समाजसेवा हे साध्य आहे, तर लोकप्रतिनिधित्व हे लोकांपर्यंत पोहोचण्याचे साधन आहे. या साधनाचा उपयोग करून जनसामान्यांची सेवा करणे हे सर्वांनाच शक्य होते, असे नाही. मात्र, बोरिवली मतदारसंघाचे भाजप आमदार सुनील दत्तात्रेय राणे यांनी ‘लॉकडाऊन’ काळात केलेले व्यापक मदतकार्य त्यांच्या मतदारसंघातील जनता कधीही विसरणार नाही. त्यांच्या या मदतकार्याचा या लेखात घेतलेला हा सविस्तर आढावा...
नाव : सुनील दत्तात्रेय राणे
राजकीय पक्ष : भारतीय जनता पक्ष
जबाबदारीचे पद : आमदार
कार्यक्षेत्र : बोरिवली विधानसभा क्षेत्र
संपर्क क्र. : ९८१९६००००९
कोरोना हे जागतिक महामारीचे संकट इतके भयानक रूप धारण करेल, याची कोणालाही कल्पना नव्हती. पण, जे समोर आले, त्याला तोंड देणे भाग होते आणि जनतेला धीर देणे हे महत्त्वाचे काम होते. कोरोनामुळे झालेली जागतिक वाताहात लक्षात घेता, सुनील राणे यांनी आपल्या मतदारसंघातील लोकांना धीर देण्याचे महत्त्वाचे काम केले. कोरोनावर अजून कोणतेही औषध सापडलेले नाही. त्यामुळे या संकटाला धीराने तोंड देण्याची लोकांची मानसिक तयारी करणे हे महत्त्वाचे काम त्यांनी कार्यकर्त्यांसह केले. दुसरे म्हणजे, कोणताही आजार परतवून लावायचा म्हणजे स्वच्छता महत्त्वाची असते. कोरोना विषाणू पसरू नये म्हणून सर्व रस्ते, झोपडपट्टी आणि सोसायट्यांच्या परिसराचे निर्जंतुकीकरण केले. नुसता परिसरच नव्हे, तर झोपडपट्ट्यांच्या गल्ल्या आणि इमारतींच्या मजल्यांचेही निर्जंतुकीकरण करण्यात आले. शिवाय, धूम्रफवारणीही करण्यात आली.
पोलिसांच्या खास परवानगीने बोट मिळवून गोराई-मनोरी गावातील गरजू व आदिवासी पाड्यातील नागरिकांना पोलिसांच्या मदतीने पुरेसे अन्नधान्य पाठविण्यात आले. कोरोनाच्या संकटकाळात येथील लोकांच्या चेहर्यावरचे हास्य ही आमच्या कामाची पोचपावती होती.
गरजू लोकांना अन्न
कोरोनामुळे सर्वच व्यवहार ठप्प झाल्याने खायचे काय, हा प्रश्न लोकांपुढे उभा राहणे साहजिकच होते. पण, त्यावर सुनील राणे यांनी अन्नछत्राचे उत्तर तयार ठेवले होते. राणे यांच्या मतदारसंघात चार ठिकाणी अन्नछत्र सुरू करण्यात आले होते. त्यामार्फत ‘अनलॉक’ सुरू होईपर्यंत गरजू लोकांना सकाळ-संध्याकाळ अन्न पुरविण्यात आले. शिवाय, अनेक लोकांना अन्नदान केंद्रावर तयार अन्नाचे वाटप करण्यात आले. बोरिवली मतदारसंघात खाडीपालीकडे गोराई-मनोरी गाव आहे. तेथे कोळी बांधव आणि गरीब आदिवासी आहेत. तेथे लोकांना अन्न कसे पुरवायचे हा प्रश्न होता. पण, त्यावरही राणे यांनी मात केली.
स्वच्छ पाण्याचा पुरवठा
अन्नाबरोबर पाणीही तितकेच महत्त्वाचे आहे. पाण्याला तर जीवन म्हटले आहे. ‘लॉकडाऊन’च्या काळात बोरिवली शहरातील खाडीपलीकडे गोराई-मनोरी गावात पाणीपुरवठ्याचा प्रश्न उद्भवला होता. तेथे साध्या पाण्याचे नव्हे, तर त्या गावातील नागरिकांना आरओ प्युरिफाईड पाण्याचा टँकर पाठविण्यात आला.
