धर्मकारणी अहिल्यादेवी होळकरांचे काशीविश्वेश्वराप्रती योगदान!

    30-May-2024
Total Views | 257
article on Dharmakarni Ahilya Devi Holkar and Kashi Vishweshwar



खरेतर काशी विश्वनाथ मंदिर हे भारतीय सभ्यतेचे एक मोठे प्रतीक आहे आणि त्यावेळीदेखील होते आणि इस्लामिक शासकांच्या हातून ते आपल्या हातात घेणे, आपली सभ्यता स्थापन करणे आणि आपले देव-देवता आपल्या राज्यात सुरक्षित आहेत, हे दाखवून देणे, हे तितकेच महत्त्वाचे आहे, हे अहिल्यादेवी होळकर यांना त्याकाळी पटले होते.


इतिहासामध्ये अशी अनेक व्यक्तिमत्त्वे होऊन गेली, ज्यांनी आपला ठसा इतिहासाच्या विविध पानांवर उमटविला. पुरातन भारतापासून ते स्वातंत्र्यकाळापर्यंत या सगळ्या व्यक्तिमत्त्वांनी भारताच्या संस्कृतीला, इतिहासाला सभ्यतेला विविध पैलू पडले. ज्या काळात सभ्यतेची अत्यंत मोठ्या प्रमाणात वाताहत झाली होती, अशा काळात हिंदवी स्वराज्याचे स्वप्न घेऊन छत्रपती शिवाजी महाराजांनी एक अग्निकुंड सुरू केले. प्रचंड भयंकर अशा इस्लामिक वादळाला रोखण्याचे कार्य छत्रपती शिवरायांनी हाती घेतले. हे कार्य पुढे जाऊन छत्रपती संभाजी महाराज, थोरले बाजीराव पेशवे, माधवराव पेशवे, महादजी शिंदे, मल्हारराव होळकर यांसारख्या अनेक महान व्यक्तींनी हाती घेतले. छत्रपती शिवरायांनी हिंदवी स्वराज्याची स्थापना ही स्वतःचे राज्य किंवा जनतेचे राज्य निर्माण व्हावे, यासाठी तर केलीच होते. परंतु, त्यासोबतच आपली धुळीस मिळालेली सभ्यता पुन्हा एकदा प्रस्थापित व्हावी, यासाठीदेखील त्यांचे प्रयत्न होते. क्रूर इस्लामिक शासकांच्या काळात अनेक हिंदू मंदिरे पायदळी तुडविली गेली. मुद्दामहून आपल्या देवतांचा अपमान केला गेला. याच सगळ्या गोष्टी पुन्हा एकदा प्रस्थापित व्हाव्या, यासाठी अनेकांनी प्रयत्न केले. छत्रपती शिवरायांनंतर जर खर्‍या अर्थाने धर्मकार्याची पताका सक्षमपणे कोणी वाहिली असेल, तर त्या होत्या पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर. मल्हारराव होळकर यांची सून ही त्यांची ओळख आहेच, परंतु एक उत्तम शासक, एक संवेदनशील राणी आणि अत्यंत दानशूर धर्मकारणी हीदेखील अहिल्यादेवी होळकर यांची महत्त्वाची ओळख आहे.


भारतामध्ये 12 ज्योतिर्लिंगांपैकी बहुतांश ज्योतिर्लिंग ही अहिल्यादेवी होळकर यांच्या कृपेने उभी आहेत. त्यापैकी सर्वात महत्त्वाचे एक ज्योतिर्लिंग म्हणजे काशीविश्वेश्वर अर्थात उत्तर प्रदेशमधील काशी विश्वनाथाचे मंदिर. काशी विश्वनाथ मंदिराचा इतिहास हा अत्यंत रक्तरंजित आहे. मीनाक्षी जैन या ‘इंडोलॉजी’ या विषयावरील सुप्रसिद्ध लेखिका. त्यांच्या अभ्यासाप्रमाणे काशी विश्वनाथाचे मंदिर कमीतकमी सहा ते सात वेळा इस्लामिक शासकांकडून पाडले गेले आहे आणि याचा कळस हा औरंगजेबाच्या काळात गाठला गेला. क्रूर इस्लामिक शासक औरंगजेबाने 1669 मध्ये काशी विश्वनाथ मंदिर तोडण्याचे आदेश दिले. ‘या मंदिरात येथील ब्राह्मण हे ग्रंथ वाचून चुकीची शिकवण देत आहेत, म्हणून हे मंदिर पाडावे,’ असा आदेश औरंगजेबाने त्याच्या सैन्याला दिला होता. हा आदेश हस्तलिखित रुपात आजही उपलब्ध आहे. 1669 मध्ये हे मंदिर दुर्दैवाने पाडले गेले व या मंदिराच्या जागेवर ज्ञानवापी मशीद उभी करण्यात आली. त्या काळात काशी विश्वनाथ मंदिरांमधील पूजा पूर्णपणे थांबविण्यात आले. भारतातून देवत्व नाहीसे व्हायला लागले.


