सर्व वेळ योगासनात खर्च करणे उचित नाही. आजकाल सर्वत्र योगासनांचा प्रचार होत आहे, ही चांगली गोष्ट आहे, पण योगासनेच योगशास्त्राचे सर्वस्व नाहीत. ‘अष्टांग योगा’पैकी तो केवळ एक भाग आहे एवढेच!
एक सुलभ साधना
अनेक साधनांचे स्वत: अनुभव घेतल्यानंतर ज्या एका परिणामकारक साधनेद्वारे लेखक या अवस्थेप्रत आलेला आहे, अशी एक सरळ साधना सर्वांकरिता प्रगट करीत आहे. या साधनेत भक्तियोग, कर्मयोग, राजयोग आणि या सर्वांमुळे ज्ञानयोगसुद्धा आहे. साधना अतिशय सरळ आणि सुलभ असून आबालवृद्ध, स्त्री-पुरुष तिचा अवलंब करु शकतात. रात्री झोपण्याच्या वेळी योगनिद्रा करून झोपावे. योगनिद्रेमुळे झोप फारच कमी होते. थोड्याशा झोपेने शरीराला पूर्ण आराम मिळून शरीर स्वस्थ आणि रोगविरहित प्रकृती असलेले बनते. साधनेकरिता शरीर प्रकृतिस्थ म्हणजे निरोगी पाहिजे. त्यासाठी काही योगासने करणे आवश्यक आहे. परंतु, सर्व वेळ योगासनात खर्च करणे उचित नाही. आजकाल सर्वत्र योगासनांचा प्रचार होत आहे, ही चांगली गोष्ट आहे, पण योगासनेच योगशास्त्राचे सर्वस्व नाहीत. ‘अष्टांग योगा’पैकी तो केवळ एक भाग आहे एवढेच!
साधना करण्याकरिता शरीरात पूर्ण शक्तीचा संचय होणे आवश्यक आहे. याकरिता साधकाने साधना संपल्यानंतर योगासने करावीत. दररोज ‘पश्चिमोत्तानासन’, ‘वज्रासन’, अर्ध वा पूर्ण ‘मच्छींद्रासन’, ‘गोमुखासन’, ‘शलभासन’, ‘सर्वांगासन’ आणि ‘मत्स्यासन’ अशी काही योगासने करावी. योगासने साधनेच्या अगोदर केल्यास शरीराला थकवा येण्याची शक्यता आहे आणि थकलेल्या शरीराने साधनेत मनाची लय आणि ध्यान लागणे कठीण आहे. म्हणून योगासने साधनेनंतर करावीत. साधनेच्या अगोदर काही खाणेपिणे योग्य नाही. प्रात:काळी पाणी पिऊन अमृतपान करतात, हेसुद्धा साधनेसाठी योग्य नाही. साधनासमयी मुखापासून गुदापर्यंत शरीरात काहीच असू नये. ज्यांना जलपानाची किंवा चहाची सवय आहे, त्यांनी काही दिवस चालू ठेवण्यास हरकत नाही. परंतु, हळूहळू त्यांनी त्या सवयीपासून आपली सुटका करुन घेतली पाहिजे. याकरिता भल्यापहाटे 4 वाजता उठून शौचमुखमार्जन आटोपून आसन मांडून साधकाने स्थानापन्न व्हावे. स्नान केल्यास चांगलेच आहे, पण काही कारणाने ते शक्य झाले नाही तरी चालेल. परंतु, साधनेला बसण्यापूर्वी शौचमुखमार्जन करणे अत्यावश्यक आहे. काहीजणांना सकाळीच मलविसर्जन होत नाही, पण अशांनीही शौचास मुद्दाम जाऊन हळूहळू मलविसर्जनाची प्रात:काळची सवय लावून घ्यावी, अन्यथा साधकाची प्रगती लवकर होणार नाही.
खाली दर्भासन, वर मृगचर्म किंवा स्वच्छ कांबळी आणि त्या सर्वांवर स्वच्छ, शुभ्र, सुती वस्त्र आंथरून त्या आसनावर ‘पद्मासन’ घालून किंवा न जमल्यास ‘सहजासन’ लावून बसावे. एकदा आसन लावल्यावर बैठक मोडू नये. आसन विजयाचा अभ्यास हळूहळू साधनाकालाबरोबर वाढत राहिला पाहिजे. तोंड पूर्व, उत्तर किंवा पश्चिम दिशेला करावे. निराकारपिंडी साधकाने केवळ आसन लावून आपल्या निराकार साधनेचा म्हणजे ध्यान, धारणा आणि समाधीचा अभ्यास करावा. साकारपिंडी साधकाने आपल्या समोर आपल्या इष्टदेवतेचे चित्र किंवा प्रतिमा ठेवावी. प्रतिमेला कुंकू वाहून, जे बोटाला लागलेले राहील तेच उर्वरित कुंकू आपल्या भ्रूमध्यामध्ये लावावे. हाच भक्ताला त्याच्या देवतेचा प्रसाद आहे. ज्यांना प्रतिमेला फूल वाहावयाचे असेल, त्यांनी तसे करण्यास हरकत नाही. परंतु, खर्या साधकाने या वरवरच्या दंभाचारामध्ये फार गुरफटून राहू नये.
