वायव्य सरहद्द, ‘फाटा’ आणि ग्रेट गेमचे उद्योग

    30-May-2025
Total Views | 61

वायव्य सरहद्द, ‘फाटा’ आणि ग्रेट गेमचे उद्योग

ऑपरेशन सिंदूर दरम्यान पाकिस्तानच्या फाळणीचा विषय पुन्हा चर्चेत आला. नजीकच्या भविष्यात पाकिस्तानची फाळणी होईल का? याबद्दल जाणून घेताना, आपण गेल्या दोन लेखांमध्ये बलुचिस्तान आणि सिंध प्रांताबद्दल माहिती घेतली होती. आता बघूया वायव्य सरहद्द प्रांताकडे...


लाकडाचा मोठा ओंडका कापून झाला की, त्याचे दोन तुकडे पुन्हा एकत्र येऊ नयेत म्हणून, सुतार लोक त्या दोन तुकड्यांच्या मध्ये एक लोखंडी हत्यार खुपसून ठेवतात. त्या हत्याराला पाचर असे नाव आहे. यावरून भाषेमध्ये ‘पाचर मारणे’ असा शब्दप्रयोग निर्माण झालेला आहे.


राजकारणात या पाचर मारण्याला अतोनात महत्त्व आहे. पाकिस्तानची निर्मिती हीच मुळात इंग्रजांनी भारतीय राजकारणात मारून ठेवलेली एक जबरदस्त पाचर आहे. १९४५ पर्यंत ब्रिटिश पंतप्रधान चर्चिल आणि नंतरचा पंतप्रधान क्लेमंट अॅटली हे पाकिस्ताननिर्मितीसाठी फारसे उत्सुक नव्हते. पण त्यांना त्याबाबत गंभीरपणे विचार करायला उद्युक्त केले, ते १९४३ पासून १९४७ पर्यंत भारताचा व्हाईसरॉय असलेल्या लॉर्ड वेव्हेलने. वेव्हेल हा मुळात राजकारणी नव्हे, तर सेनापती होता. मध्य पूर्वेत जर्मन सेनापती जनरल रोमेलशी टक्कर देणार्या जनरल अर्चिबाल्ड वेव्हेलला चर्चिलने, प्रथम भारताचा सेनापती आणि मग भारताचा व्हाईसरॉय बनवले. चर्चिल भारताला स्वातंत्र्य देण्याच्या पूर्णपणे विरुद्घ होता. पण भारतातली स्थिती प्रत्यक्ष अनुभवणार्या वेव्हेलला स्पष्टपणे कळत होते की, युद्घ संपल्यावर भारताला स्वातंत्र्य दिल्याखेरीज गत्यंतर नाही. शिवाय, रशियन आघाडीवर जर्मन सेना मार खात होत्या. म्हणजे युद्घानंतरचा सोव्हिएत रशिया पुन्हा दक्षिणेकडे इराण नि अफगाणिस्तानकडे वळून अरबी सुमद्रात उतरण्याचा प्रयत्न करू शकतो. त्यासाठी आपण अफगाणिस्तानची पाचर मारून ठेवलेली आहेच. पण रशियाचा काही भरवसा नाही. तसाच भारतात आपण ज्यांना सत्ता सोपवू, त्या काँग्रेस पक्षाचाही काही भरवसा नाही. तेव्हा काही झाले, तरी रशिया कराची बंदरापर्यंत पोहोचता कामा नये. मग पाकिस्तान ही आणखी एक पाचर मारून ठेवा. रशियन विस्तारवाद आणि अरबी समुद्र यांच्यामध्ये दोन पाचरी, एक अफगाणिस्तान आणि दुसरी पाकिस्तान. शिवाय, पाकिस्तान निर्माण झाल्यामुळे भारत दुबळा बनून जाईल. किती अचूक डावपेच आहेत पाहा.


