पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी ‘ऑपरेशन सिंदूर’नंतर भारतीयांना पुन्हा एकदा स्वदेशीचा मंत्र दिला. या मंत्राचा महिमा, त्याची शक्ती अगाध आहे. एक जुलमी राजवट उलथून टाकण्याचे काम याच स्वदेशीच्या मंत्राने केले होते. आजही 2047 पर्यंत विकसित भारताचे उद्दिष्ट साध्य करण्यासाठी स्वदेशीशिवाय पर्याय नाही, हेच खरे...
गेल्या दोन दिवसांत पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी ‘स्वदेशी’चा मोठ्या मंचावरून वारंवार उद्घोष केला आहे. इतक्या स्पष्ट शब्दांत स्वदेशीचा अंगीकार व विदेशीचा बहिष्कार सांगताना, पंतप्रधान मोदी यांच्या हृदयात स्वदेशीकरिता असलेल्या प्रचंड आगीचा साक्षात्काराच जणू झाला. ‘ऑपरेशन सिंदूर’ दरम्यान सीमेवर लढत असलेले आपले सैनिक जणू समाजातील सर्वसामान्य नागरिकाला आवाहन करत आहेत की, स्वदेशीचे अवलंबन करून हेच ‘ऑपरेशन’ समाजानेही लढले पाहिजे, असा अगदी सरळ स्पष्ट संदेश मोदींनी दिला आहे. आपल्या नित्य जीवनातील वस्तूंची यादी बनवा, स्वदेशी-विदेशी ओळखा आणि विदेशी वस्तूंना पिटाळून लावा, असे बहुधा सर्वप्रथमच ते सार्वजनिकरित्या बोलले आहेत; किंबहुना त्यांच्या वक्तव्याचा अर्थ तसाच आहे. या आधीही ‘मन की बात’मध्ये त्यांनी प्रत्यक्ष परोक्षपणे हा मुद्दा मुखरतेने मांडला आहे. पण, कालच्या भाषणातले त्यांचे शाब्दिक व भावनिक तेज निराळेच व आक्रमक जाणवले.
का बरं ते इतक्या आक्रमकतेने व पोटतिडकीने बोलले असतील? आपल्या सैनिकांचा आत्मविश्वास वाढावा म्हणून बोलले असतील का? भारतीय ब्रॅण्ड्सला सकारात्मक आवाहन करण्यासाठी बोलले असतील का? राजकारण हा समाजकारणाचाच भाग आहे, हे अधोरेखित करण्यासाठी बोलले असतील का? विदेशी ब्रॅण्ड्सला रेड कार्पेट वेलकम देणार्या कंपन्यांना, परोक्षपणे इशारा देण्यासाठी बोलले असतील का? ‘ऑपरेशन सिंदूर’मुळे देशभरात आलेल्या देशभक्तीच्या लाटेचा, व्यापक देशहितासाठी उपयोग करून घेण्यासाठी बोलले असतील का? एक राष्ट्रभक्त म्हणून असे कोणतेही प्रश्न देशभक्तांच्या मनात नसतील. मग ते आताच का बोलले?
