विज्ञानाधारित रोचक कथा

    15-Jun-2025
Total Views | 9

विज्ञान हा विषय निसर्गातील रहस्य आणि त्यांचे कारकत्व दाखवणारा. मात्र, तो रुक्षपणे शिकवला गेल्यास अधिकच असाध्य वाटतो. म्हणूनच साहित्यामध्ये ‘विज्ञानाधारित साहित्य’ ही संकल्पना आली असावी. साहित्यातील विविध अंगांच्या माध्यामातून विज्ञानाचा प्रसार करणे, हा त्यामागील हेतू. या सगळ्या प्रकारात कथा हा भाग जास्तच प्रसिद्ध झाला. अशाच एका विज्ञानाधारित रोचक कथासंग्रहाचे केलेले परीक्षण...

ज्ञानकथा या नेहमी काल्पनिक किंवा गूढरम्यच असायला हव्यात असे नाही. वैज्ञानिक संकल्पनांवर त्या बेतलेल्या असाव्यात आणि त्यात कथामूल्य हवे, ही विज्ञानकथांसाठीची मूलभूत अट. रोजच्या आयुष्यात सामोरे जावे लागणार्या अनेक बाबींमध्ये विज्ञान दडलेले असते. प्रश्न हा की, त्याकडे माणसे सजगपणे पाहतात किंवा नाही? त्यासाठी मुदलात वैज्ञानिक दृष्टिकोन हवा, तो विकसित व्हायचा, तर विज्ञान रुक्षपणे किंवा लिष्टपणे सांगून उपयोगाचे नाही. ते सांगताना त्यात रंजकता हवी. डॉ. संजीव कुलकर्णी यांचा ‘जुने जाऊ द्या मरणालागुनी’ हा विज्ञान कथासंग्रह त्यादृष्टीने दखल घ्यावा असाच.

यातील काल्पनिक म्हणता येईल अशी एक कथा म्हणजे ‘कृष्णपर्यटन.’ टायटनिक जहाजाला जलसमाधी मिळाली, त्या स्थानाचे जणू पर्यटनस्थळात रूपांतर झाले आहे. जहाजाच्या वेगवेगळ्या भागांची पळवापळवी करण्याची जणू चढाओढ लागली आहे, अशी कल्पना करून लेखकाने त्यास ‘कृष्णपर्यटन’ असे संबोधले. मात्र, हे सगळे टळावे यासाठी काही संशोधक प्रयत्नशील असतात. केन मार्शल, डॉ. कौर आणि रॉबर्ट बलार्ड या संशोधकांमधील संवादातून सगळ्या ‘लृप्तीची’ कल्पना वाचकांना येते. प्रयोगशाळेत ‘सुपरबग’ म्हणजे श्रेष्ठ जिवाणू विकसित करून त्या जहाजावर त्यांची वस्तीच संशोधक करतात. ते जिवाणू जहाजाचे धातूसह एकेक भाग नष्ट करू लागतात आणि त्या जहाजाची ‘लुटी’पासून मुक्तता करतात, अशी ही आगळी कल्पना लेखक या कथेतून मांडतो. ही एकमेव कथा वगळता, अन्य बहुतांशी कथा रोजच्या जीवनातील विज्ञान उलगडून सांगणार्या आहेत.

‘बिळातला माणूस’ कथेत शांता आत्याच्या एकलकोंड्या आयुष्याचा पट येतो. भक्कम पण आता पडया वाड्यात, वीजही नाही अशा घरात राहण्याचा या वृद्धेचा हट्ट का असतो? याचा उलगडा वाचकांना कथेच्या शेवटी होतो. ब्राझीलमधील आदिवासी जमातीतील एका जंगलात एक मृतदेह सापडतो; तो माणूस मरणाआधी २६ वर्षे माणसाच्या संपर्कात नसतो, असा संदर्भ शलाका आणि आत्या यांच्या संभाषणात येतो. त्याचा सांधा लेखक आत्याच्या एकलकोंड्या राहण्याशी जोडतो. ते एकटेपण तिच्यावर लादलेले नसते; तिने ते स्वतः स्वीकारलेले असते. ‘बाहेर सगळी लुबाडणारी माणसे आहेत’ या आत्याच्या विधानावरूनच तिची मानसिकता समजते. मात्र, परस्परांशी झालेला संपर्क हा माणसासाठी आनंददायक आहे की, तो टाळणेच अधिक समाधान देणारे, हा प्रश्न लेखक वाचकांच्या मनात उत्पन्न करतो.

‘वामांगी’ कथेत अनघा आणि मृदुला यांच्यातील संवादातून, अनघाला अचानक एकाकीपणाची जाणीव होत असल्याचे सूचित होते. नवरा, संसार असूनही अनघाला असे का वाटते? याचे उत्तर शोधण्यासाठी ती डॉ. गुप्ते यांच्याकडे जाते. विशिष्ट वयात शारीरिक बदलांमुळे स्त्रियांमध्ये मानसिक आरोग्याच्या समस्या निर्माण होण्याची शयता असते. या वास्तवाकडे डॉ. गुप्ते यांच्या प्रतिपादनातून लेखक अंगुलीनिर्देश करतो. शिवाय माणूस अतिरिक्त आत्मकेंद्रित झाला, तरी असे होऊ शकते, हेही या संभाषणातून अधोरेखित होते.

