मुलगा नको गं बाई...

    12-Jun-2025   
Total Views | 20

वंशाचा दिवा हवा’ म्हणून भारतासह जगभरात कोट्यवधी मुलींची गर्भातच हत्या करण्यात आली. मुलगी म्हणजे वंशवेलीतील अडसर, मुलगी म्हणजे कर्जाचा बोजा या बुरसटलेल्या विचारांनी जगभरात स्त्रीभ्रूण हत्येने ८०-९०च्या दशकांत अक्षरशः कहर केला. भारतासह चीनमध्येही हेच दुर्दैवी चित्र होते. पण, सध्या जगभरात ‘मुलगा नको, मुलगी हवी’ याकडे पालकांचा कल झुकताना दिसतो. यासंबंधीचा एक लेख ‘इकोनॉमिस्ट’ या आंतरराष्ट्रीय नियतकालिकात नुकताच प्रसिद्ध झाला. त्याचे शीर्षक होते – The stunning decline of the preference for having boys millions of girls were aborted for being girls now parents often lean towards them.

समाजाच्या मानसिकतेत होणारा हा बदल एकार्थी सकारात्मकच म्हणता येईल. कारण, गेली कित्येक दशके मुलींना जन्माला घालणे, हे त्या कुटुंबासाठी, पालकांसाठी जणू ओझेच समजले जाईल. मुलीचे शिक्षण, तिचा विवाह यांवर पालकांनी खर्च करायचा आणि नंतर मुलीला सासरी पाठवून द्यायचे. हे म्हणजे झाड लावायचे, जगवायचे आणि त्याची रसाळ गोमटी फळं मात्र मुलीच्या सासरच्यांनी खायची, अशी समाजातील काहींची संकुचित मानसिकता! यातूनच बेकायदेशीर गर्भलिंग निदान चाचणी आणि स्त्रीभ्रूण हत्येचे पेव फुटले. एवढेच नव्हे, तर नवजात बालिकांचाही जन्मल्यानंतर अवघ्या काही तासांत श्वास हिरावून घेण्यात आला. परिणामी, स्त्री-पुरुष लोकसंख्येच्या गुणोत्तरातील तफावत कालानुरूप वाढतच गेली आणि जगभरात सामाजिक, कौटुंबिक असमोल निर्माण झाला. मुलांची संख्या वाढल्यामुळे लग्नासाठी मुली मिळेनाशा झाल्या. विवाह रखडले. परिणामी, समाजातील कुटुंबव्यवस्था धोक्यात येऊन स्वैराचार, महिलांवरील अत्याचारांच्या घटनेत लक्षणीय वाढ झाली. एकट्या भारताबाबत सांगायचे झाल्यास, २००० साली दर एक हजार पुरुषांमागे स्त्रियांचे प्रमाण हे ९३२ इतके होते, तर २०२५ साली ही स्थिती सुधारून हेच प्रमाण एक हजार पुरुषांमागे ९५२ स्त्रिया इतके हे प्रमाण नोंदवण्यात आले आहे. याचाच अर्थ, गेल्या काही वर्षांतील जनजागृती आणि स्त्रीभ्रूण हत्येविरोधातील कठोर कायद्यांमुळे परिस्थिती बदललेली दिसते. चीनमध्येहीदेखील कमी-अधिक प्रमाणात हेच चित्र.