इंग्रजीत म्हण आहे, strike the iron while it is hot. लोखंड गरम असतानाच त्यावर आघात करून इच्छेप्रमाणे आकार देता येतो, असा त्याचा अर्थ आहे. पंतप्रधान मोदींची खासियत त्यांच्या अफलातून टायमिंगमध्येच आहे. कोणता मुद्दा केव्हा बोलावा यात त्यांचा हात पकडू शकेल, असा एकही नेता आज भारतात नाही. ‘परफेक्ट टायमिंग.’ देशाची अर्थव्यवस्था जेव्हा झपाट्याने विश्वात चौथा क्रमांक पटकावण्याचा प्रयत्न करीत आहे, तेव्हा गरज आहे एक सामूहिक प्रयत्नाची, समाजमन तयार करण्याची. उद्योजक तयार आहेत देशांतर्गत तसेच निर्यात बाजारासाठी. उद्योजक आंतरराष्ट्रीय स्पर्धेकरताही तयार असून, ‘क्वालिटी स्टॅण्डर्ड’कडेही आवर्जून लक्ष देत आहेत. एखाद्या क्षेत्रातील आंतरराष्ट्रीय उत्पादनाला माफक स्पर्धा उभी करण्यासाठी, उद्योजक आवश्यक गुंतवणूकही करत आहे. मग समाजाचे कर्तव्य काय आहे? आग्रह धरून स्वदेशी वस्तूंची खरेदी करावी. गुणवत्तायुक्त ‘पतंजली’च्या ‘दंतकांती’ ब्रॅण्डने, ‘हिंदुस्तान लिव्हर’च्या ‘कोलगेट’, ‘पेप्सोडेंट’च्या तोंडचे पाणी पळविले. एवढेच नव्हे, तर दंतमंजनातील चारकोलची थट्टा-मस्करी करणार्या त्या कंपनीने, चक्क चारकोलचा उल्लेख ठळकपणे आपल्या जाहिरातीत केलेला दिसतो. ‘सुपर कॉम्प्युटर’ देण्यास अमेरिकेने नकार दिल्यावर, भारताच्या ‘परम कॉम्प्युटर’च्या निर्मितीची यशोगाथा स्मरणात असेलच. एकेकाळी रशियाने ‘क्रायोजेनिक इंजिन’ देण्यास नकार दिल्यावर, भारतीय वैज्ञानिकांनी केलेला चमत्कारच इतिहास घडवून गेला. भारतीय वस्त्रोद्योगाने नकळत केलेल्या स्वदेशीच्या अंगीकाराने युरोप, अमेरिकेतील ब्रॅण्डसचे धाबे दणाणून सोडले होते. तंत्रज्ञान क्षेत्रात आज पर्याय नसल्यामुळे, नाईलाजाने विदेशी ब्रॅण्ड्सवर बर्याच अंशी अवलंबून राहणे समजू शकतो. पण, भारतीयांनी कन्झ्युमर मार्केट (उपभोक्ता बाजार)मधील अर्थात गृहोपयोगी वस्तूंच्या (खाद्य-पेय पदार्थ, स्वच्छतेचे उत्पादन इत्यादी) बाजारातून, या बहुराष्ट्रीय कंपन्यांना पिटाळून लावले पाहिजे. ‘मायक्रोचीप्स’ ठीक आहे पण, ‘पटेटो चिप्स’करिता विदेशी ब्रॅण्ड्स अजिबात स्वीकार्य नाही. कनझ्युमर ड्युरॅबल्स अर्थात कुटुंबाला हव्या असणार्या आवश्यक व अनेकदा सुखसोयी वाढविणार्या वस्तूंचे मार्केट. मेहनतीने कमावलेला पैसा या महागड्या वस्तू म्हणजे मोबाईल्स, एसी, फ्रीज, वॉशिंग मशीन, लॅपटॉप, फर्निचर्स, मोटर कार इत्यादी खरेदी करताना कसा वापरावा, याचे गणित समजून घेतले पाहिजे. या सर्व उत्पादनांना भारतात बहुराष्ट्रीय ब्रॅण्ड्स ‘वीवो’, ‘ओप्पो’, ‘एमआय’सारखे चायनिज मोबाईल तसेच, अन्यान्य प्रोडक्ट्सकरिता अनेक विदेशी ब्रॅण्ड्स भारतात अब्जावधी डॉलर्सचा व्यवसाय करत आहेत. भारताचा पैसा व्यवस्थितरित्या (सिस्टिमॅटिक लूट )लुटत आहेत. शरीरास अपायकारक अनेक शीतपेय बाजारात येत आहेत, आले आहेत व येऊन स्वतःचे साम्राज्य स्थापित करून बसले आहेत. बहुसंख्य शहरी व काही ग्रामीण क्षेत्र या घातक खाद्य व पेय पदार्थांच्या सापळ्यात अडकला आहे. ‘लेहर पेप्सी’, ‘कोका कोला’, ‘सेवन अप’, ‘मॅकडोवेल’, ‘लिम्का’, ‘ड्यूक्स’, ‘फॅन्टा’, ‘कॅडबरी’ इत्यादी ब्रॅण्ड्सने, तरुण पिढीला वेड लावले आहे. हे सर्व आरोग्यास हानिकारक आहेत, हे आता नव्याने सांगायला नको. मोदींचा इशारा यातून निर्माण होणार्या समस्यांकडेच आहे. भविष्यातील पिढीला