‘अनंत आमुची ध्येयासक्ती’ ही चार मित्रांची कथा. त्यांतील दोघे आजारपणातून उठलेले. हे चौघेही एव्हरेस्ट बेस कॅम्पला जाण्याचे निश्चित करतात. प्रवासापूर्वीची चलबिचल, गोठवणार्या थंडीतील खडतर प्रवास लेखकाने कथन केला आहे. आत्मविश्वासाच्या जोरावर ते चौघे ती ‘मोहीम’ फत्ते करतात खरी. पण, तेथून परतल्यानंतर ते चौघे जेव्हा भेटतात, तेव्हा त्यांतील दोन मित्रांचे काही तरी बिनसले असल्याचे दिसते. खोदून विचारले जाते, तेव्हा त्यांना त्या थरारक प्रवासातून आपण नक्की काय मिळविले? या प्रश्नाने ग्रासल्याचे पुढे येते. लेखक त्या अनुषंगाने ‘स्पिरेशनल रिग्रेट’ या संकल्पनेचा उल्लेख करतो. बरेच लोक ध्येयामागे धावतात. पण, ते ध्येय गाठल्यानंतर त्यांना ती धडपड निरर्थक वाटू लागते. अनेकजणांमध्ये पोकळीची जाणीव निर्माण होते. ती नैसर्गिक असली, तरी ते ‘रिग्रेट’ घेऊनच आयुष्यभर जगायचे का? हा प्रश्नही ऐरणीवर येतो. या प्रश्नाला ही कथा उत्तम हाताळते.

‘उदरक्षोभ’ कथेत हर्षदाला थकवा, निराशा वाटू लागते. तिचे वडील जैवरसायनशास्त्रज्ञ असतात, ते तिला शरीराला आवश्यक ‘प्री बायोटिस’ची संकल्पना समजावून सांगतात. कोणत्या आहारातून ‘प्री बायोटिस’ मिळतात; त्याने चयापचय कसे सुधारते; निरोगी राहण्यासाठी या नैसर्गिक आहाराची कशी निकड असते; त्या अनुषंगाने उंदरांवर झालेल्या प्रयोगांचे निष्कर्ष काय इत्यादी माहिती, वडील आपल्या मुलीला सांगतात. पण, त्यानिमित्ताने ‘प्रो बायोटिस’ आणि ‘प्री बायियोटिस’मधील फरकही उलगडून सांगतात. ‘भूतदया’ कथेत भारतात दरवर्षी १८ ते २० हजारजण रेबीजने मरतात. दोन कोटी लोकांना कुत्री चावतात, ही भयावह माहिती लेखक देतो आणि मग त्यामागील कारण नमूद करताना, भटया कुत्र्यांना त्यांचा अनैसर्गिक आहार देणार्या भूतदयावादी लोकांच्या अतिउत्साहावरही बोट ठेवतो. तीच बाब कबुतरांना खायला टाकणार्यांची. त्यातून पसरणार्या अनारोग्याच्या महत्त्वाच्या मुद्द्यालाही या कथेतून लेखक स्पर्श करतो. कथानक घडते त्या परिसरात अचानक, भटकी कुत्री एकामागून एक मृत्युमुखी पडू लागतात. त्यामागेचे रहस्य जाणून घेण्यासाठी कथा मुळातूनच वाचायला हवी. कारण, त्यातही वैज्ञानिक संकल्पना दडल्या आहेत. ‘तीच चैत्र यामिनी’ ही कथा निरोगी, निरामय कामजीवनाच्या संकल्पनेवर बेतलेली. ‘बेरीज वजाबाकी’, ‘धर्म’, ‘होप फॉर दि बेस्ट’, ‘महाश्वेता’ या कथाही वाचनीय अशीच.

लेखकाने संभाषणात्मक शैलीचा वापर केल्याने कथांची खुमारी वाढली आहे. लेखकाने या कथांस ‘विज्ञानाधारित कथा’ असे म्हटले आहे. कथांचे हे स्वरूप पारंपरिक विज्ञान कथांपेक्षा निराळे असून, त्या वाचकांच्या पसंतीस नक्कीच उतरतील.


पुस्तक: जुने जाऊ द्या मरणालागुनी
लेखक: डॉ. संजीव कुलकर्णी
प्रकाशक: श्रीविद्या प्रकाशन, पुणे
पृष्ठसंख्या: १७६; मूल्य: रुपये ३००


राहूल गोखले
'मुंबई तरुण भारत'चं व्हॉट्सअप चॅनल फॉलो करा!
अग्रलेख
जरुर वाचा

Email

admin@mahamtb.com

Phone

+91 22 2416 3121