खेळ की राजकारण?

    03-Aug-2021
Total Views | 123

BCCI_1  H x W:
 
क्रिकेट हा जगातील प्रख्यात खेळांपैकी एक म्हणून ओळखला जातो. जगातील अनेक देशांकडून क्रिकेटच्या सामन्यांचे आयोजन केले जाते. ज्या देशांकडून क्रिकेटचे सामने खेळले जात नाहीत, त्या देशांत क्रिकेटप्रेमींचे वास्तव नाही, असे समजणे कदाचित चुकीचे ठरेल. अलीकडच्या काळात आपल्या देशाचा संघ नसला तरी या ठिकाणी क्रिकेटच्या खेळाला चालना मिळावी, या उद्देशाने विविध लीग स्पर्धांचे आयोजन करण्यात आल्याची अनेक उदाहरणे क्रिकेटच्या जगतात ताजी आहेत. आंतरराष्ट्रीय दर्जाच्या खेळाडूंसोबत आपल्या देशातील खेळाडूंचा संघात समावेश करून लीग स्पर्धांच्या माध्यमातून क्रिकेटचे सामने खेळले जातात. जेणेकरून आंतरराष्ट्रीय खेळाडूंसोबतच स्थानिक क्रिकेटपटूंनाही आपले कौशल्य सिद्ध करण्याची संधी मिळते, याच उद्देशाने लीग स्पर्धांचे आयोजन प्रामुख्याने केले जाते. मात्र, अलीकडे लीग स्पर्धांच्या आडून व्यावसायिकीकरणासोबतच राजकारण करण्याचाही घाट काही देशांनी घातला आहे. पाकिस्तान क्रिकेट बोर्डाकडून (पीसीबी) आयोजित केली जाणारी ‘काश्मीर प्रीमिअर लीग’ (केपीएल) ही यांपैकीच एक म्हटली तर ते अतिशयोक्तीचे ठरू नये. कारण, केवळ भारताला शह देण्याच्या उद्देशाने पाकिस्तानने पाकव्याप्त काश्मीर भागात ‘केपीएल’ ही लीग स्पर्धा भरवली असून, या ठिकाणी खेळण्यासाठी काही माजी आंतरराष्ट्रीय खेळाडूंना या ठिकाणी येऊन खेळण्याचे निमंत्रण दिले आहे. ‘भारतीय क्रिकेट नियामक मंडळा’ने (बीसीसीआय) मात्र आंतरराष्ट्रीय क्रिकेट परिषदेला (आयसीसी) याबाबत पत्र लिहून या लीग स्पर्धेसाठी परवानगी न देण्याबाबत विनंती केली आहे. एकप्रकारे भारताने हे योग्यच केले, असे म्हटल्यास चुकीचे ठरणार नाही. कारण, २००८ साली ‘आयपीएल’चे आयोजन सर्वात प्रथम करत भारताने क्रिकेटविश्वात नवक्रांती घडवली. लीग स्पर्धेच्या माध्यमातून व्यवसाय उत्तम होत असल्याचे लक्षात येताच अनेक देशांनी लीग स्पर्धांचे आयोजन करण्यास सुरुवात केली. यात पाकिस्तानही मागे राहिला नाही. 2015 साली ‘पीसीबी’ने ‘पीसीएल’ची सुरुवात केली. मात्र, ही स्पर्धा पाकिस्तानला काही स्वतःच्या धर्तीवर प्रत्येक वर्षी खेळविता आली नाही. ‘युएई’च्या धर्तीवर या स्पर्धांचे आयोजन पाकला करावे लागले. मात्र, ही परिस्थिती असतानाही पाकिस्तानकडून आता ‘केपीएल’चे आयोजन केले जात आहे. यामागे केवळ भारताला शह देण्याचेच राजकारण नाही, तर दुसरा उद्देश काय?
 
 
खेळाच्या पलीकडले...
 
