाजाशी एकरुप होणे अपेक्षित आहे. गेल्या पाच वर्षांत चीनमध्ये शेकडो मशिदींमध्ये बदल करण्यात आले आहेत. चीन हा तसा अनेक धर्मीयांचा देश. बौद्ध धर्म, ताओवादी, प्रोटेस्टंट, कॅथलिक आणि इस्लाम यांना मानणारे तर अनेक लोक चीनमध्ये राहतात. बहुसंख्य चिनी मुस्लिमांत हुई लोक आणि उघूर लोक प्रमुख आहेत. चीनमधील बहुसंख्य मुस्लीम वायव्य भागात राहतात, विशेषतः गान्सू, किंघाई, निंग्झिया आणि शिनजियांग या भागात त्यांची वस्ती आहे. या भूभागाचे क्षेत्रफळ १.६ चौरस अब्ज किमी किंवा ०.६४ अब्ज चौरस मैल (म्हणजे चीनमधील एकषष्ठांश भाग) आहे. संपूर्ण चीनचे क्षेत्रफळ सुमारे ९.६ चौरस अब्ज किमी किंवा ३.७ अब्ज चौरस मैल आहे. आज चीनमध्ये अंदाजे २५ दशलक्ष (अडीच कोटी) मुस्लीम आहेत, ज्यात हुई, उघूर, कझाक, टाटर आणि इतरांचा समावेश आहे. पण, मुस्लीम लोकसंख्या मोठ्या प्रमाणावर सुन्नी आहे. अंदाजे एक ते तीन दशलक्ष मुस्लीम शिया आहेत. अनेक लहान मुस्लीम गटही अस्तित्त्वात आहेत. अहमदी मुस्लिमांची एकूण संख्या दोन लक्ष ते चार लक्ष असावी, तर चीनची एकूण लोकसंख्या १४० कोटी आहे.

अरबी शैलीत बांधलेली एकही मशीद आता चीनमध्ये उरलेली नाही. चीनच्या शेवटच्या मोठ्या मशिदीच्या इमारतीमध्ये अनेक बदल करताना घुमट आणि मिनार काढण्यात आले आहेत. मशिदीच्या इमारतीचे रुपांतर अरबी शैलीतून चिनी वास्तुकलेमध्ये करण्यात आले आहे. मिनार नसलेल्या मशिदींची छायाचित्रे समोर आल्यानंतर पाकिस्तानी नागरिकांनी चीनच्या या कृत्याविषयी संताप व्यक्त केला. “भारत किंवा अन्य देशांत असे झाले असते, तर आम्ही आकाश-पाताळ एक केले असते,” अशी टीका त्यांनी केली, या बाबीची विशेष नोंद घ्यावयास हवी आहे. पण, बातम्यांमध्ये ही छायाचित्रे कोठेही दाखविण्यात आली नसल्यामुळे त्याविषयी जनतेला नीटशी माहिती नाही. पाकिस्तानी नागरिक चीनपेक्षा पाकिस्तान सरकारवरच अधिक उखडले आहेत, हे वृत्तही नोंद घ्यावी असेच आहे. ही घटना चीनशी संबंधित असल्याने त्यावर मौन बाळगण्याचे एक कारण म्हणजे, पाकिस्तानचे चीनशी असलेले संबंध अतिशय विशेष आहेत, हे आहे काय? कदाचित आता जगातील चीन असा एकमेव देश आहे, ज्याच्यावर पाकिस्तानचा थोडाफार विश्वास उरला आहे. चीनचाच पाकिस्तानला मोठा आधार. त्यामुळे फारसा आरडाओरडा न करता गप्प बसावे, असा शहाणपणाचा मार्ग तर पाकिस्तान सरकारने व मुल्ला-मौलवींनी स्वीकारला नाही ना, असा प्रश्नही विचारला जायला सुरुवात झालेली दिसते आहे.