काशी विश्वनाथ मंदिर इस्लामिक शासकांच्या ताब्यातून मिळविण्यासाठी मराठा साम्राज्यातील अनेक धुरंधरांनी भरपूर प्रयत्न केले. माधवराव पेशव्यांनी तर महादजी शिंदे यांना काशी परत घेण्याचे आदेश दिले होते. परंतु, काही कारणास्तव हे सगळे प्रयत्न अयशस्वी ठरले. बरोबर 111 वर्षांनंतर अहिल्यादेवी होळकर यांच्या धैर्याच्या निर्णयामुळे काशी विश्वनाथ मंदिर पुन्हा एकदा उभारण्याचा निर्णय घेण्यात आला. तिवारी नावाच्या तिथल्या जागामालकाला विचारून अहिल्यादेवींनी ज्ञानवापी मशिदीच्या बाजूची जागा मंदिरासाठी वापरण्याचा निर्णय घेतला. हा निर्णय मोठ्या धाडसाचा होता. कारण, ज्या काळात स्त्रियांना बाहेर पडणेदेखील कठीण होते, त्यावेळेला या इस्लामिक हल्लेखोरांना अक्षरशः चेतावणी देणे, ही काही सोपी गोष्ट नव्हती. ज्ञानवापी मशिदीच्या बाजूच्या जमिनीवर अहिल्यादेवींनी मंदिर निर्माणाचे कार्य सुरू केले. अहिल्यादेवींनी किती दान दिले, याचा तंतोतंत आकडा इतिहासाच्या पानांमध्ये उपलब्ध नाही. परंतु, त्या काळातील इतर मंदिर बांधकामांच्या विषयी उपलब्ध असलेल्या कागदांचा अभ्यास केला, तर असे लक्षात येते की, साधारण एक लाख ते दोन लाख रुपयांच्या साहाय्याने हे मंदिर बांधले असावे. ही सर्वात मोठी गोष्ट आहे की, अहिल्यादेवी होळकर यांनी 1775 मध्ये बांधलेले हे मंदिर पूर्णपणे स्वखर्चाने उभे केले होते. आत्ता उभे असलेले आणि आत्ता दिसत असलेले काशी विश्वनाथ मंदिर साधारण 1780च्या दरम्यान अहिल्यादेवींच्या कृपेने आणि पुढाकाराने पूर्ण करण्यात आले.


अहिल्यादेवींच्या कृपेने येथे पुन्हा एकदा शिवलिंगाची पूजा सुरू झाली. भारतभरातून अनेक भाविक येथे पुन्हा एकदा येऊ लागले. देशातील विविध हिंदू शासकांनी येथे मोठ्या प्रमाणात देणग्या द्यायला सुरू केल्या. 12 ज्योतिर्लिंगांपैकी महत्त्वाचे असलेले काशी विश्वनाथ मंदिर अहिल्यादेवी होळकर यांच्या कृपेने उभे राहिले. खरेतर इतिहास बघितला तर, अहिल्यादेवी यांच्या दानशूरपणामुळे भारतातील अगदी काश्मीरपासून ते दक्षिणेतील वारंगल आंध्र प्रदेश येथील मंदिरे उभी आहेत. या मंदिरांपैकी बहुतांश मंदिरे ही शंकराची आहेत. इतिहासकारांच्या मते, अहिल्यादेवी होळकर यांनी सोमनाथाचे मंदिर बांधण्यासाठीदेखील भरपूर मोठी देणगी दिली होती. काशी विश्वनाथ मंदिरच उभे करण्यासाठी अहिल्यादेवी होळकरांनी का पुढाकार घेतला असावा, हा प्रश्न आपल्या सगळ्यांनाच पडतो. खरेतर काशी विश्वनाथ मंदिर हे भारतीय सभ्यतेचे एक मोठे प्रतीक आहे आणि त्यावेळीदेखील होते आणि इस्लामिक शासकांच्या हातून ते आपल्या हातात घेणे, आपली सभ्यता स्थापन करणे आणि आपले देव-देवता आपल्या राज्यात सुरक्षित आहेत, हे दाखवून देणे, हे तितकेच महत्त्वाचे आहे, हे अहिल्यादेवी होळकर यांना त्याकाळी पटले होते.


