हुळीचे प्राचीन वैभव

    08-Jun-2025
Total Views | 22

Historic temple of Huli

दक्षिण भारताचा सगळा भूभाग वेगवेगळी मंदिरे, मठ, वारसास्थळे यांनी नटलेला आहे. परकीय आक्रमणांतूनदेखील उत्तरेपेक्षा तुलनेने कमी विद्ध्वंस दक्षिणेत झालेला आपल्याला दिसतो. त्यामुळे बर्‍याच ठिकाणी जुनी - जशी होती तशी मंदिरे आपल्याला दिसतात. यातली अनेक आपल्याला परिचित आहेत, तर अनेक अपरिचित. कर्नाटकमध्ये बेळगाव जिल्ह्यात, बागलकोट तालुक्यामध्ये, रम्य तलावाच्या काठी, भोवतीने डोंगररांगा पांघरून, कदाचित बेळगावमधले सर्वांत जुने गाव वसलेले आहे. या गावाचे नाव आहे हूळी. येथील पंचलिंगेश्वर मंदिराविषयी जाणून घेऊया...


यल्लमाचे मंदिर असलेल्या सौंदत्ती गावापासून अवघ्या नऊ किमी अंतरावर हूळी नावाचे गाव आहे. 1181 साली लिहिल्या गेलेल्या शिलालेखात या गावाचे ‘पुळी’ असे नाव दिसते. काळाच्या ओघात अपभ्रंश होत, आज जे आहे ते नाव या गावाला मिळाले असावे. या संपूर्ण भागावरती कदम्ब, कल्याणी चालुक्य, राष्ट्रकूट, विजयनगर साम्राज्य आणि काही काळ मराठा साम्राज्य अशा अनेक राजघराण्यांनी राज्य केले. यांच्या कालखंडामध्ये अनेक मंदिरे आणि धार्मिक मठांची निर्मिती या भागामध्ये झाली. आपल्या सर्व मराठी माणसांसाठी अजून एक अत्यंत अभिमानाची गोष्ट म्हणजे, या भागामध्ये ज्या किल्ल्याचे अवशेष आपल्याला दिसतात, तो किल्ला 1674 साली छत्रपती शिवाजी महाराज यांनी बांधला.

निमुळते रस्ते, जवळजवळ घरं, त्यामध्येच वेगवेगळे धार्मिक मठ आणि बरोबर मध्यभागी पंचलिंगेश्वर मंदिराचा प्राकार (प्रिमायसेस) असे या गावाचे देखणे रूप आहे. साधारण 700 ते 800 वर्षांपूर्वी इथे या मंदिराची निर्मिती झाली. मंदिराचे आतून फोटो काढायला बंदी आहे. भारतीय पुरातत्व खात्याच्या नियंत्रणामध्ये हे मंदिर असून त्यांनी ते अतिशय सुंदर जपलेलेदेखील आहे.
पंचलिंगेश्वर मंदिराच्या मुख्य मंडपामध्ये प्रवेश करण्यासाठी तीनही बाजूंनी प्रवेशद्वारे आहेत. हा मंडपदेखील सर्व बाजूंनी अर्ध भिंतींचा वापर करून बांधला गेला आहे, त्यामुळे या मंदिरात प्रकाश आणि वाराही भरपूर असतो. मंदिराच्या मंडपाचे छत हे उतरते असून, अशा पद्धतीच्या छताची रचना अनेक वेगवेगळ्या दाक्षिणात्य मंदिरांची बघायला मिळते. ऐहोळे येथील दुर्ग मंदिराचे छतदेखील याच पद्धतीचे आहे.

या मंदिरातली सर्वांत चकित करणारी गोष्ट म्हणजे, या मंदिराचे गर्भगृह. पंचलिंगेश्वर मंदिरात पाच वेगवेगळी गर्भगृहे असून, त्या प्रत्येकामध्ये जाण्यासाठी वेगवेगळ्या द्वारांची रचना केलेली आहे. पण, याहीपेक्षा महत्त्वाची गोष्ट म्हणजे, आतल्या बाजूनेही सर्वे गर्भगृहे एकमेकांशी जोडलेली आहेत. साधना करत मोक्षाकडे प्रवास करत असताना, प्रत्येकाचा मार्ग हा कदाचित वेगळा असू शकतो, पण प्रत्येकाला सरतेशेवटी त्या परमेश्वराच्या जवळच जायचे आहे आणि तिथे हे सर्व मार्ग एक होतात. कदाचित हाच विचार आपल्या स्थपतींना या रचनेतून रुजवायचा असेल.