चीनसाठी वास्तूमध्ये बदल करणे ही नवीन गोष्ट नाही. सर्वांना समान बनविण्याचा साचा तेथे सर्रास वापरला जात असतो. प्रत्येकाने सारखाच विचार करावा आणि मशीद असो किंवा इतर काहीही, सर्व वास्तू सारख्याच दिसाव्या, असे चीन सरकारचे धोरण. दुसरे असे की, चीन अशा बातम्या बाहेर येऊ देत नाही. चीनकडून आर्थिक साहाय्य घेत असल्यामुळेच पाकिस्तानी प्रसारमाध्यमे या बातमीबाबत मौन बाळगून आहेत. खरेतर पाकिस्तानचा खरा शत्रू चीनच आहे. भारत हा पाकिस्तानचा शत्रू नाही. भारताकडून पाकिस्तानला कोणताही धोका नाही. उलट भारत आणि पाकिस्तान यांनी गरिबीविरुद्ध लढा उभारला पाहिजे, ही भारताची भूमिका आहे. चीनचा इतिहास असा आहे की, त्यांच्यावर विश्वास ठेवता येत नाही. हे मुस्लिमांना समजत नसेल असे नाही. पण, न बोलणेच शहाणपणाचे आहे, असे ते मानत असले पाहिजेत. बाकीच्यांचे एकवेळ बाजूला ठेवूया. भारतातील मुस्लीमही याबाबत गप्प असावे ना? भारतात कोठे काही खुट्ट झाले की, त्यांचा केवढा थयथयाट सुरू होतो? ‘अहो, चीन एक लष्करी आणि आर्थिक महासत्ता आहे, तिच्याविरुद्ध आवाज उठवायचा म्हणजे भलतेच काहीतरी नाही का?’ अशीच भारतासह सर्व मुस्लीम देशांतील मुस्लिमांची भावना तर झालेली नाही ना? मुस्लीम जगाने उघूर लोकांसोबत सर्व काही ठीक चालले आहे, अशीच भूमिका कायम ठेवली आहे. मार्च २०१९च्या सुरुवातीला तर, ‘इस्लामिक सहकार्य संघटनेने’ (ओआयसी) एक ठराव संमत करून आपल्या मुस्लीम नागरिकांची, तर याच सुमारास सौदी अरेबिया, बहारीन, कुवेत, सीरिया, पाकिस्तान, इजिप्त, अल्जेरिया आणि संयुक्त अरब अमिराती यांसारख्या अनेक प्रमुख मुस्लीम देशांसह ३७ देशांच्या राजदूतांनी एक संयुक्त पत्र प्रसिद्ध करून उघूर वंशाच्या संदर्भातील चीनच्या धोरणांना पाठिंबा दर्शविला होता.


थोडे मागे जाऊया...

