समुद्रापलीकडील गोवा

    15-Jun-2025
Total Views | 27

गोवा म्हटले की समुकिनारे, मद्यपानाच्या पार्ट्या ते चर्चेस अशी मोठीच यादी निघते. गोव्याच्या पर्यटनामध्ये गेली कित्येक दशके याच सर्व ठिकाणांना जाणीवपूर्वक प्रसिद्ध करण्यात आले. मात्र, या सगळ्यापलीकडे परकीय आक्रमकांच्या विध्वंसाचा ढळढळीत पुरावा असलेली आणि भारतीय राजांच्या स्थापत्यकलेचा उत्तम नमुना असलेली अनेक मंदिरे आजही गोव्याच्या हिंदुत्वाची साक्ष देत उभी आहेत. गोव्यातील अनेक मंदिरांचा आढावा घेताना समुद्रापलीकडील गोवा शोधण्याचा हा प्रयत्न...


गोवा म्हटले की, तुमच्या डोळ्यासमोर काय येते? बागा, कलंगुट, अंजुना समुद्रकिनारे, तेथील नाईट-लाईफ, सन-बाथ, समुद्रातील साहसी खेळ, कॅसिनो, बोट क्रूझ, बीच पार्टी! ‘गोव्यात जाण्याचे प्लॅन’ यावरच किती रील, विनोद केले जातात! गोव्यात जायचे ते मद्यपान करायला, समुद्रकिनारी मनसोक्त मजा करायला! गोवा म्हणजे Baslica of Bom jesus, त्यात जपून ठेवलेले सेंट फ्रान्सिस झेवियरचे मढे, Se cathidral, Fort guada. पोर्तुगीज गेले, तरी आपण मनाने गोवा अजूनही त्यांनाच देऊन टाकला आहे. पोर्तुगीज जितक्या निगुतीने त्यांच्या साम्राज्याच्या खुणा जपणार नाहीत, त्यापेक्षा अधिक इमानेइतबारे आपण त्या जपत आहोत. पर्यटनाच्या दृष्टीने मंगेशी, शांतादुर्गा ही मंदिरे केवळ आपली धर्मनिरपेक्षता जपण्याइतकीच महत्त्वाची आपण मानली. या त्यांच्या राज्यात आपलेही अस्तित्व आहे, बरं का!

गोव्याची धार्मिक सांख्यिकी काय असेल? 80 टक्के कॅथलिक ख्रिश्चन आणि 20 टक्के अल्पसंख्य हिंदू असणार, अशी माझी तरी समजूत होती. प्रत्यक्षात सांख्यिकी तशी नाही. गोव्यात 66 टक्के हिंदू आणि 25 टक्के ख्रिश्चन राहतात.आपल्याला दाखवला जातो, त्यापेक्षा खूप वेगळा गोवा अस्तित्वात आहे. ‘हिंदू गोवा.’ परंपरा जपणारी माणसे, प्रशस्त, देखणी मंदिरे, न सांगितलेला इतिहास. गोव्यात हिंदू सरकार येऊन दोन तपं झाली पण, अजून ‘हिंदू गोवा’ सामान्य पर्यटकांपासून लांबच राहिला आहे. तो जवळ आणण्याचा एक प्रयत्न गोवा सरकार ‘गोवा एकादश तीर्थ’ या आध्यात्मिक पर्यटन यात्रेद्वारे करीत आहे, त्या मार्गाच्या प्रवासाचे हे प्रवासवर्णन.

