राष्ट्रीय स्वयंसेवक संघाला 100 वर्षे पूर्ण होतील. संघाचा जन्म, जन्मापासून करावा लागलेला संघर्ष, विस्तार व आज समाजातील सर्वच क्षेत्रांवर संघाचा पडलेला लक्षणीय प्रभाव, या सार्या प्रक्रियांबाबत समाजात, राष्ट्रीय व आंतरराष्ट्रीय स्तरावरही कमालीचे कुतूहल आहे. यांसारख्या विविध विषयांवर ‘ऑर्गनायझर’चे संपादक प्रफुल्ल केतकर, ‘पांचजन्य’चे संपादक हितेश शंकर, सा. ‘विवेक’च्या संपादक अश्विनी मयेकर आणि मल्याळम दैनिक ‘जन्मभूमी’चे सहसंपादक एम. बालकृष्णन यांनी सरसंघचालक डॉ. मोहनजी भागवत यांच्याशी साधलेला हा विशेष संवाद...
रा. स्व. संघाचे स्वयंसेवक आणि सरसंघचालक या नात्याने संघाच्या 100 वर्षांच्या प्रवासाकडे आपण कसे पाहता?
डॉ. हेडगेवारांनी संघाचे कार्य खूप विचार करून सुरू केले. देशासमोर उभ्या ठाकलेल्या अडचणींवर उपाय काय असावा, हे प्रयोगांच्या आधारे निश्चित केले गेले आणि तो उपाय अचूक ठरला. संघाच्या कार्यपद्धतीनुसार काम पूर्ण होऊ शकते आणि त्या मार्गावर चालत असताना येणार्या आव्हानांवर मात करून संघ पुढे जाऊ शकतो, हे अनुभवजन्यपणे सिद्ध होण्यासाठी 1950 सालापर्यंतचा काळ लागला. त्यानंतर संघाचा देशव्यापी विस्तार आणि समाजातील स्वयंसेवकांचे एकत्रीकरण सुरू झाले. पुढील चार दशके संघाच्या स्वयंसेवकांनी समाजाच्या विविध क्षेत्रांमध्ये उत्कृष्ट पद्धतीने कार्य करून आपल्या कर्तृत्व, आपुलकी आणि नैतिकतेच्या आधारे समाजाचा विश्वास संपादन केला आणि 1990 सालानंतर या विचारसंपत्तीच्या व गुणसंपत्तीच्या आधारावर देश चालवता येतो, हे सिद्ध करून दाखवले. आता यापुढे आपले करणीय कार्य म्हणजे, हाच विचार आणि हीच गुणवत्ता स्वीकारून संपूर्ण समाजाने सर्व भेद विसरून प्रामाणिकतेने आणि निःस्वार्थ बुद्धीने देशासाठी स्वतःहून कामाला लागणे आणि देशाला महान बनवणे.
संघाच्या 100 वर्षांच्या या प्रवासात महत्त्वाचे टप्पे कोणते होते?
संघाकडे तेव्हा काहीही नव्हते. विचारांना मान्यता नव्हती, प्रचाराचे कोणतेही साधन नव्हते, समाजात केवळ उपेक्षा आणि विरोधच होता. कार्यकर्तेही नव्हते. ही सगळी माहिती संगणकात प्रविष्ट केली असती, तर त्याने भविष्यवाणी केली असती की, हा संघ जन्मताच मरण पावणार आहे. परंतु, फाळणीच्या वेळी हिंदूंच्या रक्षणाचे मोठे आव्हान होते आणि ‘संघावरील बंदी’सारखी कठीण आपत्ती ओढवली होती. तरीही संघ यशस्वीपणे त्या सगळ्यांतून बाहेर आला आणि 1950 सालापर्यंत हे सिद्ध झाले की, संघाचे काम चालणारच, वाढणारच! या पद्धतीने हिंदू समाजाचे संघटन करता येईल, हे स्पष्ट झाले. पुढे संघाचा विस्तार पूर्वीपेक्षाही अधिक झाला. 1975 सालच्या आणीबाणीच्या काळात संघाने बजावलेल्या भूमिकेमुळे या संघशक्तीचे महत्त्व समाजाच्या लक्षात आले. पुढे एकात्म रथयात्रा, काश्मीरबाबत समाजात जनजागृती, श्री रामजन्मभूमी मुक्ती आंदोलन आणि स्वामी विवेकानंद सार्धशती यांसारख्या मोहिमांद्वारे आणि सेवाकार्यांच्या मोठ्या प्रमाणात विस्तारामुळे संघाची विचारसरणी आणि संघाबद्दलची विश्वासार्हतेची भावना समाजात मोठ्या प्रमाणात विस्तारली.
1948 आणि 1975 साली संघावर जे संकट आले, त्यातून संघटना म्हणून संघ काय शिकला?
