भारतमाता की जय!

    07-Jun-2025   
Total Views | 21
in kerala on the occassion of world environment day governer arranged an event

केरळचे राज्यपाल राजेंद्र आर्लेकर यांनी ‘जागतिक पर्यावरण दिना’निमित्त राजभवनमध्ये कार्यक्रम आयोजित केला होता. मात्र, या कार्यक्रमात भारतमातेची प्रतिमा होती, म्हणून केरळच्या ‘भारतीय कम्युनिस्ट पार्टी’च्या सरकारने या कार्यक्रमावर चक्क बहिष्कार टाकला. तसेच राज्यपालांनी सरकारी कार्यक्रमांमध्ये भारतमातेची प्रतिमा लावली, हे संविधानिक आणि भयानक आहे, अशा आशयाची तक्रार केरळच्या कम्युनिस्ट नेत्यांनी राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांच्याकडे केली. केरळच्या भारतीय कम्युनिस्ट पक्षाला भारतमातेची इतकी भीती, इतका तिरस्कार का? याचा मागोवा घेणारा हा लेख...


केरळच्या राजभवनमध्ये परवा ‘जागतिक पर्यावरण दिना’निमित्त विशेष कार्यक्रम होता. या कार्यक्रमामध्ये केरळचे राज्यपाल राजेंद्र आर्लेकर यांनी भारतमातेची प्रतिमा ठेवली. प्रतिमेचे पूजन करून कार्यक्रमाला सुरुवात होणारच होती. या कार्यक्रमासाठी अतिथी म्हणून केरळच्या कम्युनिस्ट पार्टीचे कृषिमंत्री पी. प्रसाद उपस्थित होते. पण, भारतमातेची प्रतिमा त्यांनी पाहिली आणि त्यांच्या रागाचा पाराच चढला. "भारतमातेची प्रतिमा हटवा, अन्यथा मी या कार्यक्रमावरच बहिष्कार टाकेन,” अशी धमकीच त्यांनी राज्यपालांना दिली. यावर राजेंद्र आर्लेकर म्हणाले "भारतमातेसाठी सर्व आयुष्य समर्पित आहे. कितीही दबाव टाकला आणि काहीही झाले, तरीसुद्धा राजभवनातून भारतमातेची प्रतिमा काढली जाणार नाही.” यावर पी. प्रसाद यांनी राजभवनामधील सरकारी कार्यक्रमावर बहिष्कार टाकला. थयथयाट करत ते तिथून निघून गेले आणि त्यांनी थेट राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांना म्हणे तक्रारीचे पत्र लिहिले की "राज्यपाल राजेंद्र आर्लेकर यांनी राजभवनमधील सरकारी कार्यक्रमामध्ये भारतमातेची प्रतिमा पूजन केले. संविधानामध्ये भारतमातेची कुठेही नोंद नाही.” पी. प्रसाद यांच्या म्हणण्याला केरळ कम्युनिस्ट पक्षाचे शिक्षणमंत्री वी. शिवनकुट्टी यांनी लगेच दुजोरादेखील दिला. थोडक्यात, केरळच्या कम्युनिस्ट सरकारने राजभवनातील भारतमातेच्या प्रतिमेला असा बाष्कळ विरोध केला.


या लोकांचे म्हणणे की, हातात भगवा झेंडा घेतलेली भारतमातेची प्रतिमा रा. स्व. संघाच्या कार्यक्रमातच असते. रा. स्व. संघाची विचारसरणी लादण्यासाठी राज्यपालांनी भारतमातेची प्रतिमा कार्यक्रमात कशी लावली? केरळच्या कम्युनिस्ट पक्षाला रा. स्व. संघाची किती ती भीती! केरळच्या कम्युनिस्ट पक्षाला भगव्या रंगाचा इतका द्वेष का? कम्युनिस्ट पक्ष अजून किती वैचारिक अधोगतीला जाणार आहे, देव जाणे!


गेल्या वर्षीची ती घटनाही अशीच. ‘त्रावणकोर देवस्वोम बोर्ड तिरुवनंतपुरम’च्या वेल्लयानी भद्रकाली मंदिरामध्ये ७० दिवसांचा उत्सव असतो. हा उत्सव गेल्या ८५० वर्षांपासून सुरू आहे. उत्सवाला धार्मिक, ऐतिहासिक आणि सामाजिक आयाम आहेत. मात्र, हा उत्सव सुरू होण्यापूर्वीच केरळ पोलिसांनी देवस्थान समितीला आदेश दिले की, मंदिराची सजावट भगव्या रंगांच्या फुलांनी करू नये. भगव्या रंगांच्या फुलांऐवजी दुसर्या कोणत्याही रंगाची फुले चालतील. पोलिसांच्या या आदेशाविरोधात देवस्थानने न्यायालयात याचिका दाखल केली, तर पोलीस प्रशासनाचे आणि केरळच्या कम्युनिस्ट सरकारचे म्हणणे होते, "भगव्या रंगाच्या फुलांची सजावट केली, तर त्या भगव्या रंगामुळे कायदा- सुव्यवस्थेवर ताण येतो. कायदा-सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण होतो. कारण, या भगव्या रंगामुळे एका समाजाच्या भावना दुखावल्या जातात.” हिंदूंच्या मंदिरांची सजावट हिंदूंनी त्यांच्या आस्थेने केली, तर कोणत्या समाजाच्या भावना दुखावत होत्या, हे काय सांगायला हवे? ८५० वर्षांपासूनची मंदिराची ऐतिहासिक परंपरा सोडून द्या. कारण, भगव्या रंगामुळे केरळमधील काही म्हणजे अर्थातच बहुसंख्य मुस्लिमांच्या भावना दुखावतात, असा निर्णय देणारे हे केरळचे कम्युनिस्ट सरकार!