खरेतर काशी विश्वनाथ मंदिराचे मूळ ठिकाण हे सध्या उभ्या असलेल्या ज्ञानवापी मशिदीच्या येथे आहे आणि याचे पुरावे आता हळूहळू बाहेर येत आहेत. हिंदूंची अवहेलना व्हावी, यासाठी जिथे शिवलिंग होते, तेथेच विविध इस्लामिक शासकांनी, मौलवींनी वजूची जागा ठेवली होती. वजू म्हणजे नमाज पढण्याआधी मुसलमान जिथे पाय धुतात ती जागा. अजून एक मोठा अवशेष बघितला, तर ज्ञानवापी मशिदीकडे भला मोठा दगडी नंदी आपल्या भगवान शंकराची प्रतीक्षा करत आहे, अशा मुद्रेत बसला आहे. सध्या सुरू असलेल्या केसच्या एका व्हिडिओ इन्वेस्टीगेशनमध्ये हे स्पष्टपणे दिसून आले आहे की, ज्ञानवापी मशिदीच्या विविध भागांमध्ये मंदिरांचे अवशेष सापडले आहेत. तेथील खांब हे हिंदू पद्धतीने कोरलेले आहेत, हे दिसून येतच. पंतप्रधान मोदींच्या विशेष प्रयत्नातून काशी कॉरिडोर उभा राहिला आणि या काशी कॉरिडोरच्या उद्घाटनात पंतप्रधान मोदींनी अहिल्यादेवी होळकर यांचादेखील अत्यंत सुंदर पुतळा काशी विश्वनाथ मंदिराच्या प्रांगणात उभा केला.


आज काशी विश्वनाथ कॉरिडोरची स्थिती पाहिल्यावर आश्चर्य वाटते की, स्वातंत्र्यानंतर आपल्या सभ्यतेतील इतक्या महत्त्वाच्या मंदिराचा जीर्णोद्धार करायला 70 वर्षे उलटावी लागली. 1947 मध्ये इंग्रज जरी गेले असले, तरी इंग्रजांची मानसिकता असलेल्या सरकारने आपल्या हिंदू संस्कृतीच्या केंद्रस्थानी असलेल्या अनेक मंदिरांना दुर्लक्षित केले. काशीविश्वेश्वराची अवस्था काही वर्षांपूर्वी अत्यंत दयनीय होती. कधीकाळी स्वतःचे सर्वस्व देऊन अहिल्यादेवींनी उभा केलेल्या या मंदिराकडे जाण्याचा मार्ग अत्यंत अरुंद होता. काशीतील अनेक मंदिरे संपण्याच्या, पडण्याच्या मार्गावर होती. परंतु, पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या प्रयत्नांमुळे काशी कॉरिडोर आणि काशी विश्वनाथ मंदिर पुन्हा एकदा उभे राहिले आहे. अहिल्यादेवी होळकर यांचे कार्य तेव्हाच पूर्ण होईल, जेव्हा ज्ञानवापी मशीद जिथे उभी आहे, तिथे पुन्हा एकदा काशीविश्वेश्वर प्रस्थापित होईल.


अहिल्यादेवी होळकर यांचे कार्य सर्वार्थाने अतुलनीय आहे. धर्माची पताका जर न घाबरता न डगमगता आपल्या खांद्यावर पुढे नेली, तर आपले नाव, आपले कर्तृत्व अजरामर होते, याचे उत्तम उदाहरण म्हणजे पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर. महाराष्ट्रातील जनतेला पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर यांच्याविषयी अजून भरपूर माहिती येत्या काळात मिळावी आणि त्यांच्या कार्यातून प्रेरित होऊन आपल्या सभ्यतेची पताका पुढे नेणारी एक सक्षम पिढी तयार व्हावी, हीच काशीविश्वेश्वराच्या चरणी प्रार्थना....

- मल्हार पांडे
अग्रलेख
जरुर वाचा

Email

admin@mahamtb.com

Phone

+91 22 2416 3121