संघावरील या दोन्ही बंदीमागे राजकारण होते. बंदी लावणार्यांनाही माहीत होते की, संघामुळे काही नुकसान नाही, उलट संघामुळे फायदाच आहे. इतक्या मोठ्या समाजात स्वाभाविकपणे चालणार्या विचारांच्या स्पर्धेमध्ये आपले राजकीय वर्चस्व टिकवण्यासाठी प्रयत्न करणार्या सत्ताधार्यांनी संघावर बंदी घातली. पहिल्या बंदीच्या वेळी सर्व परिस्थिती संघाच्या विरोधात होती. संघाचा अंत होईल, असेच वाटत होते. परंतु, सर्व प्रतिकूलतेनंतरही संघ त्या बंदीतून बाहेर पडला आणि पुढील 15-20 वर्षांत पूर्ववत होऊन पूर्वीपेक्षाही पुढे गेला. संघाचे स्वयंसेवक जे फक्त शाखा चालवत होते आणि समाजाच्या उपक्रमांमध्ये फारसे सहभागी नव्हते, त्यांनी समाजाच्या विविध क्षेत्रांमध्ये सहभागी होऊन तिथे आपली भूमिका निश्चित केली. 1948 सालच्या बंदीमुळे संघाला हा लाभ झाला की, आम्ही आपल्या सामर्थ्याला ओळखले आणि समाजात व व्यवस्थांमध्ये बदल घडवून आणण्यासाठी स्वयंसेवकांनी योजनाबद्धपणे पुढाकार घेतला. संघाच्या विचारांत आधीपासूनच ठरलेले होते की, संघाचे कार्य केवळ एका तासाच्या शाखेपुरते मर्यादित नाही, तर उरलेल्या 23 तासांतील वैयक्तिक, कौटुंबिक, सार्वजनिक आणि उपजीविकेच्या क्रियाकलापांतही संघाचे संस्कार व्यक्त होणे गरजेचे आहे. पुढे 1975 सालच्या बंदीदरम्यान समाजाने संघाच्या या वाढलेल्या कार्यक्षेत्राची शक्ती अनुभवली. जेव्हा चांगले-चांगले लोकही निराश होऊन बसले होते, तेव्हा एक सामान्य स्वयंसेवकसुद्धा आत्मविश्वासाने विचार करत होता की, हे संकट दूर होईल आणि आपण सारे यातून सुखरूप बाहेर पडू. 1975 सालच्या आणीबाणीच्या काळात संघाने आपल्यावर लादलेली बंदी हा मुद्दा न बनवता, लोकशाहीच्या रक्षणासाठी कार्य केले. संघावर टीका करणार्यांनाही त्यावेळी साथ दिली. त्या काळात समाजात विशेषतः विचारवंतांमध्ये संघाची एक विश्वासार्ह वैचारिक ध्रुव म्हणून ओळख निर्माण झाली. आणीबाणीनंतर तर संघ अधिकच बलाढ्य होऊन बाहेर आला.
भौगोलिक आणि संख्यात्मक दृष्टिकोनातून संघाचा विस्तार होत गेला, तरीही गुणवत्तापूर्ण कार्य आणि स्वयंसेवकांचे दर्जात्मक प्रशिक्षण करण्यातही संघ यशस्वी ठरला. याची कारणे काय आहेत?
गुणवत्ता आणि संख्येमध्ये जर फक्त गुणवत्ता वाढवण्यावर भर दिला आणि संख्या वाढवणार नाही किंवा फक्त संख्या वाढवाल आणि गुणवत्ता जपणार नाही, तर ना गुणवत्ता टिकेल ना संख्या! ही गोष्ट लक्षात घेऊन संघाने सुरुवातीपासूनच याकडे लक्ष दिले आहे की, संघाला संपूर्ण समाजाला संघटित करायचे आहे. पण, ‘संघटित करणे’ याचा एक विशेष अर्थ आहे. एखाद्या व्यक्तीला कसे तयार करायचे? या सगळ्या व्यक्तींना संघटित करण्याची रचना कशी असावी? ‘आपण’ ही भावना कशी तयार व्हावी? यासाठी काही निकष पूर्वीपासूनच निश्चित केले आहेत. त्या निकषांवर कुठलीही तडजोड न करता, त्या निकषांना न तोडता संख्या वाढवायची आहे. याचा अर्थ लोकांना संघटनेच्या बाहेर ठेवायचे नाही. एका मोठ्या संघटनेच्या सुरुवातीच्या काळातले एक उदाहरण आहे. त्या संघटनेत मूळ समाजवादी विचारधारेचे एक व्यक्ती कार्यकर्ता झाले. त्यांना सतत सिगारेट पिण्याची सवय होती. ते प्रथमच एका अभ्यास वर्गात आले. सिगारेट तर दूरच, तिथे सुपारी खाणारासुद्धा कुणी नव्हता. ते दिवसभर बेचैन होते. रात्री झोपही लागत नव्हती. तेवढ्यात संघटनमंत्री आले आणि म्हणाले, “झोप येत नसेल तर बाहेर जाऊया, थोडा फेरफटका मारूया.” ते त्यांना घेऊन बाहेर गेले आणि सांगितले, “पुढे चौकात सिगारेट मिळेल. मनसोक्त पी आणि परत ये. वर्गात मात्र सिगारेट मिळणार नाही.” पुढे ते नवीन कार्यकर्ते तिथे टिकले, उत्तम कार्यकर्ते बनले आणि त्यांची सिगारेटही सुटली. त्यांनी त्या प्रदेशात त्या संघटनेला खूप उंचीवर नेले. व्यक्ती जशी आहे, तशी स्वीकारायची, हा लवचिकपणा आमच्याकडे (संघाकडे) आहे. पण, आम्हाला जशी हवी आहे, तशी ती व्यक्ती घडवण्याचे आत्मीयतेचे कौशल्यदेखील आमच्याकडे आहे. ती हिंमत आणि ताकद आमच्याकडे आहे. यामुळेच संख्या वाढवतानाही संघाची गुणवत्ता टिकून राहिली. आम्हाला गुणवत्ता हवी आहे. पण, आम्हाला संपूर्ण समाजालाच गुणवत्तापूर्ण बनवायचे आहे, याचे भान आमच्याकडे आहे.
