एक तपस्वी व्यक्तिमत्त्व - वामनराव देशपांडे

    15-Jun-2025
Total Views | 10


मराठीमध्ये विपुल साहित्यसंपदा निर्माण करणार्‍या वामनराव देशपांडे यांची मातृभाषा कन्नड होती, हे ऐकल्यावर आज बर्‍याचजणांचा विश्वास बसणार नाही. ओघवत्या शैलीतील लिखाण व ओजस्वी वाणीतून आध्यात्मिक विषय सर्वसामान्यांपर्यंत पोहोचवण्याचे महत्त्वपूर्ण कार्य वामनरावांनी केले. त्यांच्या समृद्ध साहित्यजगताचा आणि जीवनाचा घेतलेला हा आढावा...

मंगळवार, दि. 10 जून रोजी वामनराव देशपांडे यांचे काही महिन्यांच्या आजाराने डोंबिवलीतील एका रुग्णालयात निधन झाले. आम्हा डोंबिवलीकरांसाठीच नव्हे, तर महाराष्ट्रासाठीसुद्धा ही निश्चितच अत्यंत वाईट बातमी होती. कारण, वामनराव हे महाराष्ट्रातील एक लोकप्रिय आध्यात्मिक व्यक्तिमत्त्व होते. नेमक्या शब्दांत बोलायचे झाले, तर त्यांच्या निधनाने महाराष्ट्राच्या मागील जवळपास 60 वर्षांच्या साहित्यिक जगताचा एक महत्त्वाचा साक्षीदार हरपला आहे, असेच म्हणावे लागेल. कारण, त्यांच्याशी सहज म्हणून जरी बोलायला गेलो, तरी बोलता बोलता ते अनेक साहित्यिकांचा आणि साहित्य विश्वातील घटनांचा इतक्या बारीकसारीक गोष्टींचा उल्लेख करत असत की, त्यांनी तो सुवर्णकाळ अनुभवला आहे असे जाणवत असे. शब्दांचा सोस असलेले आणि शब्दांच्या प्रेमात असलेले वामनराव म्हणजे कथा, काव्य, कादंबरी, समीक्षा, संगीत म्हणजेच काव्यशास्त्र विनोदात रमलेले एक व्युत्पन्न व्यक्तिमत्त्व होते. प्रज्ञा आणि प्रतिभा यांचा अतिशय सुंदर संगम त्यांच्या ठिकाणी झालेला जाणवतो.


वामनराव डोंबिवलीत राहायला आले 2005 सालच्या सुमारास. त्यावेळी ते नुकतेच रिझर्व्ह बँकेतून निवृत्त झाले होते. त्यांच्या एका स्नेह्याने त्यांना डोंबिवलीत राहायला या, अशी विनंती केली. त्यानंतर मागील 20 ते 21 वर्षांत ते डोंबिवलीत इतके समरसून गेले की, कोणाला वाटणारही नाही ते मूळचे इथले नाहीत. याचे कारण, वामनराव यांचा साहित्यिक, आध्यात्मिक पिंड.


मुंबईतील गिरगाव येथे वामनराव यांचा जन्म दि. 31 ऑगस्ट 1944 सालचा. त्यांचे लहानपण आणि पुढे बरेचसे आयुष्य गिरगावातच गेले. त्या काळी गिरगाव म्हणजे साहित्य आणि कलाक्षेत्रातील पंढरीच म्हणायला हरकत नाही. मराठी माणसांचे ठळक अस्तित्व असलेल्या गिरगावात, साहित्य नाटक याला जणू काही उधाणच आले होते. गोरेगावकर लेनमधील मौज प्रकाशन, गायवाडीच्या मागे असलेले साहित्य संघ मंदिर, गिरगाव नाक्यावरचे मॅजेस्टिक बुक स्टॉल, समर्थ लेनमधील ढवळे प्रकाशन, राजा राममोहन रॉय रस्त्यावरील बॉम्बे बुक डेपो अशी साहित्यातील एकेकाळची शिखरे म्हणावीत, असे उत्स्फूर्त वातावरण त्यातच वामनराव यांचे शेजारी म्हणजे ‘भारतरत्न’ पुरस्काराने सन्मानित झालेले महामहोपाध्याय पा. वा. काणे. अशा वातावरणात वामनरावांच्या साहित्यविषयक आवडीला आणि लिखाणाला बहर येणे साहजिकच होते. त्यातच त्यावेळेस गिरगावात सातत्याने मोठमोठ्या साहित्यिकांचे येणे जाणे असायचे. जयवंत दळवी, रवींद्र पिंगे, शंकर वैद्य, दुर्गाबाई भागवत अशा अनेक ज्येष्ठ साहित्यिकांचे मैत्रदेखील त्यांना लाभले.