1) नार्व्याचा श्रीसप्तकोटेश्वर


उत्तर कर्नाटक आणि गोवा भागात कदंब राजाची राजवट होती. शिवरूपातील सप्तकोटेश्वर हे त्यांचे मुख्य दैवत. कदंब राजाने आपली पत्नी शिवभक्त कमलदेवी हिच्यासाठी बाराव्या शतकात हे मंदिर बांधले. पुढे 1352 साली बहामनी सुलतानाने गोवा जिंकला, तेव्हा या मंदिराचा पहिला विध्वंस झाला. पुढे विजयनगरचा राजा हरिहरराय याने हा प्रदेश पुन्हा जिंकला आणि त्याचा मंत्री-माधव मंत्री याने 14व्या शतकाच्या अखेरीस, या मंदिराची पुनर्बांधणी केली. मंदिरावर दुसरा घाव पोर्तुगीजांचा पडला. 1560 साली पोर्तुगीजांनी मंदिर पाडून इथे एक ‘चॅपल’ बांधले. ‘Nosa Senhora De Candelaria ’ या नावाने, आजही हे ‘चॅपल’ अस्तित्वात आहे. 1668 साली छत्रपती शिवाजी महाराजांनी या देवळाची पुनर्बांधणी केली. महाराजांच्या आशीर्वादाने शिवराम देसाई यांनी बांधकाम पूर्ण केले. महाराजांनी जीर्णोद्धार केला त्या घटनेला 350 वर्षे पूर्ण झाली. त्यानिमित्ताने 2019 मध्ये गोवा सरकारने मंदिराची भव्य पुनर्बांधणी केली. या पुनर्बांधणीमध्ये परंपरेने आलेले मौखिक दाखले, कागदपत्रांमधील नोंदी, मधल्या काळात घडलेल्या घटनांचा मागोवा, वास्तूचे सर्व संदर्भ पुसले जाणार नाहीत याची काळजी घेण्यात आली. नार्वे येथे मांडवी, झुवारी आणि वाळवंटी नद्यांचा संगम आहे. पर्यटन विकासाला चालना देण्यासाठी या संगमावर, गंगा आरतीच्या धर्तीवर ‘गोमंत सरिता’ पूजनाचा सोहळाही सुरू करण्यात येणार आहे.


2) खांडोळा येथील प्राचीन महागणपती


हा महागणपती अतिशय प्राचीन आहे. पणजीपासून 19 किमी अंतरावर हे मंदिर वसलेले असून, मंदिर विस्तीर्ण क्षेत्रात उभे आहे, बांधणीही भव्य आहे. ‘स्कंद’ पुराणाच्या ‘सह्याद्री’ खंडात वर्णन केलेले दीपवती बेट म्हणजेच आजचे दिवार बेट. या बेटावर हा महागणपती वसलेला होता. 1541 ते 1545 या वर्षांत पोर्तुगीजांच्या धर्मांध सत्तेने अनेक मंदिरांचा विध्वंस केला, त्यात याही मंदिराला झळ बसली. श्रीमहागणपतीची मूर्ती भक्तांनी सुरक्षित ठिकाणी हलविली. मूळ मंदिराचे अवशेष आजही दिवार बेटावर सापडतात. तांबडी सुर्ला येथील मंदिराप्रमाणे मूळ मंदिराची बांधणी असावी, असे या अवशेषांवरून वाटते. आजचे मंदिर माघ शुक्ल त्रयोदशी शके 1890, इसवी सन दि. 31 जानेवारी 1969 रोजी बांधण्यात आले आहे. प्रथेप्रमाणे जीर्ण झालेली जुनी मूर्ती पाण्यात विसर्जित करून, नव्या मूर्तीची प्राणप्रतिष्ठा करण्यात आली. मात्र, काही चमत्कारिक घटना घडल्या, तेव्हा श्रीमहागणपतीचा कौल घेण्यात आला. त्याप्रमाणे जुनी मूर्ती आजही गाभार्‍यात नव्या मूर्तीबरोबर ठेवण्यात आली आहे. श्रीमहागणपतीला प्राचीन इतिहास आहे, रचनाही भव्य आहे. व्यवस्था अप्रतिम आहे. त्याला प्रतीक्षा आहे, पर्यटकरूपी भक्तांच्या येण्याची. देव निर्गुण, निराकार असतो, कालातीत असतो. त्रिमितीयुक्त काळाने बद्ध तर आपण असतो. आपल्या या मर्यादित विश्वातील कृती, आपला अंतर्यामी होणारा प्रवास घडवीत असतात. गोव्यात येऊन प्रेयस समुद्रकिनारे न्याहाळायचे की, श्रेयस श्रीमहागणपतीची आराधना करायची हा निर्णय आपला आहे. श्रीमहागणपती वत्सल नजरेने सर्वकाही पाहतोच आहे.