संघ आजही डॉ. हेडगेवार आणि श्रीगुरुजींच्या मूळ विचारांनुसारच कार्यरत आहे. मग परिस्थितीच्या आवश्यकतेनुसार संघाने यात कसे बदल केले आहेत?
डॉ. हेडगेवार, श्रीगुरुजी आणि बाळासाहेब देवरस यांचे विचार सनातन परंपरा किंवा संस्कृतीपासून वेगळे नाहीत. सखोल चिंतन आणि कार्यकर्त्यांच्या प्रत्यक्ष प्रयोगांच्या अनुभवांमधून संघाची कार्यपद्धती ठरली आणि आजही चालू आहे. पूर्वीपासूनच त्यात पोथीनिष्ठा, व्यक्तिनिष्ठा किंवा अंधानुकरणाला कोणतेही स्थान नाही. आपण तत्त्वप्रधान आहोत. महापुरुषांच्या गुणांचे, त्यांनी दाखवलेल्या दिशेचे अनुसरण करायचे असते. परंतु, प्रत्येक देश, काल, परिस्थितीत आपला मार्ग स्वतः तयार करून त्यावर चालायचे असते. म्हणूनच नित्य आणि अनित्य यामधील विवेक असायला हवा. संघात नित्य काय आहे? एकदा बाळासाहेबांनी म्हटले होते की, “हिंदुस्थान हे हिंदू राष्ट्र आहे.” या विधानाव्यतिरिक्त इतर सर्व गोष्टी संघात बदलू शकतात. संपूर्ण हिंदू समाज हा या देशाचा उत्तरदायी समाज आहे. या देशाचा स्वभाव आणि संस्कृती ही हिंदूंचीच संस्कृती आहे. म्हणूनच हे हिंदूराष्ट्र आहे. ही गोष्ट निश्चित ठेवूनच सर्व काही करायचे आहे. स्वयंसेवकाच्या प्रतिज्ञेमध्ये आपला पवित्र हिंदू धर्म, हिंदू संस्कृती आणि हिंदू समाजाचे संरक्षण करत हिंदू राष्ट्राच्या सर्वांगीण उन्नतीसाठी काम करण्याचे उद्दिष्ट सांगितले आहे. ‘हिंदू’ ही संज्ञा व्यापक आहे. त्या चौकटीत राहून आपली दिशा कायम ठेवून देश, काल, परिस्थितीनुसार परिवर्तन करत पुढे जाण्याची पूर्ण मुभा आहे. प्रतिज्ञेमध्ये ‘मी संघाचा घटक आहे,’ असेही म्हटले जाते. ‘घटक’ म्हणजे संघ घडवणारा, संघाचे लघुरूप आणि संघाचा अभिन्न भाग. म्हणूनच वेगवेगळ्या मतांच्या लोकांना चर्चेमध्ये आपले विचार मांडण्याचे पूर्ण स्वातंत्र्य आहे. एकदा सहमतीने निर्णय झाला की, सर्वजण आपापले मत त्या निर्णयात विलीन करून एकाच दिशेने चालतात. जो निर्णय होतो, तो मान्य करायचा असतो. त्यामुळे सर्वांना कार्य करण्याचे स्वातंत्र्य आहे आणि सर्वांची दिशा एकसंध आहे. आपण नित्य गोष्टी कायम ठेवतो आणि अनित्य गोष्टी देश, काल, परिस्थितीनुसार बदलत जातो.
संघाला ज्यांनी बाहेरून पाहिले आहे, ज्यांना अनुभव नाही, त्यांना संघटनेचा ढाँचा समजतो. पण, इतकी लांब यात्रा करत असताना विचार विमर्श आणि आत्मचिंतनाची प्रक्रिया कशी असते?
