संगीत ते समाधी

    26-Jul-2023
Total Views | 93
Article On Geet Sangam Music To Samadhi

एक कथा प्रचलित आहे. त्यातील शास्त्रीयता पडताळून पाहण्यासारखी आहे. एक संगीतज्ज्ञ गायक गुरू होते. त्यांचा मुलगा आठ वर्षांचा झाल्यावर त्यांनी त्याला तंबोरा लावायला शिकवले. तंबोरा लावण्याचा अभ्यास झाल्यावर गायकगुरूंनी मुलाला खर्जसाधन करायला सांगितले. वर्ष उलटून गेले तरी गायक गुरू मुलाला खर्जाव्यतिरिक्त स्वर लावायला सांगेनात. मुलगा कंटाळला, मुलाची आई त्याहून कंटाळली. गायकगुरूजी आपल्या अनेक शिष्यांना सात स्वरच नव्हे, तर रागरागिण्या सांगून समजावून देत आणि म्हणवून घेत. घरच्या मुलाला मात्र ते खर्जाव्यतिरिक्त दोन वर्षांत एकही स्वर सांगायला तयार नव्हते. स्वतःच्या मुलाकडे गायकगुरूंचे इतके दुर्लक्ष पाहून त्यांची पत्नी त्यांच्यावर नाराज होती.

कर्म-धर्मसंयोगाने गायकाला दूरच्या देशी गायनाकरिता जावे लागले. मुलाला त्यांनी खर्जसाधनेशिवाय अन्य काहीही न करण्यास सांगितले. मुलाला वडिलांचे खर्ज साधनेचे दडपण आता कमी होणार होते. त्याच्या आईचीही साथ होती. गायक बाहेरगावी गेल्यावर मुलाने खर्जसाधन सोडून सप्तस्वरांचा विस्तार व विलास सुरू केला. बापाचे गाणे ऐकून-ऐकून त्याच्या मनात असलेले स्वर, स्वरविस्तार, आलाप व ताना तो एकामागे एक घेऊ लागला. गवयाचाच मुलगा तो! सारे कसे भराभर त्याला जमू लागले. वर्षभरात तो उत्तम गायक समजला जाऊ लागला. त्याच्या आईलाही मुलाची प्रशंसा ऐकून धन्यता वाटत असे व असे वाटे की एवढा हुशार मुलगा, पण बापाने मुलाला पुढे जाऊ दिले नाही. त्याला खर्जसाधनेवरच डांबून ठेवले. वय लहान व सर्वत्र प्रशंसा! वर्षभरानंतर गायक आपल्या गावी परत आले, तर त्यांना आपल्या घरी तबोर्‍यावर एक मुलगा भराभर ताना घेऊन गाणे म्हणतो आहे, असे त्यांनी ऐकले.

चौकशी करताच त्यांच्या पत्नीने मोठ्या अभिमानाने सांगितले, ’अहो आपलाच मुलगा हा. पाहा काय म्हणतो आहे गाणे! गवयाचाच मुलगा तो, तुम्ही त्याला खर्जसाधनेतच डांबून ठेवले होते. आता पाहा कसा गातो ते. सारेजण त्याची प्रशंसा करतात. पत्नीचे भाषण ऐकून गायकगुरू खिन्न झाले. ते म्हणाले, ’‘जे नशिबात होते तेच झाले. त्याला पट्टीचा गायक करण्याची माझी इच्छा होती व तसा मी प्रयत्न करीत होतो. तीन वर्षे त्याने खर्जसाधन केले असते, तर त्याची कुंडलिनी जागृत होऊन खर्जासह सातही स्वरांची स्थाने त्याला कळली असती. आता खेळ संपला. मुलगा भलत्या वळणावर गेला. लोकांच्या दृष्टीने तो गायक होईल, पण माझ्या दृष्टीने तो गायक असणार नाही. आपला मुलगा ’गानयोगी’ व्हावा, अशी माझी इच्छा होती. पण, परमेश्वराला ते मान्य नव्हते. आता कसली कुंडलिनी जागृती व कसली सप्तस्वरांची स्थाने! माझे स्वप्न विरले.’

