बालरंगभूमी एक सुपीक जमीन

    25-May-2025
Total Views |
Children
नाटक ही कला जीवन जगायाल शिकवणारी कला आहे. नाटकातील विविध अंगातून माणूस काहीतरी शिकतोच. हा नियम जसा मोठ्यांच्याबाबतीत, तसाच तो बालनाट्यालाही लागू होतो. उलटपक्षी लहान मुले नाटकांमधून बरेच काही अवगत करतात. त्यामुळे त्यांचे व्यक्तिमत्त्व देखील विकसित होते. नाटकातून नेमका काय लाभ होतो याचा घेतलेला आढावा...


मा गील काही लेखांतून मी बालरंगभूमीबद्दल भरभरून लिहिले आहे. त्याची व्याप्ती, त्याची खोली, त्याची उंची यांबद्दल लिहित आले. कधी मी तिची युद्धभूमीशी तुलना केली, तर कधी तिची माहिती पटवून देण्यासाठी एक वाय लिहिले, ‘बालनाट्य सृष्टीची किती बोलू कौतुके परि जीवन-कोषाशी ही पैजा जिंके.’ या लेखात ठराविक दहा मुद्दे मांडणार असून, त्यातूनच पुढच्या लेखांमधून यावर मुलांचे काय मत आहे, ते तुम्हाला स्पष्ट होईल. हा लेख त्या सर्वच वाचकांसाठी आहे जे पालक आहेत, ज्यांनी बालनाट्यात काम केले आहे किंवा ते प्रेक्षक आहेत. अशाही वाचकांसाठी आहे, जे बालनाट्य प्रशिक्षक आहेत. प्रथमदर्शनी या दहा गोष्टी मुलांबरोबर होताना दिसतील पण, मागच्या लेखात म्हटले तसे बालरंगभूमीची व्याप्ती मोठी असल्याकारणाने, एका लेखात उतरवणे अशयप्राय आहे.
१. संवाद कौशल्य

माणूस संवाद कौशल्यातून जग जिंकू शकतो. याला तीन भागांत विभागता येईल ऐकणे, विचार करणे, व्यक्त करणे. समोरच्याचे ऐकणे, ते समजून घेऊन मग त्यावर बोलणे. एखादे वाय चार वेळा वेगवेगळ्या प्रकारे म्हणून पाहणे, संवादातला सूर ओळखणे, त्यावर चर्चा करणे. लेखकाला नेमके काय म्हणायचे आहे? त्याने आई आणि सोनूमधला संवाद असा का लिहिला असेल बरं? ही वाय अशीच का लिहिली असतील असे प्रश्न विचारणे, या वायाला पर्यायी वाय तू कोणते घेशील? नाटकाचे लेखन हे वाचून नाही तर बोलून, सादर करून पोहोचते. संवाद साधणे, संवादातील सहजता गवसेपर्यंत म्हणून बघणे आणि मग शब्दातून, देहबोलीतून व्यक्त करणे ही नाटकाची प्रक्रिया. शब्दांमधील ठहराव, गती, अंतर, स्वल्पविराम, आवाज, शब्दांचा वापर, भाषेची गोडी, शांततेतून व नजरेतून होणारा अबोल संवाद या आणि अशा सगळ्यांची मुलांना ओळख होते. नाटक आवाजाकडे बघायला शिकवते, संवादातला सूर ओळखायला शिकवते.

२. संकल्प ते सिद्धी


एकदा का संवाद साधता आला की, हळूहळू नाटक समजावून घेऊन हे नाटक आपले आहे आणि आपण सगळ्यांसमोर सादर करायचे असल्याने, त्याकरिता वाटेल तेवढा वेळ आणि काम करण्याची तयारी मुलांमध्ये असते. जोपर्यंत ते सादर होत नाही, तोपर्यंत सातत्य आणि मेहनतीची पराकाष्ठा करताना मुले दिसतात. जोपर्यंत प्रेक्षकांवर हवा तसा प्रभाव पडत नाही, तोपर्यंत मुलांनाही चैन पडत नाही. याच प्रक्रियेत कल्पनाविष्कार होतो. त्यांना नाटक घडताना दिसत असते आणि अत्यंत सकारात्मक दृष्टिकोन ठेवून ते उत्सवासारखे नाट्यप्रयोग करतात. यातून मुलांची इच्छाशक्तीच प्रबळ होते, असा माझा अनुभव आहे.

