संघ कुठे काय करतो?

    20-Feb-2024
Total Views | 128
Savitribai Phule Mahila Ekatm Samaj Mandal

‘दिव्यत्वाची जेथे प्रचिती तेथे कर माझे जुळती’ याच भावनेने छत्रपती संभाजीनगर शहर आणि आजूबाजूच्या परिसरात ‘सावित्रीबाई फुले महिला एकात्म समाज मंडळा’चे सेवाजागृती कार्य चालते. गुरुवर्य लहुजी साळवे आरोग्य केंद्रात विजय उकलगावकरांची भेट झाली आणि त्यांनी ‘सावित्रीबाई फुले महिला एकात्म समाज मंडळ’ संस्थेच्या शब्दात मांडण्याचा केलेला हा प्रयत्न...

गुरुवर्य लहुजी साळवे आरोग्य केंद्राचे डॉ. दिवाकर कुलकर्णी हे प्रमुख आहेत. शहरी तथा ग्रामीण भागातले गरजू रुग्ण केवळ दहा रुपये भरून आपण तेथील ओपीडीचा लाभ घेऊ शकतो. मिलिंदनगर सेवा वस्तीसाठी ब्लडप्रेशर, डायबेटिस अशा तपासण्या, गरोदर स्त्रिया, कुपोषण ते अगदी मनोरुग्णांना कौंसिलींग अशा अनेक सेवा या केंद्रातर्फे पुरवल्या जातात. दुसरीकडे संस्थेचा ‘देवकीनंदन गोपालाक्षुधा सन्मान योजना’ प्रकल्प सुरू आहे. याअंतर्गत वस्तीतील जवळपास 300 निराधार, ज्येष्ठ नागरिकांना डबे (एकवेळचे जेवण)घरपोच दिले जातात. डिलिव्हरीसाठी वस्तीतील अनेक संघ स्वयंसेवकांचा हातभार लागतो. सेवा वस्ती म्हटले की, सगळेच आलबेल चालेल असे नाही, महिलांवरील अत्याचार, भांडण, तंटे, इतर गुन्हे यांना आळा घालण्यासाठी न्याय केंद्र चालते. आठवड्यातून एकदा मान्यवर वकिलांची व्हिजिट असते आणि मोफत सल्ला मिळू शकतो. लोकांचं मनोरंजन व्हावे, संस्कार आणि समाज जागृती या सर्वांसाठी ‘देवगिरी ऋच्’ रेडिओ चालवला जातो. येथे रेकॉर्डिंग रूम, व्हिडिओ कॉन्फरन्स अशा अद्ययावत सुविधा उपलब्ध आहेत.

वस्तीपातळीवरील युवक-युवती आणि महिलाही स्वावलंबी व्हावेत, यासाठी संस्थेच्या माध्यमातून स्वयंरोजगार प्रशिक्षणही सुरू आहे. संगणक प्रशिक्षण, शिवणकाम प्रशिक्षण, ब्युटीशियन, अन्नपूर्णा असे अनेक छोटे पण तेथील महिलांसाठी ‘लाईफ ट्रान्सफॉरर्मिंग’ उपक्रम बघायला मिळाले. सेवावस्तीतील श्रमिक लोक अनेकदा पैशाअभावी काही इजा झाल्यास दुखणे अंगावर काढतात, हे लक्षात घेऊन अत्यल्प दरात फिजिओथेरपी उपचार केंद्र चालू केले आहे. शालेय विद्यार्थ्यांसाठी विद्यार्थी किशोरी विकास प्रकल्प काम बघते. सोशल मीडियाचे दुष्परिणाम, इतर आकर्षणे यापासून मुलांना सावध केले जाते. बोलण्या बोलण्यात कळले की, हल्ली व्हाईटनरचा उपयोग मुले नशा मिळवण्यासाठी करतात. मुलांची ऊर्जा योग्य मार्गी राखणे हे खरंच मोठे काम आहे.