आजच्या चीनमधील शिझियांग (सिकियांग) राज्यात-प्रांतात गत दोन हजार, ५०० वर्षांत डझनावारी राज्ये-साम्राज्ये जन्माला आली, फुलली, फळली व शेवटी लयाला गेली. याहीपेक्षा मागे जातो म्हटले, तर महाभारतात या सिकियांग प्रदेशाला ‘तुषार’-‘तुखार’ हे नाव दिलेले दिसते. दिग्विजय यात्रेत अर्जुनाने हा भाग जिंकल्याचेही उल्लेख आहेत. अशा या अतिप्राचीन आणि इतिहासप्रसिद्ध पण विद्यमान चिनी भागात सुरू असलेले चीनचे सक्तीचे प्रयोग सध्या विकोपाला गेले आहेत. ते समजण्यासाठी नजीकच्या मागील काळात जावे लागणार आहे. मुळात मध्य आणि पूर्व आशियात उघूर नावाचा एक तुर्कीक वंशाचा गट होता-आहे, यातील बहुतेक लोक आज धर्माने मुस्लीम आहेत. चीनमधील शिझियांग (सिकियांग) नावाच्या राज्यात उघूर लोकांची वस्ती जास्त प्रमाणात असून, त्यांचा एक स्वायत्त विभागच चीनमध्ये आहे. चीनमध्ये उघूरांना ‘वांशिक अल्पसंख्याक’ म्हणून मान्यता आहे. पण, ते मूळ निवासी आहेत, असे काही चीन मानत नाही. या प्रदेशात उघूर अल्पसंख्याक आहेत, एवढेच चीन मानतो. उघूरांची भूमिका मात्र नेमकी उलट आहे. चीनमध्ये वायव्य दिशेला असलेल्या या शिझियांग (सिकियंग) राज्याच्या सीमा जशा चीन या मुख्य देशाला लागून आहेत, तशाच त्या मंगोलिया, कझाकिस्तान, किरगिझस्तान आणि अफगाणिस्तान या देशांनाही लागून आहेत. या सीमावर्ती भागातील सर्वच देशांत उघुरांची संख्या अर्थातच जास्त आहे आणि ते स्वाभाविकच आहे. या राज्यात जवळजवळ १५ लाख उघूर लोक राहतात. संपूर्ण जगाचा विचार करायचा झाला, तर रशियात त्यांची संख्या चार हजार, तुर्कस्तानात दहा हजार, उझबेकिस्तानमध्ये ३७ हजार आहे. दूर अमेरिकेतही एक हजार उघूर आहेत. अगदी बारीक शोध घ्यायचा झाला, तर उघूर लोक ऑस्ट्रेलिया, कॅनडा, जर्मनी, स्वीडन, अफगाणिस्तान, नॅार्वे, बेल्जियम, नेदरलॅण्ड व सौदी अरेबियातही वास्तव्यास आहेत. पण, तिथे त्यांची संख्या अत्यल्प किंबहुना नगण्य आहे.

तुर्कीक भाषा बोलणार्‍या या उघूरांना आजवर जवळजवळ सर्वच देशांनी निर्दयीपणे वागविले, अशा नोंदी इतिहासात सापडतात. पण, याचा अर्थ असाही नाही की, उघूर स्वतः अगदी धुतल्या तांदळाप्रमाणे स्वच्छ आहेत. उघूरांचा असा दावा आहे की, शिनजियांग प्रदेश हा चीनचा भाग नाहीच. १९४९ मध्ये त्याचा चीनमध्ये बेकायदेशीरपणे समावेश केला गेला. उघूर कट्टरपंथीयांकडून दहशतवादी कृत्ये केल्याच्या बातम्या चिनी मीडियामध्ये येत आहेत. राजकारणात त्यातही जागतिक राजकारणात तर असा ‘बिचारा’ क्वचितच कोणी सापडेल. पण, आज त्यांची चीनमध्ये ससेहोलपट होते आहे, ही मात्र वस्तुस्थिती. तुर्कीक भाषेत दोन प्रमाण भाषा आहेत असेे मानले जाते. बोली तर अनेक आहेत. असे भेद असले, तरी उघूर बोली बोलणार्‍यांना एकमेकांचे बोलणे समजते. प्रामुख्याने मध्य आशियात वास्तव्य असलेल्या या उघूरांनी मंगोल सेनेत सहभागी होऊन एकेकाळी चीन व मध्यपूर्वेत शौर्य गाजविले आहे. मंगोल दरबारात तर उघूरांना मानाच्या जागा मिळत असल्याचीही नोंद आहे. चीनमध्ये मुस्लीम अल्पसंख्य असून त्यांची टक्केवारी जवळजवळ तीन टक्के इतकीच आहे. तशी चीनमध्ये इस्लामचा शिरकाव होऊन १ हजार, ४०० वर्षे झाली आहेत. त्यातही हुई मुस्लीम बहुसंख्य आहेत. ते मुख्यतः शिझियांग (सिकियांग) राज्यात असून येथे मात्र उघूर मुस्लिमांची संख्या जास्त आहे. मुस्लिमांमध्येही सुन्नींचे प्रमाण जास्त असते. तसे ते उघूरांमध्येही सुन्नींची संख्या शियांपेक्षा जास्त आहे. चीनमध्ये अल्पसंख्यांकांचे तसे एकूण ५५ गट असून त्यातील दहा सुन्नी आहेत.

