उद्योगपतींची ‘कोरोना’वर अशीही मात...

    19-Nov-2020
Total Views |

Corona _1  H x

कोरोनाच्या संकटाशी सामना करण्यासाठी सरकार, सामाजिक संस्थांबरोबरच उद्योगजगतानेही महत्त्वपूर्ण भूमिका बजावली. आपली सामाजिक जबाबदारी ओळखून उद्योगवर्तुळातील जवळपास सर्वच बड्या उद्योजकांनी आपापल्या परीने या कोरोनाच्या संकटावर मात केली. त्याचा थोडक्यात घेतलेला हा आढावा...
 
कोरोनाच्या महामारीत अनेकांवर अनपेक्षित आपत्ती ओढवली. या जागतिक संकटाचा सामना सर्वांनाच करावा लागला. अगदी सर्वसामान्य नागरिकांपासून ते विशेष व्यक्तींपर्यंत सर्वांसमोरच समान स्वरुपात हे संकट उभे ठाकले. रोजंदारी-मजुरी करणार्‍यांना तर दोनवेळच्या जेवणाची भ्रांत पडली. लघु उद्योजकांपुढे देखील विविध पातळीवर प्रश्न निर्माण झाले, तर मोठ्या उद्योगांनाही तितक्याच मोठ्या समस्यांना तोंड द्यावे लागले.
 
या आणि अशा विविध प्रकारच्या समस्यांची सोडवणूक अनेकांनी व्यक्तिगत व सामूहिक पातळीवर केल्याचीही अनेक उदाहरणे आपल्या डोळ्यासमोर आहेत. कोरोनाचा कालखंड सुरु होताच, लक्षावधी गरीब व गरजू लोकांच्या रोजगार-व्यवसायाला जबरदस्त फटका बसला. या काळात गरीब-गरजूंना साहाय्य करण्यासाठी केंद्र सरकारने व्यापक व दीर्घकालीन स्वरुपाची मोफत धान्य पुरवठा योजना ज्या पद्धतीने राबविली, त्याला खरचं तोड नाही. तसेच सरकारी प्रयत्नांना सामाजिक व सेवाभावी व्यक्ती आणि संस्थांची मिळालेली साथही निश्चितच कौतुकास्पद आहे.
 
लघु उद्योजकांपुढे कोरोनामुळे आर्थिक-व्यावसायिक संकटे विविध स्वरुपात उभी ठाकली. त्यावर मात करण्यासाठी लघु उद्योजकही सरसावले आणि सावरलेसुद्धा. सुदैवाने त्यांना अर्थमंत्रालय, बँका-वित्तीय संस्था, सरकारचे धोरणात्मक निर्णय इत्यादीची साथ वेळेत मिळाली व तुलनेने कमी वेळात आपले लघु उद्योगसुद्धा सावरले.
 
अशा या कोरोना महामारीचा फटका आघाडीचे उद्योग-व्यवसाय आणि उद्योगपतींनाही बसला. उद्योगपतींपैकी राजीव बजाज, किरण मजुमदार-शॉ, प्रशांत भूषण यांनी आपापल्या आकलनानुसार कोरोना आणि त्याचे परिणामयांची कारणमीमांसा करताना, केंद्र सरकार आणि विशेषत: पंतप्रधानांच्या गेल्या सहा वर्षांतील आर्थिक ध्येय-धोरणांवर कडाडून टीका केली आणि आपली नैराश्यभावना प्रकर्षाने प्रकट केली. तसेच दुसरीकडे देशातील अधिकांश व आघाडीच्या उद्योगपतींनी या संकटावर केवळ यशस्वीपणे मात न करता, आपापले व्यवसाय क्षेत्र व त्याद्वारे देशाच्या अर्थकारणाला कशाप्रकारे बळकटी दिली, ते मुळातूनच अभ्यासण्यासारखे आहे.
 
‘फोर्ब्स’ मासिकाच्या जागतिक स्तरावरील अतिश्रीमंतांच्या मांदियाळीत ‘भारतातील सर्वात श्रीमंत व्यक्ती’ असा लौकिक रिलायन्स उद्योगसमूहाचे अध्यक्ष मुकेश अंबानी यांनी सातत्याने १३ वर्षे कायम राखला आहे. एवढेच नव्हे, तर ‘वेल्थ हरुन इंडिया रिच लिस्ट २०२०’ नुसार ‘लॉकडाऊन’ काळात मुकेश अंबानींच्या श्रीमंतीत दर तासाला सुमारे ९० कोटी रुपयांची भर पडत गेली. कोरोना काळातील मुकेश अंबानींची विशेष व्यावसायिक कामगिरी म्हणजे, त्यांनी कोरोनाच्या कठीण काळातही जागतिक व्यवसायाच्या दृष्टीने महत्त्वाच्या अशा गुगल, फेसबुक, इंटेल यांसारख्या कंपन्यांसह रिलायन्सचे व्यवसाय-व्यवहार विषयक करार मोठ्या निर्धाराने पूर्ण केले.
 