दीपक त्राटक
नंतर प्रतिमेसमोर एखादा दीप किंवा उदबत्ती लावावी आणि त्याच्या ज्योतीच्या किंवा जळत्या टोकाकडे एकटक नेत्र लावून त्राटक करावे. डोळे एकाग्र करून ज्योतीकडे एकटक पाहण्याला ‘त्राटक’ म्हणतात. अशाप्रकारे ‘त्राटक’ करण्याने सुरुवातीला डोळ्यात पाणी येईल. प्रयत्न चालू ठेवल्यास पाणी आपोआप बंद होईल. त्यानंतर इष्टदेवतेचे एखादे संस्कृत स्तोत्र फार जोरात नाही आणि अगदी मनातही नाही अशाप्रकारे म्हणावे. स्तोत्र गायनात आपले मन लावावे म्हणजे आपले स्तोत्र आपल्यालाच ऐकू येईल. याला ‘लययोग’ म्हणतात. स्तोत्र एकदा संपल्यानंतर पुन्हा म्हणावे वा इष्टदेवतेचा एखादा मंत्र म्हणावा. सर्वात उत्तम म्हणजे गीतेचा एखादा अध्याय पाठ करून म्हणावा. स्तोत्रगायनाने मनाची लय लागून मन शिथिल होऊन चित्तनामक अवस्था सजीव होऊन उठते. अशाप्रकारे मन एकाग्र होऊन चित्तामधून संस्काराचा लोप होण्यास सुरुवात होते. चित्ताची मलिनता किंवा संस्कार हळूहळू क्षीण होत जातात. भगवान पतंजली या ध्यानयोगाचे वर्णन ‘ततः क्षीर्यते प्रकाशावरणम्।’ असे करतात. ध्यानात ही शक्ती आहे की, ते चित्तातील मलिनता आणि संस्कार हटवू शकते.
रंगानुभूती
अशाप्रकारे काही दिवस ध्यानयोग केल्यास काही अनुभव येतात. प्रथम साधकाच्या समोर ठेवलेल्या दीपाच्या किंवा उदबत्तीचा टोकाला एका ऐवजी दोन दिवे दिसतात. काही लोक याने घाबरून जातात आणि त्यांना वाटते की, आपले डोळे खराब होत आहेत. उलट ‘त्राटका’ने डोळे चांगले होतात. मग आपल्याला दोन ज्योती का दिसाव्यात? याचे एक वैज्ञानिक रहस्य आहे. आपल्याला दोन डोळे असून त्यात समोरच्या वस्तूची प्रतिमा दोन ठिकाणी पडते. परंतु, अशाप्रकारे दोन प्रतिमा उमटून सुद्धा आपण नेहमी एकच प्रतिमा पाहतो. कारण, आपले मन जे या दोन प्रतिमा ग्रहण करते, त्यांची एकच वस्तू बनवून आपल्याला दाखविते. प्रकृती आपल्याला दोनच प्रतिमा दाखवित असते, पण मन प्रकृतीच्या पलीकडे जाऊन दोहोंची एक प्रतिमा बनविते. म्हणून साधनेमुळे मन थकून प्रकृतिस्थ बनले म्हणजे आपल्याला पूर्ववत् दोन प्रतिमा दिसतात. ही मनाची मूळ प्राकृतिक अवस्था असून काहीच विकृती नाही, हे लक्षात घ्यावे.
नंतर साधकाला काही दिवसांनी ज्योतीच्या आजूबाजूला काही ‘प्रकाशशलाका’ किंवा काजव्याच्या प्रकाशासारख्या ठिणग्या दिसतात. सुरुवातीला या ठिणग्या पिवळ्या, लाल किंवा मातीच्या रंगाच्या असतील. नंतर क्रमाक्रमाने त्यांचा रंग हिरवा आणि निळा होईल. हा निळा रंग नंतर ज्योतीतून बाहेर आणि बाहेरुन ज्योतीकडे पसरत असलेला दिसेल. काही पंथांत शेवटी लालरंगाच्या गोलावर किंवा त्रिकोणावर दृष्टी स्थिर करण्यास सांगण्यात येते. हे फारच अशास्त्रीय असून साधकाला हानिकारक आहे. सुरुवातीला रंग लाल किंवा गोमेद राहील व नंतर तो हिरवा किंवा निळा बनेल. या प्रकाशक्रमाला उलट करुन सांगणारे तथाकथित महात्मे निश्चितच असाधक आणि अनुभूतिशून्य आहेत, असेच त्यांच्याबद्दल म्हणावे लागेल. आजकाल कोणीही उठतो आणि पैसा कमविण्यासाठी प्रचार करुन साधकांना काहीही सांगतो. फलस्वरुप साधकाची साधनेत प्रगती न होता त्याला शारीरिक कष्ट सहन करावे लागतात. ज्ञानेश्वर माऊली सर्व गुरूंचे गुरू आहेत. त्यांना शरण जावे म्हणजे साधनामार्ग निश्चितच सुकर होईल, अशी खात्री बाळगावी. (क्रमशः)
- योगिराज हरकरे
(शब्दांकन : राजेश कोल्हापुरे)