3) प्राचीन शिल्पवैभवाचे प्रतीक-तांबडी सुर्ले येथील शिवमंदिर


गोव्यातील मंदिरे प्रशस्त, भव्य आहेत परंतु, बहुतेक मंदिरे अर्वाचीन आहेत. प्राचीनतेचा वारसा लाभलेले गोव्यातील एकमेव मंदिर म्हणजे, तांबडी सुर्ले येथील शिवमंदिर. घनदाट अरण्याच्या सुरक्षिततेमुळे बहमनी आणि पोर्तुगीज आक्रमणापासून हे मंदिर वाचले. थेट तेराव्या शतकातील कदंब राजांच्या काळातील शिल्पकला, मंदिर बांधणी अभ्यासायची असेल, तर या मंदिराला भेट देणे अपरिहार्यच. हा गोव्याचा संरक्षित ठेवा आहे, इतिहासाचे संचित आहे. सत्तरी तालुक्यातील वालपाई गावापासून 22 किमी पूर्वेस कर्नाटकला जोडणार्‍या अनमोड घाटाच्या पायथ्याशी हे मंदिर आहे. काळ्या बेसॉल्ट खडकात शिल्पकारांनी कमाल केली आहे. शिल्पातील चित्रकृती दगडांनी गायलेली गीते आहेत. तासनतास ही कलाकुसर पाहत वेळ सार्थकी लावता येऊ शकतो. काळ्या दगडाच्या मंदिराला हिरव्या वनश्रीचे कोंदण लाभले आहे. जवळून वाहणार्‍या रागाडा नदीने या चित्राला पूर्णत्व दिले. भगवान महावीर अभयारण्य आणि मोले अभयारण्य यांचे सान्निध्य लाभलेला हा सगळाच प्रदेश, सह्याद्रीचे वैभव आहे. तांबडी सुर्ला मंदिराची भेट म्हणजे, तरल गाण्यासारखा सह्याद्रीच्या वाटांवरचा सुंदर प्रवास आणि समेवर येताना आनंदाची परमावधी गाठणारी तान असावी, तसे समोर येणारे मंदिर असा अविस्मरणीय अनुभव आहे.

4) मंगेशी देवस्थान


1543 साली पोर्तुगीज आक्रमणानंतर हे देवस्थान मार्मागोवा येथील कुशस्थळी येथून मंगेशी गाव, प्रियोळ, तालुका फोंडा येथे स्थलांतरित करण्यात आले. श्री मंगेश हे अनेक सारस्वत ब्राह्मणांचे कुलदैवत. आज हे मंदिर गोव्यातील सर्वांत भव्य मंदिरांपैकी एक असून, पर्यटकांमध्येही लोकप्रिय आहे. मंदिर स्थलांतरित झाल्यापासून मराठ्यांच्या कारकिर्दीत आणि पुन्हा 1890 साली दोनदा मंदिराची पुनर्बांधणी आणि नूतनीकरण करण्यात आले. शेवटचे नूतनीकरण 1973 साली झाले. त्यावेळी मंदिराच्या सर्वांत उंच घुमटावर सोनेरी कलश बसवण्यात आला.


5) शांतादुर्गा मंदिर


प्राचीन काळी केव्हातरी गोव्यात शैव आणि वैष्णव यांच्यात संघर्ष झाला असावा, अशा खुणा सापडतात. पुराणात शिव आणि विष्णु यांच्यातील युद्धाचे वर्णन आहे. हे युद्ध इतके भयंकर होते की, ब्रह्मदेवाने देवी आदिशक्ती पार्वतीला मध्यस्थी करण्याची प्रार्थना केली, जी तिने शांतादुर्गेच्या रूपात केली. शांतादुर्गेने विष्णुला उजव्या हातावर आणि शिवाला डाव्या हातावर ठेवले आणि लढाई शांत केली. शांतादुर्गा हे हिंदू संस्कृतीतील सामंजस्याचे, सहिष्णुतेचे आणि सहअस्तित्वाचे सुंदर प्रतीक. 1566 साली पोर्तुगीजांच्या आक्रमणात हे मंदिर केळोशी येथून फोंड्यातील कवळे येथे हलविण्यात आले. सध्याचे मंदिर 1713 ते 1738 या काळात बांधण्यात आले आहे.