व्हाईसरॉयचा कार्यकाळ चार वर्षांचा असायचा. अर्थात सरकारच्या सोयीनुसार तो वाढूही शकत असे. पण वेव्हेलचे हुजूरपक्षीय चर्चिलशी जमले नाही, तसेच मजूरपक्षीय अॅटलीशीही जमले नाही. १९४३ ते ४७ हा चार वर्षांचा कार्यकाळ झाल्यावर त्याला माघारी बोलावण्यात आले. मात्र, भारताची फाळणी करण्याचा त्याचा सल्ला अॅटली मंत्रिमंडळाने स्वीकारला.


१७व्या शतकात ब्रिटन आणि फ्रान्स आपापल्या साम्राज्यविस्ताराच्या उद्योगात गुंतलेले असतानाच, रशियाचा झार पीटर-द-ग्रेट हाही शांतपणे आपले साम्राज्य वाढवत होता. सन १७२५ मध्ये तो मेल्यावर कॅथरीन-द-ग्रेट, दुसरा पीटर, राणी अॅना, चौथा इव्हान, तिसरा पीटर इत्यादी त्याच्या वारसदारांनी साम्राज्य वाढते ठेवले. १९व्या शतकात त्यांनी चिनी तुर्कस्तान म्हणजे आजचे कझाकस्तान, उझबेकिस्तान इत्यादी देश जिंकले. आता त्यांची दृष्टी भारताकडे वळली. हे पाहिल्यावर भारत जिंकून बसलेले इंग्रज सावध झाले. चिनी तुर्कस्तान आणि भारत यांच्या हद्दीवरच्या पठाणी टोळीवाल्यांच्या प्रदेशात अनेक छोटी-मोठी राज्ये विखुरलेली होती. इंग्रजांनी ती जिंकून घेण्याचा प्रयत्न केला, पण ते जमले नाही. तेव्हा धूर्त इंग्रजांनी सर्वांत प्रबळ असलेल्या दोस्त मोहम्मद खान या पठाण टोळीप्रमुखाला भरपूर पैसे दिले. अफगाणिस्तान हा एक नवीनच देश बनवला आणि दोस्त मोहम्मदला त्याचा प्रमुख किंवा ‘अमीर’ असे जाहीर करून, लगेच त्याला मान्यता दिली. म्हणजे एकीकडे रशिया, एकीकडे इराण आणि एकीकडे चीन यांच्यामध्ये अफगाणिस्तान ही नवी पाचर ठोकली. ही घटना १८५५ सालची.



इंग्रजांनी आपल्या परीने असे प्रयत्न केले, तरी रशियाचेही अफगाणिस्तानातले हेरात हे सीमेवरचे महत्त्वाचे शहर जिंकून घेण्याचे प्रयत्न चालूच होते. याकरिता इंग्रज मुत्सद्दी सर मॉर्टिमर ड्युरांड याने खूप प्रयत्न करून तोडगा काढला. याच ड्युरांडने तत्कालीन ब्रिटिश इंडियाचे बलुचिस्तान, सिंध, पंजाब हे प्रांत आणि अफगाणिस्तान यांच्या सीमा निश्चित करणारी रेषा ठरवली. म्हणून तिला ‘ड्युरांड लाईन’ असे म्हटले जाते. इंग्रजांच्या या राजकारणालाच ‘ग्रेट गेम’ म्हणतात.

आता गंमत अशी होती की, अफगाणिस्तान हा अफगाण लोकांचा किंवा पठाण लोकांचा नवा देश तर निर्माण झाला. पण, लोकसंख्येच्या हिशोबात त्यात पठाण किंवा पश्तुन लोकांची संख्या जेमतेम ४० टक्के होती, तर ताजिक, हाजरा, उझबेक, ऐमक, तुर्कमेन आणि बलोच यांची एकंदर संख्या ६० टक्के होती. मग आता पठाणांच्या देशात पठाणांची संख्या जास्त असली पाहिजे. त्यासाठी पंजाब प्रांतातील पठाणी बहुसंख्येचा भाग आम्हाला द्या, अशी अफगाणिस्तानच्या अमीराची इंग्रजांकडे मागणी होती. धूर्त इंग्रजांनी त्याकडे दुर्लक्ष केले. म्हणजे बघा, रशिया आणि भारतीय साम्राज्य यात पाचर म्हणून पठाणांना मोठे केले; पण ते डोईजड होऊ नयेत, म्हणून त्यांच्याच देशात त्यांची संख्या कमी राहील, हेही पाहिले. उलट १९०१ साली पंजाब प्रांतातून पठाणांची संख्या जास्त असलेले जिल्हे वेगळे काढून, त्यांचा एक वेगळा प्रांत बनवला आणि त्याला नाव दिले, वायव्य सरहद्द प्रांत.

