सेवेची, समरसतेची वारी...

    16-Jun-2023
Total Views |
Article On Hundreds of organizations Service In Vari

वर्षानुवर्षे अव्याहतपणे सुरू असलेल्या पंढरपूरच्या आषाढी वारीमध्ये मागील काही वर्षांपासून स्वच्छता, पर्यावरण, सेवा आणि समरसता याचे आयाम जोडले गेले आहेत. समविचारी संस्था यासंदर्भात काम करीत आहेत. हजारो हात सेवेच्या कामात गुंतलेले असतात. समाजातील अनिष्टावर मात करून सत्कार्य आणि सत्कर्माचा सिद्धांत रुजविणार्‍या वारकरी संप्रदायाच्या परंपरेचे हे स्वयंसेवक पाईक होत आहेत. ‘निर्मलवारी’, ‘हरितवारी’, ‘निसर्गवारी’ अशा विविध उपक्रमांमधून जनजागृती होत आहे. महाराष्ट्रामधून लाखो वारकरी या सोहळ्यामध्ये सहभागी होत असतात. वारीच्या १५ दिवसांत त्यांनी पाहिलेल्या उपक्रमांची माहिती ते आपापल्या गावांमध्ये जाऊन देत असतात. त्यामुळे गावांमध्येही प्रबोधन होत असते. पुण्यामध्ये पालख्यांचा दोन दिवसांचा मुक्काम होता. या काळात राष्ट्रीय स्वयंसेवक संघ, विश्व हिंदू परिषद, आरोग्य भारती, यांसह संघ परिवारातील शेकडो संस्थांनी वारकर्‍यांची सेवा प्राथमिकतेने केली. कुठे वारकर्‍यांचे पाय चेपले जात होते, तर कुठे औषधोपचारांची व्यवस्था केली जात होती. कुठे भोजनाची व्यवस्था करण्यात आलेली होती, तर कुठे निवासाची व्यवस्था. वारी पुढे चालते आणि पाठीमागून ’निर्मलवारी’चे नियोजन स्वच्छता करीत जात असते. ’निसर्गवारी’ अभियानांतर्गत ’थं क्रिएटिव्ह’ संस्थेमार्फत ‘पर्यावरणपूरक पत्रावळीमधून अन्नदान’ ही संकल्पना अनेक वर्षांपासून राबविली जात आहे. त्याद्वारे थर्माकोल आणि प्लास्टिक पत्रावळींचा वापर कमी होण्यास मोलाची मदत मिळाली आहे. या उपक्रमांमधून स्वच्छता-नीटनीटकेपणाचा हा संस्कार आपसूकच सर्वांवर घडत जातो. ’सेवा है यज्ञकुंड, समिधासम हम जले’ या पद्यातील काव्यपंक्ती स्वयंसेवक जगत असतो. सेवा हा स्वयंसेवकांचा स्वभावधर्म बनून गेलेला असतो. असे हजारो सेवाव्रती वारीमध्ये कोणताही गाजावाजा न करता, कोणतीही प्रसिद्धी न घेता किंवा त्याची अपेक्षा न धरता काम करीत आहेत. केवळ पुणे, आळंदीच नव्हे, तर पुढील १५ दिवस विविध रुपाने हे सेवाकार्य वारीमध्ये सुरूच राहते. देशभर चालणार्‍या लाखो सेवाकार्यांमागे हीच तर, प्रेरणा आहे.

पुण्याने ‘आकाशवाणी’ ऐकली

'हे आकाशवाणीचे पुणे केंद्र आहे’ हे वाक्य कदाचित भविष्यात ऐकायला मिळणे, कठीण झाले असते. किंबहुना, बंदच झाले असते. आकाशवाणी पुणे केंद्रावरून दिल्या जाणार्‍या बातम्या बंद करून हे युनिट छत्रपती संभाजीनगरला हलविण्याची तयारी शासनस्तरावर झालेली होती. पुण्याच्या ‘आकाशवाणी’ला इतिहास आहे. अनेक महान लेखक, कवी, स्वातंत्र्यसैनिक, यशस्वी व्यक्तींच्या मुलाखतींपासून ते सांस्कृतिक उपक्रमांपर्यंत आकाशवाणी केंद्र हे पुणेकरांच्या जिव्हाळ्याचा विषय राहिलेले आहे. इंटरनेटच्या प्रचंड वेगाच्या दुनियेत आणि व्यावसायिक ‘एफएम चॅनल्स‘च्या गर्दीत ‘आकाशवाणी’चा श्वास कोंडतो आहे, हे सत्यच आहे. पण, आजही ‘आकाशवाणी’च्या चाहत्यांची संख्या कमी झालेली नाही. नवीन पिढी भलेही ‘आकाशवाणी’शी फारशी परिचित नसेल, पण जुनी पिढी आजही ‘आकाशवाणी’शी तितकीच मनाने आणि कानाने जोडलेली आहे. शेवटी म्हणतात ना, जुने ते सोने, हेच खरे. कदाचित शासनस्तरावर त्याच्या संचालनाचा खर्च आणि उत्पन्न याचेही गणित मेळ खात नसले. परंतु, जेव्हा एखादा विषय अथवा संस्था स्थानिकांच्या सांस्कृतिक विश्वाशी जोडली जाते, तेव्हा त्याचा वेगळ्या मानसिकतेमधून विचार केला, जाणे आवश्यक ठरते. ‘आकाशवाणी’चे केंद्र संभाजीनगरला हलविण्याचा निर्णय झाल्यानंतर स्वाभाविकच त्यावरून गदारोळ होणे अपेक्षित होते. त्याविषयी चर्चा, टीका झाली. हे केंद्र हलवू अगर बंद करू नये, ही मागणी पुणेकरांकडून होणे स्वाभाविक होते. पुणेकरांच्या भावनांचा आदर केंद्रीय पातळीवर राखला गेला. केंद्रीय मंत्री अनुराग ठाकूर यांनी विजय सहस्रबुद्धे, खा. प्रकाश जावडेकर, पालकमंत्री चंद्रकांतदादा पाटील यांच्यासह अनेकांच्या पाठपुराव्याचे फलित म्हणून हे केंद्र हलविण्यावर स्थगिती आली. या सर्व मान्यवर व्यक्तींमुळे पुणेकरांना शुक्रवार, दि. १६ जून रोजी सकाळी ७.१० वाजता ‘हे आकाशवाणीचे पुणे केंद्र आहे आणि आपण ऐकत आहात राष्ट्रीय बातमीपत्र’ हे पुन्हा ऐकायला मिळाले. पुणेकरांच्या विनंतीला मान देणार्‍या प्रत्येकाला यानिमित्ताने धन्यवाद!

लक्ष्मण मोरे 

अग्रलेख
जरुर वाचा

Email

admin@mahamtb.com

Phone

+91 22 2416 3121