तर केरळच्या कोल्लम जिल्ह्यातील मुथुपिलक्कडु श्री पार्थसारथी मंदिराचेही असेच. या मंदिराच्या कळसावर भगवा झेंडा डौलाने फडकत असायचा. मात्र, मंदिरावर भगवा झेंडा का, अशी याचिका हिंदूद्वेष्ट्यांनी न्यायालयात दाखल केली होती.


शंकराचार्यांच्या स्मृतींनी पावन असलेले केरळ ‘देवभूमी केरळ’ असे म्हटले जाते. मात्र, कम्युनिस्ट सरकारने केरळच्या या दोन्ही उपाधींना नामशेष करायचे ठरवलेले दिसते. केरळला ‘दक्षिणेतले काश्मीर’ही म्हटले जाते. केरळच्या कम्युनिस्ट सरकारने केरळची ही ‘दक्षिणेतले काश्मीर’ उपाधी सार्थ करायचे ठरवलेले दिसते. काश्मीर जसे मुस्लीमबहुल आहे आणि तिथे जसे फुटीरतावादी धर्मांध दहशतवाद माजला, तसेच चित्र केरळमध्ये कम्युनिस्ट पक्षाला निर्माण करायचे आहे, असेच वाटते. अर्थातच, केरळ काँग्रेसही याबाबतीत मागे नाही. २७ टक्के मुस्लिमांचा मसिहा कोण, यावरून दोन्ही पक्षांची आपसांत स्पर्धा आहे.


असो. तर केरळच्या कम्युनिस्ट पक्षाने भारतमातेच्या प्रतिमेला विरोध केला. मात्र, जेव्हा त्यांना जाणवले की, भारतमातेला विरोध केल्याने केरळ राज्यातील हिंदूंची मते आपल्याला गमावावी लागतील, तेव्हा मग केरळच्या कम्युनिस्ट सरकारने सारवासारव केली की, "आम्ही भारतमातेच्या विरोधात नाही, आमच्या पक्षाच्या कितीतरी कार्यक्रमांमध्ये बालिका भारतमातेचे रूप घेऊन सहभागी होतात. राज्यपालांच्या कार्यक्रमामधील भारतमातेच्या प्रतिमेला विरोध केला, कारण ही प्रतिमा सरकारी कार्यक्रमांमध्ये लावली होती. सरकारी कार्यक्रमात संविधानात ज्यांची नोंद आहे, तेच असायला पाहिजे. संविधानामध्ये भारतमातेची अधिकृत नावनोंदणी नाही.” संविधानाच्या नावावर कम्युनिस्ट आणि त्यांचे चमचे अजून किती काळ भारतीय जनतेची दिशाभूल करणार आहेत? मुळात भारतमातेची नोंद किंवा चित्र संविधानात नाही, म्हणून भारतमातेच्या तसबिरीला नाकारले गेले असेल, तर संविधानाच्या पानांवर प्रभू श्रीरामाचे चित्र आहे. मग राज्यपाल राजेंद्र आर्लेकर यांनी सरकारी कार्यक्रमामध्ये प्रभू श्री रामचंद्रांचे प्रतिमापूजन केले, तर केरळच्या कम्युनिस्ट सरकारला चालेल का? अर्थातच नाही. कारण तसे केले, तर केरळ कम्युनिस्ट पक्षाचे हिरवा रंग आवडणारे पारंपरिक मतदार कम्युनिस्टांना मतदान करणार नाहीत. थोडक्यात, कम्युनिस्ट पक्ष मुस्लिमांच्या लांगूलचालनासाठी हे सगळे करत आहे.