जपानमधील एका सर्वेक्षणानुसार, ज्या पालकांना केवळ एकच अपत्य हवे आहे, अशा ७५ टक्के पालकांनी मुलापेक्षा मुलगी बरी, असेच मत नोंदवले. एवढेच नाही, तर दत्तक घेतानाही दाम्पत्यांचा ओढा हा मुलांपेक्षा मुलींकडे अधिक असल्याचेही आकडेवारी दर्शविते. तसेच अमेरिका, रशिया, मेक्सिको, सायप्रस यांसारख्या काही देशांमध्ये ‘आयव्हीएफ’च्या माध्यमातून गर्भधारणा करताना दाम्पत्याला त्यांना मुलगा हवा की मुलगी हे निवडायचे स्वातंत्र्य आहे. तिथेही बहुतांशी दाम्पत्यांनी मुलांपेक्षा मुलींचीच निवड केली. याचाच अर्थ जगभरात स्त्रियांची संख्या वाढून पुरुषांची संख्या घटली, असे अजिबात होत नाही, तर पूर्वी ज्या कळ्यांना फुलण्याआधीच खुडण्यात आले, त्यांचे प्रमाण मात्र लक्षणीयरित्या कमी झालेले दिसते. ‘मुलापेक्षा मुलगीच बरी’ या दाम्पत्यांच्या मानसिकतेमागे जशी वैयक्तिक कारणे आहेत, तशीच बदलती सामाजिक, कौटुंबिक स्थितीदेखील त्यासाठी तितकीच कारणीभूत. पूर्वी मुलगा म्हणजे आपली म्हातारपणाची काठी असा एक प्रचलित समज होता. पण, हल्ली मुलगाही आपला सांभाळ करेल, याचीही पालकांना शाश्वती नसून, उलट मुली समर्थपणे आपल्या आईवडिलांची जबाबादारी घेताना दिसतात. तसेच, आजच्या आधुनिक काळात मुलगा-मुलगीही दोघेही शैक्षणिकदृष्ट्या, आर्थिकदृष्ट्या तितकेच सक्षम असल्यामुळे या लिंगभेदी दृष्टिकोनातही बदल झालेला दिसतो.

खरं तर स्त्री आणि पुरुष ही संसाररूपी रथाची दोन चाकं. अर्धनारीनटेश्वरही शिवशक्तीचाच परमोच्च संगम. त्यामुळे कुणी तर महान आणि कुणी कनिष्ठ, हा विचारच मुळी मागासलेला. तसेच, फक्त पुरुषांची किंवा फक्त स्त्रियांचीच संख्या वाढणे, हेदेखील समाजस्वास्थ्यासाठी हितकारक नाहीच. स्त्रियांची संख्या घटल्याचे परिणाम आपण अनुभवतो आहोतच. त्यामुळे ‘मुलगा नको गं बाई’ म्हणत भविष्यात लग्नासाठी मुलंच नाही, अशी स्थिती निर्माण न होवो, हीच अपेक्षा!

विजय कुलकर्णी

 एम.सी.जे पर्यंत शिक्षण. सध्या ‘मुंबई तरुण भारत’मध्ये मुख्य उपसंपादक (फीचर्स) या पदावर कार्यरत. मुंबईतील बीएमएम महाविद्यालयांमध्ये पत्रकारितेतील विषयांसाठी व्हिजिटिंग फॅक्लटी म्हणून कार्यरत. चालू घडामोडी, सामाजिक विषय, युवा पिढीला आवडेल असे लेखन आणि वृत्तपत्रातील मांडणी आणि सजावटीमध्ये विशेष रुची
'मुंबई तरुण भारत'चं व्हॉट्सअप चॅनल फॉलो करा!
अग्रलेख
जरुर वाचा
डिजिटल व्यवहारविश्वात हवे सायबर खबरदारीचे भान

डिजिटल व्यवहारविश्वात हवे सायबर खबरदारीचे भान

जगभरात भारताच्या डिजिटल प्रगतीची प्रशंसा केली जाते. ‘युनिफाईड पेमेंट इंटरफेस’ (यूपीआय)ची सेवा जगभरातील काही देशांनी स्वीकारली आहे. भारताची डिजिटल क्षेत्रातील ही प्रगती विकसित भारताच्या दिशेने टाकलेले हे स्मार्ट पाऊल म्हणावे लागेल. मोदी सरकारला नुकतीच ११ वर्षं पूर्ण झाल्याच्या निमित्ताने, सरकारच्या अनेक उपलब्धींपैकी एक असलेल्या डिजिटल व्यवहार प्रणालीचेही विशेषत्वाने कौतुक करण्यात आले. पण, अशापद्धतीने व्यवहार करताना बँक ग्राहकांनी ‘यूपीआय’ आणि ‘डिजिटल वॉलेट’ पेमेंट सिस्टममधील फरक समजून घेण्याबरोबरच खबरदारी ..

Email

admin@mahamtb.com

Phone

+91 22 2416 3121