३. आत्मविश्वास


नाटकाच्या मोकळ्या-ढाकळ्या, सर्वांना सामावून घेणार्‍या वातावरणात मुले मोकळी होतात. भीती वाटली तरी ती हळूहळू कमी होते. कारण, एखादे वाय, एखादी हालचाल, लकब घेताना त्याला वेळ दिला जातो, चुका होतातच. मात्र, चुकांमधून शिकायला जागा असते. अवघडल्यासारखे वाटते तेव्हा वातावरण आम्ही सहज करतो. अतिसहजता जी घातक ठरू शकते अशी जर असेल, तर त्याला लगाम घातला जातो पण, ते सुद्धा प्रेमानेच. आपले सहकलाकार आणि आपण एक कुटुंब आहोत आणि इथे मी माझ्यासारखा वागू शकतो, इतकी सहजता तालमीत आवश्यक. एकदा का आत्मविश्वास बळावला की? अशय असे काहीच नाही. सराव, सातत्य, शिस्त आणि समज वाढली की, अभिनेता तयार होतो. आत्मविश्वासाने ओतप्रोत.

४. मन वळवण्याचे कौशल्य


आपल्या अभिनयाने प्रेक्षकांचे नुसते मनोरंजनच न करता, दिलेल्या भूमिकेतून विचार पोहोचवता आले. खोट्याच्या खर्‍या आभासाचे कौशल्य मुलांना जमायला लागते. मग प्रेक्षक आपल्याला ऐकत आहेत, आपल्याकडे बघत आहेत, ही पायरी गाठल्यावर तो आपसूकच स्वतःवर काम करायला लागतो. मग मी घरी कसे माझे म्हणणे पटवून दिले, याचे किस्से सांगायला लागतो. पण, हे लगेच होत नाही तर काही काळ जावा लागतो. त्याचा सभाधीटपणा वाढला की, आपोआप त्याला मने जिंकता येतात.

५. व्यक्तिमत्त्वाचा सर्वांगीण विकास


विकास हा नाट्यकलेचे उपफळ म्हणता येईल. एक अभिनेता, एक अभिनेत्री म्हणून जेव्हा नाटकात काम करायचे असते, तेव्हा स्वतःकडे बघणेही आवश्यक असते. व्यक्तिमत्त्वात बदल घडवून आणणे, स्वतःला प्रयोगशील बनवल्याने नानाविध नाट्यखेळातून स्वतःची ओळख नव्याने होते. अभिनयाचे चार प्रकार म्हणजे वाचिक, आंगिक, आहार्य आणि सात्विक. सोप्या शब्दात सांगायचे झाले तर बोलायचे कसे, चालायचे कसे, राहायचे कसे, वागायचे कसे हे मुले शिकतात. मग यात नृत्य, संगीत, रंग, वेशभूषा, केशभूषा आणि यात नाव, रस समजावून सांगणे हे सगळेच असल्यामुळे अभिनेता, अभिनेत्रींकडून अभ्यासपूर्ण तयारी करून घेतली जाते. त्यामुळे एक व्यक्ती म्हणून सर्वांगांनी गोष्टींचा, व्यक्तींचा, स्वभावाचा विचार होतो. मग एक दिवस विद्यार्थ्याला आपण बदलतो आहोत, आपल्यात सुंदर असे बदल होत आहेत, याची जाणीव होते. ही प्रक्रिया विलक्षण असते.

६. आयुष्याकडे बघण्याचा दृष्टिकोन


अनेकदा मी मुलांचा आयुष्याकडे बघण्याचा दृष्टिकोन बदललेला पाहिला आहे. हे घडते कारण नाटकाची संहिता त्यांना तसे करायला भाग पाडते. एखादी गोष्ट वाचली किंवा ऐकली की, त्यातून बोध होतो. पण, इथे मुले ती गोष्ट नाट्यस्वरूपात अनुभवत असतात, ते नाटक जगतात. मग ते नाटक सादर करत असतात तेव्हा ते ते राहत नाहीत, तर ते पात्र होतात. मग ती गोष्ट अफझलखानाची असो वा छत्रपती शिवाजी महाराजांची. काय केल्याने काय होते इथपासून, कसे वागायचे आणि कसे वागायचे नाही इथपर्यंत मुले शिकतात. मनाला लेश पोहोचतो, यातना होतात पण, रसाभ्यास करताना हे सारेच आवश्यक असते. इथे प्रशिक्षकाची भूमिका महत्त्वाची ठरते. तालमी दरम्यान आणि तालमीनंतरची चर्चाही महत्त्वाची ठरते. हे काम करायला मला विशेष आवडते. कारण, मुलांचे मन निर्मळ असते आणि त्यांच्यावर होणारा परिणाम पुढील आयुष्यासाठी महत्त्वाचा ठरतो. अत्यंत जबाबदारीने मी हे काम करते.

