राजा रघुवंशीची हत्या आणि...

    11-Jun-2025   
Total Views | 15
 
raja Raghuvanshi murder
 
 
11 मे रोजी इंदोरमध्ये राजा रघुवंशीचा विवाह सोनमशी झाला होता. दि. 20 मे रोजी ते दोघे मधुचंद्रासाठी मेघालयला गेलेे. दि. 23 मे पासून दोघांचे मोबाईल बंद होते. दि. 2 जून रोजी राजाचा मृतदेह वेसावडोंग धबधब्याजवळ एका खोल दरीत आढळला. राजाचा मृतदेह सापडला, मात्र सोनम जिवंत आहे की मृत, हे समजत नव्हते. मात्र, दि. 9 जून रोजी पहाटे 3 ते 4 वाजेदरम्यान सोनमच्या भावाला सोनमचा फोन आला. तिने त्याला सांगितले की, ती गाझीपूरच्या नंदगंज भागातील एका ढाब्यामध्ये होती. पोलिसांच्या मते, राज रघुवंशीची हत्या त्याच्या पत्नीने सोनमने घडवून आणली. तिचे प्रेम राज कुशवाहवर होते. ती विधवा झाली, तर विधवा मुलीशी विवाह करायला राज कुशवाहला आपले आईबाबा संमती देतील, असे तिने राज कुशवाहला सांगितले होते म्हणे. राजा रघुवंशीच्या हत्येमध्ये सोनम रघुवंशीचा प्रियकर राज कुशवाह आणि आनंद, आकाश आणि विकी ठाकूर यांचा सहभाग आहे, असे पोलिसांचे म्हणणे आहे. आपल्या क्षणिक सुखासाठी एका उमद्या मुलाचा जीव घेणे आणि त्याच्या हत्येनंतर स्वतःच्या सुखी जिवनाचे स्वप्न पाहणे इतकी विकृत मानसिकता? ज्या कुटुंबातील मुलगा गेला, त्या कुटुंबावर दुःखाची कुर्‍हाड कोसळेल, तसेच हा गुन्हा करून आपण आपल्या आईबाबांचीही फसवणूक करत आहोत, त्यांच्या भावनांशी खेळत आहोत, याचा तिळमात्र विचार सोनमच्या मनात आला नाही का? इतर कोणत्याही भावनेपेक्षा, कर्तव्यापेक्षा हत्या करून का होईना, आपला विवाह झालाच पाहिजे, असे सोनम आणि राज कुशवाहला कसे काय वाटू शकते? ही अशी मानसिकता कशी निर्माण झाली असेल? त्यामुळेच मानवतेला काळीमा फासणार्‍या या घटनेने समाज ढवळून निघाला आहे. या घटनेबाबत समाजमनाचा दै.’मुंबई तरुण भारत’ ने घेतलेला हा मागोवा...
 
तरुणाईने कल्पनेत न जगता वास्तवात जगावे...
 
राजाच्या हत्याकांड आणि पूर्वी अशाच घडलेल्या तत्सम घटनांचा मागोवा घेतल्यानंतर एक जाणवते की, अशा प्रकारच्या घटनांमधल्या गुन्हेगार युवक-युवती कोणत्यातरी भ्रामक जगतात वावरत होते. स्वतःचा स्वार्थ साधणे स्वतःला जे पाहिजे ते अट्टाहासाने मिळवणे, मग त्याचे परिणाम काहीही होवोत, ही वृत्ती त्यांच्यामध्ये होती. त्यांच्या कुटुंबाशी समाजाशी बांधील असते, तर एखाद्याचा कुणाचा जीव घेण्याचा किंवा जीव देण्याचा विचारही त्यांनी केला नसता. एखाद्या कृतीचे काय परिणाम होऊ शकतात, याबाबत विचार करण्याची समज युवक-युवतींमध्ये यावी, यासाठी जागृती करणे गरजेचे आहे. कुटुंबाचे अस्तित्व हे सहजीवनावर आधारित असते. ही सहजीवनाची भावना या तरुण-तरुणीमध्ये होती का? कुटुंबाच्या सर्व सदस्यांमध्ये सहजीवनाची भावना वृद्धिंगत करणे गरजेचे आहे.
 
