फेक नॅरेटिव्ह पसरविणाऱ्या युट्युब चॅनेलचा भाजपा गटनेते प्रविण दरेकरांकडून पर्दाफाश

    29-Jul-2024
Total Views |

Darekar
 
मुंबई- भाजपा गटनेते आमदार प्रविण दरेकर यांनी मराठा आरक्षणासंदर्भात केलेल्या विधानाचा चुकीचा वापर करून खोटा व्हिडीओ मराठी एक्सप्रेस या युट्युब चॅनेलने सोशल मीडियावर व्हायरल केला होता. त्या फेक व्हिडीओचा आधार घेत मराठा आंदोलक मनोज जरांगे पाटील यांनीही दरेकर यांच्याविरोधात वक्तव्य केले होते. जरांगेंद्वारे युट्युब चॅनेलच्या माध्यमातून कसे फेक नॅरेटिव्ह पसरविले जाते याचा पर्दाफाश आज दरेकर यांनी मुंबई पोलीस आयुक्तांची भेट घेऊन केला. पोलीस आयुक्तांकडे युट्युब चॅनेलविरोधात गुन्हा दाखल करावा, अशी मागणीही त्यांनी केली. तसेच अशा अनेक गोष्टी आहेत त्या टप्प्याटप्प्याने समोर आणणार असल्याचा गर्भित इशाराही दरेकरांनी विरोधकांना दिला.
 
मुंबई पोलीस आयुक्तांची भेट घेतल्यानंतर माध्यमांशी बोलताना दरेकर म्हणाले की, मराठी एक्सप्रेस नावाचे युट्युब चॅनेल आहे. ज्यांनी मराठा आरक्षणासंदर्भात मी केलेले विधान ज्या पद्धतीने ट्विट केले आणि ज्यावर जरांगेंनी २८ तारखेला मुंबईतील एका आमदाराला पळवून लावले असे शिक्कामोर्तब केले, त्या फेक नॅरेटिव्हचा पर्दाफाश आज मी पोलीस आयुक्तांना भेटून केला. मुंबईच्या पोलीस आयुक्तांना मराठी एक्सप्रेस या युट्युब चॅनेलवर गुन्हा दाखल करावा अशा प्रकारची मागणी केली.
३० जून रोजी समता नगरला महिलांनी पाण्यासाठी मोर्चा काढला होता.
 
मी वक्तव्य केले १७ जुलैला आणि ३० जूनचा फोटो वापरून दरेकरांची मराठा आरक्षणावर संताप व्यक्त करून हकालपट्टी केली अशा प्रकारची खोटी बातमी या मराठी एक्सप्रेस युट्युब चॅनेलने, संपादकांनी, पत्रकारांनी केली. २८ जुलैला जरांगे यांनी त्याचा पुनःरूच्चार करत मुंबईतून आमदाराला हकालले गेल्याचे म्हटले. म्हातारी मेल्याचे दुःख नाही पण काळ सोकावता कामा नये. फेक नॅरेटिव्हच्या माध्यमातून आम्ही काहीही करू शकतो, समाजाची दिशाभूल करू शकतो असा जो समज होता तो आज पुराव्यासहित पोलीस आयुक्तांना दिला.
 
मी म्हणजे मराठा समाज, माझा अपमान म्हणजे मराठा समाजाचा अपमान, मला काय बोलले की मराठा समाजाचा संताप तर आता मराठा समाजाचा संताप होता का? १७ दिवसापूर्वीचा फोटो दाखवून मराठा समाजाचा संताप म्हणून बेगडं खोटं चित्र मराठी एक्सप्रेस युट्युब चॅनेलच्या माध्यमातून दाखवून निर्माण करण्याचा प्रयत्न केला गेला. त्याची पोलखोल आज केली. हा एक पर्दाफाश आहे अशा अनेक गोष्टी आहेत त्या टप्प्याटप्प्याने वस्तुस्थिती आणि फेक नॅरेटिव्ह कशा पद्धतीने पसरवले जाते हे समाजासमोर आणि महाराष्ट्रातील जनतेसमोर आणले जाईल. आज आयुक्तांना या विषयावर मी घटनाक्रम सांगितला. कशा पद्धतीने समाजात अशा फेक नॅरेटिव्हच्यामधून संभ्रमाचे वातावरण करून जातीय तेढ निर्माण केली जाते हे निदर्शनास आणून दिल्याचे दरेकर म्हणाले.
 
