संकटसमयी धावून येणारा राम

    16-Jun-2022
Total Views | 111

ram
 
 
 
 
 
भक्ताने संकटसमयी उगीच धावाधाव करण्यापेक्षा रामावर विश्वास ठेवून आपले प्रयत्न चालू ठेवावेत. रामभक्ताचे संकट निवारण्यासाठी योग्यवेळी कोणाच्या ना कोणाच्या रूपाने मदत करतो. हा या मागील भावार्थ आहे. अध्यात्मासाठी हा विचार उपयुक्त आहे. हे स्पष्ट करण्यासाठी स्वामींना कविकल्पनेतील चक्रवाक पक्षाच्या जोडप्याचा दृष्टांत घ्यावा लागला.
 
 
 
‘राम कधीही आपल्या भक्तांची उपेक्षा करीत नाही आणि रामाला आपल्या भक्ताचा अभिमान असतो’ हा संदेश देणारी ‘नुपेक्षी कदा, राम दासाभिमानी’ अशी शेवटची ओळ असणारे दहा श्लोक समर्थांनी एकापाठोपाठ एक सांगितले आहेत. त्यामागे त्यांचा उद्देश असा की, हा संदेश श्रोत्यांच्या मनावर बिंबवावा. त्या दहा श्लोकांपैकी पुढील श्लोक हा शेवटचा श्लोक आहे. तेथून पुढे स्वामींना श्रोत्यांना वेगळ्या मुद्द्याकडे न्यायचे आहे.
 
 
 
सदा चक्रवाकासी मार्तंड जैसा।
उडी घालितो संकटीं स्वामि तैसा।
हरीभक्तिचा घाव गाजे निशाणी।
नुपेक्षी कदा राम दासाभिमानी ॥३७॥
 
 
 
मनाच्या श्लोकांतील हा एक प्रसिद्ध श्लोक आहे. बर्‍याच लोकांच्या तोंडी तो आढळतो. दासबोधांच्या पारंपरिक पारायण पद्धतीत त्या दिवसाचे पारायण झाले की, समर्थांची आरती केली जाते. ही आरती झाल्यावर परंपरेनुसार मनाच्या श्लोकांपैकी तीन श्लोक मोठ्याने म्हणण्याची पद्धत आहे. या तीन श्लोकांमध्ये ‘सदा चक्रवाकासी मार्तंड जैसा’ हा एक श्लोक असतो. इतके त्याचे महत्त्व आहे. वारकरी संप्रदायात जसा नामगजर करण्याची पद्धत आहे, तसा श्लोकगजर करण्याची प्रथा समर्थ संप्रदायात आहे. आरती झाल्यावर हा श्लोक मोठ्याने म्हटल्याने त्याचे ध्वनी तेथील वातावरणात घुमत राहतात आणि संकटसमयी उडी घेऊन धावून येणारा राम, भगवंत सर्वांच्या स्मरणात राहतो. श्लोक मोठ्याने सर्वांनी एकत्र येऊन म्हटल्याने या श्लोकांतील ‘हरीभक्तिचा धाव’ खर्‍या अर्थी गाजतो, असे म्हणायला हरकत नाही. हा श्लोक सर्वांनी म्हटल्याने लगेच पाठ होतो. तथापि त्यातील अर्थाचा बोध झाल्याशिवाय तो मोठ्याने म्हणणे स्वामींना आवडणारे नाही. या श्लोकात उल्लेखिलेला चक्रवाक पक्षी ही एक सुंदर कविकल्पना आहे. चक्रवाक, चकोर हे कवींनी विशिष्ट भावनेचे प्रतीक म्हणून निर्माण केलेले पक्षीसंकेत आहेत. कवीनिर्मित चकोर पक्षी चांदणे पिऊन राहतो, अशी कविकल्पना आहे. चांदण्याचे अमृतकण वेचणारा हा चकोर किती कोमल असला पाहिजे. अत्यंत कोमल असणारा चकोर पक्षी चांदणे पितो, ही कल्पनाच किती मधुर आहे. ‘ज्ञानेश्वरी’त या चकोर पक्ष्याचे दृष्टान्त आढळतात. उदा.
 
