शत्रूदेशात जाऊन दहशतवाद्यांचा खात्मा करणार : परराष्ट्रमंत्री डॉ. जयशंकर
11-Jun-2025
Total Views | 8
नवी दिल्ली : “दहशतवादी पाकिस्तानमध्ये कोठेही असले, तरीही तेथपर्यंत जाऊन त्यांचा खात्मा करण्याचे भारताचे धोरण आहे,” असे प्रतिपादन परराष्ट्रमंत्री डॉ. एस. जयशंकर यांनी मंगळवारी ब्रुसल्स येथे केले. ‘पॉलिटिको’ या प्रसारमाध्यमाच्या मुलाखतीत ते बोलत होते.
परराष्ट्रमंत्री डॉ. एस. जयशंकर हे व्यापार आणि परराष्ट्रविषयक उच्चस्तरीय चर्चेसाठी युरोप दौर्यावर गेले आहेत. त्यांनी मंगळवारी बेल्जियममधील ब्रुसेल्स येथे ‘पॉलिटिको’ या प्रसारमाध्यमास मुलाखत दिली. यावेळी ते म्हणाले, “भविष्यातील कोणत्याही दहशतवादी हल्ल्यास आणि चिथावणीस प्रत्युत्तर देण्यास भारत सज्ज आहे. दहशतवादी पाकमध्ये कोणत्याही कोपर्यात असले, तरीदेखील तेथपर्यंत जाऊन त्यांचा खात्मा करण्याची भारताची क्षमता आणि धोरण आहे. दहशतवाद हा पाकच्या राष्ट्रीय धोरणाचा एक भाग आहे,” असेही परराष्ट्रमंत्री डॉ. जयशंकर यांनी सांगितले.
परराष्ट्रमंत्री डॉ. जयशंकर यांनी यावर भर दिला की, “भारतीय हवाई हल्ल्यांमुळे पाकिस्तानच्या लष्करी पायाभूत सुविधांचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे. भारतीय हवाईदलाची ‘राफेल’ लढाऊ विमाने किती प्रभावी होती किंवा इतर यंत्रणा किती प्रभावी होत्या, याचा पुरावा बघायचा असल्यास पाकचे नष्ट झालेले आणि बंद झालेले लष्करी आणि हवाईतळ बघावे,” असेही डॉ. जयशंकर यांनी नमूद केले आहे.