त्याची एक पद्धत तयार करण्यात आलेली आहे. ज्यामध्ये उद्दिष्ट आणि आशय निश्चित आहे. पण, तो आशय पोहोचवण्याची पद्धत वेगवेगळी असू शकते. संरचना बदलू शकते. परंतु, त्या संरचनेच्या आत काय आहे, ते ठाम आणि अढळ आहे. परिस्थितीबरोबरच मनःस्थितीचाही महत्त्वाचा भाग असतो. म्हणूनच आपल्या प्रशिक्षणांमध्ये देशाची स्थिती, आव्हाने इत्यादींचा विचार केला जातो. त्याचबरोबर त्या संदर्भात स्वयंसेवक कसा असावा, संघटना कोणत्या गुणांच्या आधारावर उभी राहते, स्वतःमध्ये त्या गुणांचा विकास करण्यासाठी आपण काय करतो, यांचाही विचार केला जातो. प्रार्थनेमध्ये आपल्या सामूहिक संकल्पाचे आणि प्रतिज्ञेमध्ये प्रत्येक स्वयंसेवकाच्या वैयक्तिक संकल्पाचे दररोज स्मरण केले जाते. स्वयंसेवक म्हणजे ‘स्वतःपासून प्रारंभ करणारा,’ असा त्याचा अर्थ आहे. ‘संघाचा घटक’ या शब्दाचा अर्थ आहे, ‘जसा मी आहे, तसाच संघ आहे आणि जसा संघ आहे, तसाच मी आहे.’ जसे समुद्रातील प्रत्येक थेंब समुद्रासारखाच असतो आणि त्या सर्व थेंबांनीच समुद्र तयार होतो, तसेच हे ‘एक’ आणि ‘पूर्ण’ यांचे नाते संघात सुरुवातीपासूनच आहे. स्वयंसेवकाचे आत्मचिंतन सतत चालू असते. यशाचे श्रेय संपूर्ण संघाचे असते. अपयश आल्यास मी कुठे कमी पडलो? हे प्रत्येक स्वयंसेवक स्वतःला विचारतो. हाच संघाच्या स्वयंसेवकांचा प्रशिक्षणाचा मूलभाव आहे.
समाज बदलला, जीवनशैली बदलली, मग आजच्या परिस्थितीत संघाची दैनंदिन शाखा पद्धत तितकीच प्रभावी आहे का किंवा यासाठी काही पर्यायी व्यवस्थादेखील आहे का?
शाखेच्या कार्यक्रमांचे पर्याय असू शकतात आणि त्यांना आम्ही स्वीकारतो. पण, ‘शाखा’ हे जे तत्त्व आहे; एकत्र येणे, सद्गुणांची सामूहिक उपासना करणे आणि दररोज मनामध्ये हा संकल्प जागवणे की आपण मातृभूमीसाठी काम करत आहोत, परमवैभवासाठी काम करत आहोत, हा जो पाया आहे, एकमेकांशी भेटणे, सहकार्य करणे हे मूलभूत आहे, याला पर्याय नाही. सामान्य माणूस सामान्य असतो. तो असामान्य तेव्हाच होतो, जेव्हा तो जोडलेला असतो आणि मग तोच सामान्य माणूस असामान्य काम करतो, असामान्य त्याग करतो. पण, त्यासाठी एक वातावरण असावे लागते आणि त्या वातावरणाशी जोडलेले असले पाहिजे. उदाहरण आणि आत्मीयता हेच परिवर्तनाचे खरे कारण आहे, दुसरे काही नाही. जगात कुठेही जा, जेव्हा जेव्हा परिवर्तन होते, तेव्हा एक मॉडेल असते; ज्यामध्ये प्रथम स्वतःमध्ये परिवर्तन करावे लागते आणि ते पाहून इतरांमध्ये परिवर्तन होते. हे दूर राहून होत नाही. आप्त असावे लागते, जवळ असावे लागते. महापुरुष खूप आहेत, आपण त्यांना ओळखतो, त्यांच्याप्रति श्रद्धा आणि सन्मानही आहे. पण, मी ज्या व्यक्तीच्या संगतीत असतो, तो जसा चालतो, मी तसाच चालतो. मी तेच करतो, ज्याची संगत मला लाभलेली असते. माझा स्वतःचा मित्र पण माझ्यापेक्षा थोडा चांगला असेल, तर मी त्याचेच अनुकरण करतो. हेच परिवर्तनाचे सिद्ध झालेले तंत्र आहे. या तत्त्वामध्ये अजूनपर्यंत कोणताही बदल झालेला नाही आणि तोपर्यंत शाखेचे दुसरे कोणतेही ‘मॉडेल’ नाही. कार्यक्रम आणि इतर सगळे बदलू शकते, शाखेची वेळ बदलते, वेश बदलतो. शाखेमध्ये वेगवेगळ्या प्रकारचे कार्यक्रम करण्याची मुभा पूर्वीपासूनच आहे. पण, शाखेला पर्याय नाही. शाखा कधीही अप्रासंगिक होत नाही. आज आपल्या ‘शाखा मॉडेल’बद्दल प्रगत देशांतील लोक येऊन अभ्यास करत आहेत, त्याबद्दल विचारपूस करत आहेत. दर दहा वर्षांनी आपण चिंतन करतो की, काही दुसरा पर्याय आहे का? अशा चिंतनांमध्ये मी आजपर्यंत सहा ते सात वेळा सहभागी झालो आहे. पण, जे आपल्याला करायचे आहे, ते करणारा कोणताही पर्याय आजपर्यंत सापडलेला नाही.
संघ वनवासी क्षेत्रात कशाप्रकारे विस्तारतो आहे?