प्राचीन काळापासून अस्तित्त्वात असलेला जुना ‘सिल्क रूट’ वापरणार्‍या व्यापार्‍यांमध्ये मुस्लिमांचे प्रमाण बरेच होते. या मार्गाने केवळ व्यापारी देवघेवच झाली असे नाही, तर धर्म, संस्कृती व श्रद्धांचाही प्रसार झालेला आढळतो. या मार्गावर युद्धे जशी झाली, तशी राजकीय देवघेवही झालेली आढळून येते. ती जशी धर्मासाठी झाली, तशीच ती राजकीय कारणांसाठीही झाली आहे.


आपले स्वतंत्र राज्य असावे

चीन, मंगोलिया, कझाकिस्तान, किरगिझस्तान आणि अफगाणिस्तान यांच्या सीमा शिझियांग राज्याला स्पर्श करतात. अशाप्रकारे जेव्हा अनेक देशांच्या सीमा एकमेकींना स्पर्श करीत असतात, तेव्हा त्या त्या भागांत तणावाचे वातावरण निर्माण होणे ही एक स्वाभाविक घटना असते. तीच स्थिती याही बाबतीत आहे. येथील उघूरांच्या मनात आपले स्वतंत्र राज्य असावे, अशी सूप्त भावना आहे. त्यामुळे या सर्वच देशांत त्यांच्याकडे संशयाने पाहिले जाते व ते बदडले जात आहेत. चीनमध्ये सध्या हा चिनी व उघूर संघर्ष विकोपाला जाण्याचे हे प्रमुख कारण आहे. कारण, शिझियांग (सिकियांग) राज्य बरेच मोठे आहे. एखाद्या राज्यात चीनपासून फुटून निघण्याचा विचार होत असेल, ते चीनला सहन होणे शक्यच नाही.


चीनमधील ‘संस्कार’ छावण्या

संयुक्त राष्ट्रांच्या अहवालानुसार, आज चीनमध्ये एकूण दहा लाख उघूर अटकेत असून त्यांच्या पुनर्शिक्षणाचा कार्यक्रम चीनने हाती घेतला आहे. त्यासाठी छावण्याही उभारण्यात आल्या आहेत. चिनी कम्युनिस्ट पक्षाच्या तत्त्वांचे ‘संस्कार’ त्यांच्यावर या छावण्यांत केले जातात. चीनचा हा ‘गोपनीय’ कार्यक्रम उजेडात आणण्याच्या बाबतीत शोधपत्रकारितेने महत्त्वाची भूमिका बजावून सर्व तपशील उघड केला आहे. त्यानुसार उघूरांचे प्रशिक्षण १२ महिन्यांपर्यंत चालते. त्यात कोणाची किती प्रगती (?) झाली, कोणात किती सुधारणा (?) झाली, याचा आढावा घेतला जातो. प्रगती किती झाली, हे तपासण्यासाठी परीक्षा घेतल्या जातात. समाधानकारक प्रगती असणार्‍यांनाच छावणीतून परत घरी जाण्याची अनुमती चिनी सरकार देत असते. प्रशिक्षणार्थी आठवड्यातून एकदाच कुटुंबीयांशी फोनवर बोलू शकतात. संयुक्त राष्ट्रांच्या ‘मानव हक्क समिती’ने हा प्रशिक्षण कार्यक्रम थांबवून सर्वांची सुटका करावी, असे चीन सरकारला सांगितले असून छावण्याही बंद करा, असेही म्हटले आहे. या सर्व प्रकारांकडे अमेरिका दुर्लक्ष करणार नाही. उघूरांच्या बाबतीत मानवी हक्कांचे उल्लंघन अमेरिका सहन करणार नाही, असे अमेरिकेच्यावतीनेही जाहीर करण्यात आले आहे. पण, याबाबत अनुकूल भूमिका घेईल, तर तो चीन कसला?