७. आध्यात्मिक विकास : आत्मबल, आत्मशोध. मी कोण आहे?


मुले अत्यंत संवेदनशील असतात आणि हळवी, विचारी आणि बुद्धिमानसुद्धा. मुलांना अनेक प्रश्न पडतात, अनेक वेळा ते नाटकातून स्वतःचा शोध घेऊ पाहतात. मी कोण आहे, ते असे का आहेत, हे जग असे का आहे, यांपासून आम्ही कसे असायला हवे, हे जग कसे असायला हवे, असा विचार करून माझ्याशी येऊन चर्चा करतात. त्यासाठी माझ्या शेजारी येऊन बसतात. पुढे जाऊन ही मुले कोण होणार आहेत, याचा मीही नकळत अभ्यास करायला लागते.

८. सेवाभाव


माणसाने माणसाच्या कामी यावे, हे सारे जग आपलेसे करावे, स्नेहभाव अर्पावा, मोठा विचार करावा, हेच नाटक शिकवते. बालनाट्यात सगळी कामे मुलांना करायची असतात. पूजा करण्यापासून, नेपथ्य आवरून घरी जाईपर्यंत. आज माझा प्रवेश झाला नाही, तरी मी माझ्या मित्राला कशी मदत करू, याचा विचार विद्यार्थ्याला आलाच पाहिजे. नाटक जबाबदारीने वागायला शिकवते.

९. लोक कौशल्य


मुलांमध्ये सहसा जाती, वर्ण, मोठे, छोटे असे भेद नसल्याकारणाने, एकी फार लवकर होते. मग नाटक, अभिनय हे केवळ त्यांच्यापुरतेच मर्यादित राहात नाही. नाटकाचे सादरीकरण ही एक सांघिक कला असून, एकत्र येऊन ते विचार करतात. त्यामुळे ‘संघे शक्तिः कलौ युगे’ हे वेगळे सांगायची गरज भासतच नाही. अगदी माणूस ओळखणे नाही पण, आपल्याबरोबर काम करणार्‍या मुलाला समजून घेणे, त्याच्या भावनांचा आदर करणे, एकमेकांशी प्रेमाने वागणे, इतरांप्रति सहानुभूती, अशी संवेदनशीलता मुलांमध्ये बघायला मिळते.

१०. कल्पनाशक्ती वाढते


नाट्यसृष्टीचा पाया कल्पनाशक्ती आहे. एका कल्पनेतूनच दुसरीचा जन्म, हे अविरत चालत असलेल्या नटराजाच्या नृत्यासारखे आहे. सततच्या चलित असलेल्या कलेचा एक पाय जमिनीवर, तर दुसरा पाय आकाशाच्या दिशेला आहे. बाल्यावस्थेतली कल्पना जेव्हा नाट्यस्वरूप घेते, तेव्हा कल्पनाशक्तीचे स्वरूप विशाल होते, प्रेक्षकांचे डोळे विस्फारतात आणि वेगळ्याच जगात घेऊन जातात. क्षणार्धात इथून तिथे पाठवण्याचे सामर्थ्य नाट्यकलेत आहे.

असे हे दहा मुद्दे मी तुमच्यासमोर मांडत असताना, मला अजून दहा मुद्दे आठवले. पण, त्याविषयी कधीतरी नंतर सांगेन. कारण, ते मुद्दे नंतरच्या टप्प्यात पाहायला मिळतात. हे सारे काही घडत असते पण, हे सारे पाहायला मिळण्यासाठी प्रशिक्षक तसा हवा, मुलांमध्ये निष्ठा हवी, मुलांचे विषय निवडताना सजगता हवी. मुले नाटकाचा तास संपल्यावर घरी जातात, तेव्हा मेंदू हलका होतो. हात कामाला लागलेले असतात, तर हृदय आनंदाने भरलेले असते आणि माझ्या चेहर्‍यावर समाधानाचे स्मित उमलते; ते सुपीक जमिनीवर शेती सुंदर झाल्यावर एखाद्या शेतकर्‍याच्या चेहर्‍यावर उमटते अगदी तसेच.

रानी- राधिका देशपांडे
raneeonstage@gmail.com