अशातच केरळमध्ये मुस्लीम लोकसंख्येचा दर सातत्याने वाढत आहे. काही महिन्यांपूर्वी म्हणजे दि. ३० जानेवारी रोजी ‘सेंटर फॉर पॉलिसी स्टडीज थिंक टँक’ने एक अहवाल प्रकाशित केला. त्याचे नाव होते, ‘रिलीजियस डेमोग्राफी इन इंडिया : राइजिंग रिलीजियस इम्बॅलन्स.’ या अहवालामध्ये हिंदू, मुस्लीम ख्रिश्चन आणि इतर समुदायांच्या लोकसंख्येचे २००८ तेे २०२१ सालापर्यंतचे सर्वेक्षण करण्यात आले होते. या अहवालानुसार केरळमध्ये मुस्लीम लोकसंख्या वाढीचा स्फोट झाला आहे.


२०१६ साली ५४ टक्के हिंदू असलेल्या केरळमध्ये २ लाख, ७ हजार हिंदू मुले जन्माला आली, तर केरळमध्ये मुस्लिमांची लोकसंख्या २७ टक्के असूनही याच काळात २ लाख, ११ हजार मुस्लीम मुले जन्माला आली. २०१७ मध्ये २ लाख, १० हजार, ७१ हिंदू मुले जन्मली, तर मुस्लीम मुलांची संख्या २ लाख, १६ हजार, ५२५ मुस्लीम मुले जन्माला आली. हेच चित्र २०२१ पर्यंत होते. हिंदूंपेक्षा अर्धी लोकसंख्या असलेल्या मुस्लीम समाजाच्या मुलांचा जन्मदर दुप्पट होता. म्हणजे जवळजवळ ४६ टक्के होता. याचाच अर्थ भविष्यात केरळचे काय चित्र असणार आहे, हे स्पष्ट आहे. तसेच केरळमध्ये कट्टरपंथी दहशतवाद्यांच्या संघटना फोफावल्या आहेत. ‘लव्ह जिहाद’, ‘ड्रग्ज जिहाद’सोबत ‘व्होट जिहाद’ हे या संघटनांचे काम. त्यांच्या मते, हिंदू काफिर आहेत. त्यामुळे त्यांना संपवायलाच हवे! या हिंदूद्वेष्ट्या संघटनांचे हस्तकही केरळच्या कम्युनिस्ट सरकारला हिंदूविरोधी भूमिका घेण्यासाठी दबाव टाकत असतात. दुसरीकडे केरळचे मुख्यमंत्री पिनराई विजयन यांना हिंदूविरोधी भूमिका घेतल्याशिवाय गत्यंतरच नाही. कारण, त्यांचे जावई पी. ए. मोहम्मद रियास कट्टर हिंदूविरोधी आहेत, हे तर जगजाहीर. गोमांस उत्सव साजरा करत या रियासने त्याची राजकीय कारकीर्द सुरू केली होती. केरळच्या कम्युनिस्ट राजकारणात रियासचा बोलबाला आहे. त्यामुळे हिंदू, रा. स्व. संघ यांच्याशी संदर्भित काहीही असले की केरळचे कम्युनिस्ट सरकार त्याला विरोध करते. आता तर काय, केरळमध्ये कम्युनिस्टांनी चक्क भारतमातेलाच विरोध केला. कम्युनिस्ट विसरले की, याच भारतमातेची शपथ घेऊन स्वातंत्र्यलढ्याचा संग्राम देशभक्तांनी जिंकला, देश स्वतंत्र झाला. तसेच, केरळचे कम्युनिस्ट सरकार हेसुद्धा विसरले की, ‘तेरा वैभव अमर रहे माँ , हम दिन चार रहे ना रहे’ म्हणत भारतमातेसाठी प्राणाहुती देण्यासही तयार असलेले देशनिष्ठ भारतीय आजही आहेत. यामुळे केरळच्या कम्युनिस्ट सरकारने भारतमातेला जरी विरोध केला असला, तरीसुद्धा करोडो भारतीयांच्या आणि अर्थातच केरळवासीयांच्या मनात भावना आहे-



चलेंगे साथ, हाथ में हाथ,
उठाकर माथ,
शपथ गीता गौमाता की,
जगत के भाग्यविधाता की
आरती भारतमाता की,
जगत के भाग्यविधाता की |



ही भावना असलेले करोडो भारतीय, भारतमाताविरोधी द्वेष-मत्सर असणार्या केरळच्या कम्युनिस्ट सरकारला जागा दाखवतीलच!
भारतमाता की जय!

योगिता साळवी

एम.ए. समाजशास्त्र. सध्या मुंबई तरुण भारत  येथे वार्ताहर-उपसंपादक पदावर कार्यरत. राजकीय कार्यकर्ता म्हणून प्रदीर्घ अनुभव. विविध सामाजिक प्रश्‍नांच्या अभ्यासाची आवड व लिखाण. वस्त्यांचे वास्तव हे मुंबई तरुण भारतमधील लोकप्रिय सदराच्या लेखिका.
'मुंबई तरुण भारत'चं व्हॉट्सअप चॅनल फॉलो करा!
अग्रलेख
जरुर वाचा

Email

admin@mahamtb.com

Phone

+91 22 2416 3121