उघूर ह्यूमन राईट्स पॅालिसी अ‍ॅक्ट

या संबंधातील ‘उघूर ह्यूमन राईट्स पॅालिसी अ‍ॅक्ट’, अमेरिकेच्या प्रतिनिधी सभेत (हाऊस ऑफ रिप्रेझेंटेटिव्हज्) प्रचंड बहुमताने पारित झाला आहे. पण, अमेरिकेच्या या भूमिकेमुळे चीनचा अक्षरशः तीळपापड झाला असून, प्रत्यक्षात आम्ही उग्रवाद व अलगाववाद संपविण्याचा प्रयत्न करीत असताना, अमेरिकेने ही अशी भूमिका घ्यावी व आमच्या अंतर्गत बाबीत ढवळाढवळ करावी, याबद्दल चीनने अमेरिकेचा निषेध केला आहे. ‘याचे परिणाम चांगले होणार नाहीत,’ असे बजाविण्यासही चीनने कमी केलेले नाही.

याचा स्वाभाविक परिणाम असा झाला आहे की, अमेरिका आणि चीनमधील व्यापारी संघर्षसुद्धा आणखी चिघळला आहे. या अगोदरच चीन व अमेरिका यात गेल्या अनेक महिन्यांपासून व्यापारयुद्ध पेटले असून, उभयदेशांनी एकमेकांच्या मालावरील आयातशुल्क खूपच वाढविले आहे.

“चीनकडे प्रचंड पैसा आहे, त्यामुळे चीनला कर्ज देऊ नये,” अशी मागणी अमेरिकेने जागतिक बँकेकडे केली आहे. “जागतिक बँकेने चीनला कर्ज देण्याऐवजी इतर गरीब देशांना कर्ज द्यावे,” अशी भूमिका अमेरिकेने घेतली आहे. हा प्रस्ताव जागतिक बँकेने स्वीकारला आहे.

चिनी सरकार शिनजियांगमधील उघूरांच्या मानवी हक्कांचे उल्लंघन करत आहे, त्यांचा छळ करीत आहे. लोकसंख्या नियंत्रित करण्यासाठी महिलांचे निर्बीजीकरण करीत आहे, त्यांच्यावर बलात्कार केला जात आहे. त्यांचा वंशविच्छेद होत आहे. हा छळ किंवा नरसंहाराचाच प्रकार मानला पाहिजे, असे प्रसार माध्यमांनी म्हटले आहे. उघूरांना वेगळे विचार स्वीकारण्यास भाग पाडले जात आहे, त्यांचे विचारपरिवर्तन घडवून आणले जात आहे (ब्रेनवॉश). आमूलाग्र मतपरिवर्तन किंवा वृत्तीतील बदल करून व्यक्तीला नवीन व्यक्तिमत्त्व देण्याचाच हा आहे. हे सर्व आरोप चीनने सपशेल फेटाळले असले, तरी त्यावर कोणीही विश्वास ठेवण्यास तयार नाही. उघूर नावाच्या मानवसमूहाच्या बाबतीतील चीनचा व्यवहार हा निंद्य, आक्षेपार्ह आणि मानवतेला काळीमा फासणारा आहे, असेच मुस्लीममेतर जग मानते आहे आणि मानत राहणार आहे, हे नक्की. पण, मग मुस्लीम जग अशी मुलुखावेगळी भूमिका का घेत आहे? राजकीय, धार्मिक आणि वैचारिक भूमिकांपेक्षा आर्थिक हितसंबंधच सर्वोच्च असतात, हेच यावरून सिद्ध होत नाही का? शेवटी, ‘अर्थेनदासता’, हेच खरे!!


वसंत काणे
९४२२८०४४३०
अग्रलेख
जरुर वाचा

Email

admin@mahamtb.com

Phone

+91 22 2416 3121