6) महालसा मंदिर


महालसा श्रीविष्णुंच्या मोहिनी रूपाचे नाव आहे. हे मंदिरही पोर्तुगीज आक्रमणात स्थलांतरित होऊन फोंड्यातील मारडोल येथे हलविण्यात आले. फोंडा तालुक्यातील ही तिन्ही मंदिरे पर्यटकांनी गजबजलेली असतात. या मंदिराचे एक वैशिष्ट्य म्हणजे, येथे असलेली प्रसादालये. अप्रतिम चवीचे अन्न या मंदिराच्या आवारात माफक दरात उपलब्ध असते. देवाच्या सान्निध्यात ग्रहण केलेल्या अन्नाला प्रसादाचे पावित्र्य प्राप्त होते.

7) जांबिवली येथील दामोदर मंदिर


दाम म्हणजे दोरी आणि उदर म्हणजे पोट. पोटाला दोरी बांधलेला देव म्हणजे श्रीकृष्ण-विष्णुचा अवतार. भारतभरात दामोदर हे श्रीकृष्णाचे नाव म्हणून प्रसिद्ध आहे. मात्र, गोव्यात शैव आणि वैष्णव संप्रदायात अशाप्रकारे परस्पर घुसळण साधली गेली की, जांबिवली येथील दामोदर शिवलिंग रूपात आहे. गोव्याचे गौड सारस्वत ब्राह्मण मूळचे शैव, मात्र मध्वाचार्य यांच्या द्वैत तत्त्वज्ञानाचा पगडा यांच्यावर पडल्याने, बरेचसे गौड सारस्वत ब्राह्मण वैष्णव झाले. असे असले तरी नागेश, मंगेश अशा शिवरूपांनाही ते पूजतात. त्यामुळे गोव्यात शैव-वैष्णव संप्रदायांचा सुरेख समन्वय झालेला आढळतो. मठग्राम किंवा मडगाव येथे असणारी दामोदर देवता 1567 साली पोर्तुगीज आक्रमणामुळे, कुशावती नदीच्या किनारी क्वेपेम तालुक्यातल्या जांबिवली येथे आणण्यात आली.

8) ब्रह्मदेव मंदिर, ब्रह्म करमाळी, नगरगाव


वैशिष्ट्यपूर्ण दाढीमुळे वेगळी शोभून दिसणारी ब्रह्मदेवाची प्रतिमा भारतात फार कमी ठिकाणी आढळते. निसर्गाच्या सानिध्यात वसलेल्या नगरगाव-वाळपई गावातील ब्रह्मदेव मंदिरात असलेल्या प्रतिमा बाराव्या शतकातील आहेत. ही प्रतिमा ब्रह्मा-विष्णु-महेश अशा त्रिमूर्तीची आहे. हे मंदिर गोवा-कर्नाटक येथील कदंब राजवटीचा वैभवशाली इतिहासाचा वारसा आहे

9) दत्त मंदिर-साखळी


पणजीपासून 35 किमी अंतरावर डिचोली तालुक्यात वाळवंटी नदीच्या किनारी साखळी येथे हे दत्तमंदिर वसले आहे. दत्तभक्त म्हाळू कामत यांचे पुत्र लक्ष्मण कामत यांना नृसिंहवाडी येथे स्थानिकांकडून काही त्रास झाला. त्यावेळी ‘मीच तुझ्या गावी येऊन निवास करेन,’ असा अनुग्रह कामतांना झाला आणि त्यातूनच या मंदिराची स्थापना 1882 साली झाली. हे ठिकाण अतिशय स्वच्छ असून, अनेक प्रकारच्या वृक्षांनी शोभिवंत झालेले आहे.

10) परशुराम-नृसिंह मंदिर, पैंगण, तालुका काणकोण


श्री परशुराम हे श्रीविष्णुंचे सहावे अवतार. श्री परशुराम हे कोकण भूमीचे निर्मातेही मानले जातात. एका आख्यायिकेनुसार परशुरामांनी त्यांचे अस्त्र परशु जिथवर लांब फेकले, तिथवरची भूमी सागराने बाजूस सारून परशुरामांना जागा दिली. याच भूमीवर परशुरामांनी कोकण वसविले. परशुरामांची देवळे कोकणात चिपळूणात पेढे परशुराम येथे आणि काणकोण जिल्ह्यात पैंगण येथे आहेत. पैंगण हे गाव दक्षिण गोव्यात कर्नाटक सीमेला लागून आहे. अतिशय निसर्गरम्य पार्श्वभूमीवर हे साधेसे सुंदर मंदिर वसलेले असून, या मंदिराचा कालखंड 1300 ते 1400च्या दरम्यान मानला जातो.