वरील कथेतील शास्त्रीय भाग शास्त्रवेत्त्यांना कळेल. खर्जसाधनेद्वारे कुंडलिनी जागृती व कुंडलिनी जागृतीनंतर षट्चक्रभेदनाने सप्तस्वरांची स्थाने कळण्याचा गानयोग स्पष्ट झाला आहे. स्वर कोठून काढावेत व कसे काढावेत याचे एक विज्ञान आहे. त्यानुसार स्वर काढल्यास त्यातूनच विधायक संगीत उत्पन्न होत असते. स्वरांच्या थयथय विलासातून फार फार तर वैचित्र्यपूर्ण रंजकता उत्पन्न होईल. पण, विधायक संगीताचा प्राण त्यातून निघून जाईल. रंजकता संस्कारांवर अवलंबून असते. भारतीय संगीत संस्कारवश व्यक्तींना पाश्चात्त्य संगीत आवडत नाही,तर पाश्चात्त्यसम संगीताचा संस्कार झालेल्या मनांना भारतीय संगीतातील पीळ सहन होत नाही. म्हणून रंजकता गुण नसून ती ऐकणार्‍याच्या पूर्वसंस्कारांवर अवलंबून असते हे आपण पाहतोच. म्हणजे आजच्या संगीतातील विधायकतेचा प्राण तर केव्हाच लोप पावला. पण त्यातील रंजकताही व्यक्तिगणिक संस्कार स्वभावानुरुप राहणार! शिवाय कालांतराने ती ही रंजकता विभिन्न असणार !
ओडवच का ?

‘पंचोनेभ्यः स्वरेभ्यश्च तस्याद्रागस्य संभवः’ भारतीय संगीताचे आणखी एक वैशिष्ट्य आहे. स्वरमेल कितीही स्वरांचा असू शकेल. पण त्यातून उत्पन्न होणारा राग मात्र कमीत कमी पाच स्वरांचा म्हणजे ओडवच असला पाहिजे असा एक दण्डक आहे. असे का? उत्तर वाटते तेवढे सोपे नाही. पाच स्वरांच्या रागाला ओडवच का म्हणायचे? पंचमहाभूतांतील मूलतत्व आकाशतत्व आहे. आकाश म्हटल्याबरोबर त्यात चमकणारे तारे व नक्षत्रे आपल्या मनःचक्षु समोर येतात. ’उडूवः’ म्हणजे नक्षत्र म्हणून कल्पनेला ताण देऊन बादरायण संबंधाने पाच स्वरांच्या रागरागिण्यांना ज्यात उडूव आहेत असा ओडव असे म्हटले आहे. पण , रागात स्वर पाचच का असावेत? त्यापेक्षा कमी स्वरांचा राग का असू नये? हा प्रश्न अनुत्तरित राहतो. पंचमहातत्वांमधील मूलतत्व आकाश खरे. पण, आकाशात काही पाचच नक्षत्रे नाहीत. शिवाय आकाशतत्वाचा व ओडवाचा संबंध काय ? एका आकाश तत्वाचाच संबंध आहे की, पंचमहाभूतांतील पंचतत्वांचा भारतीय संगीताशी संबंध आहे? शेवटचा प्रश्न मात्र आपल्याला भारतीय संगीताच्या घटनेवर व मूलगामीत्वावर प्रकाश पाडायला लावतो.

भारतीय संगीतात तीन आणि चार स्वरांचे राग बरेच आहेत. त्यापैकी आज सर्वश्रुत असलेले मालश्री व भवानी हे होत. भवानीचे ‘सा रे म ध’ हे चार स्वर तर मालश्रीचे ’सा ग प’ हे तीन स्वर राग पूर्ण करतात. पण, तीन वा चार स्वरांचा रागच होऊ शकत नाही, या दण्डकामुळे भवानीला अधेमधे पंचमाचा आभास देऊन व मालश्रीला निषाद मध्यमाचा आधार देऊन त्या चार स्वराच्या रागांना बळेच ओडवाच्या दावणीत गोवले आहे. हे दोन्ही राग वेलावली स्वरमेलातील आहेत, हे ही विशेष होय. गरुडध्वनीचीही तीच अवस्था आहे. पाश्चिमात्य संगीतात पूर्ण स्वरांचे राग बरेच कमी असून पाच, चार व तीनही स्वरांचे राग बरेच असतात. कमी स्वरांच्या रागात उत्तेजकता बरीच असते. पण, संगीत संपल्यावर मानवी चित्तावर त्याचा चिरस्थायी परिणाम काहीच शिल्लक राहात नाही. रागांच्या विधायक स्वरुपाचा विचार केल्यास असले पाच स्वरांपेक्षा कमी स्वर असलेले राग भारतीय संगीताच्या मूल घटनेनुसार विधायक राहूच शकत नाहीत. मालश्री व भवानी रागांच्या अवशेषावरून एका काळात भारतीय संगीतातही असल्या तीन चार स्वरांच्या रागांचा भरणा असावा असे दिसते. पण, भारतीय संगीताचे आधारशास्त्र जे योगशास्त्र, त्या सांख्य योग शास्त्राच्या अनुभवांना धरून असले तीन व चार स्वरांचे राग लोप पावले असावेत किंवा त्यांनाच ओडव केले असावे. भारतीय व अभारतीय संगीतातील हा सर्वात महत्त्वाचा व मूलगामी भेद आहे.

योगिराज हरकरे
(शब्दांकन : राजेश कोल्हापुरे
९७०२९३७३५७)


अग्रलेख
जरुर वाचा

Email

admin@mahamtb.com

Phone

+91 22 2416 3121