मंत्री चंद्रशेखर बावनकुळे संजय शिरसाटांच्या भेटीला! भेटीचं कारण काय?
11-Jun-2025
Total Views | 17
मुंबई : मंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांनी बुधवार, ११ जून रोजी मंत्री संजय शिरसाट यांची त्यांच्या मुंबईतील निवासस्थानी भेट घेतली. दरम्यान, ही भेट नेमकी कशासाठी आहे? याबाबत अनेक तर्कवितर्क लढवण्यात आले. परंतू, बावनकुळे हे केवळ चहा घेण्यासाठी घरी आले असल्याचे शिरसाट यांनी स्पष्ट केले आहे.
भेटीनंतर माध्यमांशी बोलताना मंत्री संजय शिरसाट म्हणाले की, "मंत्री चंद्रशेखर बावनकुळे हे माझे मित्र आहेत. त्यांना बऱ्याच दिवसापासून माझ्याकडे चहा घेण्यासाठी यावे असे वाटत होते. त्यांनी चहा घेतला आणि ते गेलेत. यावेळी इतर कोणतीही राजकीय चर्चा झाली नाही. ते मित्रत्वाच्या नात्याने आलेत. यावेळी नागपूरमध्ये सुलेखा कुंभारे याचा प्रकल्प सुरु असून त्यासाठी आम्हाला मदत करा, असे त्यांनी सांगितले असून आम्ही त्यांना मदत करणार आहोत."
निधीसंदर्भात नाराजी नाही!
"निधीसंदर्भात माझी कोणतीही नाराजी नाही. काल कॅबिनेटच्या आधीच माझी अजित पवारांशी भेट झाली. त्यांनी मला आश्वासन दिल्याप्रमाणे त्यांनी संबंधित अधिकाऱ्यांना निर्देश दिलेत. अर्थ विभागाने ६० टक्क्यांच्या जीआर काढला आहे. परंतू, अजून तो निधी आलेला नाही. त्यामुळे अर्थमंत्र्यांनी बसून चर्चा करावी, अशी सर्वच मंत्र्यांची अपेक्षा होती. काल अजित पवार मिश्कीलपणे बोलले असतील. पण आमची एकमेकांशी चर्चा झाली आहे. सध्या आमच्यात कोणतेही वाद नाहीत," असेही मंत्री संजय शिरसाट यांनी स्पष्ट केले.
ते पुढे म्हणाले की, "मुंबई महापालिकेसंदर्भात अद्याप कोणताही निर्णय झालेला नाही. महायूती म्हणून लढण्याची आमच्या सर्वांची मानसिकता आहे. यासंदर्भात देवेंद्र फडणवीस, एकनाथ शिंदे आणि अजितदादा बसून निर्णय घेणार आहेत," असे ते म्हणाले.
जयंत पाटलांचे पक्षात मन रमत नाही!
शरद पवार गटाचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांच्याबद्दल बोलताना ते म्हणाले की, "जयंत पाटील अनेक वर्षांपासून नाराज आहेत असे दिसते. त्यांच्या पक्षात त्यांची कोंडी होत असल्यास त्याबाबत काही कल्पना नाही. परंतू, जयंत पाटलांचे मन तिथे रमत नाही ही वस्तुस्थिती आहे," असेही संजय शिरसाट म्हणाले.