वनवासी क्षेत्रातील पहिले काम म्हणजे जनजाती बांधवांना सक्षम बनवणे, त्यांची सेवा करणे. त्यानंतर हेही जोडले गेले की, त्यांच्या हितांचे रक्षण करण्यासाठी प्रयत्न करणे. मात्र, आमची इच्छा आहे की, जनजाती समाजातून असे नेतृत्व उभे राहावे, जे आपल्या समाजाची चिंता करील आणि ‘आम्ही संपूर्ण राष्ट्रजीवनाचा अविभाज्य भाग आहोत,’ हे समजून समाजाला पुढे नेईल. या क्षेत्रांमध्ये काम करणार्या स्वयंसेवकांची संख्या वाढत आहे. जनजाती म्हणजे कोण? त्यांच्या मूळ जडणघडणी काय आहे? जनजाती समाजातून निर्माण झालेले महापुरुष, स्वातंत्र्यसंग्रामात योगदान देणारे जनजाती नायक या सर्व बाबतीत त्यांना शिक्षित करत हळूहळू राष्ट्रीय सुरात बोलणारे, योगदान देणारे कार्यकर्ते आणि नेतृत्व त्या ठिकाणी उभे राहावे, यासाठी प्रयत्न सुरू आहेत. ईशान्य भारताबरोबरच इतर जनजाती भागांमध्येही संघाच्या शाखांची संख्या वाढते आहे.
भारताच्या शेजारील देशांमध्ये हिंदूंवर अत्याचार होत आहेत, त्यांना प्रचंड हिंसेला सामोरे जावे लागते. हे पाहता, जगात मानवाधिकारांची चिंता वाहणारे लोक हिंदूंवरील अत्याचाराबाबत तितकेच संवेदनशील आहेत का? संघाच्या प्रतिनिधी सभेतही हा विषय मांडण्यात आला. या विषयावर आपले काय मत आहे?
सगळ्या हिंदूंची चिंता तेव्हाच करता येईल, जेव्हा इथला हिंदू समाज सशक्त बनेल. कारण, हिंदू समाज आणि भारत देश हे एकमेकांशी जोडलेले आहेत. हिंदू समाजाचे उत्तम स्वरूप भारतालाही एक महान देश बनवेल आणि जो स्वतःला भारतात ‘हिंदू’ म्हणत नाही, त्यालाही सोबत घेऊन चालू शकेल. कारण, तोदेखील मूलतः हिंदूच आहे. भारतातील हिंदू समाज सामर्थ्यवान झाला, तर जगभरातील हिंदूंनाही आपोआपच सामर्थ्य प्राप्त होईल. हे काम सुरू आहे. पण, अजून पूर्ण झालेले नाही. हळूहळू ती स्थिती निर्माण होत आहे. बांगलादेशमध्ये हिंदूंवर झालेल्या अत्याचारांविषयी यावेळी जितका आक्रोश व्यक्त झाला, तसा याआधी कधीच झाला नव्हता. इतकेच नव्हे, तर तिथल्या हिंदूंनी हेही ठामपणे सांगितले आहे की, ते पळून जाणार नाहीत, तर तिथेच राहून आपले हक्क मिळवतील. आता हिंदू समाजाचे अंतर्गत सामर्थ्य वाढत आहे. एक प्रकारे संघटन वाढत आहे आणि त्याचे परिणाम आपोआप दिसून येतील. तोपर्यंत त्यासाठी संघर्ष करावा लागेल. जगात जिथे-जिथे हिंदू आहेत, तिथे त्यांच्या हितासाठी हिंदू संघटनेच्या नात्याने आपली मर्यादा राखून जे काही करता येईल, ते सर्व काही करण्यासाठीच संघ आहे. स्वयंसेवकाची प्रतिज्ञाही आहे - ‘धर्म, संस्कृती आणि समाजाचे संरक्षण करून राष्ट्राची सर्वांगीण उन्नती करणे.’
जागतिक व्यवस्थेत लष्करी शक्ती, राष्ट्रीय सुरक्षा आणि आर्थिक शक्ती यांचे स्वतःचे महत्त्व आहे. संघाचे याबद्दल मत काय?
बलशाली होणे हे अपरिहार्य आहे. संघाच्या प्रार्थनेत एक ओळ आहे, ‘अजय्यां च विश्वस्य देहीश शक्तिं.’ अर्थात, आपल्यावर कोणीही विजय मिळवू शकणार नाही, इतके सामर्थ्य आपल्यात असलेच पाहिजे. सुरक्षेच्या बाबतीत आपण कोणावरही अवलंबून राहू नये. आपली सुरक्षा आपण स्वतः करायला हवी; आपल्याला कोणीही जिंकू शकणार नाही; संपूर्ण जग एकत्र आले, तरी आपल्याला हरवू शकणार नाही; इतके सामर्थ्य आपल्याकडे असले पाहिजे. कारण, जगामध्ये काही दुष्ट प्रवृत्तीचे लोक आहेत, जे स्वभावानेच आक्रमक आहेत. सज्जन व्यक्ती केवळ सज्जनतेमुळे सुरक्षित राहत नाही. सज्जनतेसोबतच शक्तीही आवश्यक आहे. केवळ शक्ती असेल, पण दिशा नसेल, तर ती हिंसेचे कारण बनते. म्हणूनच शक्तीसोबत सज्जनतेची जोड आवश्यक आहे. या दोघांची साधना आपल्याला करावी लागेल. भारत अजेय व्हावा. ‘परित्राणाय साधूनां विनाशाय च दुष्कृताम्’ असा सामर्थ्यवान देश व्हावा. जेव्हा दुसरे कोणतेही उपाय उरत नाहीत, तेव्हा दुष्टतेला शक्तीच्या बळावर नष्ट करावेच लागते. पण, त्याचवेळी जर स्वभाव सज्जन असेल, तर रावणाचा संहार करून त्याच्या जागी विभीषणाला राजा बनवून आपण परततो, असा विचार असतो. हे सर्व आपण करत आहोत ते जगावर आपली छाप पाडण्यासाठी नाही, तर सर्वांचे जीवन निरोगी, समर्थ व सुरक्षित व्हावे यासाठी. आपणास सामर्थ्यसंपन्न व्हावेच लागेल. कारण, आपल्या सीमांवर आपण दुष्ट लोकांच्या दुष्टतेचा अनुभव घेत आहोत.