त्याचबरोबर आदित्य बिर्ला उद्योग समूहाचे अध्यक्ष कुमार मंगलम बिर्ला यांनी ‘कोविड-१९’च्या काळात ‘हिंडाल्को’ कंपनीच्या अधिग्रहणाशी संबंधित २०,४४० कोटी रुपयांचे व्यवहार मोठ्या दूरदर्शीपणे पूर्णत्त्वास नेले. या व्यवहारात अलेरिया कंपनीशी संबंधित प्रकिया अमेरिका, युरोपिय देश व एवढेच नव्हे तर चीनशी पण संबंधित होते. मात्र, ही कामगिरी बिर्ला यांनी मोठ्या कौशल्याने पूर्ण केली व परिणामी आता बिर्ला उद्योगतील ही कंपनी जगातील सर्वात मोठी अ‍ॅल्युमिनीयम उत्पादक कंपनी ठरली आहे. वैयक्तिक संदर्भात कुमार मंगलम बिर्ला यांच्याबद्दल असे सांगितले जाते की, त्यांच्या २० वर्षांच्या सफल व्यावसायिक कारकिर्दीत ते केवळ तीन वेळा वैतागले होते. पण, आपले ‘कूल’ स्वभाव वैशिष्ट्य त्यांनी कोरोना काळात कायम ठेवले, हे विशेष!
 
कोरोना काळातही गौतम अदानी यांनी ‘एअरपोर्ट ते पोर्ट’ या मूलभूत व महत्त्वाच्या क्षेत्रात मोठी कामगिरी केली. यामध्ये देशांतर्गत सर्व प्रमुख विमानतळांचे संचालन-व्यवस्थापन करण्यापासून त्यांच्या ‘अदानी पोर्ट्स’चे आंध्र प्रदेशातील ‘कृष्णपट्टनम पोर्ट’चे अधिग्रहण करण्यासाठी केलेली १२ हजार कोटींची गुंतवणूक व पर्यावरणपूरक व्यवसायात ४५ हजार कोटींचा नवा व्यवसाय सुरू करणे, हे त्यांचे कोरोना काळातील विशेष धोरणात्मक निर्णय म्हणावे लागतील.
 
कोटक महिंद्रा बँकेचे व्यवस्थापकीय संचालक उदय कोटक यांनी कोरोनानंतर उत्पादन क्षेत्राचे चीनमधून भारतात होणारे स्थलांतर केवळ भारताच्याच नव्हे, तर जागतिक दृष्टिकोनातून किती महत्त्वपूर्ण आहे, याविषयीचा महत्त्वाचा मुद्दा या दरम्यान मांडला. उदय कोटक यांच्या व्यापक व्यावसायिक धोरणांमुळेच कोरोना काळात केंद्र सरकारने कोटक यांची ‘आयएल अ‍ॅण्ड एफएस’चे गैर प्रशासनिक अध्यक्ष म्हणून फेरनिवड केली. याशिवाय सप्टेंबर २०२० मध्ये त्यांची ‘इंडो-ब्रिटेन ट्रेझरी’च्या अध्यक्षपदी फेरनिवड होण्याचा दुहेरी मानही त्यांना मिळाला.
 
कोरोनाची सुरूवात होताच, टाटा ट्रस्टचे अध्यक्ष रतन टाटा यांनीदेखील ५०० कोटींची मदत जाहीर केली व पुढे त्यात आणखी १०० कोटींची भर घालून, लगेच या मदतीची पूर्तताही केली. याशिवाय टाटा समूहाच्या कोरोनाविषयक ध्येय व धोरण आणि कार्यप्रणालीला मूर्तरूप देण्याचे महनीय कामदेखील रतन टाटांनी स्वतः केले.
 
जेएसडब्ल्यू ग्रुपचे अध्यक्ष व व्यावसायिक संचालक सज्जन जिंदाल यांनी कोरोनाग्रस्तांच्या मदतीसाठी ‘पीएम केअर्स’ या मदतनिधीमध्ये १०० कोटी रुपयांची राशी दिली. त्याशिवाय ‘जिंदाल स्टिल’च्या विविध कारखाने आणि आस्थापनांचा उपयोग ‘कोविड-१९’च्या रूग्णांसाठी करून दिला. त्याद्वारे शेकडो रूग्णांवर उपचार तर झालेच, शिवाय चार लाख गरजूंची भोजन व्यवस्था जिंदाल समूहाद्वारे करण्यात आली. व्यवसायाबरोबरच ‘लॉकडाऊन’ दरम्यान सज्जन जिंदाल यांनी आपला दैनंदिन व्यायाम घरच्या घरी सुरुच ठेवून एकप्रकारे सर्व उद्योजकांना उद्योगाबरोबरच आपल्या वैयक्तिक स्वास्थ्याचीही काळजी घेण्याचा संदेश दिला.
 
 
कोरोना काळ तसा अनेकांसाठी अनेकार्थांनी कसोटीचा ठरला. व्यक्तिगत ते व्यावसायिक स्तरावर सर्वांनी त्यावर तोडगा काढला. आकस्मिकपणे आलेल्या या महासंकटावर मात करण्याच्या प्रकियेत शासन व समाजानेही कसोशीने प्रयत्न केले. त्यांच्या या प्रयत्नांना उद्योग आणि उद्योगपतींनी जी साथ दिली, ती प्रातिनिधिकच नव्हे, तर परिणामकारक ठरली. याचनिमित्ताने उद्योग-व्यवसायाची नाळ गरजू व्यक्तींशी अधिक घट्ट झाली, हेच खरे.
 
 
- दत्तात्रय आंबुलकर

(लेखक एच. आर व्यवस्थापन सल्लागार आहेत.)
९८२२८४७८८६
अग्रलेख
जरुर वाचा

Email

admin@mahamtb.com

Phone

+91 22 2416 3121