सकाळी 10.30 ते दुपारी 3 या साडेचार तासांत आम्ही जवळपास डझनभर विविध उपक्रमांची माहिती घेतली, तेथील प्रमुखांशी गप्पा मारल्या आणि काही कामांचा अनुभवही घेतला. दुपारच्या चहानंतर आमचा दौरा संभाजीनगर ग्रामीण भागात होता. तसे संभाजीनगर शहर काय आणि ग्रामीण काय अगदी पिण्याच्या पाण्याचेही दुर्भिक्ष्य. महानगरपालिका क्षेत्रातही पाणीपुरवठा टँकरनेच होतो. ग्रामीण भागात जेमतेम 650 मिमी पाऊस होतो. पाऊस होईल तेव्हाही बरेच पाणी वाहून जाते. ही समस्या लक्षात घेऊन भूजल पातळी वाढवण्यासाठी अनेक उपाययोजना चालू आहेत. पहिले धोंडखेडा गावातील गाबियेल बंधारा बघितला, याचा उपयोग पाणी अडवण्यापेक्षाही मातीला थांबवणे जास्त आहे. हाच गाळ पुन्हा शेतात टाकला जातो. याच जोडीला माती नाला बांध (MNB) व Deep CCT ( Contineous Contour Trench) बघितले- डोंगर उतारावर खोल खंदक वेढ्यासारखा - वाहून येणारे पाणी योग्य ठिकाणी वळवणे.
 
गेल्या काही वर्षांच्या प्रयत्नांनी भूजल पातळी वाढली आहे, त्यामुळे वर्षातून दोन-तीन पिके घेणे शक्य होऊ लागले. शेतमाल वाढला तरी विक्री व्यवस्था नसल्यास पुन्हा शेतकरी अडचणीत येतो, म्हणून संस्थेच्या 32 वेगवेगळ्या FPC (Farmer Producer Company) आहेत. 100 हून अधिक गावांत ‘S4S टेक्नॉलॉजी’च्या माध्यमातून सोलर ड्रायर दिले आहेत, पैकी नांद्रा गावातील प्रोजेक्ट बघितला, सध्या तेथे कांदा वाळविला जातो. दोनच दिवसांपूर्वी भोर येथील माझ्या शेतकरी मित्राबरोबर ही कल्पना मांडली होती. कांद्याच्या भावासंबंधी रडत बसण्यापेक्षा त्यावर प्रक्रिया केली पाहिजे आणि आज त्याची अशी अंमलबजावणी बघायला मिळाली आणि खूप बरे वाटते. आले, हळद, टोमॅटो आणि कांदा असे चार प्रकार येथे वाळवले जातात. छोट्या छोट्या गावांत जसे सरकारी पातळीवर आशा सेविका असतात, त्याप्रमाणे औषध पेटी आणि ‘मदर केयर किट’ हा प्रकल्प अनेक गावांत चालतो. वजनकाटा, रक्तदाब, हिमोग्लोबिन मोजणे ते अगदी गरोदर महिलांच्या गर्भांचे ठोके चेक करणे अशी अद्ययावत बॅग दिली जाते. एकूण 75 आरोग्यसेविकांपैकी 11 महिलांना ‘मदर केयर किट’ दिले आणि प्रत्येक महिला सात गावांत फिरतात. पूर्वी तर पायीच प्रवास करायला लागायचा. हल्ली वाहनाची व्यवस्था झाली आहे. नांद्रा गावातील एका आरोग्यसेविकेच्या घरी किटबॅग बघायला मिळाली आणि छान काळा चहाही! वजन काट्यावर वजनही करून बघितले. दिवसाचा शेवट एका शेतकरी कुटुंबाच्या घरी होता, त्यांच्याकडे वर्मी कंपोस्ट आणि गोबर गॅस हे प्रोजेक्ट बघायला मिळाले. एक पाहायला मिळाले की, येथील छोट्या छोट्या शेतकर्‍यांकडे गोधन आहे. पाण्याचा प्रश्न असताना एवढे गोधन सांभाळतात, हे विशेषच. इथे पुन्हा गाईच्या निरस्या दुधाचा आणि गोबर गॅस वापरून केलेला चहा झालाच!