भारताच्या भाषिक, सांस्कृतिक आणि धार्मिक विविधतेचा विचार करता, संघ सर्वसमावेशकतेला कसे प्रोत्साहन देतो?
संघात येऊन पाहा. इथे सर्व भाषा, पंथ, संप्रदायाचे लोक आनंदाने एकत्र येऊन संघात कार्य करतात. संघाचे गीत फक्त हिंदीमध्येच नाही, तर अनेक भाषांमध्ये आहेत. प्रत्येक भाषेत संघ गीत गाणारे गायक, गीतांची रचना करणारे कवी आणि संगीत तयार करणारे संगीतकार आहेत. तरीही संपूर्ण भारतभर संघ शिक्षा वर्गांमध्ये दिली जाणारी तीन गीते सर्वत्र गायली जातात. सर्वजण आपापल्या वैशिष्ट्यांना जपून एक राष्ट्रीयत्वाचा सन्मान आणि संपूर्ण समाजाची एकता याची जाणीव ठेवून कार्य करतात. हाच संघ आहे. इतक्या विविधतेने भरलेल्या समाजाला एका सूत्रात बांधणारे सूत्र आम्ही देतो.
संघ सामाजिक समरसतेचे विचार मांडतो आणि त्यानुसार कार्यही करतो. पण, काही लोक आहेत, जे समानतेचा पुरस्कार करतात. तेव्हा समरसता आणि समानता या दोन्ही संकल्पनांमधील फरकाकडे तुम्ही कसे पाहता?
समानता आर्थिक, राजकीय आणि सामाजिक क्षेत्रात यावी लागते, अन्यथा तिचा काही अर्थ राहत नाही. बंधुभाव हीच समरसता आहे. स्वातंत्र्य आणि समता यांचा आधारसुद्धा बंधुता आहे. समता जर स्वातंत्र्याशिवाय आली, तर ती संकुचित होते आणि जर ती टिकवायची असेल, तर तिला बंधुभावाचा आधार लागतो. हाच बंधुभाव म्हणजे समरसता आहे. समतेसाठी एक पूर्वअट म्हणजे समरसता. जात-पात आणि अस्पृश्यतेविरुद्ध कायदे झाले, तरी विषमता जात नाही. कारण, ती मनात असते. ती मनातून काढून टाकायला हवी. ‘सर्वजण आपले आहेत, म्हणून आपण सारे समान आहोत,’ असे मानणे आवश्यक आहे. दिसायला समान नसले, तरी आपण एकमेकांचे आहोत, आपुलकीने जोडलेले आहोत, यालाच ‘समरसता’ म्हणतात. प्रेमभाव, बंधुभाव यालाच ‘समरसता’ म्हणतात.
संघातील महिलांच्या सहभागाबाबत नेहमीच प्रश्न उपस्थित केले जातात. याविषयी काय सांगाल?
संघाच्या प्रारंभीच्या काळात, सुमारे 1933 सालच्या सुमारास ही व्यवस्था झाली की, महिलांमध्ये व्यक्तिमत्त्व विकास आणि समाज संघटनाचे कार्य ‘राष्ट्र सेविका समिती’मार्फतच केले जाईल. ही व्यवस्था आजही चालू आहे. जेव्हा ‘राष्ट्र सेविका समिती’ सांगेल की, संघानेही महिलांसाठी हे कार्य करावे, तेव्हाच आम्ही त्या दिशेने जाऊ. दुसरी गोष्ट म्हणजे, संघाची शाखा पुरुषांसाठीचा कार्यक्रम आहे. त्या कार्यक्रमांना पाहण्यासाठी महिलांना यायला हरकत नाही आणि त्या येतातही. पण, संघाचे कार्य केवळ कार्यकर्त्यांच्या आधारावर चालत नाही. आमच्या माता-भगिनींचा हात लागतो, तेव्हाच संघ चालतो. संघ स्वयंसेवकाच्या घरात जितक्या महिला असतात, तितक्याच महिला संघामध्ये आहेत. विविध संघटनांमध्येही महिला स्वयंसेवकांबरोबर मिळून काम करतात. संघाच्या ‘अखिल भारतीय प्रतिनिधी सभे’च्या बैठकीतही त्यांचे प्रतिनिधित्व आणि सक्रिय सहभाग असतो. या महिलांनी भारताच्या महिलांचे पहिल्यांदाच व्यापक सर्वेक्षण केले, ज्याला शासनानेही मान्यता दिली आहे. त्यांच्याच नेतृत्वाखाली मागील वर्षी संपूर्ण देशभर मोठमोठी महिला संमेलने संपन्न झाली, ज्यामध्ये लाखो महिलांनी सहभाग घेतला. या सर्व उपक्रमांमध्ये राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे समर्थन आणि सहकार्य होते. आमचे मत आहे की, महिलांचा उद्धार पुरुष करू शकत नाहीत. महिलाच स्वतःचा स्वतःचा उद्धार करतील आणि त्यातून सर्वांचाच उद्धार होईल. म्हणूनच आम्ही त्यांना प्रमुखत्व देतो आणि त्या जे करू इच्छितात, त्यासाठी त्यांना सक्षम बनवतो.