आता मुळात हे पठाणबहुल जिल्हे पंजाब प्रांतात का होते? तर, १९व्या शतकात ते शीखांचा राजा रणजितसिंग याने अफगाणांचा अमीर शहा शुजा याच्याकडून जिंकून घेतले. इंग्रजांनी शीखांचा पराभव केल्यावर ते इंग्रजांकडे आले. पण पंजाबी मुसलमान आणि पठाण यांचे अजिबात जमत नव्हते. त्यामुळे पंजाब प्रांतातून आपल्याला वेगळे काढल्यावर पठाण खूष झाले. आता त्यांनी शांतपणे नांदायला हरकत नव्हती पण... लगेच १९१० साली त्यांनी चळवळ सुरू केली की, अफगाणिस्तानप्रमाणेच हा वायव्य सरहद्द प्रांत एक वेगळा देश बनवा आणि ‘पख्तुनिस्तान’ या नावाने तो आमच्या ताब्यात द्या. १९११ साली या चळवळीला एका तगडा नेता मिळाला, सरहद्द गांधी.

खान अब्दुल गफार खान ऊर्फ बादशहा खान ऊर्फ सरहद्द गांधी आणि त्यांचे धाकटे भाऊ अब्दुल जब्बार खान ऊर्फ डॉ. खान साहेब यांनी ‘खुदाई खिदमतगार’ नावाची संघटना काढून, १९३७ची प्रांतिक निवडणूक लढवली. त्यांचे मंत्रिमंडळ आले. डॉ. खान साहेब मुख्यमंत्री बनलेे. १९४१ नंतर ‘मुस्लीम लीग’ने पाकिस्तानसाठी जोरदार चळवळ सुरू केली. जिनांच्या संभाव्य पाकिस्तानात वायव्य सरहद्द प्रांत अर्थातच होता. पण, खुद्द वायव्य सरहद्द प्रांतातल्या मुसलमानांना पाकिस्तानात सामील होण्यात काहीही स्वारस्य नव्हते. त्यांना अफगाणिस्तानान सामील व्हायचे नव्हते; त्यांना पाकिस्तानात सामील व्हायचे नव्हते. त्यांना पख्तुनी मुसलमानांचा, पुश्तु भाषा बोलणार्या लोकांचा स्वतंत्र ‘पख्तुनिस्तान’ हवा होता. आणि तो जर मिळणार नसेलच, तर हिंदू भारताचा एक प्रांत म्हणून राहण्याची त्यांची तयारी होती. त्यांना जिनांचा द्विराष्ट्रवादाचा सिद्धांत अजिबात मान्य नव्हता. तसे त्यांनी जाहीरपणे सांगितले होते.

म्हणूनच जेव्हा १९४७ साली काँग्रेसने फाळणी मान्य करून वायव्य सरहद्द प्रांतावर पाकिस्तानचे स्वामित्व मान्य केले, तेव्हा बादशहा खान वैतागून म्हणाले, "तुम्ही आम्हाला लांडग्यांसमोर टाकलेत.” इंग्रजांच्या धूर्तपणाची कमाल म्हणजे, त्यांनी जाता जाता वायव्य सरहद्द प्रांताला आणखी तोडले. मैदानी भागातले जिल्हे वायव्य सरहद्द प्रांतात ठेवले आणि दुर्गम पहाडी भागांचा एक वेगळाच प्रशासकीय विभाग बनवून, तो पाकिस्तानी केंद्र सरकारच्या थेट अखत्यारीत ठेवला. त्याला नाव दिले ’फेडरली अॅडमिनिस्टर्ड ट्रायबल एरिया’ म्हणजेच एफ. ए. टी. ए. किंवा ‘फाटा.’