 
 
जैसे शारदीचिये चंद्रकळे।
माजि अमृतकण कोवळें॥
ते वेचिती मनें मवाळें। चकोरत लगे॥
 
 
 
यात अतिहळुवार कोमलतेची परिसीमा गाठली आहे, हे स्पष्ट होते. तसेच चक्रवाक पक्ष्याचा दृष्टान्त विरहव्यथा सांगण्यासाठी देण्याची कविप्रथा आहे. एकंदर समर्थ वाड्.मयात कोमल भाषेचा प्रयोग स्वामींनी क्वचितच केला आहे. तथापि अंतःकरणाने कोमल असलेले समर्थ काहीवेळा कविसंकेत पाळताना दिसतात. त्यामुळे भगवंत-भक्त नाते स्पष्ट करताना विरही चक्रवाक पक्ष्याचा दृष्टान्त स्वामींनी या श्लोकात घेतला आहे. संकटात सापडलेला चक्रवाक आणि धावून येणारा मार्तंड म्हणजे सूर्य यांच्या भक्त आणि भगवंत यांच्याशी मोठ्या मजेशीरपणे स्वामींनी संबंध जोडला आहे. कवींच्या संकेताप्रमाणे चक्रवाक पक्ष्याचे जोडपे नर आणि मादी हे एकमेकांवर खूप प्रेम करणारे असतात. ते नेहमी जोडीने बरोबर फिरत असतात. पण, काहीवेळा झाडाच्या फांद्यांवरून फिरताना ते वेगळे होतात. अपल्या नादात त्यांच्यापैकी एकजण नदीपलीकडील झाडावर जातो. त्याला वाटत असते की, आपला जोडीदारही जवळपास कुठेतरी असेल. तशात दिवस मावळतोे आणि अंधार होतो.अंधारात चक्रवाक पक्ष्याला काही दिसत नाही. एक चक्रवाक पक्षी नदीच्या या तीराला, तर दुसरा पलीकडच्या तीरावर अशी स्थिती उत्पन्न होते. ते एकमेकांंना साद घालीत असतात, पण पाहू शकत नाहीत आणि मध्ये वाहणार्‍या नदीचा खळखळ आवाज... त्यामुळे अंतराची कल्पना करता येत नाही. रात्रभर दोघेही विरहव्यथा अनुभवत सकाळ होण्याची वाट पाहत, त्या ठिकाणीच बसून राहतात. रात्र संपल्यावर डोंगराआडून सूर्य दर्शन देतो व या पक्ष्यांचा विरहकाळ संपतो. ते एकमेकांना भेटतात. त्यांच्यावर आलेल्या विरहसंकटाचे मार्तंड निवारण करतो. रात्रीच्या अंधारात चक्रवाक पक्षी इकडेतिकडे न धावता, उडता एकाच फांदीवर बसून मार्तंड या संकटातून सोडवतील या विश्वासाने, श्रद्धेने वाट पाहतात. ते दिशाहीन होत नाहीत. त्यामुळे सूर्य उजाडताच त्यांचा विरहकाल संपतो. त्याप्रमाणे भक्ताने संकटसमयी उगीच धावाधाव करण्यापेक्षा रामावर विश्वास ठेवून आपले प्रयत्न चालू ठेवावेत. रामभक्ताचे संकट निवारण्यासाठी योग्यवेळी कोणाच्या ना कोणाच्या रूपाने मदत करतो.
 