संघाच्या शताब्दी वर्षात ‘पंच परिवर्तना’चा संकल्प करण्यात आला आहे. यासंदर्भात काही कार्ययोजना तयार करण्यात आली आहे का? आणि या आधारावर पुढे काय करता येऊ शकते?
आचरणात बदल होण्यासाठी मनाचा भाव आवश्यक आहे. ज्या कामांमुळे मनाचा भाव बदलतो, स्वभाव बदलतो, ते काम द्यायला हवे. त्यामुळे जीवनही सुधारते. म्हणून ‘पंच परिवर्तना’ची चर्चा आहे. पहिले म्हणजे सामाजिक समरसता. आपल्या समाजात प्रेम निर्माण व्हावे. समाज वेगवेगळा आहे, वेगवेगळ्या अवस्थांमध्ये आहे, वेगवेगळ्या भौगोलिक भागांत आहे आणि समस्याही वेगवेगळ्या आहेत. एक नियम जो तुमच्यासाठी बनला, तो माझ्यासाठीही बरोबर असेलच असे नाही. देश इतका मोठा आहे की, त्यातून मार्ग काढायचा असेल, तर जे जे नियम बनवायचे आहेत, ते मनापासून बनवले गेले पाहिजेत. तेव्हा ते टिकतील आणि प्रेम वाढेल. सामाजिक समरसतेचा व्यवहार करायचा आहे. यात फक्त सामाजिक समरसतेचा प्रचार करायचा नाही. समाज वेगवेगळे प्रकार मानतो, त्यात आपण एक गोष्ट मानतो, सगळे माझे मित्र असले पाहिजेत, माझ्या कुटुंबाचे मित्र असले पाहिजेत. जिथे आपला प्रभाव आहे, तिथे मंदिर, पाणी, स्मशान हे एकसारखे असले पाहिजेत, हा प्रारंभ आहे आणि याला पुढे नेणे गरजेचे आहे.
दुसरे म्हणजे कुटुंब प्रबोधन, जे काही जगाला आधार देणारे परंपरागत संस्कार आहेत, जे आपल्या कुल-रीतींमध्ये आणि देशाच्या रीती-नीतींमध्ये आहेत, त्यावर चर्चा करून त्यावर सहमती होऊन तो आचरणात कुटुंबात आणणे, हेच कुटुंब प्रबोधन आहे.
तिसरे म्हणजे पर्यावरणाची जपणूक. पर्यावरणासाठी अनेक आंदोलने आणि गोष्टी चालतात. पण, स्वतःच्या घरात पाणी वाया जाते, याची काळजी न घेणे म्हणजे चुकीचे आहे. आधी हे करा. झाडे लावा, प्लास्टिक कमी करा, पाणी वाचवा. असे केल्याने समज वाढते आणि विचार चालू होतो.
चौथे आहे स्व-आधारित आचरण. आपल्या राष्ट्रीय ‘स्व’च्या आधारावर वागायला हवे. आपल्या घरामध्ये भाषा, भूषा, भोजन, भजन, भ्रमण हे सर्व आपलेच असले पाहिजेत. घराबाहेर परिस्थितीनुसार वागावे लागते. पण, घरात तर आपणच आहोत. त्यामुळे संस्कार टिकून राहतील. ‘आत्मनिर्भर देश’ व्हायचा असेल, तर आपण आपल्याच देशातील वस्तू वापरायला सुरुवात करावी. ही सवय निर्माण करावी. याचा अर्थ आंतरराष्ट्रीय व्यापार बंद करायचा नाही. त्यात संतुलन ठेवायचे आहे. माझ्या शक्यतेत ते चालू शकते, ते चालू करेन. देशाला जे आवश्यक आहे, ते काही वेळा परदेशातून आणावे लागेल. पण, ते आपल्याच अटींवर, कुणाच्या दबावाखाली नाही.
पाचवे आहे कायदा, संविधान आणि सामाजिक शिष्टाचारांचे पालन (नागरी कर्तव्य). या पाच गोष्टी घेऊन स्वयंसेवक पुढे वाढतील आणि शताब्दी वर्षानंतर याचा प्रचार शाखांमार्फत समाजात केला जाईल. आचरण बदलले, तर वातावरण बदलेल आणि वातावरणातून परिवर्तन होईल. अजूनही अनेक गोष्टी पुढे येतील, त्या हळूहळू सुरू होतील. असा विचार तर केला आहे. पाहूया काय घडते.
