‘कॉस्मिक एनर्जी’ची किमया...

    09-Feb-2021
Total Views | 212

Cosmic Energy_1 &nbs
 
 
 
ब्रह्मांडातील ‘कॉस्मिक एनर्जी’ ही अतिविशाल असते व तिच्या प्रभावाखाली संपूर्ण ब्रह्मांडाची रचना ठरलेली असते. सूर्यमंडळात सूर्याभोवती फिरणारे ग्रह काय किंवा ग्रहांभोवती फिरणारे उपग्रह काय, हे सर्व प्रचंड अशा ऊर्जेमुळेच फिरत असतात, ज्याला आपण ‘गुरुत्वाकर्षण’ असे म्हणतो. जर आपण पाहिले तर आपल्याला असे लक्षात येईल की, निसर्गातील सर्व घडामोडी या एखाद्या अदृश्य नियमानुसार व वेळेनुसारच चालू असतात. नैसर्गिक नियम हे ठरलेले असतात व ते कुणीही मोडू शकत नाही. दिवस होणे, रात्र होणे, प्रकाश-अंधार, भरती-ओहोटी ही निसर्गाची कामे सृष्टीच्या उत्पत्तीपासूनच चालू आहेत.
 
 
अगदी नियोजनबद्ध व नियमितपणे ही सुरु आहेत. याला नियमांमध्ये ठेवणारी शक्ती म्हणजे ‘कॉस्मिक एनर्जी.’ ज्यावेळी या निसर्गाच्या नियमांच्या विरुद्ध मनुष्य किंवा इतर प्राणी वर्तन करतात, त्यावेळी ही ऊर्जा दूषित होते व मग नैसर्गिक आपत्तीला आपण आमंत्रण देतो. जगात येणारे पूर, प्रलय, भूकंप, दुष्काळ, अतिवृष्टी, अतिउन्हाळा की अतिथंडी, विविध साथींचे आजार हे याचेच फलित आहे. याचाच अर्थ मूळ नैसर्गिक ऊर्जा ही अतिशय शुद्ध असते व त्यामुळे निसर्गातील सर्व कार्ये सुरळीत चालू असतात. निसर्गात शुद्धतेला अतिशय महत्त्व आहे. जोपर्यंत शुद्धता अबाधित राहते, तोपर्यंत निसर्गातील सर्व गोष्टी सुयोग्य व निरोगी असतात. शुद्धता लोप पावते, त्याचवेळी नैसर्गिक आपत्ती ओढवतात. मानव हा निसर्गाच्याच नियमांनी बांधला गेलेला अतिसूक्ष्म भाग आहे आणि निसर्गाचे सर्व नियम मानवाला पूर्णपणे लागू होतात.
 
 
‘जे पिंडी तेच ब्रह्मांडी’ या उक्तीचा विचार केला, तर जसा निसर्ग पंचमहाभूताने बनलेला आहे, तसेच मानवी शरीर व मन हेही अग्नी, वायू, पृथ्वी, आकाश, जल या पंचमहाभूतांनीच निर्माण झालेले आहे. ब्रह्मांडात, आकाशगंगेत अनेक सूर्यमाला आहेत व ग्रह या ताऱ्यांभोवती फिरत आहेत, तसेच निसर्गातील सर्वात सूक्ष्मकण जो ‘अणू’ आहे, त्याचे विघटन केल्यावरही आपल्याला तेच दिसते की, मध्यभागी ताऱ्यासारखे एक केंद्रक (न्युक्लिअस) आहे. त्याच्या भोवताली ‘इलेक्ट्रॉन्स’ घिरट्या घालत आहेत. हे ‘इलेक्ट्रॉन्स’सुद्धा एक ठरवून दिलेल्या ‘ऑर्बिट’मध्येच केंद्रकाच्या भोवती फिरत असतात. हे सूक्ष्मतम ‘इलेक्ट्रॉन्स’ आणि त्याच्या फिरण्याला कोण हाताळत असतो? तर निसर्ग व निसर्गाची ही शुद्ध सात्त्विक अशी ऊर्जा ‘कॉस्मिक एनर्जी.’
 
 
आपल्या शरीरातही ही ऊर्जा प्रत्येक अणुरेणूत भरलेली असते. यालाच महाकाय निसर्गाचेच छोटे रूप म्हणता येईल. त्यामुळे जोपर्यंत मनुष्याच्या शरीरात ही ऊर्जा शुद्ध व सात्त्विक स्वरूपात असते, तोपर्यंत शरीराची सर्व कार्ये निसर्गाच्या नियमानुसार सुरळीत चालू असतात. परंतु, जर या ऊर्जेच्या शुद्धतेमध्ये व सात्त्विकतेमध्ये अडथळा निर्माण झाला, तर ही ऊर्जा कमकुवत होते. या ऊर्जेलाआपण ‘चैतन्यशक्ती’ म्हणतो. जर कमकुवतपणा आला, तर रोगप्रतिकारकशक्ती अशक्त होते आणि बाहेरील जंतू शरीरात प्रवेश करतात व आजार होतो. म्हणजेच बाहेरील जंतू व विषाणू हे आजाराचे कारण नसून कमकुवत चैतन्यशक्ती व रोगप्रतिकारकशक्ती हे आजूबाजूचे मुख्य कारण आहे. म्हणूनच डॉ. हॅनेमान यांनी लिहून ठेवले आहे की, Bacteria are not the cause but the result of the disease. आपण आता ही ऊर्जा कमकुवत कशी होते, ते पुढे पाहूया.
 
 
- डॉ. मंदार पाटकर
(लेखक एम.डी होमियोपॅथी आहेत.)
 
 
 
अग्रलेख
जरुर वाचा

Email

admin@mahamtb.com

Phone

+91 22 2416 3121