अस्वस्थ करणारी ही यंत्रणा आहे, हे त्यांना सांगायचे आहे. भारताच्या युवा पिढीला पाश्चात्य जीवनशैली स्वीकारण्यास भाग पाडणारी, ही बहुराष्ट्रीय कंपनींची विषारी यंत्रणा आहे. आधुनिकतेचा झेंडा हातात घेऊन आपण केव्हा पाश्चात्यकरणाकडे वाटचाल केली, हेच आपलेच आपल्याला कळलेले नाही. अमेरिकन कुसंस्कृती ही त्यांच्या भोगवादी मानसिकतेतून आली आहे. उपभोक्तावादातून आली आहे. जगाच्या एकूण वस्तीतील फक्त चार टक्के वस्ती असलेला अमेरिका, जगाच्या 16 टक्के संसाधनांचा उपयोग करतो. त्या आत्मविघातक कुसंस्कृतीचे आपण वाहक होत आहोत, असा इशारा बहुधा मोदींना करायचा आहे. जेव्हा मोदी तुम्हाला याद्या बनवायला सांगतात, तेव्हा ते तुम्हाला सावध करीत आहेत. कुटुंबाच्या सर्वोच्च पालकाप्रमाणे मार्गदर्शन करत आहेत. कारण, त्यांना तुमची, तुमच्या मुलाबाळांची, ज्येष्ठांची व घरातल्या मातृशक्तीची काळजी आहे.
आज भारतात अंदाजे सात हजार प्रकारची चिनी उत्पादने आयात केली जातात. अनेक वर्षे अंतर कमी होते पण, आता चीनसोबतच्या व्यापाराचे ‘ट्रेड डेफिसिट’ (निर्यात-आयात) वाढत चालले आहे. भारताची गंगाजळी, आयातीत वस्तूंच्या खरेदीमुळे खर्ची पडते. भारताचे स्थानिक उद्योग देशोधडीला लागतात व हळूहळू या बहुराष्ट्रीय कंपन्यांचा फास गळ्याभोवती आवळत जातो. एकदा का स्थानिक उद्योग रसातळाला गेला की, या विदेशी कंपन्या भारतीयांची लूट सुरू करतात. आपल्याच भारतीय समाजाकडून कमावलेला पैसा, हा चीनसारखा देश भारताविरुद्ध जिहाद करणार्या पाकला पुरवतो. त्यांना शस्त्रास्त्र देतो व भारताच्या बरबादीचा डाव मांडतो. समाजाने हे गणित समजायला हवे की नाही? का समजून घेत नाही आपला हा समाज? म्हणून मग पंतप्रधानाला घसा फाटेपर्यंत ओरडून सांगावे लागते; वारंवार सांगावे लागते. आतापर्यंत सैन्याशी युद्ध होते, आता ते सर्वसामान्य नागरिकांपर्यंत आले आहे. पहलगाम हत्याकांड हे सांकेतिक आहे, नमुना आहे. दहशतवादी पाकिस्तानचे मनसुबे वेगळेच आहेत. त्याला अख्खा भारत गिळंकृत करायचा आहे. ‘गजवा-ए-हिंद’ करायचा आहे. सामाजिक, सांस्कृतिक, राजकीय, आर्थिकरित्या भारतास पराभूत करायचे आहे. दहशत निर्माण करायची आहे. भारताचे खच्चीकरण करायचे आहे आणि हे फक्त पाकिस्तान नव्हे, तर आर्थिक शोषण करणार्या सर्व बहुराष्ट्रीय कंपन्यांचे षडयंत्र आहे. व्यापार करण्यासाठी आलेल्या एक ‘ईस्ट इंडिया कंपनी’ने भारतावर पावणे दोनशे वर्षे राज्य केले. आता भारतात 40 हजारांवर विदेशी कंपन्या कार्यरत आहेत. संकट केवढे मोठे आहे, गंभीर आहे, याची प्रचिती व्हावी म्हणून हा उल्लेख केला आहे. या विदेशी कंपन्या भारतीय समाजाचे हित जोपासत नाहीतच, उलट पर्यावरण, संस्कृती, सभ्यता, तरुण पिढीला पथभ्रष्ट करण्याच्या उद्योगात लिप्त आहेत. त्यांनी टाकलेल्या दिखाऊपणाच्या जाळ्यात अडकून आपण गुंगीचे औषध घेऊन, निष्काळजीपणाने सुप्तावस्थेत आहोत. गेल्या दोन दशकांत सामाजिक स्तरावर झालेल्या प्रचंड अधोगतीच्या मुळाशी, ही बहुराष्ट्रीय कंपनींच्या माध्यमाने आलेली कुसंस्कृतीच आहे. पर्यावरणाचे रक्षण करू, नोकर्या देऊ, स्थानिक व्यापार्यांच्या क्षेत्रात शिरणार नाही तसेच, फक्त बी2बी व्यवसाय करू असे लिखित करार करणार्या, ऑनलाईन विक्री करणार्या दोन विदेशी कंपन्या ‘अॅमेझॉन’ व ‘वॉलमार्ट (फ्लिपकार्ट)’ याचे जिवंत उदाहरण आहेत.