या मंदिराच्या बाह्यभागावरती शिल्पांचे प्रमाण अत्यल्प आहे, पण मंदिराच्या शिखराची रचना अतिशय आखीव-रेखीव केलेली दिसते. पंचलिंगेश्वर मंदिराच्या शेजारीच पुरातत्व खात्याने आजूबाजूला सापडलेले वीरगळ आणि शिलालेख ठेवलेले आहेत. वीरगळ म्हणजे काय, तर युद्धामध्ये वीरमरण पत्करलेल्या त्या गावातल्या योद्ध्याचे स्मरण करून देणारा दगड. या दगडाच्या सर्वांत खालच्या भागात युद्धप्रसंग कोरलेला असतो. मधल्या भागामध्ये अप्सरा आणि योद्धा असे कोरलेले असतात, तर सर्वांत वरच्या भागात तो वीर आपल्या आराध्य देवतेचे पूजन करत बसलेला दाखवला जातो. दक्षिणेतल्या वीरगळांवरती बर्‍याचदा त्या वीराचे नाव आणि युद्धाचे कारणदेखील कोरलेले असते. आपल्याकडे होऊन गेलेल्या पराक्रमी पुरुषांची ओळख येणार्‍या पिढ्यांना व्हावी, म्हणून अशा पद्धतीने वीरगळ तयार केले जातात. तुमच्याही आजूबाजूला असे कुठले वीरगळ असतील, तर ते आता नक्की परत जाऊन बघून या.

पंचलिंगेश्वर मंदिरातून गावातून चालत आपण अतिशय सुंदर अशा तलावापाशी येतो. या तलावाच्या अवतीभोवती नंदिकेश्वर, बनशंकरी, हरीकेशव, कारकेश्वर, अंधकेश्वर, त्रिकुटेश्वर अशी अनेक मंदिरे आणि मठ यांची रचना केलेली दिसते. शैवआराधनेशी निगडित कालामुख आणि मग नंतर नाथ संप्रदायाचा मोठ्या प्रमाणात इथे प्रभाव होता, याचे पुरावे इथल्या शिलालेखांमध्ये आढळून येतात. या मंदिरांचे अजून एक वैशिष्ट्य म्हणजे, गर्भगृहात प्रवेश करण्यासाठी ज्या द्वारशाखा आहेत, त्यांच्याबरोबर मध्यभागी म्हणजेच ललाटावर अभिषेक लक्ष्मीचे शिल्प कोरलेले दिसते. मधोमध लक्ष्मी असून, दोन्ही बाजूंनी मोठाले हत्ती देवीला अभिषेक घालत आहेत, अशा पद्धतीचे हे शिल्प असते.

या मंदिरांच्या द्वार शाखादेखील अत्यंत बोलक्या आणि सुंदर नक्षीकाम केलेल्या आहेत. मानवी जीवनाशी निगडित वेगवेगळे प्रसंग, शैव द्वारपाल, गंगा आणि यमुना अशा अनेक घटकांनी ही द्वार शाखा भरलेली आहे. या ठिकाणी अनेक वेगवेगळे कुंडदेखील बांधलेले दिसतात. यांपैकी सर्वांत मोठ्या कुंडाची रचना ही मराठा कालखंडामध्ये झाली असावी.

पंचलिंगेश्वर मंदिर वगळता इतर मंदिरे ही दुर्लक्षित अवस्थेत आहेत. प्राचीन भारतीय संस्कृतीचा हा अमूल्य ठेवा आपण सुरक्षित ठेवण्याची गरज आहे. अगदी इसवी सनाच्या सातव्या-आठव्या शतकापासून ते 17व्या-18व्या शतकापर्यंत सलग काही ना काहीतरी धार्मिक घडामोडी आणि हालचाली या ठिकाणी होत होत्या. हे इथे तयार झालेल्या मंदिरांच्या माध्यमातून आपल्याला लक्षात येते. पंचलिंगेश्वर मंदिराच्या समोर असलेला एक मठ हा संत ज्ञानेश्वर माऊलींच्या प्रभावाने तयार झालेला आहे. छत्रपती शिवाजी महाराज आणि संत ज्ञानेश्वर माऊली, एकाने पराक्रमाची साधना केली, तर एकाने ज्ञानसाधनेची तपश्चर्या केली, या दोघांचेही ऋणानुबंध या जागेची जोडले गेलेले आहेत, हे आपण विसरून चालणार नाही.

या ठिकाणी जाताना आठवणीने पाणी, थोडा कोरडा खाऊ बरोबर ठेवा. आजूबाजूच्या परिसरात यातल्या कुठल्याही गोष्टी फार उपलब्ध नाहीत. या गावाचे अजून एक वैशिष्ट्य समजून घेऊन आपण या लेखाचा शेवट करूया.

मंदिरामध्ये दिसणारे खांब आणि द्वार शाखा त्याच प्रामाणिक विचाराने आणि त्याच आयुधांचा वापर करून कोरणारी अनेक घरे या गावामध्ये आहेत. आपला भारत देश हा अशा जागांनी भरलेला आहे. गरज आहे ती, या जागेवरती जाऊन भेट देणार्‍या हौशी प्रवाशांची.

इंद्रनील बंकापुरे
7841934774
www.virasatindia.in
'मुंबई तरुण भारत'चं व्हॉट्सअप चॅनल फॉलो करा!
अग्रलेख
जरुर वाचा

Email

admin@mahamtb.com

Phone

+91 22 2416 3121