वामनराव यांना जशी साहित्यात रुची होती, तशीच त्यांना आध्यात्मिक विषयातदेखील गोडी होती. राघवेंद्र स्वामींच्या भक्तीत ते लीन झाले होते. स्वतःला ते राघवेंद्र स्वामींचे अनुग्रहित समजत असत. अशा सर्व साहित्यिक आणि आध्यात्मिक वातावरणात त्यांचे लिखाण होऊ लागले. ज्ञानेश्वर आणि ज्ञानेश्वरीच्या प्रेमात कधी ते पडले, हे त्यांनाच कळले नाही इतके ते ज्ञानेश्वरीमय होऊन गेले होते. केवळ संत ज्ञानेश्वर असे नव्हे, तर संत तुकाराम, रामदास, एकनाथ अशा सर्वच संतांच्या शिकवणुकीचा त्यांच्यावर प्रभाव होता. लिखाणाची शैली असल्यामुळे त्यांनी या संतांचे वैचारिक साहित्यधन साध्या, सोप्या शब्दात मांडायला सुरुवात केली आणि वाचकांना ते पसंत पडल्यामुळेच वामनराव अधिक उत्साहाने लिहायलाही लागले.


वास्तविक वामनराव यांची मातृभाषा कन्नड ही होती. पण, त्यांनी मराठीत एवढी साहित्यसंपदा निर्माण केली की, त्यांची मातृभाषा मराठी नाही यावर कोणीही विश्वास ठेवणार नाही. सर्वच साहित्यिकांच्या लिखाणाची सुरुवात जशी कविता करण्याने होते, तशीच सुरुवात वामनराव यांनीही केली होती. चंद्रशेखर गोखले यांनी चारोळी हा काव्यप्रकार लोकप्रिय केला तो खूप उशिरा. त्याच्या कित्येक वर्षे आधी वामनराव यांनी चारोळ्या लिहून त्याचे पुस्तकही प्रसिद्ध केले होते. वामनराव जसे लिहीत गेले, तसे त्यांचे साहित्य मराठीतील सर्वच प्रमुख वर्तमानपत्रांत प्रसिद्ध व्हायला लागले आणि नंतर तर महाराष्ट्रातील अनेक नाशिक, सांगली, कोल्हापूर इत्यादी जिल्ह्यांतील वर्तमानपत्रातदेखील यायला लागले. ‘सांज लोकसत्ता’ किंवा ‘लोकप्रभा’ आणि ‘महाराष्ट्र टाइम्स’मध्ये वामनराव यांनी स्तंभलेखनही केले होते. ‘महाराष्ट्र टाइम्स’मध्ये ‘अच्युतानंद’ या नावाने त्यांनी दोन वर्षे ज्ञानेश्वरीतील एका ओवीवर रोज भाष्य लिहिले होते. ‘सांज लोकसत्ते’तील स्तंभलेखनाचे पुस्तकही ‘मौनाची वारी’ या नावाने प्रसिद्ध झाले आणि त्याचे कौतुक दस्तुरखुद्द दुर्गाबाई भागवत यांनी केले होते!


लेखनाच्या क्षेत्रात मुशाफिरी करणारे वामनराव दरवर्षी किमान दहा ते 12 दिवाळी अंकांतून लिहीत असत. विशेष म्हणजे संपादक त्यांना फोन करून त्यांचे साहित्य मागवीत असत. दिवाळी अंकातून प्रसिद्ध होणार्‍या साहित्याला विशेष असा एक दर्जा आहे, असे आजही समजले जाते.


बालवाङ्मय हे वामनराव यांचे आणखीन एक विशेष. त्यांनी मुलांसाठी एकूण 25 पुस्तके लिहिली आहेत. त्यातील निवडक उल्लेख करायचा झाला, तर खास बाळांसाठी लिहिलेल्या संत रामदास, तुकाराम आणि ज्ञानेश्वर यांच्या संस्कारक्षम कथांच्या आवृत्या दरवर्षी निघत आहेत. ‘निवडक बालकवी’ किंवा ‘पाठ्यपुस्तकातील साहित्यिक’ ही पुस्तकेही प्रसिद्ध आहेत. साहित्याच्या क्षेत्रात वावरत असल्यामुळे आणि जगमित्र असल्यामुळे वामनराव अनेक थोरामोठ्यांच्या सहवासात आले. या व्यक्तींवर लिहिलेली व्यक्ती चित्रणात्मक तीन पुस्तके वामनरावांच्या नावावर आहेत.


वामनरावांची एकूण 13 गीते तबकडीच्या स्वरूपात प्रसिद्ध झाली होती. त्यातील अत्यंत गाजलेले गीत म्हणजे रामदास कामत यांनी गायलेले आणि श्रीनिवास खळे यांचे संगीत लाभलेले ‘आकाशी फुलला चांदण्यांचा मळा’. ‘आठवणीतील गाणी’ या संग्रहात हे गीत समाविष्ट आहे.