11) हरी मंदिर, मडगाव


मडगाव शहरात भर वस्तीत हे मंदिर वसलेले आहे. श्रीविष्णु, गणेश, हनुमान आणि विठ्ठल-रखुमाई या देवता या मंदिरात प्रतिष्ठापित आहेत. मंदिराचे बांधकाम अतिशय सुबक आहे.

आज 2025 साली गोव्याला पर्यटक म्हणून भेट देताना कदंब, बहमनी, पोर्तुगीज, छत्रपती शिवाजी महाराज असा सगळा इतिहास आपल्या मनात आला पाहिजे. धर्मनिरपेक्ष शासनाने परकीय, धर्मांध शासनाच्या खुणा संस्कृती म्हणून जपण्याचे ठरविले होते. गोव्यात नृशंस अत्याचाराचे न्यायाधिकरण (Inquisition) बोलावणार्‍या फ्रान्सिस झेवियरला ‘गोयंचो साहेब’ मानण्याची गरज धर्मनिरपेक्ष शासनाला वाटली असेल, आपल्याला वाटण्याचे काही कारण नाही. त्याचे जपून ठेवलेले मढे बघण्यापेक्षा, छत्रपती शिवाजी महाराजांच्या पदस्पर्शाने पावन झालेल्या सप्तकोटेश्वराचे दर्शन घेणे कधीही अधिक श्रेयस्करच!

मंदार परांजपे
'मुंबई तरुण भारत'चं व्हॉट्सअप चॅनल फॉलो करा!
अग्रलेख
जरुर वाचा
मुंब्रा रेल्वे दुर्घटनेबद्दल मुंबई उच्च न्यायालयाचे रेल्वे विभागाला खडेबोल! विचारले... या घटनेची जबाबदारी कुणाची?

मुंब्रा रेल्वे दुर्घटनेबद्दल मुंबई उच्च न्यायालयाचे रेल्वे विभागाला खडेबोल! विचारले... या घटनेची जबाबदारी कुणाची?

मुंब्रा लोकल स्थानकाजवळ ९ जून रोजी सकाळी ९.३० वाजताच्या सुमारास दुर्घटना घडली होती. दोन लोकल गाड्या एकमेकांजवळून जाताना लोकलच्या दारात लटकलेल्या प्रवाश्यांच्या बॅगा घासल्यामुळे ६ प्रवाशांचा रेल्वे रुळावर पडून मृत्यू झाला होता. या घटनेवर मुंबई उच्च न्यायालयाने गुरूवार दि. १९ जून रोजी प्रवाशांच्या मृत्यूंबाबत एका जनहित याचिकेवर सुनावणी करत असताना चिंता व्यक्त केली आणि मध्य रेल्वेने मुंबई लोकल गाड्यांमध्ये स्वयंचलित बंद दरवाजे बसवण्याचा विचार करावा, असा सल्ला दिला...

क्रेडाई एमसीएचआय युथतर्फे नवी मुंबईसाठी पुनर्विकास प्रदर्शनाचे आयोजन

क्रेडाई एमसीएचआय युथतर्फे नवी मुंबईसाठी पुनर्विकास प्रदर्शनाचे आयोजन

नवी मुंबई आणि रायगड भागातील गृहनिर्माण क्षेत्रात परिवर्तन घडवून आणण्याच्या उद्देशाने सुरू केलेल्या पहिल्याच उपक्रमात चाळीस वर्षांखालील तरुण रिअल इस्टेट डेव्हलपर्सची संघटना, क्रेडाई एमसीएचआय युथतर्फे सिडको Exhibition सेंटर रविवार, २९ जून २०२५ रोजी सकाळी 10:00 ते संध्याकाळी 8:00 वाजेपर्यंत मेगा पुनर्विकास प्रदर्शन योजले आहे. आज नवी मुंबईतील हॉटेल ताज विवांता येथे रिअल इस्टेट उद्योगातील वरिष्ठ नेते, क्रेडाई एमसीएचआय युथचे पदाधिकारी आणि माध्यमांच्या उपस्थितीत आयोजित पत्रकार परिषदेत ही माहिती देण्यात आली...

Email

admin@mahamtb.com

Phone

+91 22 2416 3121