भारताच्या एकूण जीडीपीमध्ये अशा अनेक ‘एफडीआय’चे योगदान आहे. विदेशी साहाय्य मिळवताना भारत सरकार, भारतीय समाजाला ध्यानात ठेवून अनेक अटी टाकतात व करार करतात. या अटींप्रमाणे बहुराष्ट्रीय कंपन्या व्यवहार करत नाहीत. सरकारच्या मर्यादा आहेत. ते नियमात बसणारीच कार्यवाही करू शकतात. पण, समाजाला कोणते बंधन आहे? निवड करण्याचा अधिकार, स्वातंत्र्य त्याच्याकडे आहे. स्वदेशी आहे म्हणून तो आपला आहे, आपल्या देशाचा आहे, भारतीय उद्योजकाचा आहे, देशाच्या अर्थव्यवस्थेचा कणा आहे, भारताचे भविष्य आहे, हा भाव मोदींना जागृत करायचा आहे. म्हणून स्वदेशी विषयाचा सार्वजनिक ऊहापोह करून त्यांनी, भारतीय समाजाला भारताचे सत्य सांगण्याचा प्रयत्न केला आहे. स्वदेशी सामान खरेदी करताना आपल्या भाषेचा, आपल्या स्वदेशी आचार-विचारांचा, स्वदेशी भावनांचा, भाषणाचा, स्वदेशी भ्रमणाचा, स्वदेशी चिकित्सेचा अनुल्लेखित इशारा केलेला आहे. भारताला 2047 सालापर्यंत ‘विश्वगुरू’ करायचे असेल, तर संपूर्ण स्वदेशी शिवाय पर्याय नाही. 45 ओसेंटिग्रेड तापमानात काम करणार्या शेतकर्यापासून ते देशाच्या मुख्य आर्थिक सल्लागारापर्यंत या विषयाची गंभीरता समजावी, म्हणूनच मोदी बोलले. खरं तर त्यांनी जांबुवन्तांचीच भूमिका केली आहे. भारतीय समाजरूपी हनुमानाला जो विसर पडला होता, त्याची स्मृतिमंजुषा उघडण्याचे काम केले आहे. चार दिवसांत पाकड्यांना ‘ऑपरेशन सिंदूर’ करून त्यांनी लोळविले आहे, आता पाळी आहे भारतीय समाजाची.
‘ऑपरेशन सिंदूर’ करण्यासाठी आपल्याला सीमेवर जावे लागत नाही, प्रत्यक्ष युद्धक्षेत्रात उतरावे लागत नाही, छातीवर गोळ्या खाव्या लागत नाही. पण, सामाजिक व आर्थिक स्तरावरचे युद्ध समाजानेच लढावे लागेल. भारताचे सत्य, सत्व व स्वत्व समजून घ्यावे लागेल. मोदींच्या भाषणातील स्वदेशीच्या आग्रहाचा हाच मतितार्थ आहे. हे युद्ध आपण किती डोळसपणे, आक्रमकतेने लढतो, यावरच आपल्या प्रिय भारतमातेचे भवितव्य अवलंबून आहे.
(लेखक ‘स्वदेशी जागरण मंचा’चे अखिल भारतीय कार्यकारिणी सदस्य आहेत.)
प्रशांत देशपांडे
9820804434
pndswadeshi@gmail.com