अन्नधान्याचे वाटप
काही लोकांना त्यांच्या घरात चूल (गॅस) पेटायला हवी होती. घरात शिजलेले अन्न नेहमीप्रमाणे पंगतीत जेवून, घरात हसते खेळते वातावरण ठेवून त्यांना या आजाराचा ताण कमी करायचा होता. अशा लोकांसाठी आम्ही अन्नधान्य पुरविले. गोराई-मनोरी गावातील गरजू व आदिवासी पाड्यातील नागरिकांना पोलिसांच्या मदतीने पुरेसे अन्नधान्य पाठविण्यात आले. त्यांच्याच हस्ते अन्नधान्याचे वाटप करून त्यांनाही लोकसेवेची संधी देण्यात आली.
ज्येष्ठ नागरिकांची विशेष काळजी
कोरोनाकाळात आजारी पडणार्यांत आणि मृत्यू पावणार्यांत ज्येष्ठ नागरिकांचे प्रमाण अधिक आहे. त्यामुळे त्यांची काळजी घेणे हे कर्तव्यच ठरते. त्यांची अन्नपाण्याविना आबाळ होऊ नये म्हणून ज्येष्ठ नागरिकांसाठी अन्नधान्याचे व फळांचे वाटप करण्यात आले. शिवाय, त्यांच्यासाठी औषधोपचार सेवा कायम सुरू ठेवण्यात आली.
‘पोलिसांच्या खास परवानगीने बोट मिळवून गोराई-मनोरी गावातील गरजू व आदिवासी पाड्यातील नागरिकांना पोलिसांच्या मदतीने पुरेसे अन्नधान्य पाठविण्यात आले. कोरोनाच्या संकटकाळात येथील लोकांच्या चेहर्यावरचे हास्य ही आमच्या कामाची पोचपावती होती.‘
मोबाईल आरोग्यसेवा
अन्नदान केल्याने लोकांची उपासमार टळली होती. पण, त्यांच्या आरोग्याचा प्रश्न कायम होता. ‘कोविड’मुळे सर्व खासगी दवाखाने डॉक्टरांनी बंद ठेवले होते. रुग्णालये कोविड निर्दालनाच्या कामात गुंतली होती. मग इतर आजाराच्या रुग्णांनी करायचे काय, हा प्रश्नच होता. त्यामुळे मतदारसंघातील नागरिकांसाठी ‘डॉक्टर आपल्या दारी’ हा उपक्रम राबवला. या उपक्रमातून ऑक्सिजन आणि तापमान तपासण्यात आले. त्यांच्या इतर आजारांची तपासणी करण्यात आली. विशेष म्हणजे, नागरिकांच्या संरक्षणासाठी जे पोलीस अहोरात्र मेहनत घेत होते, त्यांच्या आरोग्य तपासणीला प्राधान्य देण्यात आले.
आत्मनिर्भर भारत
कोरोनाकाळात सुमारे तीन महिने लोक घरात बसून होते. कोरोना प्रतिबंधासाठी लोकांकडे तोच एकमात्र उपाय होता. शिवाय, उद्योगव्यवसाय ठप्प झाले होते. अशावेळी लोकांना पुन्हा उभे करण्यासाठी त्यांना मदतीची गरज होती. मात्र, ती मेहेरबानी म्हणून नव्हे, तर त्यांना सन्मानाने जगण्यासाठी मदत हवी होती. त्यासाठी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आत्मनिर्भर भारताची संकल्पना प्रत्यक्षात आणली. ‘आत्मनिर्भर भारत’ या अभिनव योजनेद्वारा प्रेरित होऊन व स्वातंत्र्यदिनाचे औचित्य साधत, गोराई गाव, डोंगरी येथील महिलांना प्रधानमंत्री जीवन ज्योती विमा योजना/प्रधानमंत्री सुरक्षा विमा योजना या योजनांच्या सन्मानपत्रांचे वाटप करण्यात आले.