- सुशिल जाजू, सामाजिक कार्यकर्ता
 
विवाह करण्यापूर्वी...
 
सोनमला राज कुशवाहशी लग्न करायचे होते, तर तिने राजा रघुवंशीशी विवाह का केला? खून करून स्वतःसोबत प्रियकरालाही तिने देशोधडीला लावले. गुन्हा सिद्ध झाला, तर तिला तुरुंगातच खितपत पडावे लागणार आहे. हे सगळे का झाले? एखाद्या निष्पाप तरुणाचा खून करण्याची क्रूरता तिच्यात होती. मात्र, प्रियकाराशी विवाह करण्याची हिंमत तिच्यात नव्हती? हे सगळेच सुन्न करणारे आहे. विवाह संस्कार हा महत्त्वाचा संस्कार आहे. मला वाटते, विवाह करण्यापूर्वी वधु-वरांचे समुपदेशन आणि भावी वधुवरांसंदर्भात सर्वच बाबींची तपासणी होणे गरजेचे आहे. कुंडली, घरदार आणि संपत्ती हे निकष बघितले जातात. पण ज्यांचा विवाह होणार आहे, त्यांच्या मनात काय चालले, ते काय विचार करतात, याचाही मागोवा घेणे गरजेचे आहे.
 
-दिपक साळवी, सचिव, अखिल भारतीय भाट समाज
 
पालक आणि पाल्य यांच्यात सामंजस्य हवे
 
अनेकदा पालक मुलामुलींवर विवाह लादतात. वधु आणि वराबाबत काही निकष ठरलेलेच आहेत. जसे वर श्रीमंत असावा आणि वधु सुंदर असावी. या निकषानुसार स्थळ असले की पालक त्यांच्या पाल्यांना लग्न करण्याची सक्ती करतात. अनेकदा भावनिक ब्लॅकमेल करतात. मग पाल्य केवळ दिखाव्यासाठी हे लग्न करतात आणि आयुष्यभर मनाविरुद्ध जगतात किंवा टोकाची पावल उचलतात. अर्थात, पालक ही असे विवाह लादतात. कारण, त्यांच्यावर समाजाचे दडपण असते. तसेच, त्यांना आपल्या पाल्याचे भले कशात आहे, हेसुद्धा माहिती असते. पण, पालकांचे हे मन त्यांची पाल्य समजून घेत नाहीत. तरुणाईची ती मानसिकताच लोप पावत चालली आहे. पालक आणि पाल्य यांच्यात सामंजस्य असणे गरजेचे आहे.
 
-सविता नागेश धोंडगे, सामाजिक कार्यकर्ता
 
गुन्हेगार कायद्यापासून वाचूू शकत नाहीत
 
राजा रघुवंशी हत्याकांडामधून प्रामुख्याने दोन गोष्टी लक्षात येतात. एक म्हणजे, आरोपीने कितीही काळजीपूर्वक गुन्हा केला, तरी तो कायद्यापासून वाचू शकत नाही. आज ना उद्या पोलीस त्याच्यापर्यंत पोहोचतात. तांत्रिक पुराव्याच्या आधारे पोलीस व तपास यंत्रणा आरोपीला शोधून काढतात व त्याला शिक्षा होतेच. दुसरी आणि महत्त्वाची गोष्ट म्हणजे, जर इच्छा नसेल, तर घरच्यांच्या दबावांमध्ये कोणाशीही लग्न करू नये. घरच्यांनीसुद्धा आपल्या मुलांना विशिष्ट ठिकाणीच लग्न करा, असा आग्रह करू नये. कारण अशा जबरदस्तीमुळे एक नव्हे, तर दोन कुटुंब उद्ध्वस्त होत असतात. पती पत्नी हे नाते विश्वास व मैत्रीवर अवलंबून असते. अशी मैत्री निर्माण व्हावी, यासाठी प्रत्येकाने प्रयत्न केले पाहिजे. या घटनेनुसार पुन्हा वाटते की, गुन्हेगार कायद्यापासून वाचवू शकत नाहीत.
 