दरेकर पुढे म्हणाले की, अनिल देशमुख यांच्याकडे पुरावे असतील तर त्यांनी द्यावेत. समित कदम यांनी यावर जबाब दिला आहे. फोटो तर कुणीही येतो आणि काढतो. फोटो काढला म्हणजे तो त्यांच्या जवळचा आहे असे शिक्कामोर्तब करण्याचे कारण नाही. वस्तुस्थिती काय आहे हे त्यांनी पुराव्यासहित संबंधित यंत्रणांना द्यावे. फडणवीस राज्याचे मुख्यमंत्री राहिले आहेत. ते बेजबाबदार बोलत नाहीत. अनिल देशमुख वारंवार खोट्या पद्धतीने हुलकवण्या देत असतील तर शेवटी फडणवीस यांनाही याबाबत भुमिका घ्यावी लागेल.
 
दरेकर पुढे म्हणाले की, देवेंद्र फडणवीस यांची प्रतिमा महाराष्ट्राच्या जनतेच्या मनात चांगली उभारून येत असल्याचे दिसतेय. पुन्हा जनता फडणवीसांना महाराष्ट्राचा लोकप्रिय नेता म्हणून पाहायला लागलीय त्यामुळे विरोधकांचा त्यांना खलनायक बनविण्याचा जो अजेंडा आहे तो यशस्वी होत नसल्याचे दिसतेय. आरक्षणासह इतर विषयांच्या बाबतीत लोकांच्या मनात फडणवीसांविषयी खोटी प्रतिमा उभी करण्याचा प्रयत्न होता तो धुवून निघाला आहे. आपला अजेंडा यशस्वी होत नाही म्हणून पुन्हा-पुन्हा फडणवीस खलनायक कसे आहेत असे केविलवाणे चित्र उभे करण्याचा विरोधकांचा प्रयत्न आहे परंतु तो यशस्वी होणार नाही.
 
दरेकर पुढे म्हणाले की, देवेंद्र फडणवीसांना मराठा आरक्षणात टार्गेट करण्याचा प्रयत्न होता, आम्ही तो हाणून पाडला. आम्ही मराठा समाज, आंदोलकांच्या बाजूने आहोत. परंतु आपले आंदोलन राजकारणासाठी वापरले जाऊ नये एवढीच माफक अपेक्षा आमची होती. फडणवीसांना टार्गेट करण्याचे कारण काय? त्यांनी मुख्यमंत्री असताना आरक्षण दिले, कोर्टात टिकवले, सुप्रीम कोर्टात नाकारले गेले. उद्धव ठाकरेंना ते टिकवता आले नाही. त्यांना कोणी विचारत नाही. शरद पवार चार-चार वेळा मुख्यमंत्री होते, त्यांच्या मार्गदर्शनाखाली सरकारं होती. त्यांना कुणी विचारत नाही. केवळ फडणवीसच या गोष्टीचे कर्तेधर्ते आहेत अशा प्रकारचे खोटे चित्र उभे करण्याचा प्रयत्न आहे तो आम्ही हाणून पाडल्याचेही दरेकर म्हणाले.
 
तसेच जरांगेंना राजकारणात जास्त रस दिसतोय. किती जागा लढवायच्या, कुणाला पाडायचे, निवडून आणायचे. म्हणजे तुम्ही मराठा समाजाच्या भावनांवर मजा लुटताय की काय? तुमचा मराठा आरक्षणाच्या आंदोलनाचा दृष्टिकोन बदलला आहे. सरकारने मराठा समाजाला आरक्षण दिलेय. १० टक्क्याचे आरक्षण टिकविण्याची जबाबदारी सरकारने घेतलीय. सरकार सकारात्मक असताना समाजाला वेठीस कशाला धरता. समाजाच्या भावनांचा खेळ होऊ नये. मराठा समाज आणि त्याच्या प्रश्नांसोबत आम्ही आहोत. राजकारण झाले तर आम्ही प्रत्येक गोष्टीचा पर्दाफाश केल्याशिवाय राहणार नाही, असा इशाराही दरेकरांनी दिला.
 
सुरक्षा पुरविण्याचा निर्णय समित्या घेतात
राज्यात नगरसेवक, आमदार नसणारे असे अनेक लोकं आहेत ज्यांना राज्य सरकारने सुरक्षा पुरवलेली आहे. सुरक्षा गृहमंत्री देत नसतो. सुरक्षा देण्यासंदर्भात समित्या आहेत. त्या समित्या आढावा घेऊन सुरक्षेचा निर्णय घेतात. केवळ समित कदम नाही तर अनेक आवश्यक असणाऱ्या लोकांना सुरक्षा पुरविली जाते त्याचप्रमाणे त्यांना दिली असावी. संजय राऊत यांना सुरक्षा पाहिजे ती त्यांना मिळत नाही म्हणून अशा प्रकारच्या पोटदुखीतून त्यांचे वक्तव्य आले असावे, असा टोलाही दरेकरांनी लगावला.