आता जिनांची हिंमत बघा. भारत, पाकिस्तान निर्माण झाल्यावर फक्त सव्वादोन महिन्यांतच जिनांच्या आदेशाने, पाकिस्तानी सैन्याने पठाणी टोळीवाल्यांना काश्मीरवर सोडले. इकडे बादशहा खानांच्या लोकांनी स्वतंत्र पख्तुनिस्तान हवे म्हणून उठाव केला, तेव्हा जिनांनी बादशहा खान आणि त्यांच्या किमान एक हजार अनुयायांना उचलून तुरुंगात टाकले. पाकिस्तानी सैन्याच्या पाच बटालियन्स म्हणजे किमान पाच हजार सैनिक वायव्य सरहद्द प्रांतात पाठवले आणि पठाणांचा उठाव दडपून टाकण्यासाठी, बेधडक दडपशाही करण्याचे सर्वाधिकार दिले. एकीकडे भारताशी लढत असतानाच, दुसरीकडे पठाणांशी पंगा घेण्याची ही जिगर दाखवल्याबद्दल जिनांना मानायला हवे.

पुढे अल्पावधीतच जिना मरण पावले. पण पंजाबी मुसलमान पंतप्रधान लियाकत अली खान यांनी अतिशय हुशारीने सगळ्या पठाण बंडखोरांना सार्वत्रिक माफी जाहीर केली. त्याचबरोबर सरहद्द प्रांतासाठी अनेक विकासप्रकल्प जाहीर केले. या गाजर दाखवण्याचा परिणाम झाला. जमीनदार, व्यावसायिक, मध्यम व्यापारी, नोकरदार हा वर्ग पाकिस्तानी राज्यकर्त्यांना पाठिंबा देऊ लागला. खुद्द बादशहा खानांनी आपला स्वतंत्र पख्तुनिस्तानचा आग्रह सोडला. ‘आम्हाला स्वातंत्र्याऐवजी स्वायत्तता द्या,’ असे ते म्हणू लागले.

यानंतर आजपर्यंत बादशहा खान, त्यांचा मुलगा अब्दुल वली खान भाणि नंतरचे लोक यांनी आपल्या राजकीय भूमिका वारंवार बदलल्यामुळे, त्यांच्या स्वतंत्र पख्तुनिस्तानच्या मागणीला कोणतेही वजन उरले नाही. २०१८ साली पाकिस्तान संसदेने एफ. ए. टी. ए. ऊर्फ ‘फाटा’ हा इंग्रजांनी पाडलेला तुकडा वायव्य सरहद्द प्रांतात विलीन केला आणि वायव्य सरहद्द प्रांतालाच नवे नाव दिले ’खैबर पख्तुनख्वा प्रांत’.

हे नाव ठेवून पाकिस्तानने एक प्रकारे अफगाणिस्तानला इशारा दिला आहे की, तुम्ही काबूल नदीच्या खोर्यातले पख्तुन आहात आणि हे आमच्या देशातले पठाण खैबर खिंडीच्या परिसरातले आहेत. ते तुमच्यापेक्षा वेगळे आहेत. तेव्हा यांना भडकावून स्वतंत्र पख्तुनिस्तान किंवा अफगाणिस्तानातच सामील होण्याची स्वप्ने दाखवू नका.

या सगळ्या विश्लेषणाचा निष्कर्ष हा की, बलुचिस्तानची स्वातंत्र्यासाठी चाललेली सशस्त्र चळवळ हा पाकिस्तानला धोका ठरू शकतो. पण सिंध किंवा खैबर पख्तुनख्वामधली चळवळ यांचा तसा परिणाम होण्याची शयता निदान बाह्यतः तरी दिसत नाही. सिंधी हे बलुचींप्रमाणे लढाऊ नाहीत म्हणून आणि पख्तुन हे लढाऊ आहेत पण संघटित नाहीत म्हणून, त्यांच्या चळवळी निष्प्रभ आहेत, असे दिसते.

मल्हार कृष्ण गोखले
'मुंबई तरुण भारत'चं व्हॉट्सअप चॅनल फॉलो करा!
अग्रलेख
जरुर वाचा

Email

admin@mahamtb.com

Phone

+91 22 2416 3121