- अ‍ॅड. प्रकाश साळसिंगीकर,अध्यक्ष, दर्द से हमदर्द तक संस्था
 
नैतिक मूल्ये रुजवणे गरजेचे
 
चंगळवादी संस्कृती फोफावली आहे. जे समोर दिसते, तेच सत्य आहे. जे वरवर चांगले दिसते, त्यातच सुख आहे, असे मानण्याची प्रवृत्ती बळावली आहे. ’मी’, ’माझे सुख’, ’माझी मौजमजा’ अशी वृत्ती समाजात वाढली आहे. मुख्यतः कुटुंबातून नात्यांबाबतची परिभाषा आणि संस्कारच देणे कमी होत चालले आहे. त्यामुळे नात्यांचे पावित्र्य, नात्यांचा अर्थ आणि महत्त्व ही समजू नये, अशा वातावरणात युवा पिढी वाढत आहे. नात्यांचे बंधच उरले नसल्याने युवा पिढी भरकटली जात आहे. मी आणि माझ्या महत्त्वाकांक्षा, आवड यापलीकडे त्यांची गाडी जात नाही. जे हवे ते मिळवायचेच, या वृत्तीने नैतिक मूल्यांचा र्‍हास होत आहे. मानवी जीवनात कुटुंब संस्था महत्त्वाची आहे. कुटुंबातून होणारे मूल्य संस्कार बळकट झाले पाहिजेत. ते मूल्य संस्कार युवापिढीमध्ये रुजले, तर अशा निर्घृण आणि मानवतेला काळीमा फासणार्‍या घटनांना आळा बसेल, अन्यथा नाही.
 
-डॉ. स्वाती महाळंक, पत्रकार, आकाशवाणी पुणे
 
प्रेम भावनेचे उदात्तीकरण होण्याऐवजी विकृतीकरण वाढले
 
‘प्यार के लिये सब कुर्बान’ असे म्हणणारे आणि संस्कार करणारे अनेक साहित्य आणि चित्रपट हैदोस घालत आहेत. इतर कोणत्याही नात्यांपेक्षा प्रेयसी आणि प्रियकराचे नाते महत्त्वाचे असे तरुणाईच्या मनात भरवणारे वातावरण आहे. या असल्या वातावरणामुळे अनेकदा मुलंमुली टोकाचे पाऊल उचलतात. जरा काही मर्जीविरुद्ध झाले की घरातून पळून जाणे आणि अगदी आत्महत्या करण्यासारखे टोकाचे पाऊल उचलले जात आहे. आपल्या मनासारखे झाले पाहिजे नाही, तर स्वतःच्या आणि इतरांच्या जिवाची किंमतही वाटेनाशी झाली आहे. अर्थात, हे सगळ्याच तरुणाईला लागू होत नाही. मात्र, ज्या घटना घडतात, त्याने चिंतीत व्हायला होते. प्रसारमाध्यम आणि संस्कार देणार्‍या सगळ्याच सामाजिक आणि कौटुंबिक व्यवस्थांनी पुनर्वलोकन करायला हवे. आपल्या सुखासाठी दुसर्‍याचा हत्या करणारी वृत्ती का रुजली, हे तपासून त्यावर मार्ग काढायला हवा. तसेच गुन्हेगाराला कठोर शिक्षा व्हावी.
 
-रेखा पागधरे, पदाधिकारी, अखिल भारतीय मांगेला समाज संघटना
 
 

योगिता साळवी

एम.ए. समाजशास्त्र. सध्या मुंबई तरुण भारत  येथे वार्ताहर-उपसंपादक पदावर कार्यरत. राजकीय कार्यकर्ता म्हणून प्रदीर्घ अनुभव. विविध सामाजिक प्रश्‍नांच्या अभ्यासाची आवड व लिखाण. वस्त्यांचे वास्तव हे मुंबई तरुण भारतमधील लोकप्रिय सदराच्या लेखिका.
'मुंबई तरुण भारत'चं व्हॉट्सअप चॅनल फॉलो करा!
अग्रलेख
जरुर वाचा

Email

admin@mahamtb.com

Phone

+91 22 2416 3121