संघाचा स्वयंसेवक कुठेही गेला तरी शाखेत गेल्याशिवाय त्याला चैन पडत नाही. सकाळी ओंकारेश्वर मंदिर येथील स्वा. सावरकर शाखेत गेलो. पंचवीसएक जणांची उपस्थिती होती आणि छान कार्यक्रमाची रचना होती. ‘हिंदू मॉरा रे हिंदू मॉरा’ हे बंगाली गीत झाले. वेगळेच वाटले. 10.30 वाजण्याच्या सुमारास ओंकार बालवाडीला गेलो. ‘पायाभूत शिक्षणाची आनंदयात्रा’ अशी प्रदर्शनी होती. नवीन येऊ घातलेल्या राष्ट्रीय शैक्षणिक धोरणाची उद्दिष्टे ‘विद्याभारती’ अभ्यासक्रमाच्या माध्यमातून कशी पूर्तता होईल, याची काही प्रात्यक्षिके, काही मॉडेल बघायला मिळाली, अगदी लहान मुलांच्या तळ्यात मळ्यातसारख्या खेळात खेळलोही, त्याच कॅम्पसमध्ये ‘विहंग’ ही विशेष विद्यार्थ्यांसाठी असलेली शाळाही बघितली. त्यांची एक नवीन इमारत ही वर्षभरात होईल. जे दोन नवीन प्रकार बघायला मिळाले ते छोटा जलतरण तलाव, ज्यात विशेष मुलांना वॉटर थेरपी दिली जाते आणि तेथील वाचनालय. मुख्य म्हणजे, या दोन्ही संस्थांचे संस्थापक व आधारस्तंभ संघ स्वयंसेवक डॉ. संजीव सावजी यांचीही भेट झाली. नंतर दत्ताजी भाले रक्तपेढी बघितली. दत्ताजी येथे 70च्या दशकात संघाचे प्रचारक म्हणून अनेक वर्षं काम बघत होते. रक्तपेढीची माहिती घेताना ‘बॉम्बे ओ’ असा एक वेगळा रक्तगट आहे आणि प्रत्येक रक्तगटात ‘अन्टिजेन’प्रमाणे पुन्हा दोन भाग असतात. उदा. -1, -2 जे ब्लड मॅचिंगमध्ये महत्त्वाचे असते हे कळले. फ्रान्सचे अत्याधुनिक ब्लड चेकिंगचे पूर्ण ऑटोमॅटिक मशीनही बघितले.
 
जेवणाच्या मध्यंतरानंतर डॉ. हेडगेवार रुग्णालय बघितले. 800 बेडचे हे खूप सुसज्ज हॉस्पिटल आहे. ब्रेन सर्जरी आणि कॅन्सर सर्जरी सोडल्यास सर्व उपचार होतात. अनेक ओपीडी आहेत. जनरल वॉर्डच्या सोईसुविधाही अप्रतिम आहेत. इतर हॉस्पिटलच्या तुलनेत खूपच माफक दरात उपचार होतात. सर्वांत महत्त्वाचे जे जाणवले ते एवढ्या मोठ्या प्रमाणवर रुग्णसेवा होत असूनही रुग्णालयात कुठेही गडबड गोंधळ आढळला नाही. रुग्णालयाचा स्वतःचा वॉटर फिल्टरेशन आणि ऑक्सिजन प्लांट आहे. रुग्णालयातील औषधपेढी रुग्णांना घरपोच औषधांची डिलिव्हरीही करते. एक अचंबित करणारी गोष्ट म्हणजे, राजकुमार हॉस्पिटलमधील सर्व पेशंट आणि त्यांच्या नातेवाईकांना रोज घरी बनवलेले जेवण मोफत देतात. येथे नर्सिंगचा फूल फ्लेज कोर्स चालू आहे, तर लवकरच ‘एमबीबीएस’चे कॉलेज चालू होईल.

दोन दिवसांत ‘डॉ. बाबासाहेब आंबेडकर वैद्यकीय प्रतिष्ठान’ संस्थेचे कार्य पाहिले. संस्थेची व्याप्ती खूप मोठी आहे. 12 जिल्ह्यांमध्ये 900 पेक्षा अधिक गावांमध्ये संभाजीनगर शहर व जालना शहरातील 73 सेवावस्थांमध्ये संस्थेचे काम चालते. संस्थेमध्ये 200 पूर्ण वेळ कर्मचारी आहेत. लहानपणी संघाच्या बौद्धिक वर्गात ऐकायचो संघ काही करणार नाही, पण संघ स्वयंसेवक सगळे करतील याचा प्रत्यय आला. ‘थेंबे थेंबे तळे साचे’, आपल्या प्रत्येकाच्या छोट्याशा मदतीने या सेवा प्रकल्पांना हातभार लागू शकतो.

(अधिक माहितीसाठी संपर्क - विजय उकलगावकर - 7875555944, अजित वर्तक, गोपू. कडड - हरित, स्वच्छ, सुरक्षित गोरेगाव -8097796070)
 
अजित वर्तक 
अग्रलेख
जरुर वाचा

Email

admin@mahamtb.com

Phone

+91 22 2416 3121