वामनराव यांचे व्यक्तिमत्त्व तसे बहुपेडी, चतुरस्त्र कारण, ते नुसतेच लेखनावर थांबले नाहीत, तर त्यांनी स्वतःची ‘वाल्मिक प्रकाशन’ ही संस्थासुद्धा सुरू केली. या प्रकाशनामार्फत फार नाहीत पण, नाव घेण्याजोगी अशी निवडक पुस्तके प्रकाशित केली होती. मनोहर शहाणे यांच्या ‘ससे’ या कादंबरीचे प्रकाशन वामनराव यांनी अत्यंत प्रेमाने केले होते. ‘मौजेची छपाई’ (त्या काळी ‘मौजेची छपाई’ हे पुस्तकाचे एक गुणवैशिष्ट्य समजले जाई. पुण्यात कल्पना मुद्रणालय) आणि पद्माताई सहस्रबुद्धे यांच्या मुखपृष्ठाने नटलेल्या या पुस्तकाला, जाणकारांनी पसंती दिली होती. शिरीष पै यांचा काव्यसंग्रहदेखील त्यांनी प्रकाशित केला होता.


असे वामनराव साहित्याच्या सर्वच प्रांतात वावरत असूनदेखील ‘संत साहित्य’ हा त्यांच्या जिव्हाळ्याचा विषय आणि त्यांच्या अंतर्मनाचा आवाज होता. संत साहित्याच्या अभ्यासात ते मनापासून रमले. संतांच्या साहित्यातून आपल्याला मिळणारा आनंद इतरांनाही मिळावा, म्हणून ते मुंबई सेंट्रल येथे आरबीआयच्या वसाहतीत राहात असताना, आठवड्यातील एका दिवशी ते आपल्या जवळच्या मंडळींना बोलावून, संत साहित्यावर निरूपण करीत असत. हीच परंपरा ते जेव्हा डोंबिवलीत वास्तव्यास आले, तेव्हाही सुरू राहिली. डोंबिवलीतील घरी रोजच असंख्य माणसांचा राबता असायचा आणि वामनराव अखंड बोलत असायचे. याच व्यासंगातून नंतर ‘सार्थ श्री ज्ञानेश्वरी’, ‘सार्थ श्री दासबोध’, ‘गोंदवलेकर महाराजांचे नामस्मरण’ हे ग्रंथ तयार झाले. याच अनुषंगाने संत साहित्यावर त्यांनी पुढेही अनेक पुस्तके लिहिली. महाराष्ट्रातल्या अनेकांच्या संग्रही वामनराव यांचे एक तरी पुस्तक असणारच!


सुरुवातीस म्हटल्याप्रमाणे, शब्दांचा सोस असलेले वामनराव लेखक, प्रकाशक, कवी, निरुपणकार तर होतेच. पण, त्यांनी जवळपास 120 पुस्तके लिहिली आणि तेवढ्याच पुस्तकांना प्रस्तावनाही लिहिल्या आहेत. त्यांच्या घरी कोणी एखादा नवखा लेखक आला, तर ते त्याला त्याचे पुस्तक कसे प्रकाशित होईल याचे मार्गदर्शन करीत असत. एखाद्याचे पुस्तक प्रकाशित होण्यात त्या लेखकाला जेवढा आनंद होत नसेल, त्यापेक्षाही जास्त आनंद त्यांना होत असे! कोणाला कधी एखादा शब्द अडला, अर्थ माहीत नसेल किंवा योग्य प्रकारे कसा लिहावा हे माहीत नसेल, कधी एखादी कविता कोणाची आहे हे आठवत नसेल किंवा एखादा संदर्भ हवा असेल, तर वामनराव यांना फोन केला की अडचणीचे पटकन निराकरण होई. अनेकांना त्यांनी लिहिते केले आहे.


वक्तृत्व हे वामनरावांचे आणखीन एक विशेष! आयत्या वेळी कोणत्याही विषयावर वामनराव बोलू शकत असत, असा त्यांचा व्यासंग होता. ‘अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलना’त ते 40 वेळा उपस्थित होते आणि काही परिसंवादात त्यांचा सहभाग होता. ‘भारतीय नाटकातील शोकांतिका’ हा त्यांच्या आवडीचा विषय होता. आध्यात्मिक विषयावर बोलणे हा तर त्यांचा सहजस्वभाव होता.


महाराष्ट्र सहत्या परिषद, डोंबिवली शाखेचे मागील दहा वर्षे ते अध्यक्ष होते आणि संस्थेला त्यांचे मोलाचे मार्गदर्शन लाभले. आमच्या स्नेहात वय कधीही आड आले नाही. सातत्याने अध्यात्म आणि साहित्य यात रमलेले वामनराव यांच्या जाण्याने एका आत्मीय सुहृदाला आम्ही परखे झालो आहोत. त्यांना वंदन!

सुरेश देशपांडे
scd2000@gmail.com

'मुंबई तरुण भारत'चं व्हॉट्सअप चॅनल फॉलो करा!
अग्रलेख
जरुर वाचा

Email

admin@mahamtb.com

Phone

+91 22 2416 3121