 
 
पाकिस्तानने ‘पीसीएल’ आणि ‘केपीएल’ यांसारख्या लीग स्पर्धांचे आयोजन करत आपणही काही भारतापेक्षा कमी नसल्याचे दाखविण्याचा केविलवाणा प्रयत्न या माध्यमातून केला. ‘आयपीएल’ इतकी मोठी व्याप्ती या दोन्ही लीग स्पर्धांची नाही. ‘केपीएल’च्या आयोजनातून नेमके काय साध्य होणार, याची स्पष्टताही नाही. काश्मिरी नागरिकांना याचा काय लाभ होणार, याचे उत्तर नाही. मात्र, तरीही काहीतरी आपण वेगळे करतो, असे जगासमोर भासवायचे आणि आपल्या शेजारील राष्ट्राला या माध्यमातून शह द्यायचा हीच पाकिस्तानची यामागची केविलवाणी धडपड आहे. इतकेच होते तर मग ‘पीसीएल’चे आयोजन स्वदेशी धरतीऐवजी परदेशी धरतीवर करण्याची वेळ पाकिस्तानवर का ओढवली, याचे उत्तर पाकिस्तानला कधीही जगासमोर देता आलेले नाही. दहशतवादाच्या भीतीने अनेक आंतरराष्ट्रीय खेळाडू पाकिस्तानमध्ये येऊन खेळण्यास तयार नसल्याने अनेकदा ही लीग स्पर्धा ‘युएई’मध्येच भरवावी लागली. आता ‘केपीएल’चे आयोजन करत पाकिस्तान काही माजी आंतरराष्ट्रीय खेळाडूंना आपल्या धर्तीवरही क्रिकेट खेळणे सुरक्षित असल्याचे जगाला भासवू पाहत आहे. मात्र, पाकिस्तानने कितीही हमी दिली तरी श्रीलंकेच्या खेळाडूंवर झालेल्या दहशतवादी हल्ल्याच्या आठवणी आजही जगासमोर ताज्या आहेत, हे पाकिस्तानने विसरू नये. सुरक्षेच्या कारणात्सव ‘केपीएल’मध्ये आधीच काही देशांच्या खेळाडूंनी खेळण्यास स्पष्ट नकार दिला आहे. मात्र, काही खेळाडू खेळण्यास तयार झाले आहेत. परंतु, या लीग स्पर्धेत खेळल्यानंतर भारतासह इतर बड्या देशांसोबतचे त्यांचे खेळण्याबाबतचे करार निश्चितच संपुष्टात येणार आहेत. ‘क्रिकेटचे महाकुंभ’ म्हणवल्या जाणार्‍या ‘आयपीएल’च्या स्पर्धेत जगभरातील सर्व देशांच्या खेळाडूंना संधी मिळते. मात्र, शेजारी राष्ट्र असून आपल्या देशाच्या खेळाडूंना या ठिकाणी संधी मिळत नसल्याचा द्वेष पाकिस्तानच्या मनात आजही कायम आहे. दहशतवादी हल्ल्यांनंतर भारताने पाकिस्तानसोबत क्रिकेट खेळण्यास नकार दिल्यानंतर पाकिस्तान चलबिचल झाला आहे. जवळपास गेल्या दशकभरापासून पाकिस्तानचे खेळाडू ‘आयपीएल’पासून लांब आहेत. अनेकदा याबाबत ‘आयसीसी’कडे ओरड केल्यानंतरही दाद न मिळालेल्या पाकिस्तानने आता भारताला शह देण्याच्या उद्देशाने ‘केपीएल’चा घाट घातला आहे. खेळाच्या पलीकडले पाकिस्तानचे हे राजकारण, असे म्हटल्यास ते वावगे ठरणार नाही.
- रामचंद्र नाईक
अग्रलेख
जरुर वाचा

Email

admin@mahamtb.com

Phone

+91 22 2416 3121