वृक्षवेलींना जीवदान
बोरिवली मतदारसंघातील नागरिकांची काळजी घेत असताना या निसर्गाची काळजी घेणे हेसुद्धा आपले कर्तव्य आहे. याचसाठी ‘स्वच्छ बोरिवली, हरित बोरिवली!’ या प्रकल्पाद्वारा मे महिन्याच्या कडक उन्हाळ्यात पिण्यायोग्य नसलेल्या पाण्याचा वापर करून बोरिवली शहरातील उद्यानांची निगा राखली. बोरिवलीतील काही उद्यानांत या प्रकल्पावर काम करण्यास प्रारंभ झाला. भविष्यातील बोरिवलीचे रूप हे हिरव्या छायेखाली राहावे, यासाठी हा एक निराळा प्रयत्न!
महत्त्वाची ११ कामे
१) गरीब आणि गरजू लोकांना अन्नदान
२) मतदारसंघात गरजवंतांना अन्नधान्य किटचे वाटप
३) ज्येष्ठ नागरिकांना फळफळावळ आणि अन्नधान्याचे वाटप
४) रहिवासी सोसायट्या, झोपडपट्ट्या, रस्ते, सार्वजनिक ठिकाणे येथे धूम्रफवारणी
५) इमारती, सोसायट्या यांचे पिण्याच्या पाण्याव्यतिरिक्त इतर पाण्याने सॅनिटायजेशन
६) गोराई-मनोरी भागात पाणीटंचाई निर्माण झाली असता आरओ प्युरिफायर पाण्याचे टँकरद्वारे वितरण
७) गार्डनमध्ये पाण्याचे सिंचन करून तेथील झाडांना जीवदान
८) नागरिकांच्या माहितीसाठी हेल्पलाईन
९) रुग्णालय, पोलीस ठाणे आणि महापालिकेत विभागांच्या माहितीसाठी नागरिकांकरिता हेल्पलाईन
१०) बाहेरगावी जाणार्यांसाठी मोफत आरोग्य प्रमाणपत्रे
११) नागरिकांच्या आरोग्य तपासणीसाठी मोबाईल व्हॅन
वडिलांकडून लोकसेवेचा वारसा
सुनील राणे यांचे वडील दत्तात्रेय राणे हे राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे स्वयंसेवक व गिरणी कामगार होते. गिरणी कामगारांच्या न्याय्य हक्कासाठी त्यांनी लढा उभारला. तेथून समाजसेवेचे बाळकडू मिळाले. वडील दत्तात्रेय राणे हेसुद्धा उच्च व तंत्रशिक्षण मंत्री होते. त्या माध्यमातून त्यांनी केलेले काम पाहिले. त्यामुळे शिक्षण चालू असतानाच सुनील राणे समाजकारणाकडे वळले. महाविद्यालयीन शिक्षण पूर्ण करून एअर इंडियाच्या सेवेत नोकरी केली. मात्र, २००० साली नोकरीचा राजीनामा देऊन पूर्णपणे समाजकारणात सक्रिय झाले. १९९७ ते २००० या काळात भाजपचे महाराष्ट्र युवा मोर्चा उपाध्यक्ष होते.
२००० ते २००३ या काळात मध्य दक्षिण मुंबईचे जिल्हा सरचिटणीस होते. २००३ पासून २००६ पर्यंत भाजपचे मध्य-दक्षिण मुंबई अध्यक्ष आणि २००६ पासून भाजपचे मुंबई सरचिटणीस होते. विविध पदांवर काम करत असताना तळागाळातील जनतेच्या समस्या जाणून घेऊन त्या सोडविण्याचा आटोकोट प्रयत्न केला. मुलींच्या शिक्षणासाठी अथर्व फाऊंडेशनच्या माध्यमातून मदतकार्य सुरू केले. या कामामुळेच २०१९ मध्ये ते बोरिवली विधानसभा मतदारसंघातून मोठ्या मताधिक्याने निवडून आले आणि बोरिवलीच्या नागरिकांना सर्वसामान्यांची कणव असलेला आमदार मिळाला.