पुढील 25 वर्षांसाठी संघाचा काय संकल्प आहे?
संपूर्ण हिंदू समाजाला संघटित करून देशाला परमवैभव संपन्न करणे, हा संघाचा उद्देश आहे. पण, त्याच्या पलीकडे आणखी एक गोष्ट आहे की, संपूर्ण विश्वालाही असेच बनवायचे आहे. डॉ. हेडगेवारांच्या काळापासून ही दृष्टी आहे. त्यांनी 1920 साली प्रस्ताव मांडला होता की, ‘भारताचे पूर्ण स्वातंत्र्य हे आपले ध्येय आहे आणि स्वातंत्र्य भारताने जगातील देशांना भांडवलशाहीच्या मगरमिठीतून मुक्त करावे,’ असे भारतीय राष्ट्रीय काँग्रेसने म्हणावे.
संघाला 100 वर्षे पूर्ण होणे आणि 2047 साली देशाच्या स्वातंत्र्याची 100 वर्षे पूर्ण होणे, या अनुषंगाने भारत विश्वगुरू म्हणून कसा नावारुपास येईल? याविषयी काही लोक वेगवेगळ्या प्रकारे भेद निर्माण करण्याचा प्रयत्न करतील. तेव्हा या सगळ्याकडे आपण कसे पाहता?
आपली जी प्रक्रिया आहे, त्यामध्ये या सर्व गोष्टींचा विचार केला गेलेला आहे. आत्मविस्मरण, स्वार्थ आणि भेद या तीन गोष्टींशी लढत लढत आपण पुढे चाललो आहोत. आज आपण समाजाच्या विश्वासाचे पात्र बनलो आहोत. हीच प्रक्रिया पुढे चालू राहील. आपलेपणाच्या आधारावर समाजातील सर्व लोक एकसमान मानसिकतेत येतील. एक आणि एक मिळून दोन न होता अकरा होतील. भारताला संघटित आणि बलसंपन्न बनवण्याचे कार्य 2047 सालापर्यंत सर्वत्र पोहोचेल आणि ते पुढेही सतत चालू राहील. समरस, सामर्थ्यसंपन्न भारताच्या जागतिक जीवनातील समृद्ध योगदानाकडे पाहून जगातील इतर लोक त्याचा आदर्श घेण्यासाठी पुढे येतील. 1992 साली आमच्या एका वरिष्ठ कार्यकर्त्यांनी म्हटले होते की, या राष्ट्रीय स्वयंसेवक संघाकडे पाहून इतर देशांतील लोक त्यांच्या देशातसुद्धा एक राष्ट्रीय स्वयंसेवक संघ उभा करतील, ज्यामुळे संपूर्ण जगाच्या जीवनात परिवर्तन घडून येईल. ही प्रक्रिया 2047 सालानंतर सुरू होईल आणि ती पूर्ण होण्यासाठी 100 वर्षे लागणार नाहीत. पुढील 20-30 वर्षांत ती पूर्ण होईल.
संघ शताब्दी वर्षात जो हिंदू-हितैषी वर्ग आहे, जे संघाचे शुभचिंतक आहेत, या राष्ट्राचे हितचिंतक आहेत, त्यांच्यासाठी तुमचा संदेश काय असेल?
हिंदू समाजाने आता जागृत होणे अत्यावश्यक आहे. आपले सर्व भेद आणि स्वार्थ विसरून हिंदुत्वाच्या शाश्वत धर्ममूल्यांच्या आधारावर आपल्या वैयक्तिक, कौटुंबिक, सामाजिक आणि आजीविकेच्या जीवनाला आकार देत, एक सामर्थ्यसंपन्न, नीतिसंपन्न आणि सर्व प्रकारे वैभवसंपन्न भारत उभा करावाच लागेल. कारण, जग नवीन मार्गाच्या प्रतीक्षेत आहे आणि तो मार्ग देणे हे भारताचे म्हणजेच हिंदू समाजाचे ईश्वरप्रदत्त कर्तव्य आहे. कृषिक्रांती झाली, उद्योगक्रांती झाली, विज्ञान व तंत्रज्ञानाची क्रांती झाली, आता धर्मक्रांतीची गरज आहे. मी येथे ‘रिलीजन’ याच्या अर्थाने धर्म म्हणत नाही. सत्य, शुचिता, करुणा आणि तपस्या यांच्या आधारावर मानव जीवनाची पुनर्रचना होणे जगासाठी आवश्यक आहे आणि त्या वाटेचा मार्गदर्शक भारत होणे, हे अपरिहार्य आहे. संघकार्याचे महत्त्व आपण समजून घेतले पाहिजे. ‘मी आणि माझे कुटुंब’ या मर्यादेच्या पलीकडे जाऊन आपले जीवन उदाहरण बनवून सक्रियपणे समाजात सहभागी व्हावे आणि सर्वांना सोबत घेऊन पुढे जावे, ही आजची आवश्यकता आहे.