 
 
हा या मागील भावार्थ आहे. अध्यात्मासाठी हा विचार उपयुक्त आहे. हे स्पष्ट करण्यासाठी स्वामींना कविकल्पनेतील चक्रवाक पक्षाच्या जोडप्याचा दृष्टांत घ्यावा लागला. भक्तांसाठी भगवंत धावून आल्याची अनेक उदाहरणे पुराणात सांगितली आहेत. गजेन्द्रमोक्षाची कहाणी सर्वांना ठाऊक आहे, तसेच महाभारतात द्रौपदीवस्त्रहरणप्रसंगी द्रौपदीने श्रीकृष्णाचा धावा केला, तेव्हा वस्त्रे पुरवून श्रीकृष्णाने पांचालीची अब्रू वाचवल्याची कथाही सर्वविदीत आहे. भक्ताचा देवावर विश्वास असेल, तर भगवंत धावून येतो आणि भक्ताचे रक्षण करतो. स्वामी पुढे सांगतात की, हा ‘हरीभक्तिचा घाव’, आघात सर्वत्र गाजत आहे. त्याचा डंका पिटला जात आहे. या श्लोकात ‘हरीभक्तीचा घाव गाजे निशाणी’ असे समर्थांनी म्हटले आहे. समर्थ भाषाप्रभू असल्याने बहुविध अथार्र्चा ‘निशाणी’ हा शब्द त्यांनी येथे मोडिला आहे. त्यामुळे अभ्यासकांनी ‘निशाण’ शब्दाचे वेगवेगळे अर्थ काढून त्यातील भाव स्पष्ट केला आहे. निशाण हे एक रणवाद्य आहे. निशाण नगार्‍यावर जोराने घाव घातले, तर त्याचा आवाज दूरवर जातो. त्याचप्रमाणे संकटसमयी भक्तासाठी धावून येणारा भगवंत, त्याच्या कीर्तीचा डंका सर्वदूर पोहोचला आहे. ‘निशाण’ या शब्दाचा अर्थ पताका, झेंडा, ध्वज, विजयाचे चिन्ह असाही आहे. ध्वज उंच काठीवर लावून फडकत ठेवावा लागतो. तो आडवा ठेवत नाहीत. हवेत उंचावर असल्याने दुरुनही तो दिसतो. त्याप्रमाणे भक्ताच्या रक्षणासाठी धावून येणार्‍या भगवंताची कीर्ती दुरुनही अनुभवास येते, ती विजयी कीर्तीची ध्वजा आहे, आनंद देणारी आहे. निशाण याचा आणखीही एक अर्थ आहे, तो म्हणजे नेम धरुन लक्ष्यावर वार करणे. ‘हरीभक्तिचा घाव’ बरोबर लक्ष्यावर बसतो. भक्तीचा हा डंका भक्ताच्या हृदयाचा ठाव घेतो. धनुर्विद्येला ‘निशाणबाजी’ असेही म्हटले जाते. कोदंडधारी राम धनुर्विद्येत म्हणजे निशाणबाजीत निष्णात आहेत, तेव्हा ‘घाव गाजे निशाणी’ हा शब्दप्रयोग रामाची आठवण करुन देण्यासाठी स्वामींनी समर्पकपणे योजिला आहे. समर्थांची शब्दयोजना अशी विविध अर्थ प्रगट करणारी असते. एका टीकाकाराने समर्थांना ‘वाड्.मयीन मल्ल’ असे म्हटले आहे, ते योग्यच आहे. पुढे स्वामींची श्लोक क्र. ३८ ते ४२ या पाच श्लोकांतून शेवटची ओळ ‘मना सज्जना राघवी वस्ति कीजे’ अशी सांगितली आहे. राघवाजवळ वस्ती करून राहण्याचा रुपकात्मक अथवा सांकेतिक अर्थ काय असावा, या विषयावर यापूर्वी चर्चा झालेली आहे. तत्कालीन परिस्थितीत राम आणि शिवछत्रपती यांच्या स्वभावातील गुणातील कृतीतील साम्य जाणवल्याने भक्ताने जसे रामाजवळ राहावे, तसे प्रजाजनांनी शिवछत्रपतींच्या जवळ वस्ती करून राहणे त्यांच्या हिताचे, असे स्वामींच्या मनात असावे, हे स्पष्ट आहे.
 
 
७७३८७७८३२२

- सुरेश जाखडी
 
 
 
अग्रलेख
जरुर वाचा

Email

admin@mahamtb.com

Phone

+91 22 2416 3121